आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
बिहारच्या राजकारणात लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख राम विलास पासवान यांची एक वेगळी ओळख आहे.
राम विलास पासवान यांनी गेल्या ३२ वर्षात १० निवडणुका लढवल्या असून त्यांना फक्त दोनदाच पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे राम विलास पासवान यांनी सहा वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात हजेरी लावली आहे.
राम विलास पासवान यांचा १९६९ पासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास फारसा यशस्वी ठरला नसला तरी, तो दुर्लक्षित करण्याजोगाही नाही. वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात त्यांनी वेगवेगळी मंत्रीपदे सांभाळली. सध्या ते नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कारकिर्दीतील कॅबीनेट मंत्री आहेत.
सध्या त्यांच्याकडे ग्राहक सरंक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय आहे.
२००० साली त्यांनी लोक जनशक्ती या नावाने स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. २००५ मध्ये त्यांच्या पक्षाच्या एकही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. तेव्हा रामविलास यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्याची वावटळ उठली.
पण, २०१४ मध्ये त्यांनी हाजीपुर मतदार संघातून विजय मिळवला आणि सिद्ध करून दाखवले की, रामविलास पासवान हे नाव अजून भारतीय राजकारणातून हद्दपार झालेले नाही. २०१९ मध्ये तर त्यांनी स्वतः निवडणूक न लढवताही त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात सामावून घेण्यात आले.
बिहारच्या खगरिया जिल्ह्यात राम विलास पासवान यांचा जन्म झाला. कोसी कॉलेज मधून त्यांनी पदवी संपादित केली. पदवीनंतर ते सिव्हील सर्विसची परीक्षा देखील उत्तीर्ण झाले. पुढे त्यांना पोलीस सेवेतील प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले.
याचवेळी ते समाजवादी नेत्यांच्या संपर्कात आले. १९६९ साली पासवान समाजवादी पक्षात सामील झाले. त्याच वर्षी ते पहिल्यांदा खासदार म्हणूनही निवडून आले. त्यांच्या या राजकीय प्रवासात ते जयप्रकाश नारायण यांच्या संपर्कात आले.
१९७४ मध्ये लोकदलाचे महासचिव म्हणून निवडले गेले. याकाळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. आणीबाणीच्या काळात पासवान यांना जेलवारी देखील करावी लागली. १९७७ साली त्यांची जेल मधून सुटका झाली आणि त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला.
यावर्षी हाजीपुर मतदार संघातून त्यांनी ४.२४ लाख इतक्या विक्रमी मतांच्या फरकाने लोकसभा निवडणूक जिंकली. त्यांच्या इतक्या मोठ्या फरकाने निवडून येण्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने देखील घेतली.
या संपूर्ण प्रवासात पासवान एक दलित नेते म्हणूनच पुढे आले होते. १९८३ साली त्यांनी दलित सेनेची स्थापना केली. ही संघटना पूर्णतः दलितांच्या उत्थानासाठी समर्पित असेल अशी घोषणा पासवान यांनी केली. पुढे पासवान यांची जनमानसातील प्रतिमा अधिकाधिक दृढ होत गेली.
१९८४, १९८९, १९९६, १९९८, २००० आणि २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत हजीपूर मतदार संघातून ते खासदार म्हणून निवडून आले.
बौध्द धर्म स्वीकारणाऱ्या दलितांनाही आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे यासाठी पासवान यांनी मागणी केली आणि सरकारकडून त्यांनी तसे विधेयक मंजूर देखील करून घेतले. सध्या स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या दलितांना देखील आयएएस अधिकाऱ्यांच्या समान वेतन मिळावे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
पासवान यांनी सहा वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या सोबत काम केले आहे. व्ही. पी. सिंग यांच्या सरकारमध्ये ते कामगार मंत्री होते. या दरम्यान पासवान यांनी सरकारी क्षेत्रात दलितांसाठीचे आरक्षण वाढवण्याचा आग्रह धरला. त्यानंतर १९९६ साली त्यांच्याकडे रेल्वे मंत्रालय सुपूर्द करण्यात आले.
२००० साली त्यांनी स्वतःचा लोक जनशक्ती पक्ष स्थापन केला.
२००१ मध्ये आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते कोळसा मंत्री होते.
२००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या भीषण दंगलींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम ठोकला. २००४ मध्ये ते पुन्हा संयुक्त पुरोगामी आघाडीत सामील झाले. यावेळच्या मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे रसायन आणि खत मंत्रालय सोपवण्यात आले.
राम विलास पासवान यांचा राजकीय प्रवास तसा बराच मोठा आहे. वेगवेगळ्या पंतप्रधानांसोबत काम करूनही ते दलित समाजाच्या उत्थानासाठी काही ठोस काम करू शकले नाहीत. या संपूर्ण प्रवासात त्यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोपही झाले.
त्यांनी लोक जनशक्ती पक्ष हा स्वतंत्र पक्ष स्थापन करूनही स्वबळावर सत्ता स्थापन करणे त्यांना कधीही शक्य झाले नाही. दरवेळी त्यांनी दलबदलू राजकारण करूनच सत्तेत प्रवेश केलेला आहे. स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतपत ते स्वतःचा पक्ष मजबूत करू शकले नाहीत.
दलितांच्या उत्थानासाठी पक्ष काढलेला असूनही प्रत्यक्ष दलितांना काही लाभ होईल असे कोणतेही कार्य या पक्षाकडून झालेले नाही. आरक्षण वाढवण्याचा मुद्दा सोडल्यास आजही देशातील दलितांची स्थिती दयनीय आहे.
इतकेच नाही, तर स्वतः दलितांचा नेता म्हणून पुढे येऊनही २०१६ मध्ये उन्ना येथे झालेल्या दलित हिंसाचाराच्या घटनेवर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया तर अनेकांना संतप्त करून गेली.
उन्ना प्रकरणाने संपूर्ण देशात दलित संघटना रस्त्यावर उतरल्या असताना, पासवान यांनी मात्र मोठ्या देशात अशा छोट्या छोट्या घटना होत राहतात अशी खेदजनक टिप्पणी करत रोष ओढवून घेतला होता. देशातील विविध दलित संघटनांनी त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.
याव्यतिरिक्त त्यांच्या पक्षावरही अनेक आरोप झालेले आहेत. गुन्हेगार, माफिया लोकांना निवडणुकीची तिकिटे देण्यातही त्यांचा पक्ष पुढे असतो. यामध्ये सुरजभान सिंह आणि रणजीत सिंह या प्रमुख आरोपींना तिकीट दिल्याचा गंभीर आरोप या पक्षावर करण्यात आलेला होता.
२००३ साली रणजीत सिंह याच्यावर कॅट, आयआयएम, एम्स आणि सीबीएसईच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका लिक केल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवाय व्यापमसारख्या बड्या घोटाळ्यात त्याचा हात असल्याचेही म्हटले जाते. शिवाय, पासवान यांच्या पक्षात जातिवाद आणि घराणेशाहीला प्रचंड प्रोत्साहन दिले जाते, असाही आरोप करण्यात येतो.
दहा वेळा लोकसभा निवडणूक लढवून आठ वेळा विजयी होणारे आणि सहा वेळा केंद्रीय मंत्रिपद भूषवणारे पासवान हे भारतीय राजकारणातील वजनदार नाव आहे, इतके तरी या प्रवासावरून आपण निश्चितच म्हणू शकतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.