आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्या पैकी अनेकांना विड्याचे पान खायला आवडते. आपल्याकडे भारतात लोक या विड्याच्या पानाचे प्रचंड शौकीन असतात. पान खाणे हा अक्षरशः एक सेपरेट विधी आपल्याकडे चालतो. पानाचे वेगवेगळे प्रकार देखील प्रसिद्ध आहेत. नागवेल या वनस्पतीची ही पाने आपण जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून घेतो.
या पानांचे फायदे आपल्या प्राचीन धर्मग्रंथात पण सांगितलेले आहेत. आयुर्वेदात पानांचे औषधी उपाय देखील सांगितलेले आहेत. अगदी आहाराच्या दृष्टीकोनातून बघायचे झाल्यास या पानामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, मिनरल्स यांचा अगदी उत्तम साठा आढळतो.
असं मानलं जातं की या नागवेलीची पानं पूर्वी फक्त हिमालयातच सापडत असत. हिमालयामध्ये या पानांच्या विशिष्ट जातींची लागवड केली जात असे. हिमालयातील लोकांचा विश्वास होता की स्वत: माता पार्वती आणि शिव शंकर यांनी पानाचे पहिले बीज हिमालयात रोवले आणि तेथपासून या पानांची उत्पत्ती सुरु झाली.
रामायण आणि महाभारत कालखंडातदेखील या पानाचा उल्लेख सापडतो. मारुतीला आपल्या संस्कृतीत विड्याच्या पानाची माळ घालण्याची पद्धत आहे. असे सांगितले जाते की, जेंव्हा मारुती लंकेत पहिल्यांदा माता सीतेला भेटायला गेला होता तेव्हा माता सीतेने मारुतीला भेट म्हणून अशोक वाटिकेमध्ये उगवलेल्या नागवेलीच्या पानांची माळ करून त्याला भेट दिली होती. त्याच्या स्मरणार्थ आजही मारुतीच्या मंदिरात गेल्यावर मारुतीला विड्याच्या पानाची माळ अर्पण करतात.
महाभारतामध्येसुद्धा जेव्हा पांडवांनी यु*द्ध जिंकले त्यानंतर त्यांनी सगळ्यात मोठा अश्वमेध यज्ञ करण्याचे ठरवले जो यज्ञ त्या काळात फक्त एक चक्रवर्ती सम्राट करत असे. या यज्ञासाठी अर्जुनाने नागलोकात जाऊन विड्याची पाने आणली असा उल्लेख जैमिनी अश्वमेध या पुस्तकात सापडतो.
आज पान हे आपल्या संस्कृतीमध्ये मंगलदायी समजले जाते. अगदी तुळशीपत्र, बेल, मंजिरी, दुर्वा या वनस्पतींप्रमाणे विड्यालासुद्धा महत्त्व दिले जाते. कुठलाही लग्न समारंभ असो, पूजा असो, विड्याची पाने अशा वेळी तांब्याच्या कलशात ठेवायला वापरली जातातच. या पानांना एक प्रकारचे सांस्कृतिक महत्त्व आपल्या समाजात आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा कुठली गोष्ट ठरायची तेव्हा करार म्हणून विड्याची पाने एकमेकांना देण्याचा प्रघात होता.
हे पान आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे उपयोगी ठरते. सगळ्यात पहिल्यांदा याचा महत्वाचा फायदा जर बघायचा झाला तर जेवण झाल्यानंतर अन्न पचवण्यासाठी पचन क्रिया वाढावी लागते. ही पचनक्रिया वाढवण्याचे काम हे पानामध्ये असलेल्या प्रोबायोटीक्समुळे केले जाते. त्यासाठी ज्या लोकांना पचनाची समस्या आहे त्यांना पान, लवंग, कात कुटून खाण्यासाठी आवर्जून सांगितले जाते. किंबहुना जुन्या काळी घरात जेवणानंतर पान, कात, लवंग वगैरे खलबत्त्यात कुटून खाण्याची आपल्याकडे पद्धत होतीच.
तोंडाचे जे काही विकार असतील त्यांच्यामध्येसुद्धा हे विड्याचे पान अत्यंत गुणकारी असते. आजकाल लोक तोंडाला दुर्गंध येवू नये म्हणून मिंटच्या गोळ्या चघळत राहतात. पण फार कमी जणांना माहित असेल की जर सकाळ संध्याकाळ जर पान खाल्ले तर तोंडाचा दुर्गंध कायमस्वरूपी निघून जाण्यास मदत होते.
अनेक गायक लोकांना आपण आत्तापर्यंत पान खाताना बघितले आहे. गायक लोक आपला गळा ठीक करण्यासाठी आणि आवाज मोकळा ठेवण्यासाठी हे पान खात राहतात. पान खाल्ल्यामुळे घसा मोकळा राहण्यास देखील मदत होते. पान हिरड्यांवर आलेली सूजसुद्धा कमी करतं. तसेच सर्दी आणि घसा बसला असेल, कफ झाला असेल तरी त्यावरती विड्याची पाने मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास फरक पडतो.
कात, चुना, सुपारी नागवेलीच्या पानांवर ठेवून त्याची पुरचुंडी करून खाणे हा विड्याच्या पानांचा सगळ्यात सोपा प्रकार समजला जातो. उपलब्धता असेल त्याप्रमाणे विड्यात काजू पावडर, बदाम पावडर, सुंठ पावडर, गुलकंद, खोबऱ्याचा कीस, जायफळ, लवंग, मिरे, बडीशेप, असे अनेक पदार्थ घातले जातात.
आपल्या इतिहासात सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे तो त्रयोदशीगुणी विडा. तब्बल तेरा प्रकारचे पदार्थ वापरून हा विडा बनवला जातो. कात, विलायची, लवंग, खोबरे, बडीशेप,सुपारी, खसखस, केशर, जायपत्री, कापूर, जेष्ठमध, कंकोळ ही सर्व प्रकारची सामग्री घालून हा विडा तयार केला जातो. भारतातील प्रमुख देवस्थानांमध्ये त्रयोदशगुणी विडा देवाला नैवेद्यामध्ये अर्पण करण्याची पद्धत आहे. यात सगळ्यात श्रीमंत संस्थान असलेल्या तिरुपती बालाजीच्या मंदिराचा देखील सामावेश होतो.
आज विड्यामध्ये कलकत्ता मीठा, बनारस पान, चॉकलेट पान, फायर पान असे अनेक पानांचे प्रकार पाहायला मिळतात. महाराष्ट्रात या पानांचा अजून एक प्रसिद्ध प्रकार म्हणजे कातगोळ्याचे पान.
कातगोळ्या या कातापासून बनवलेल्या गोळ्या असतात. विड्याला सुगंध यावा आणि तोंडाचा दुर्गंध जावा म्हणून खास पान बनवताना या कातगोळ्याचा मुक्तहस्ते वापर केला जातो. या कातगोळ्या तयार करण्याचीसुद्धा विशिष्ट पद्धत असते.
प्रथम काताचे शुद्ध तुकडे घेतले जातात ते कुटून बारीक करून त्याची वस्त्रगाळ पूड बनवली जाते. केवड्याची ताजी पाने घेतात व त्या पानावर ही वस्त्रगाळ केलेला कात ठेऊन तिची गुंडाळी केली जाते. ही काताची पूड भरलेली केवड्याची पाने आठवडाभर ठेवून दिली जातात. अगदी ओलसर अशा पानामध्ये ही पूड गुंडाळून ठेवल्यामुळे ६ – ७ दिवसानंतर केवड्याच्या पानांचा रस या पुडी मध्ये उतरतो आणि काताला केवड्याच्या सुगंधाचा घमघमाट यायला सुरुवात होते. ही केवड्याचा रस शोषून घेतलेली काताची पूड नंतर वेगळी काढतात.
आता यापुढचा भाग महत्वाचा असतो. केवड्यापासून बनवलेले अत्तर असते त्या अत्तराचा हात लावून या काताच्या गोळ्या मळल्या जातात. या कातगोळ्याचे आयुष्य जास्त नसते. बनवल्यापासून महिनाभराच्या आत त्या संपवाव्या लागतात.
अशा प्रकारे प्राचीन काळापासून स्वत:चा महिमा टिकवून ठेवलेले हे गुणकारी पान आजही आपल्या चवीला उपयोगास येते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.