आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
२०२४ सुरु होऊन पंधरवडा उलटून गेलाय, राज्यातील आणि देशातील परिस्थिती पाहता हे वर्ष राजकारण आणि निवडणुकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. येत्या एप्रिल-मे महिन्यांत लोकसभा निवडणूका तर त्यानंतर लगेचच सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांमध्ये राज्य विधानसभेच्या निवडणूका लागण्याची शक्यता आहे. निवडणूका नसल्या तरी राज्यातलं राजकीय वातावरण सतत तापलेलं असतं. पक्षांतरं, सत्तांतरं, बंड, आरोप-प्रत्यारोप या सर्व राजकीय घटकांमुळे वातावरण ढवळून निघत असतं. आता तर निवडणुकांचं वर्ष आहे म्हटल्यावर अनेक अनपेक्षित उलथापालथी होण्याच्या शक्यता आहेत.
कदाचित पुढचं राजकारण आणि निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊनच काल (दि. १४ जानेवारी) दक्षिण मुंबईमधील काँग्रेसचे नेता मिलिंद देवरा यांनी शिंदे गटाच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. मिलिंद देवरा यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात केंद्रीय शिपिंग राज्यमंत्री तसेच माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून काम केले आहे, तर ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. इतकंच नाही तर २००४ साली १० हजार मताधिक्याने आणि २००९ साली १ लाखांहून अधिकच्या मताधिक्याने ते निवडून खासदार म्हणून निवडून आले.
त्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर मात्र देवरा कुटुंबाच्या ५ दशकांच्या पक्षनिष्ठेबद्दल चर्चा होत आहे. मिलिंद देवरा हे काँग्रेसचे दिवंगत नेता मुरली देवरा यांचे सुपुत्र असून मिलिंद देवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले होते. त्यांच्या सर्वांत महत्त्वपूर्ण कामांपैकी एक म्हणजे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर बंदी आणणे. मुंबईच्या राजकारणात देवरा कुटुंबाचं काय राजकीय महत्त्व होतं यावर प्रकाशझोत टाकण्याचा हा प्रयत्न..
मिलिंद देवरा यांनी काल सकाळी आपल्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले ५५ वर्षांचे हितसंबंध संपवून काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याने ते हेडलाईन्समध्ये झळकत होते. राजीनामा देण्याची घोषणा करताच, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यांना ट्विटर अर्थात X वर आठवण करून दिली की त्यांचे वडील पक्के काँग्रेसी होते, जे बिकट परिस्थिती येऊनही पक्षासोबत राहिले.
मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा, एक यशस्वी उद्योगपती आणि नंतर यशस्वी राजकारणी. २०१४ साली त्यांचे निधन झाले. त्यांना पक्षांतर्गत मानाचे स्थान होते. त्यांना ‘किंगमेकर’ आणि ‘दक्षिण मुंबईला काँग्रेसचा बालेकिल्ला बनवणारा नेता’ म्हणून ओळख मिळाली होती. त्यांनी देशाच्या आर्थिक राजधानीचे महापौर म्हणूनही काम केले होते. त्यानंतर ते केंद्रीय पेट्रोलियम मंत्री बनले. सलग पाच वर्षे ते या पदावर होते, त्या राजकीय परिस्थितीत अशी संधी हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत लोकांनाच मिळत असे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रीपद, मुंबईचे महापौरपद अशी महत्त्वाची पदे भूषवून देखील ‘मुरली देवरा’ लोकांच्या लक्षात राहिले ते त्यांच्या धुम्रपानविरोधी मोहिमेमुळे. २००१ साली मुरली देवरा यांनी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल केली. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली.
न्यायालयाच्या निर्णयानुसार, घटनेच्या कलम २१ अन्वये जीवनाच्या मूलभूत अधिकाराची हमी सर्वांना देण्यात आली आहे, धूम्रपान करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी जायचे आहे म्हणून धूम्रपान न करणार्या व्यक्तीला विविध जीवघेण्या आजारांनी ग्रासले जाऊ नये हा या निर्णयामागील उद्देश होता. सार्वजनिक ठिकाणांमध्ये रुग्णालये, सार्वजनिक वाहतूक, ग्रंथालये आणि अशाच इतर सार्वजनिक ठिकाणांचा समावेश आहे. याच जनहित याचिकेने अल्पवयीन मुलांना सिगारेट विकण्यावर बंदी घातली होती. त्यांना लोक ‘मुरलीभाई’ म्हणून ओळखत असत.
१९६८ साली २५ पैसे देऊन काँग्रेसचे प्राथमिक सदस्य बनले आणि यानंतर आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. महानगरपालिकेच्या राजकारणात उतरणे ही त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात होती. मुरली देवरा यांचा प्रभाव राजकीय वर्तुळाच्या पलीकडे उद्योग विश्वात देखील होता. धीरूभाई अंबानींसारख्या व्यक्तींशी असलेले त्यांचे सौहार्द आणि गांधी घराण्याशी अतूट निष्ठा हे त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचे पैलू बनले.
मुरली देवरा चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते, त्यापैकी तीन वेळा त्यांची राज्यसभेत देखील वर्णी लागली होती. १९७० च्या दशकात मात्र काँग्रेसला राष्ट्रीय आणि प्रांतीय स्तरावर धक्का बसला. जनता पक्षासोबत प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक फ्रंटची स्थापना करून शरद पवार वेगळे झाले, तो काळ महाराष्ट्रातील काँग्रेससाठी आव्हानात्मक होता. त्याचवेळी मंत्रिपदाची कोणतीही आकांक्षा नसतानाही, मुरली देवरा यांनी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारली, हेच पद त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ सांभाळले. आपल्या पश्चात दक्षिण मुंबईच्या प्रतिनिधीत्वाची जबाबदारी त्यांनी मुलगा मिलिंद यांच्याकडे सोपवली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.