आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
स्व. इंदिरा गांधींवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. याचसाठी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला चालू होता. या खटल्याचा निर्णय त्यांच्या बाजूने लागणार नाही असेच एकूण चित्र होते. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा परिणाम रोखण्यासाठी आणि सरकार विरोधी भावना दडपण्यासाठी इंदिराजींनी आणीबाणीचा मार्ग निवडला हे तर सर्वश्रुतच आहे.
२५ जून १९७५ रोजीच्या मध्यरात्री अचानक आणीबाणी लागू करण्यात आली आणि १९७७ला उठवण्यात आली. हा २१ महिन्यांचा काळ म्हणजे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा डाग आहे. पण आणीबाणीचा सगळ्याच क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला. अभिजन वर्गापासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत सर्वांनाच आणीबाणीचे चटके सोसावे लागले. लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आल्याने कला क्षेत्राला पण याचा खूप मोठा फटका बसला.
कॉंग्रेसने मुंबईत एक रॅली आयोजित केली होती. या रॅलीमध्ये प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांना सादरीकरणासाठी आमंत्रण दिले होते. पण, कॉंग्रेसच्या मनमानी कारभाराला विरोध म्हणून किशोर कुमार यांनी या कार्यक्रमाला नकार कळवला. संजय गांधींना किशोर कुमारांचे हे वर्तन खटकले. संजय गांधी यांच्या सूचनेनुसार सरकारने किशोरदांच्या गाण्यावर बंदी घातली. त्यांनी गायलेली गाणी किंवा त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी रेडीओवरून प्रसारित करण्यासही बंदी घालण्यात आली. आणीबाणीच्या काळातील दडपशाहीचा अंदाज यायला हे एक उदाहरण पुरेसे आहे.
विरोधी पक्षातील खासदार अमृता नाहटा यांनी सरकारच्या धोरणाला लक्ष करत एक चित्रपट बनवला होता, ज्याचे नाव होते किस्सा कुर्सी का. सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या या चित्रपटावर सरकारने बंदी आणली. गुलजार यांचे दिग्दर्शन असलेला प्रसिद्ध चित्रपट आंधीच्या प्रदर्शनावरही तेंव्हा बंदी आणली होती.
देव आनंद जाहीरपणे आणीबाणी आणि सरकारी धोरणांविरोधात बोलत होते. म्हणून, त्याच्या चित्रपटांवर देखील बंदी घालण्यात आली होती. १९७८ साली आय एस जोहर यांनी नसबंदी नावाचा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात इंदिरा सरकार आणि त्यांच्या धोरणांवर टीका करण्यात आली होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर देखील बंदी घालण्यात आली होती. सलमान रश्दी यांच्या मिडनाइट्स चिल्ड्रन आणि इतर पुस्तकांवर देखील बंदी घालण्यात आली होती.
१९७५ मध्ये शोले चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या शेवटी ठाकूर गब्बरला पोलिसांच्या हवाली करतो असे दाखवण्यात आले होते. परंतु, शोलेचा हा शेवट खरा नाहीये. चित्रपटात ठाकूर आपल्या हातांनी गब्बरचा खून करतो असा शेवट होता. मात्र, चित्रपटातील ठाकूर हा पोलीस अधिकारी होता आणि पोलिसांनी अशा प्रकारे खून केलेला दाखवणे म्हणजे पोलिसांच्या हाती अमर्याद सत्ता असल्याचे समर्थन करण्यासारखे आहे. असे कारण देत चित्रपटाचा शेवट बदलण्यास भाग पाडले. हा शेवट बदलून गब्बरला पोलिसांच्या हवाली केल्याचे दाखवण्यात आले.
अर्थात, एकीकडे आणीबाणीमुळे राजकीय नेते आणि कलाकार, साहित्यिक, यांच्या अभिव्यक्तीची गळचेपी होत असली तरी, काही लोकांनी या आणीबाणीच्या निर्णयाचे कौतुक देखील केले.
अशा लोकांच्या यादीतील एक नाव होते आचार्य विनोबा भावे.
विनोबा भावे यांनी आणीबाणीचे समर्थन केले. या काळाला त्यांनी अनुशासन पर्व म्हटले होते. नागरिकांनी संयम ठेवून सरकारला या निर्णयात सहकार्य कारण्याची देखील त्यांनी आवाहन केले होते. नागरिकांनी सरकारी धोरणांना समजून घ्यावे असेही ते म्हणाले होते.
याशिवाय, सीपीआयच्या काही नेत्यांनी देखील आणीबाणीला पाठींबा दिला होता. प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग, उद्योगपती जेआरडी टाटा, आणि ओडीसाचे तत्कालीन मुख्यमंत्री नंदिनी सत्पथी यांनी देखील आणीबाणीचे समर्थन केले होते. अर्थात टाटा, सत्पथी आणि सिपीआयच्या नेत्यांना नंतर मात्र हे समर्थन दिल्याबद्दल पश्चाताप होऊ लागला.
पंजाबच्या अमृतसरमध्ये इंदिरा गांधी यांच्या या निर्णयाला तीव्र विरोध करत शीख समुदायाने मोठे आंदोलन केले होते. शिरोमणी अकाली दल आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. अमनेस्टी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आणीबाणीच्या तब्बल २० महिन्यांच्या काळात १ लाख ४० हजार लोकांना तुरुंगात टाकण्यात आले होते. यामध्ये शिखांचीच संख्या ४० हजार इतकी होती, असा अंदाज आहे.
आणीबाणीच्या या काळात केरळमध्ये नक्षलवाद जोरात उफाळून आला होता. हे नक्षलवादी पोलीस स्टेशनवर हल्ला करत असत. आणीबाणीच्या काळात पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात जोरदार कारवाई केली. अशी कारवाई करत असताना ते कुणालाही नक्षलवादी म्हणून पकडून आणत आणि त्यांचा छळ करत असत.
नक्षलवाद्यांशी संबध असल्याचे सांगत पोलिसांनी राजन नावाच्या एका विद्यार्थ्याला पकडून आणले. तसेही विद्यार्थ्यांची आंदोलने चिरडून टाकण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे सरकारी आदेश असल्याने पोलीस मारहाण करताना कसलीही गय करत नसत. राजनला देखील पोलिसांनी भरपूर मारहाण केली. राजनचा पोलीस कस्टडीतच मृत्यू झाला.
राजनच्या मृत्यूचा आघात सहन न करू शकल्याने तिच्या आईला जोराचा मानसिक धक्का बसला. त्याच्या वडिलांनी मात्र हर न मानता कायदेशीर लढाई सुरु ठेवली. कित्येक वर्षानंतर राजनवर केलेले आरोप मागे घेण्यात आले. या प्रकरणात दोषी आढळलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली.
विद्यार्थी संघटनांच्या राजकारणाला याच काळात अधिक वाव मिळत होता. जेपींच्या आंदोलनातून नितीश कुमार, लालू प्रसाद, रामविलास पासवान यासारखे तरुण पुढे आले ज्यांची आजही राजकारणावर चांगली पकड आहे. या काळात प्रसारमाध्यमांवर कडक बंदी होती. सरकारविरोधात कोणतेही वृत्त किंवा लेख प्रसारित करण्यास वाव नव्हता. मात्र, सरकारच्या या दडपशाहीला उत्तर देण्यासाठी आणि त्याविरोधात जनजागृती करण्यासाठी लोकांनी निरनिराळे मार्ग शोधून काढले.
लेखक कलाकार असलेले सफदर हाश्मी यांनी सरळ लोकांमध्ये जाऊन नाटकाचे प्रयोग सुरु केले. त्यांनी नाटकाच्या माध्यमातून सरकार विरुद्ध आवाज उठवला. यातूनच पुढे नुक्कड नाटक परंपरा निर्माण झाली.
आणीबाणीच्या काळातील या दमनशाहीने अनेकांच्या अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्यावर गदा आणली. उघडपणे काहीही बोलणे, सरकारच्या विरोधात आपले मत मांडणे हा गुन्हाच मानला जात होता. यातून सिनेकलावंतांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत कुणीही सुटलं नव्हता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.