आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
राजकारण आणि जुगार यात फारसा फरक नाहीच. कधी कुठले फासे बदलतील आणि डाव उलटेल यचा नेम नाही. मोठ्या अपेक्षेने मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणत, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचा मुकुट शिरावर विराजमान झाल्याचे स्वप्न पाहणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना, आपले हे स्वप्न पूर्ण होणारंच याची पक्की खात्री होती.
म्हणूनच स्वप्नातच जागे झाल्याप्रमाणे ते भल्या पहाटेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी अजित पवारांसह राजभवनात पोहोचले आणि त्यांनी शपथ घेतलीसुद्धा. सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.
पण शेवटी स्वप्न ते स्वप्नच जितके खरे भासते तितक्या लवकरच ते अंतर्धान पावते. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतही हे झाले. पहाटे घेतलेली ही मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांच्यासाठी पहाटेच्या स्वप्नांप्रमाणेच अल्पायुषी ठरली.
२३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे त्यांनी शपथ घेतली आणि २६ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
अर्थात, राजकारणात कोणतीच गोष्ट शाश्वत नसते. फक्त दोन किंवा अडीच दिवसांसाठी मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे काही देशातील पहिलेच मुख्यमंत्री नाहीत. त्यांच्या आधीही असे अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेत ज्यांना अगदी काही दिवसांसाठीच किंवा तासांसाठीच मुख्यमंत्री पद ग्रहण करता आले.
कर्नाटकमध्येही भाजपच्या येडीयुरप्पांची स्थितीही नेमकी अशीच झाली होती. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात येडीयुरप्पांना अपयश आले. मात्र त्यांना हा जादुई आकडा गाठणे शक्य झाले आणि सत्तेचा डाव त्यांच्या हातून निसटला. अखेर त्यांना राजीनामा देणे भाग पडले.
येडीयुरप्पाही केवळ अडीच दिवस कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर राहिले होते.
यांच्याशिवाय सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्रीपद सांभाळणारे आणखीही काही नेते आहेत. यामध्ये उत्तरप्रदेशच्या जगदंबिका पाल यांच्या नावावर सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम आहे.
उत्तरप्रदेशचे तत्कालीन राज्यपाल भंडारी यांनी २१ फेब्रुवारी १९९८ रोजी कल्याणसिंह यांचे सरकार अल्पमतात आल्याचा दावा करत सरकार बरखास्त करण्याची घोषणा केली. फक्त घोषणा करूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी जगदंबिका पाल यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देखील दिली. मात्र कल्याणसिंह यांनी राज्यपालांच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले.
कोर्टाने दिलेल्या मुदतीत जगदंबिका पाल बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्या आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना पद सोडावे लागले. केवळ एका दिवसासाठी जगदंबिका पाल उत्तरप्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी राहिल्या होत्या.
बी. एस. येडीयुराप्पा हे कर्नाटकमध्ये फक्त अडीच दिवस मुख्यमंत्री पदावर राहिले. न्यायालयाने दिलेल्या कालावधीत येडियुराप्पा बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना तिसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले.
याआधी २००७मध्येही येडियुराप्पा फक्त ८ दिवसांसाठी मुख्यमंत्री होते. १२ नोव्हेंबर रोजी त्यांनी शपथ घेतली आणि १९ नोव्हेंबर २००७ रोजी राजीनामा दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह २३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि सोबत भाजपचा पाठींबाही काढून घेतला. त्यामुळे फडणवीस सरकार अल्पमतात आले. देवेंद्र फडणवीस यांना पदाचा राजीनामा देण्याव्यतिरिक्त गत्यंतर राहिले नाही. केवळ ७९ तासासाठी देवेंद्र फडणवीस या पदावर राहिले होते.
बिहारचे मुख्यमंत्री सतीश प्रसाद सिंह यांना तर पाच दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सतीश प्रसाद सिंह हे बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणारे पहिले दलित मुख्यमंत्री होते.
ओम प्रकाश चौटाला हे फक्त सहा दिवसांसाठी हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले होते. १२ जुलै रोजी त्यांनी शपथ घेतली आणि १७ जुलै १९९० रोजी त्यांनी राजीनामा दिला.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही कमी कालावधीत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ३ मार्च रोजी त्यांनी शपथ घेतली आणि १० मार्च २००० रोजी त्यांना राजीनामा दिला.
मेघालयमध्ये एस. सी. मारक हे १२ दिवसांसाठी मुख्यमंत्री पदावर होते. २७ फेब्रुवारी १९९८ रोजी त्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर १० मार्च रोजी राजीनामा दिला.
झारखंडच्या राज्यपालांनी शिबू सोरेन यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नसताना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पण बहुमत सिद्ध करू न शकल्याने शिबू सोरेन यांना राजीनामा द्यावा लागला. २ मार्च रोजी त्यांनी शपथ घेतली आणि १२ मार्च २००५ रोजी त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचे २४ डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुख्यमंत्री पद कोण सांभाळणार आणि त्यांचा वारसा कोण चालवणार याबाबत एकमत झाले नाही. सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी रामचंद्रन यांची पत्नी जानकी रामचंद्रन यांना आपला पाठींबा असल्याचे पत्र लिहिले.
७ जानेवारी रोजी जानकी रामचंद्रन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र अपेक्षित बहुमत गाठता न आल्याने त्यांनी राजीनामा दिला. केवळ २४ दिवसांसाठी त्या मुख्यमंत्री पदावर राहिल्या.
बिहारचे मुख्यमंत्री सितीश प्रसाद सिंह यांच्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे बी. पी. मंडल यांच्याकडे आली. मात्र हे सरकारही फार काळ तग धरू शकले नाही. फक्त ३१ दिवसांत बी. पी. मंडल यांना राजीनामा द्यावा लागला होता.
केरळचे मुख्यमंत्री सी. एच. मोहम्मद हे देखील १२ ओक्टोंबर १९७९ ते १ डिसेंबर १९७९ असे फक्त ४५ मुख्यमंत्री होते. हे सी. एच. मोहम्मद यांचे हे सरकार देखील देशातील एक अल्पायुषी सरकार ठरले.
राजकारणातील स्थिती कोणत्याही क्षणी पालटू शकते आणि याला कोणीही अपवाद असू शकत नाही, हेच यावरून दिसून येते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.