आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
अमृता प्रीतम हे साहित्य विश्वातील एक असे नाव आहे, ज्यापासून कोणीही अनभिज्ञ नाही. आयुष्यभर आपल्या तत्वांवर निस्सिम श्रद्धा असलेल्या अमृताला तिच्या खऱ्या प्रेमापासून कायमच वंचित रहावं लागलं.
प्रेम आणि स्त्रीवादाच्या भोवताली त्यांच्या साहित्याकृतींनी जन्म घेतला. आपल्या प्रेम भावनेला व्यक्त करण्यास त्या कधीच कसूर करत नव्हत्या, आपल्या प्रेम भावनेची शुद्ध अभिव्यक्ती करणाऱ्या अमृतांचे वैशिष्ट्य होते.
भारतात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या संकल्पनेची पायाभरणी अमृता प्रीतम यांनीच केल्याचं मानलं जातं.
पंजाब प्रांतातील पहिली महिला साहित्यिक अशी ख्याती अमृतांनी मिळवली, अशा या विविधांगी गुणांनी आणि वैशिष्ट्यांनी नटलेल्या अमृता प्रीतम यांच्या जीवन प्रवासावर आपण दृष्टिक्षेप टाकूया.
अमृता प्रीतम यांचा जन्म १९१९ साली पंजाबच्या गुजरांवाला येथे झाला होता. त्या ११ वर्षाच्या होत्या त्यावेळीच त्यांच्या डोक्यावरून मातृछत्र हरपले. त्यांचं बालपण लाहोरमध्ये गेलं, त्याच ठिकाणी त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते आणि उरलेल्या वेळात कवितांची रचना करायचे, इतकंच नाही त्यांच्या वडिलांनी शीख धर्माच्या प्रचाराचे काम देखील केले होते.
बालपणापासूनच आपल्या साहित्यिक वडिलांचा सहवास लाभल्यामुळे त्यांच्यातील प्रतिभा खुलत गेली. तारुण्यात त्यांच्यातील बुद्धिप्रामाण्यवादी भावनेने पकड घेण्यास सुरुवात केली आणि त्यांची ईश्वरावरील श्रद्धा ढळत गेली. पुढे त्या निरीश्वरवादी बनल्या. खरंतर त्यांची श्रद्धा लयास जाण्यास त्यांच्या आईचा अकाली मृत्यू देखील कारणीभूत होता.
आईच्या मृत्यूनंतर अमृतावर घराची जबाबदारी येऊन पडली होती, त्या जबाबदारीला निभावण्यासाठी त्यांनी कविता, कथा आणि निबंध लेखन करण्यास फार कमी वयातच सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी पंजाबी भाषेत लेखन करण्यास सुरुवात केली.
लहानपणापासूनच त्यांचे विचार पुरोगामी होते, त्यांनी सदैव अस्पृश्यतेचा धिक्कार केला होता.
लहानपणी त्यांच्या आजीच्या घरी मुसलमानांना वेगळ्या भांड्यात जेवण दिलं जायचं, याचा अमृतांना सुरुवातीपासूनच तिटकारा वाटायचा, पुढे ही भावना वाढतच गेली. त्यांना धार्मिक भेदभाव अजिबात रुचत नव्हता.
१९४७ साली देशाची फाळणी झाली त्यावेळी असंख्य लोकांप्रमाणे अमृता यांना देखील पिडेचा सामना करावा लागला. अमृता यांना त्यांचे लाहोरचे घर सोडले आणि त्या दिल्लीत येऊन स्थायिक झाल्या.
त्यांनी देशाच्या फाळणीला फार जवळून बघितले होते, त्यावेळीचे दुःख सदैव त्यांच्या मनात होते, यातूनच त्यांच्या अजरामर साहित्याकृतीत फाळणीच्या काळातील दुःखद आठवणींचा उल्लेख नेहमीच आढळून येत असतो. याच काळात त्यांनी पंजाबी बरोबर हिंदीत लेखन करण्यास सुरुवात केली होती.
त्यांच्या लेखणीत अशी जादू होती की वयाच्या १६व्या वर्षी त्यांचे लिखाण प्रकाशित होऊ लागले. त्यांचा पहिला संग्रह १९३६ साली प्रकाशित झाला, याचे अमृत लहरा असे नाव होते. त्याच वर्षी त्यांचा विवाह झाला आणि अमृता कौरच्या अमृता प्रीतम झाले.
लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली, पण त्यांचं वैवाहिक जीवन चांगलं राहिलं नाही आणि त्यांनी नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला.
१९४३ साली त्यांचे ६ काव्य संग्रह प्रकाशित झाले, यात बहुतांश प्रेमकविता होत्या. प्रेमावर साहित्य निर्मिती करणे हा त्यांचा आवडीचा विषय असला तरी कालांतराने त्यांच्या शैलीत बदल होत गेले व त्यांच्या साहित्यामध्ये मानवी भावना, दुःख आणि जीवन यांना स्थान मिळू लागले.
कविता करत असताना १९४३ साली बंगालच्या दुष्काळात होरपळलेल्या लोकांच्या दुःखद कथा देखील अमृतांच्या लेखणीतून उतरल्या. त्या कवयित्री बरोबरच एक धारधार लेखक म्हणून देखील प्रसिद्धीस येऊ लागल्या.
१९४० पासूनच त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आणि काही काळ रेडिओ स्टेशनवर नोकरी देखील केली. १९५० साली त्यांनी ‘पिंजर’ ही सर्वोत्तम कादंबरी प्रकाशित केली, ही एका हिंदू मुलीची कथा होती जिचे नाव होते पुरो.
भारताच्या फाळणीचा काळात घडलेल्या कथेत एका मुस्लिमाकडून अपहरण झाल्यावर पुरोला तिच्या आयुष्यात सामना कराव्या लागलेल्या अडचणींचे वर्णन करण्यात आले आहे. ही कादंबरी फार प्रसिद्ध झाली आणि पुढे त्यावर सिनेमा देखील आला.
१९६१ सालापासून त्या आकाशवाणीच्या पंजाबी विभागात कार्यरत झाल्या, याच काळात त्यांनी स्त्रीवादी लेखन करायला सुरुवात केली. त्यांनी लिहिलेल्या ‘काल चेतना’, ‘रसीदी तिकीट’, ‘काला गुलाब’ आणि ‘अक्षरों की छाया’ या साहित्याकृतींना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
साहिरसोबतची अधुरी प्रेम कथा
१९४४ साली अमृता साहिर लुधियानवींना भेटल्या आणि त्या त्यांच्या आकंठ प्रेमात बुडाल्या, त्यांनी कधीही त्यांचे साहिर यांच्यावर असलेले प्रेम कधीच लपवले नाही.
अमृता म्हणतात की साहिरच्या शब्दात अशी जादू होती की मी त्यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.
त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की त्या साहिरच्या प्रेमात इतक्या बुडाल्या होत्या की त्यांनी एकदा कागद आणि पेन घेऊन फोटो काढण्यासाठी पोज दिली तर त्यांनी संपूर्ण कागदावर ‘साहिर साहिर’ लिहून ठेवलं होतं.
पण जितकं प्रेम साहिर यांच्यावर अमृता यांचे होते, तेवढं साहिरचे अमृतांवर इतके प्रेम नव्हते. साहिर यांच्या आयुष्यात अनेक महिला येऊन गेल्या त्यापैकी अमृता एक होत्या. १९५० साली साहिर यांचं दुसऱ्या एका महिले सोबत असलेले प्रेम प्रकरण उजेडात आले आणि अमृता यांना जबर धक्का बसला.
पुढे या धक्क्यातून सावरत त्यांनी अनेक वर्ष एकांतात काढली. यानंतर साहिर यांची त्यांच्या आयुष्यातील कमतरता भरून काढण्यासाठी ‘इमरोज’ आले.
अमृता आणि इमरोज यांचे प्रेम चांगले फुलत गेले. त्यांनी एकमेकांशी लग्न केले नाही पण आयुष्याची चाळीस वर्षे एकमेकांच्या सानिध्यात काढली. ३१ ऑक्टोबर २००५ साली अमृता यांचे निधन झाले. पण आपल्या साहित्यामुळे त्या अजरामर झाल्या.
अमृता यांना त्यांच्या अप्रतिम साहित्यासाठी असंख्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले. १९५६ साली त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला तर १९८२ साली त्यांना त्यांची रचना ‘कागज ते कॅनव्हास’ या साहित्याकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अमृता या २० व्या शतकातील भारतीय साहित्य सृष्टीच्या एक तेजस्वी तारका होत्या, त्यांच्या कलाकृती व त्यातून जिवंत करण्यात आलेल्या प्रेमाच्या आणि स्त्रीत्वाच्या भावनेने अनेकांना मोहून टाकले आहे. आजही लोक त्यांच्या साहित्याचे चाहते आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.