आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ग्वाल्हेर संस्थानच्या महाराणी विजयाराजे शिंदे यांनी मध्य भारताच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकला होता, इतकंच नाही तर देशाची आयर्न लेडी म्हणून नावलौकिक असलेल्या इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीला आव्हान दिले होते. राजतंत्राप्रमाणे लोकतंत्रातदेखील लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले होते. त्या सदैव महिलांच्या हक्कांसाठी लढल्या. त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना आपल्याप्रमाणेच शक्तिशाली बनवले. आज त्यांच्या दोन्ही मुली वसुंधरा राजे आणि यशोधरा राजे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत.
स्वातंत्र्यानंतर राजेशाही लयास गेली. ग्वाल्हेर संस्थान मध्यप्रदेश राज्याचा भाग बनले होते. जीवाजीराव शिंदे हे या संस्थानाचे राजे होते. १९२५ साली जीवाजीराव यांची संस्थानचे उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. पण ते अल्पवयीन असल्याने एका दशकाने त्यांच्याकडे ग्वाल्हेरचा कारभार आला. याच काळात त्रिपुराच्या राजकुमारीशी त्यांचा विवाह निश्चित झाला. पण त्यांच्या दरबारातील मराठा सरदारांना हे मंजूर नव्हते, त्यांच्यामते मराठा मुलींशीच विवाह केला पाहिजे. जनतेचा आक्रोश लक्षात घेऊन जीवाजीराव यांनी विवाह रद्द केला.
मराठा सरदारांना जरी त्यांच्या राज्यासाठी मराठा मुलगी हवी होती, तरी त्यांचे हे मनसुबे कधीच पूर्ण होऊ शकले नाहीत.
जीवाजीरावच्या आयुष्यात लेखा दिव्येश्वरी नावाची महिला आली. मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये दोघे एकमेकांना भेटले होते. जीवाजीराव पहिल्या दृष्टीक्षेपातच त्यांच्या प्रेमात पडले.
लेखा यांचे बहुतांश आयुष्य नेपाळमध्ये गेले. त्यांचे मावसा चंदनसिंह हे जीवाजीराव यांचे सल्लागार होते. या दोघांचे नाते राजपूत आणि मराठ्यांचा आपसी व्यवहाराचे प्रतीक बनले.
लग्नानंतर लेखा दिव्येश्वरी यांचे विजयाराजे असे नामकरण करण्यात आले. विजयाराजे यांच्यासाठी सुरुवातीचा काळ अवघड होता. मराठा मुलगी राणी हवी असा मराठा सरदारांचा आग्रह होता, त्यामुळे त्यांना विजयाराजे यांचे आगमन पसंतीस पडले नाही. जीवाजीराव ज्यावेळी संभाजीराव आंग्रे या आपल्या सरदाराला मुंबईला विजयाराजे यांना भेटायला घेऊन गेले होते तेव्हा संभाजीरावांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले नाही. जीवाजीराव यामुळे नाराज झाले, परंतु जसा काळ लोटला तसा विजयराजेंनी आपला प्रभाव निर्माण करायला सुरुवात केली. केवळ १० वर्षांत त्या जीवाजीरावांच्या सर्वांत निकटवर्तीय बनल्या. विजयाराजे यांच्याशी विवाह करण्याचा जीवाजीराव यांचा निर्णय योग्य होता, हे सिद्ध झाले.
विजयाराजे यांनी अगदी समर्थपणे आपली भूमिका वठवली होती. शिंदे घराण्याला विजयाराजे यांनी लोकशाहीतदेखील राजेशाहीइतके महत्व मिळवून दिले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर जीवाजीराव यांनी आपल्या संस्थानाचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण केले, तसे केले नसते तर त्यांना संपत्ती गमवावी लागली असती. जीवजीराव यांना सत्तेच्या राजकारणात रस नव्हता. त्यांनी आपला सर्व कारभार राणीला सोपविला. नेहरूंनी १९५७ साली जीवाजीराव यांची भेट घेतली आणि त्यांना कॉंग्रेसमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. परंतु जीवाजीरावांनी नकार दिला. त्यांना काँग्रेसची धोरणे पटत नव्हती, त्यांचा हिंदू महासभेकडे अधिक झुकाव होता. महाराणी विजयाराजे यांनी नेहरू यांची भेट घेऊन जीवाजीराव हे कॉंग्रेसमध्ये येण्यास उत्सुक नसल्याचे त्यांनी कळवले.
काँग्रेसने यावेळी नवीन चाल खेळली आणि विजयाराजे यांना काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहण्याची विनंती केली. विजयाराजे यांनी होकार दिला.
१९५७ साली विजयाराजे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांनी हिंदु महासभेच्या देशपांडे यांना ६० हजार मतांच्या फरकाने पराभूत केले. अशाप्रकारे विजयाराजे यांनी राजकारणात प्रवेश केला आणि कुशल राजकारणी म्हणून स्वतःला सिद्ध केले.
त्यांनी दुसऱ्यांदा ग्वाल्हेरमधून निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या. परंतु याच काळात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डी. पी. मिश्रा (काँग्रेस पक्ष) यांच्याशी विजयाराजे यांचे खटके उडाले. डी. पी. मिश्रा एक दबंग नेते होते व इंदिरा गांधींशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. डी. पी. मिश्रा मुख्यमंत्री असताना विजयाराजे यांनी ग्वाल्हेरमध्ये मोठे आंदोलन उभे केले. महाराणी विजयाराजे त्या आंदोलनाला बळ देत होत्या तर डी. पी. मिश्रा त्या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न करत होते. डी. पी. मिश्रा यांनी विजयाराजे यांच्या महालात पोलिस घुसवले. यामुळे संतप्त झालेल्या विजयाराजे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला.
पुढच्या वर्षी विजयाराजे यांनी केंद्र आणि राज्य दोन्हीकडे निवडणूक लढवली. करैरा येथून त्या जनसंघाच्या तिकिटावर लढत होत्या तर गुना येथून स्वतंत्र उमेदवार म्हणून लढत होत्या. दोन्ही निवडणुकीत विजयी झाल्या तरी प्रदेशात काँग्रेस पक्ष बहुमताने सत्तेत आला आणि विजयाराजे विरोधी पक्षनेत्या बनल्या.
याच काळात काँग्रेसमध्ये देखील फूट पडली. गोविंद नारायण सिंह यांच्या नेतृत्वाखाली ३५ आमदारांचा एक गट फुटून सरकारमधून बाहेर पडला. यामुळे महाराणी विजयाराजे यांना मध्यप्रदेशच्या राजकारणात सक्रिय होण्याची संधी मिळाली. ३५ आमदारांचा गट जनसंघात सामील झाला. गोविंद नारायण सिंह यांना मुख्यमंत्रीपद बहाल करून राजमाता विजयाराजे सदनाच्या नेत्या बनल्या. इंदिरा गांधींना विजयाराजे यांनी हे एक प्रत्यक्ष आव्हान दिले होते, यामुळे त्यांनी आपली सूत्रे फिरवली व २० महिन्यात हे जनसंघाचे सरकार कोसळले.
आणीबाणीच्या वेळी राजमाता विजयाराजे यांना अटक करण्यात आली आणि त्यावेळी त्यांना मारहाण देखील करण्यात आली.
वयाच्या ४८ व्या वर्षी जीवाजीरावांचे निधन झाले. विजयाराजे यांनी सर्व जबाबदारी स्वीकारत परिवार, संस्थान आणि राजकारण तिन्ही सांभाळले. आज त्यांचे बंधू ध्यानेंद्र सिंह, भावजय माया सिंह, मुलगी वसुंधरा राजे व यशोधरा राजे भाजपामध्ये राहून त्यांचा वारसा चालवत आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील मध्यप्रदेशात नुकताच कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता विजयाराजे यांची ही तिसरी पिढी आहे जी भाजपत कार्यरत आहे.
१९६७ साली विजयाराजे यांनी काँग्रेस सोडली आणि स्वतंत्र पार्टीच्या तिकिटावर संसदेत निवडून आल्या. त्यांचे पुत्र माधवराव यांना मात्र आईप्रमाणे कॉंग्रेसच्या विरोधात जाता आले नाही, उलट त्यांना काँग्रेसच्या राजकारणात जास्त रस होता. यामुळे विजयाराजे आणि माधवराव हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले.
या दोघांमधील राजकीय वाद फार विकोपाला गेले होते. इतके की विजयाराजे यांनी माधवराव यांच्याकडे राजवाड्यात राहायचे भाडे मागितले होते! हे भाडे भले १ रुपया इतके प्रतिकात्मक असले तरी दोघांमधील तणावाचे दर्शन घडवत होते.
१९८५ साली विजयाराजे यांनी आपल्या मृत्युपत्रात आपल्या कुठल्याच मुलाच्या हातून मला मुखाग्नी देण्यात येऊ नये असे स्पष्ट लिहिले होते. परंतु २००१ साली विजयाराजे यांचे निधन झाले, त्यावेळी मात्र माधवराव यांनी मुखाग्नी दिला होता.
विजयाराजे यांना ज्यावेळी पोलिसांकरवी मारहाण करण्यात येत होती, त्यावेळी माधवराव तिथे उपस्थित होते. त्याचा विजयाराजे यांच्या मनात प्रचंड राग होता. त्यांनी आपल्या संपत्तीमधील फार थोडा वाटा माधवराव यांना दिला. त्यांनी आपली संपत्ती व दागिने मुलींना भेट म्हणून दिले होते.
विजयाराजे यांनी मध्य भारतच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणावर एक वेगळी छाप सोडली. ज्या काळात काँग्रेसच्या एकाधिकारशाहीला आव्हान देणारं कोणीच उरलं नव्हतं, त्यावेळी विजयाराजे उभ्या ठाकल्या होत्या. विजयाराजे यांचे नाव भारताच्या राजकीय इतिहासात अजरामर झाले आहे.
२०२० साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयाराजे शिंदेंच्या नावाने १०० रुपयांचे नाणे सुरु करून त्यांचा एक प्रकारे सन्मानाच केला. अशा या महान राजकारणी आणि समाजकारणी महाराणीची आज (१२ ऑक्टोबर) जयंती. त्या निमित्त विनम्र अभिवादन.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.