आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
संजय दत्तच्या मुख्य भूमिकेतल्या सडकचा पुढचा भाग निघावा असं त्यात काहीच नसतानाही भट परिवाराने हा सडक 2 ची निर्मिती केली. भट ग्रुप, गाण्यांनी भरलेले मेलोड्रमॅटिक आणि जवळपास अश्लील असणारे सिनेमे बनविण्यासाठी गेल्या दशकात चर्चेत राहिले. त्याआधी नातेवाईक इम्रान हाश्मीसारख्या चांगल्या अभिनेत्याची सिरीयल किसर म्हणून ओळख निर्माण करण्याचं श्रेयही त्यांनाच द्यावं लागेल.
आशिकी, आशिकी 2 सारख्या प्रसिद्ध आणि “अर्थ” सारख्या काही चांगल्या सिनेमांची निर्मितीही त्यांनी केली. भट कुटुंबातील पुढची पिढी म्हणजे पूजा भट आणि आलिया भट. पूजा भटच्या कृपेने हॉरेक्स म्हणून प्रसिद्ध झालेला प्रकार भारतीय सिनेमात आला. राजकुमारचा अभिनय आणि इतर तांत्रिक बाबींमुळें हा चित्रपट आजही आवर्जून बघावा असा आहे.
आलिया भटने टिपिकल नेपोटीझमच्या उदाहरणात भर घालणारी एन्ट्री केली पण नंतर उडता पंजाब, राझी, गली बॉय यांसारख्या सिनेमांतून तिच्या दर्जेदार अभिनयाची ओळख करून दिली.
एकंदर काय, तर भट ग्रुपच्या चौकटबद्ध आणि दर्जाहीन कारकिर्दीत फक्त नेपोटीझमचं प्रोडक्ट या लेबलमुळे आलिया भटसारख्या चांगल्या अभिनेत्रीचं नुकसान होऊ नये असं वाटत होतं. पण सडक 2 सिनेमा करण्याचा निर्णय घेऊन तिने ते संकट स्वतःवर ओढून घेतलं.
सडक 2 अपेक्षेप्रमाणे सडक 1च्या फ्लॅशबॅकपासून सुरू होतो. जगायची इच्छाच नसलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाला आलिया भटच्या पात्रात स्वतःची मुलगी दिसायला लागते. या प्रवासात तिला सुरक्षित कैलाशला पोहोचवण्याच्या मिशनमध्ये जे घडतं ते सडक 2.
तिची सावत्र आणि एक गुरू (इच्छा नसताना पात्र करावं लागतंय असं काम करणारे मकरंद देशपांडे) यात खलनायकाच्या भूमिकेत आहेत. सडक 2 ची पटकथा बऱ्याच सिनेमातुन कॉपी करून लिहिली आहे असं वाटतं.
फेक गुरुंच्या विरोधात लढणारी मुलगी, तिला साथ द्यायला आलेला मुलगा आणि मग त्यांचं प्रेम प्रकरण, तिला थांबवायला कट रचणारे गुरू, आणि या सगळ्यात तिला सापडलेला एकमेव संरक्षण देणारा माणूस म्हणजे हा ड्रायव्हर, ज्याला, अर्थातच, अनेक गुंडांशी एकत्र लढता येत असतं.
या सगळ्याच गोष्टी आपण याआधी बघितल्या आहेत, म्हणून कथा प्रेडिक्ट करता येते, यातलं काहीच उत्सुकता वाढवत नाही. बॉलीवूडीकरण एवढ्या बोर प्रकारे केलंय की फायटिंग आणि मेलोड्रामा बघणं कंटाळवाणं वाटतं.
हातात बंदूक असताना हिरोचे डायलॉग संपेपर्यंत वाट बघणारे खलनायक आणि आधी डायलॉग आणि त्यानंतर गोळी मारणारे हिरो, असा सगळा मसाला यात आहे.
त्यात हे आपण ऑनलाइन बघत असतो, जिथे फक्त हा सिनेमा बघायला आपण पैसे भरलेले नसतात, दुसऱ्या मिनिटाला आपण वेगळं काही तरी बघायला सुरू करू शकतो.
भरमसाठ गाणे टाकून वेळ मारण्याचा प्रकार आता संपलाय. प्रेक्षक सजग होताय. हे सगळं बदललेलं असताना लेखकांनी दाखवलेला आळशीपणा या सिनेमाचं सगळ्यात जास्तं नुकसान करतोय. लिखाण नीट असतं तर “नुकतीच ओळख झालेला ड्रायव्हर मुलीला संकटांपासून वाचवतोय” ही कल्पना चांगलीच आहे.
याआधी हॉटस्टारवरच प्रदर्शित झालेल्या विद्युत जमवालच्या खुदा हाफिज सिनेमात असंच एका ड्रायव्हरचं काम अनु कपूर यांनी केलं होतं. त्यातल्या लिखाणामुळे ते पात्र किमान एंगेजिंग तरी झालं होतं. इथं संजय दत्तसारखा चांगला प्रभावशाली अभिनेता असतानाही ते जमलं नाहीये.
संजय दत्त हा मर्यादित व्हेरिएशन असलेला अभिनेता आहे, एखादा चांगला दिगदर्शक त्याच्या शरीरयष्टीचा, पर्सनॅलिटीचा आणि लोकांच्या मनात असलेल्या त्याच्या प्रभावाचा चांगला उपयोग करून घेऊ शकतो. जसं याआधी अग्निपथ 2, पानिपत, शूट आउट ऍट लोखंडवाला या सिनेमात झालंय.
पण इथं हे हत्यारच वापरता येत नसल्याने संजय दत्त उगाच स्क्रीनवर दिसतोय असं वाटतं. आलिया भटला इतक्या चांगल्या भूमिकांमध्ये बघितल्यानंतर या सिनेमात मात्र ती सुट्टीवर गेली आहे आणि उगाच वेळ घालवायला अभिनय करते आहे असं वाटतंय.
तिचा अभिनय चांगला असला तरी तिच्या वाट्याला विशेष काही येऊ नये याची चांगली खबरदारी लेखक आणि दिग्दर्शकांनी घेतली आहे.
जिशु सेनगुप्ता या दर्जेदार बंगाली अभिनेत्याने आलियाच्या वडिलांच्या पात्राचं काम चांगलं केलं आहे. सावत्र आईच्या पात्राला आपण एक अत्यंत तर्कहीन सिन भयंकर लाऊड पद्धतीने साकारताना बघतो. डोक्याला लावलेल्या लाल रंगाचं काय कारण असावं हे विचार करतच आपण बोर होतो.
काळी लिप्स्टिक, काळी साडी असं स्टार प्लसमधून उचलून आणलेल्या खलनायिकेचं पात्र आणि त्यांचा तो टिपिकल बंगला हे हास्यास्पद वाटतं.
हा सिनेमा प्रवासाशी निगडित आहे. याआधी कारवाँसारख्या सिनेमात आपण प्रवासामुळे बघायला मिळणारं सुंदर केरळ बघितलं होतं. इथं ती ही मजा नाही. फायटिंग सीन्स, वेशभूषा, कॅमेरा, म्युजिक या सगळ्याच विभागात ठरवून चौकटबद्धपणा आणलाय असं वाटतं. व्हिलन स्क्रीनवर आला की लाऊड सितार, इमोशनल सिन असला की मंद व्हायोलिन असा सगळाच तोचतोचपणा दिसतोय.
अंधश्रद्धेच्या विरोधात भाष्य करणारा हा सिनेमा एका अर्थाने मानसिक आजारांकडे अत्यंत अशिक्षित लोकांसारखं बघायला लावतो. संजय दत्तची मानसिक अवस्था, जीवावर उदार होऊन मारामारी करण्यासाठीची सकारात्मक प्रेरणा म्हणून दाखवली आहे.
सुशांतच्या आत्महत्येनंतर सुरू झालेल्या नेपोटीझमच्या चर्चेत मुकेश भट आणि महेश भट यांचीही चौकशी झाली. त्यानंतर घराणेशाहीचा पुरस्कार करणाऱ्या सगळ्याच सिनेमांवर आणि सेलिब्रिटींच्या ट्विटर, इन्स्टाग्रामवर प्रेक्षकांनी बराच राग काढला.
कुठलाही सिनेमा तोट्यात गेला तर फक्त त्या सेलिब्रिटीचं नुकसान होत नाही तर त्यांच्यावर आधारलेल्या चांगल्या कलाकारांचाही त्यात तोटा होता. म्हणून जर घराणेशाही मिटवायची असेल तर फक्त हिरोचं नाव बघून सिनेमा बघायला न जाता, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, लेखक यांची नावं ही क्रेडिट्समध्ये आवर्जून बघण्याची सवय लावायला हवी. सिनेमाला आपण अजून जास्त सजग प्रकारे बघायला हवं.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.