आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
महाराष्ट्रातील रत्नांची खाण म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे रत्नागिरी. रत्नागिरी म्हटल्यावर डोळ्यासमोर येतो तो निळाशार दर्या, रुपेरी वाळू, खाडी, विविध समुद्र पक्षी-प्राणी, हिरवीगर्द वनराई, खोल दऱ्या-धबधबे, गरम पाण्याचे झरे, प्रसिद्ध मासळीची व्यंजने अन् फळांचा राजा ‘आंबा’! येथील विविध नैसर्गिक व भौगोलिक कुतुहलामुळे जगभरातील पर्यटक आकर्षित होत असतात. इथे आलेला प्रत्येकजण इथल्या निसर्गात हरवून जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची भूमी तसेच मौर्य, सातवाहन, चालुक्य, शिलाहार, शालिवाहन, कलचुरी व यादव यांच्या सत्तांची आठवण करून देणारे जलदुर्ग व किल्ले आणि म्यानमार देशाच्या राजाचा महाल रत्नागिरीच्या इतिहासाची साक्ष देत आहेत.
ज्यांचे नाव इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले अशा महापुरुषांची जन्मभूमी तसेच कर्मभूमी असलेल रत्नागिरी मनावर वेगळंच स्फुरण चढवते. एकेकाळी ‘मनीऑडरवर जगणारा जिल्हा’ म्हणून हिणवले गेलेले रत्नागिरी, खरे पाहता आपल्या नैसर्गिक, भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक रत्नांनी संपन्न आहे.
इतिहासामध्ये रत्नागिरीचा उल्लेख हा चौथ्या शतकापासून आढळून येतो. पण रत्नागिरीचा इतिहास याहीपेक्षा जुना आहे. याचा पुरावा म्हणजे दोन दशकांपूर्वी शोध लागलेल्या पेट्रोग्लिफ्स अर्थातच कातळशिल्प.
पेट्रोग्लिफ्स म्हणजे अश्मयुगीन मानवाने खडकांवर कोरलेली शिल्पं होय. मानवी कलेची सुरुवात अश्मयुगातून सुरु होते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पेट्रोग्लिफ्स आहेत. पेट्रोग्लिफ्स या शब्दाचा उदय ग्रीक भाषेत आहे. petra म्हणजे दगड आणि glypho म्हणजे वक्र.
आदिमानवाचा ‘होमो सेपियन’ म्हणजेच पूर्ण मानव हा अश्मयुगाच्या पॅलेओलिथिक म्हणजे उत्तरअश्म कालखंडात झाला. हा कालखंड सर्वसाधारणपणे पंचवीस हजार ते दहा हजार वर्षे मागचा मानला जातो. ज्याचा प्रारंभ चाळीस हजार वर्षांपूर्वीच झाला असे मत मांडले जाते. या कालखंडात सर्वसामान्यपणे हवामान हे थंड होते त्यामुळेच वनस्पती खुरट्या होत्या. रेनडिअरसारख्या प्राण्यांचे कळप सर्वत्र वावरत. तेव्हा मानवाने नैसर्गिक गुहांचा वापर निवासासाठी केला. त्याचं काळात खडकांवर कोरीव चित्रकाम किंवा नक्षीकाम केले जाऊ लागले.
तज्ज्ञांच्या मते अश्मयुगातला मधला कालखंड, मेसोलिथिक (मध्यअश्मयुग) कालखंड. याच कालखंडात पर्जन्यमान हळूहळू वाढू लागले, त्यामुळे गवताळ जंगलांची वाढ होऊ लागली. जीवसृष्टी सध्यासारखी झाली तेव्हा मानव उघड्यावर किंवा तळ्याच्या काठी कातडी तंबूत निवारा करू लागला. याच कालखंडात पेट्रोग्लिफ्सची निर्मिती झाली असावी. या कालखंडात मानव एका जागी स्थिर नव्हता नव्हता, पशुपालन करणाराही नव्हता. शिकार व नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या फळांवर-कंदावर व धान्यावर आपलं पोट भरत होता. रत्नागिरी भागात सापडणारे पेट्रोग्लिफ्स याच कालखंडातील असल्याचे मानले जाते.
तसे पाहता रत्नागिरीतील पेट्रोग्लिफ्सच्या शोधाची कथा तशी रंजकच आहे.
१९८० च्या दरम्यान सुधीर रिसबूड नावाचा एक शाळकरी मुलगा रत्नागिरी जवळील ‘निव्हाळी’ या गावी सायकलवरून फिरत असताना रस्त्याच्या कडेला खडकांवर अगम्य असें भूमितीय आकार, कलात्मक वक्र व एक केंद्री वर्तुळे असणारे कोरीव काम तो कुतूहलाने न्याहाळत असे. हे विचित्र आकार काहीतरी विशेष आहेत असे छोट्या सुधीरला नेहमी वाटे. परंतु हे प्राचीन अश्मयुगातील शिल्पं असल्याची त्याला कल्पना नव्हती.
पुढे साधारण २५ वर्षांनंतर सुधीर इलेक्ट्रिकल इंजिनीअर झाले. त्यावेळी एक उत्साही पक्षी निरीक्षक म्हणून आपल्या मनोज मराठे व सुरेंद्र ठाकूर-देसाई या इंजिनीअर मित्रांसोबत पक्षी निरीक्षणासाठी रत्नागिरीतील वेगवेगळ्या वनांमध्ये फिरत असत. एकदा गणपतीपुळेच्या किनारपट्टी भागांतील जंगलात फिरत असताना लहानपणी निव्हाळी येथे पाहिलेल्या हुबेहूब अगम्य अशा आकृत्या तिथल्या खडकांवर दिसल्या. सुधीरला हे पाहून आश्चर्य वाटले, त्यांनी त्यांच्या मित्रांना ही गोष्ट सांगितली. “या आकृत्या कसल्या आहेत?” हा प्रश्न त्यांच्या मनात फिरू लागला. याबाबत त्यांच्या मित्रांमध्ये कोणाकडेच काही माहिती नव्हती. शेवटी आपणच याची माहिती काढूया! असे या मित्रपरिवाराने एकमताने ठरविले.
ठरवल्याप्रमाणे २०१० साली सुधीर रिसबूड, मनोज मराठे व इतर मित्रपरिवाराने मिळून ‘अडगळीवरचे कोकण ‘ नावाचा एक अनौपचारिक संशोधक गट काढला. आणि खडकांवरील आकृत्यांची माहितीचा शोध सुरु झाला. आसपासच्या गावात चर्चा करताना त्यांना लक्षात आले, नवीन रस्त्यामुळे खडकांच्या पृष्ठभागावरून कोणी जात नाही. मात्र जुन्या मंडळींना याबद्दल थोडी माहिती असल्याचे दिसले. मिळालेल्या माहितीच्या आधारे ते इतर जागांचा शोध घेऊ लागले. काही वर्षातच या गटाने रत्नागिरी जिल्ह्यातील १० भागांत ८६ चित्रे शोधून काढली. ज्यात वर्तुळाकार नक्षी असलेल्या चित्रांसोबत हरीण, हत्ती व मनुष्य प्रतिमांचाही समावेश होता.
२०१९ पर्यंत या टीमने ५२ ठिकाणी हजाराहून जास्त पेट्रोग्लिफ्स शोधल्या आहेत. सुधीर आणि त्यांच्या टीमची दखल पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र यांनी घेतली आहे. सुधीर आणि टीमने शोधलेल्या पेट्रोग्लिफ्सच्या आधारे अधिक अन्वेषण व जपवणूक केली पाहिजे यासाठी निधी उभारला असून. सध्या ही टीम स्थानिक व जिल्हा पातळीवर पेट्रोग्लिफ्सच्या संवर्धनासाठी जनजागृती करीत आहेत. रत्नागिरीच्या अनेक भागांत पेट्रोग्लिफ्ससाठी सर्वेक्षण न करता मोठ्या प्रमाणात रस्त्याचे बांधकाम व खोदकाम केले जात आहे. पेट्रोग्लिफ्सच्या संवर्धनासाठी धोक्याची बाब असून या टिमने याबाबत जनजागृतीचे काम यु*द्धपातळीवर चालू ठेवले आहे.
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या लेण्यांच्या निर्मितीचं पहिलं पाऊल म्हणजे पेट्रोग्लिफ्स आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणारं नाही. इतर संवेदनांप्रमाणे कल्पना करणे किंवा एखादी प्रतिमा प्रत्यक्षात कुठल्यातरी माध्यमात उतरवण्याची इच्छा मानवात अश्मयुगापासूनच नैसर्गिकरित्या अनुकूलित झाली असावी. रत्नागिरीच्या पेट्रोग्लिफ्सपैकी हरणाची प्रतिमा असलेल्या चित्राकडे बघून मनात सहज कल्पना येते की, त्यावेळी बघणाऱ्याच्या दृष्टीला समोर हरणांच्या कळपातील एक हरिण इतके सुंदर वाटले असावे, त्या सुंदर हरिणांची कुठंतरी प्रतिमा काढून ठेवावी अशी मनोमन इच्छा नक्कीच झाली असावी.
एका शाळकरी मुलाच्या कुतूहलामुळे रत्नागिरीतील पुरातन पेट्रोग्लिफ्स जगासमोर आले आहेत. यासाठी आपण सर्वच सुधीर रिसबूड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे ऋणी आहोत. विविध रत्नांनी समृद्ध असलेल्या रत्नागिरीच्या खजिन्यात या पुरातन कला नमुन्याचा अनमोल ठेवाही जमा झाला आहे. त्याचे योग्य असे जतन संवर्धन झाले पाहिजे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.