आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींबद्दल एक असं वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. संजय राऊत म्हणाले होते की,
स्व. इंदिरा गांधी मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटण्यासाठी वेळोवेळी येत असत.
एक काळ असा होता जेव्हा मुंबईवर दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि शरद शेट्टी यांच्या सारखे गुंड राज्य करत होते. ह्या लोकांनी मुंबईचे वेगवेगळे तुकडे करून त्यावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले होते.
संजय राऊत म्हणाले की, “मुंबईचे हे गुंड ठरवायचे की मुंबईचा पोलीस आयुक्तपदी कोण विराजमान होणार आणि कोण नाही.”
हाजी मस्तान हा गुंड जेव्हा मंत्रालयात जायचा त्यावेळी त्याला भेटायला सगळं मंत्रालय खाली येऊन उभं राहत होतं. स्व. इंदिरा गांधी दक्षिण मुंबईचा डॉन करीम लाला याला भेटण्यासाठी नेहमी येत असत.
संजय राऊत हे पूर्वी गुन्हे पत्रकार होते. त्यांनी असा देखील दावा केला होता की त्यावेळेस काही कामानिमित्त ते दाऊदला भेटले होते. त्यांनी त्याच्याशी संवाद देखील साधला होता. त्यांच्याकडे त्याचे काही छायाचित्र देखील आहेत. परंतु त्यांनी इंदिरा गांधींबद्दल जे विधान केलं होतं ते मात्र खळबळजनक होतं.
करीम लाला ह्याला मुंबईचा पहिला गुंड समजले जाते. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा दाऊद इब्राहिमचा जन्म देखील झाला नव्हता. तो असा काळ होता जेव्हा करीम लाला मुंबईवर राज्य करत होता. ५० च्या दशकात मुंबईत करीम लालाचीच दहशत होती.
करीम लाला हा प्रचंड श्रीमंत होता त्याने या श्रीमंतीचा उपयोग गरिबांना मदत करण्यासाठी केल्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. गरिबांना मदत करायचा म्हणून त्याची प्रतिमा रॉबिनहूड सारखी बनली होती.
खरंतर हाजी मस्तानला मुंबईचा पहिला डॉन म्हणतात, पण करीम लाला त्याच्या आधीपासूनच मुंबईवर राज्य करत होता. हाजी मस्तान आणि करीम लाला यांच्यामध्ये चांगले संबंध होते.
करीम लालाचा दरारा इतका होता की त्याने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमला रस्त्यावर पळवून पळवून मारले होते. मुंबईच्या अपराध विश्वात हा किस्सा प्रसिद्ध आहे.
जंजिर ह्या अमिताभच्या प्रसिद्ध चित्रपटातील अभिनेते प्राण यांनी साकारलेली शेरखान ही व्यक्तीरेखा करीम लाला पासून प्रेरणा घेऊन तयार केली होती.
७ फुट उंचीच्या भारदस्त आवाजाच्या करीम लालाचा फक्त सामान्य नागरिकांत नाही तर मुंबई पोलिसात देखील मोठा दरारा होता. इतका की त्याला कुठल्या जागेवर कब्जा करायचा असेल तर स्वतःला जाण्याची देखील गरज पडत नसे. त्याच्या काही लोकांनी त्या जागेवर करीम लालाची निव्वळ छडी नेऊन ठेवली म्हणजे ती जागा त्याची झाली.
करीम लालाने ५० ते ८० च्या दशकात पूर्ण मुंबईवर आपलं वर्चस्व कायम ठेवलं. तो मुंबईचा पहिला गुंड होता. त्याच्या पठाण गँगची मुंबईवर मोठी दहशत होती.
करीम लालाचे खरे नाव अब्दुल करीम शेर खान होतं. त्याचा जन्म १९११ साली अफगाणिस्तानात झाला होता. तो पाश्तून समुदायाचा होता. तो त्याच्या जातीचा शेवटचा राजा होता. २१व्या वर्षी त्याने अफगाणिस्तान सोडलं आणि मुंबईला आला.
सुरुवातीला त्याला छोट्या मोठ्या सट्टेबाजीतून पुढे येऊन तो गुन्हेगारी विश्वात गेला. त्याने एक घर भाड्याने घेतलं आणि तिथे त्याने जुगाराचा अड्डा सुरू केला. पुढे त्याने जुगारी लोकांना उधार पैसे द्यायला सुरुवात केली. इथून त्याचे नाव शेरखान वरून करीम लाला असे झाले. त्याला लोक पुढे या दोन्ही नावांनी ओळखू लागले.
थोड्याच कालावधीनंतर त्याने दारूचा धंदा सुरू केला. जुगार आणि दारूच्या अड्ड्यातून त्याने पुढे मुंबई डॉकयार्डमध्ये तस्करी करायला सुरुवात केली. त्याच्या कृष्णकृत्यांचा मुंबई पोलिसांकडे संपूर्ण लेखाजोखा होता. परंतु करीम लालाकडे मुंबई पोलिसांशी मैत्री करण्याचे कसब होते. यातूनच त्याने आपला धंदा मोठा केला होता.
जेव्हा संपुर्ण मुंबई करीम लालाच्या ताब्यात आली तो जुगार आणि दारूच्या माध्यमातून तस्करी आणि हफ्ता वसुली करू लागला.
त्याची पठाण गॅंग यातूनच मोठी होत होती. तो लढाई आणि दंगलीच्या केसेस स्वतः सोडवू लागला. करीमलालाच्या घरी दर आठवड्याला तंटे सोडवण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी जनता दरबार भरायचा. एकप्रकारे त्याने वेगळी अधिसत्ता निर्माण केली होती.
५०च्या दशकात करीम लालाने सोने आणि हिऱ्याची तस्करी करायला सुरुवात केली. तेव्हा मुंबईत हाजी मस्तान उदयास येत होता. हाजी मस्तान समुद्रमार्गे तस्करी करायचा. दोघांनीही एकमेकांशी संगनमत साधून एकत्र काम करायला सुरुवात केली. थोड्याच कालावधीत दोघं अख्या मुंबईवर राज्य करू लागले.
करीम लालाचे राजकारणी आणि बॉलिवूड अभिनेते यांच्याशी चांगले संबंध होते. ईदच्या प्रसंगी करीमलालाकडे मोठ्या पार्ट्या होत. या पार्टीमध्ये मुंबईचे अनेक प्रसिद्ध लोक, अभिनेते सहभागी होत.
करीम लालाने एकदा अभिनेता दिलीप कुमार यांच्या सांगण्यावरून अभिनेत्री हेलेनची मदत केली होती. त्याने हेलेनला तिच्या हक्काचे पैसे मिळवून दिले होते.
८० च्या दशकात मुंबईत दाऊदचे नाव वर आले. तो येण्याअगोदर कुठल्याच टोळीमध्ये भांडण नव्हते. दाऊद आला आणि गुंडांच्या टोळ्यांमध्ये युद्ध सुरू झालं. दाऊदची गँग आणि करीम लालाची गँग एकमेकांचे कट्टर शत्रू होते, ते एकमेकांवर हल्ला करत. १९८६ साली दाऊदच्या टोळीने करीम लालाच्या भावाची हत्या केली.
हळूहळू करीमलालाचे वर्चस्व ढीले पडलेआणि दाऊदने मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित केले. १९ फेब्रुवारी २००२ ला वयाच्या ९० व्या वर्षी करीम लालाचा मृत्यू झाला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.