आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केल्याची घोषणा केली. इंदिरा गांधी १९७१ साली रायबरेली मतदार संघातून निवडून आल्या होत्या. पण त्यांच्या विरोधात उभे असलेले राजनारायण यांनी, इंदिरा गांधीनी या निवडणुकीत गैरमार्गांचा अवलंब केला असल्याचे कारण देत अलाहाबाद उच्च न्यायालयात इंदिराजींच्या निवडप्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली. यावरून इंदिरा गांधींचे पंतप्रधानपद धोक्यात आले असते. शिवाय त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूकही लढवता आली नसती.
त्याचवेळी देशात महागाईच्या कारणावरून सरकारविरोधी जनक्षोभ वाढला होती. ज्येष्ठ गांधीवादी नेते जे. पी. यांनी याविरोधात चांगलेच रान माजवले होते. जेपींनी या आंदोलनाच्या माध्यमातून सैन्याला देखील तुमच्या अंतरात्म्याला न पटणारा आदेश मानू नका असा सल्ला दिला होता.
जे. पीं.च्या याच आवाहनाचे कारण पुढे करत देशातील काही लोक सैन्यात बंडाळी माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कारण देत इंदिराजींनी राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे सांगत देशात आणीबाणी लागू केली.
आणीबाणीमुळे देशातील सर्व सत्ता पंतप्रधानांच्या हाती एकवटली गेली. लोकसभा निवडणुकांचा निर्धारित कालावधी देखील रद्द करण्यात आला. त्यामुळे अमर्याद काळासाठी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधानपदी राहतील अशी स्थिती निर्माण झाली.
२५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेली आणीबाणी १९७७ साली उठवण्यात आली. अनेक विचारवंत, लेखक, विद्वान आणि राजकारणी यांच्या मते, हा काळ देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा दमनकारी काळ होता. याकाळात लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली गेली, अनेकांना अटक करण्यात आली. जे कोणी सरकारच्या विरोधात बोलेले त्यांचा आवाज दडपून टाकण्यात येत असे. आणीबाणीच्या या काळात लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली गेली.
आणीबाणीच्या काळात ज्या काही प्रमुख घटना, घडामोडी घडल्या त्या आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आणीबाणीच्या काळात भाजपा नेत्यांची स्थिती
मोदींच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्री राहिलेले अरुण जेटली यांना आणीबाणीच्या काळात १९ महिने तुरुंगात डांबण्यात आले होते. जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या प्रसंगातील अनुभव मांडले होते. वैंकय्या नायडू यांना १७ महिने तर, रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर या नेत्यांना देखील मोठ्या कालावधीसाठी तुरुंगात डांबण्यात आले होते.
भाजपचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांना देखील तुरुंगवास सहन करावा लागला होता. अडवाणी यांना तर १९ महिने जेल मध्ये बंद राहावे लागले.
या काळात जेलमध्ये बंद असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी “अनुशासन के नाम पर अनुशासन का खून / भंग कर दिया संघ को कैसा चढा जुनून” यासारख्या कविता लिहिल्या.
भाजपा नेते सुब्रामाण्याम स्वामी यांनी शिखाचा वेश धारण करून सरकारला फसवून अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी नरेंद्र मोदी यांनीही वेषांतर करून मदत केली होती.
काँग्रेस नेत्यांची भूमिका
संजय गांधी यांचे निकटचे मित्र आणि तत्कालीन सरंक्षण मंत्री बन्सीलाल हे आणीबाणीचा कालावधी वाढवण्याच्या प्रयत्नात होते. इतकेच नाही तर यासाठी संविधानात घटना दुरुस्ती करून त्यासाठी मार्ग काढण्याचाही प्रयत्न केला गेला.
त्याचवेळी संजय गांधी यांचे घनिष्ठ मित्र आणि कॉंग्रेसी नेते विद्याचरण शुक्ल यांनी संजय गांधी यांच्या मनमानी कारभाराला अधिकच बढावा देत होते. संजय आणि इंदिरा गांधी यांच्या विरोधातील लोकांना अटकाव घालण्यासाठीही त्यांचे विशेष प्रयत्न सुरु होते.
इंदिरा गांधींच्या विरोधातील वाढता सूर दडपून टाकण्यासाठी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांनीच इंदिरा गांधीना आणीबाणी लागू करण्याचा सल्ला दिल्याचे म्हटले जाते. संविधानाचा संपूर्ण अभ्यास करून इंदिरा गांधींना कुठल्या मार्गाने निरंकुश सत्ता ठेवता येईल याचादेखील त्यांनी अभ्यास केला होता.
सरकारचा मनमानी कारभार
इंदिरा गांधींच्या नंतर राजकारणात संजय गांधीच गांधी घराण्याचा वारसा चालवतील अशी चर्चा होती. संजय गांधी यांनी आणीबाणीच्या काळात मिळालेल्या निरंकुश सत्तेचा अमाप वापर करून घेतला. सरकारमधील कितीतरी धोरणांची सूत्रे संजय गांधी यांनी स्वतःच्या हातात घेतली होती. नसबंदीचा कार्यक्रम हे एक त्यातील प्रमुख उदाहरण म्हणून देता येईल.
कुटुंब नियोजनाचा हा कार्यक्रम सपशेल अपयशी ठरला. कारण, या उपक्रमातून लोकांवर नसबंदीसाठी जबरदस्ती केली जात होती. लोकसंख्या नियंत्रणाची करणे देत १९७५-७६ या काळात देशात जवळपास २७ लाख लोकांची नसबंदी करण्यात आली. सरकारच्या या उपक्रमावर विखारी टीका होऊ लागल्या. पण, सरकारने आपला हा कार्यक्रम रद्द न करता उलट अधिक सक्तीने त्यांनी याची अंमलबजावणी सुरु केली. तेंव्हा जबरदस्तीने नसबंदी केलेल्या लोकांचा आकडा ८३ लाखावर पोचला होता.
नसबंदीसाठी कशी जबरदस्ती केली जात होती, याचे उदाहरण म्हणून काही किस्से इथे देऊ इच्छितो.
वृत्तपत्रांतून प्रसारित झालेल्या बातम्यांनुसार, दिल्लीपासून ८० किमी दूर असलेल्या उत्तावर गावात पाहते ३ वाजता पोलीस गाडी हजार झाली. त्यांनी लाउडस्पीकरवरून पुकारून गावातील लोकांना जागे केले. गावातील ४०० लोक जमा झाल्यावर त्यांना गाडीत टाकून नेले आणि त्यांची जबरदस्ती नसबंदी करण्यात आली. देशातील अनेक भागात ७० वर्षाच्या वृद्धापासून ते १८ वर्षाच्या तरुणांपर्यंत अनेकांची जबरदस्ती नसबंदी केल्याचे किस्से देखील ऐकायला मिळतात.
असाच एक किस्सा मुजफ्फरनगरचा आहे. इथे पोलिसांनी नसबंदी करण्यासाठी काही लोकांना जबरदस्ती पकडून नेले. या पकडून नेलेल्या लोकांना पोलिसांनी सोडून द्यावे अशी मागणी करण्यासाठी लोकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला असता पोलिसांनी या जमावावर थेट गोळीबार केला. ज्यात ३० लोकांचा मृत्यू झाला होता.
इंदिरा गांधीनी आणीबाणी जाहीर करताना आपल्या मंत्रीमंडळासोबत कसलीही चर्चा केली नाही. २५ जूनच्या मध्यरात्रीच त्यांनी आणीबाणीच्या आदेशावर राष्ट्रपतींच्या सह्या घेतल्या आणि सकाळी, मध्यरात्रीपासून राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी लागू केल्याचे जाहीर केले. आणीबाणी लागू केल्यानंतर तीनच तासात अनेक वृत्तपत्राच्या कार्यालयातील वीज कनेक्शन तोडून टाकण्यात आले. विरोधी पक्षाच्या नेत्यांची धरपकड सुरु झाली.
आज आणीबाणी लागू करण्याला ४५ वर्ष पूर्ण झालेत. पण आजही त्याकाळातील जखमा कितीही प्रयत्न केले तरी कॉंग्रेस पक्ष पुसू शकला नाहीये.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.