आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
२५ जून १९७५.
ही तारीख म्हणजे देशात घडलेल्या आणिबाणीच्या चित्तथरारक काळाची आठवण करुन देणारा दिवस. याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आणि या आणीबाणीच्या आगीत संपूर्ण देश होरपळून निघाला. परंतु पंतप्रधान इंदिरा गांधींना आणीबाणी का जाहीर करावी लागली याची अनेक कारणं सांगितली जातात.
त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे म्हणजे राजनारायण.
वय वर्ष ६९ असणारे राजनारायण हे तब्बल ८० वेळा तुरुंगात जाऊन आले होते. स्वातंत्र्यापूर्वी ३ वर्षे आणि स्वातंत्र्यानंतर १४ वर्षे असा सुमारे १७ वर्षांचा काळ त्यांनी तुरुंगात काढला. इतका काळ तर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनीसुद्धा तुरूंगात घालवला नव्हता.
राजनारायण हे ते व्यक्तिमत्त्व, आहे ज्यांच्यामुळे इंदिरा गांधी यांना भीतीपोटी आणीबाणी लागू करावी लागली. राजनारायण हे भारतीय इतिहासातील एक हुशार आणि कार्यतत्पर नेते होते. ते कुणालाही मदत करायला कधीही, काळवेळेचं भान न ठेवता हजर असायचे.
१९६० च्या दशकाच्या शेवटी तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी या देशातील सर्वांत ताकदवान व्यक्ती बनल्या होत्या. कॉंग्रेसच्या भल्या भल्या नेत्यांना त्यांनी पाणी पाजलं होतं. विरोधीपक्ष अत्यंत दुर्बल स्थितीत होता. अशी परिस्थिती असतानाच इंदिरा गांधींनी १९७१ मध्ये पुन्हा निवडणूकीत विजय मिळवला.
यावेळी तर कोणत्याही मोठ्या नेत्याला यांच्या विरोधात जाण्याच धाडस झाले नाही. असं असूनही राजनारायण हे इंदिरा यांच्या विरोधातच गेले नाही तर त्यांनी इंदिराजींच्या सर्व विरोधकांना एकत्रसुद्धा केलं. एका खटल्यात जर राजनारायण यांनी इंदिरा गांधींना कोर्टात खेचून त्यांचा मुकाबला केला नसता तर आपल्या देशात १९७१ मध्ये ना आणीबाणी लागली असती ना इंदिरा गांधींना १९७७ मध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला असता.
फार पूर्वी डॉ. युगेश्वर कल्हन यांचे पुस्तक आले होते ‘आणीबाणीचा धूमकेतू: राजनारायण’ या नावाचं. त्यावेळी राजनारायण आणि इंदिरा गांधी दोघेही जिवंत होते. ते पुस्तक काही वर्षांपूर्वी पुन्हा प्रकाशित झाले. पुस्तकात असं म्हटलं आहे की, राजनारायण यांनी इंदिरा गांधींविरोधात सर्वत्र लढा दिला. म्हणजे संसदेत आणि रस्त्यावरही. निवडणुकीच्या क्षेत्रात आणि कोर्टातही. इंदिरा गांधींना विरोध करण्यात ते कुठेच मागे हटले नाहीत.
१९६९ मध्ये ज्या समाजवादी लोकांना असं वाटत होतं की इंदिराजी योग्य काम करीत आहेत त्यांचा सपशेल अपेक्षाभंग झाला होता. १९७१ च्या निवडणुकीत रायबरेली मधून इंदिराच्या विरोधात मजबूत उमेदवार उभे करण्याचं ठरलं. पण त्यावेळेस कोणीही तयार नव्हते. ना चंद्रभानू गुप्ता तयार नव्हते ना चंद्रशेखर यांची हिंमत झाली.
इंदिरा यांच्या विरोधात लढण्यास जेव्हा इतर दिग्गज नेते मागे सरकले तेव्हा राजनारायण यांनी त्यांच्याविरोधात उभे राहत संयुक्त सोशलिस्ट पक्षाकडून आपला निवडणूक अर्ज दाखल केला.
१९७१ च्या निवडणुकीत राजनारायण यांना पराभव स्वीकारावा लागला आणि इंदिरा गांधी विजयी झाल्या. निवडणूक जिंकण्यासाठी राजनारायण हे इंदिराजींच्या सर्व चुकीच्या गोष्टींवर लक्षच ठेऊन होते. या सगळ्या गोष्टींना त्यांनी घटनात्मक आणि असंवैधानिक स्वरूप दिले. त्यांनी इंदिराजींच्या काळात झालेला एकूण एक भ्रष्टाचार शोधून काढला आणि त्यांना कोर्टात खेचलं. यावेळी त्यांनी इंदिराजींवर एकूण सात आरोप लावले. हा खटला बराच काळ चालला. एकदा स्वत: इंदिरा गांधी यांना कोर्टात हजर होऊन स्पष्टीकरण द्यावे लागले आणि नंतर त्यावर सहा तास त्यांची चौकशी करण्यात आली.
अखेर पाच वर्षांनंतर या खटल्याचा निकाल आला. त्यावेळी इंदिरा गांधींनी न्यायाधीशांवर आपल्या दहशतीने दबाव आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता पण अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहन लाल सिन्हा यांना इंदिराजींच्या दाबावाची पर्वा नव्हती.
इंटेलिजन्स ब्युरोचा एक अधिकारी (आयबी) अलाहाबादमध्ये निर्णय काय येणार याचा शोध घेण्यासाठी तैनात केला होता. पण न्यायाधीश सुद्धा त्यांच्या पुढचे होते, न्यायाधीशांनी टायपिस्टला आपल्या घरी बोलावले. निर्णय घेतला आणि टाईप करणाऱ्याला निकाल जाहीर झाल्यानंतरच बाहेर सोडलं.
जगमोहन लाल सिन्हा यांनी इंदिरा गांधींची रायबरेली निवडणूक बेकायदेशीर घोषित केली. त्यांच्यावर सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली होती.
पुपुल जयकर यांनी इंदिराजींच्या चरित्रामध्ये असे लिहिले आहे की इंदिराजींनी आपल्या विरोधात निर्णय येऊ शकतो अशी भीती व्यक्त केली होती. हा निर्णय १२ जून १९७५ ला आला आणि त्याच्या १४ व्या दिवशी इंदिराजींनी देशव्यापी आणीबाणी लागू केली.
आणीबाणीच्या काही तासांतच राजनारायण यांना सर्वात पहिले अटक करण्यात आली. त्याच दिवशी जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, सत्येंद्र नारायण सिन्हा आणि अटलबिहारी वाजपेयी यांना देखील अटक करण्यात आली. देशभरात हजारो लोकांना तुरूंगात टाकण्यात आले. अर्थात इंदिराजींवर इतक्या वाईट रीतीने दहशत निर्माण करणारी व्यक्ती म्हणजे राजनारायण, ज्यांच्यामुळे हे पाऊल उचलावे लागले. पण इंदिरा यांच्या या निर्णयामुळे विरोधकांना एकत्र येण्याची संधी मिळाली.
१९७७ मध्ये जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी काढून टाकली आणि निवडणुका झाल्या, तेव्हा राजनारायण पुन्हा रायबरेली इथे यांच्या विरोधात होते. यावेळी त्यांनी इंदिराजींचा दारुण पराभव केला. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत इंदिराजींचा ज्या व्यक्तीने खरोखर पराभव केला आहे ते एकमेव व्यक्ती म्हणजे राजनारायण होय.
१९७७ मध्ये प्रथमच कॉंग्रेस सोडून इतर पक्ष केंद्रात सत्ता चालवत होता. जनता पक्षाचे सरकार विरोधाभासांमुळे झपाट्याने कोसळले, परंतु कॉंग्रेसच्या चळवळीला देशात नवीन ऑक्सिजन मिळाला.
अलीकडेच राजनारायण यांच्या स्मरणार्थ त्यांच्या समर्थकांनी दिल्ली येथे एक चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी सर्वांनी लोकबंधूची आठवण केली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि कार्यावर चर्चा झाली. यावेळी क्रांती प्रकाश म्हणाले की जनता पार्टीच्या राजवटीत जेव्हा राजनारायण आरोग्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी तत्काळ गरिबांना उपचार व ऑपरेशनसाठी आर्थिक मदत देण्यास सुरवात केली. दिल्ली सरकारी रुग्णालयांची नावे बदलली.
राजनारायण हे समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. एकदा त्यांच्या नात्यात थोडासा कडवटपणा देखील आला पण राजनारायण यांनी या गोष्टीवर एका खास मार्गाने मात केली. राजनारायण १९६२ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. ५२ वर्षानंतर ते प्रथमच विधानसभेबाहेर गेले.
ही परिस्थिती पाच वर्षे कायम राहणार होती. अशा परिस्थितीत लोहिया यांना नकोसे झाल्यानंतरही त्यांनी ६२व्या वर्षी राज्यसभा निवडणुक लढवली इतकंच काय तर जिंकली सुद्धा. लोहियांना हे अजिबात आवडलं नव्हतं. त्यांनी कबूल केले की राजनारायण यांनी तत्त्वांविरूद्ध चुकीची कामे केली होती. लोहियांनी राजनारायण यांच्याशी बोलणे थांबविले. त्यांच्या घरी जाणेसुद्धा थांबवले. हे सर्वांनाच ठाऊक होते की जर लोहिया यांनी एकदा कोणाशी संबंध तोडले तर ते पुन्हा कधीच जोडणार नाहीत.
राजनारायण यांनी लोहियांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण लोहिया मात्र नरमले नाहीत. यानंतर त्यांना एक खास युक्ती शोधून काढली. ते राज्यसभेतून बाहेर पडल्यानंतर लोहिया ज्या गेटमधून बाहेर पडायचे त्या गेटवर बसून असत. जेव्हा ते हे करतच राहिले तेव्हा लोहियाजींना आपली हार पत्करावी लागली. नंतर ही नाती पुन्हा पूर्ववत झाली.
लोहिया यांच्याविषयी रामकमल राय यांनी आपल्या राम मनोहर लोहिया या पुस्तकात असे म्हटले आहे की लोहिया जी म्हणत असत की, राजनारायण जिवंत आहे तोपर्यंत देशातील लोकशाही मरणार नाही.
नेताजी म्हणजेच राजनारायण दलितांचे प्रेमी कसे होते याची आठवण देताना लोकनीती मोहिमेशी संबंधित वकील संजीव उपाध्याय हे सांगतात की त्यांच्या नेतृत्वात बनारसमधील काशी विश्वनाथ मंदिरात दलित आणि अनुसूचित जातींच्या प्रवेशासाठी आंदोलन करण्यात आले होते.
त्यांचे दरवाजे गरजूंसाठी नेहमीच खुले असायचे. ते दिल्लीत राहत असताना कोणीही रिकाम्या हाताने परत जायचा नाही. क्रांती प्रकाश म्हणतात, राजनारायण कायमच एक साधारण आयुष्य जगले. ते सामान्य कपडे घालत असत. त्यांच्या जीवनात कुठलाच ऐशोआराम नव्हता. पण त्यांना वेगवेगळे पदार्थ खायची मात्र प्रचंड आवड होती. त्यांच्याकडे जे काही पैसे आले ते त्यांनी गरिबांमध्ये वाटून टाकले. त्यांनी स्वत: साठी कधीही एक पैसाही साठवला नाही.
शेवटी जेव्हा जनता पार्टी फुटली तेव्हा ते प्रथम चरणसिंगचे सहाय्यक झाले आणि नंतर त्यांच्या विरोधात मतदानात घडवण्यात त्यांनी उडी घेतली. नंतर नंतर मात्र त्यांचे राजकीय सहकारी त्यांना टाळू लागले. त्याच सहकार्यांनी त्यांना भारतीय राजकारणाचा विदूषकही म्हटले. परंतु हे खरे आहे की त्यांनी लोकशाही मूल्यांवर कधीही तडजोड केली नाही.
राजनारायण फकीराप्रमाणे जगातून निघून गेले. ३१ डिसेंबर १९८६ रोजी त्यांचे निधन झाले. घर, जमीन, बँक-बॅलन्स असं काहीच ज्यांच्याकडे मृत्यूसमयी नव्हतं असे राजनारायणजी नक्कीच एक आदर्श नेते होते यात दुमत नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.