आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
दिनांक २९ मे, १८३२. प्रसिद्ध पॅरिस शहरातील रात्र. २० वर्षांचा एक तरुण आपला मित्र – ऑगस्ट केवालिएरसाठी एक पत्र लिहित होता. त्या पत्राचा मायना थोडक्यात असा होता –
“प्रिय मित्र ऑगस्ट,
गणितातील समीकरण सोडवण्याच्या पद्धतीमध्ये मी काही संशोधन केले आहे आणि या प्रयत्नांमध्ये मला समीकरणे सोडवण्याच्या अशा काही पद्धती सापडल्या आहेत की ज्यांचे उत्तर मिळणे अशक्य होते. माझ्या संशोधनातील अतिशय महत्वाचा भाग मी खाली थोडक्यात लिहून ठेवत आहे.”
आणि त्यानंतर रात्रभर जागून तो तरुण आपल्या संशोधनातील महत्वाची माहिती भराभर लिहून ठेवू लागला. त्या कागदांवर तो अनेक ठिकाणी “माझ्याकडे पुरेसा वेळ नाही” असेही लिहून ठेवतो. प्रयत्नांती तो तरुण केवळ ६० पानेच लिहून काढू शकला. त्या लिखाणाच्या शेवटी त्याने असेही लिहून ठेवले की, “मला आशा आहे की, मी घाई घाईत लिहून काढलेल्या या गिचमिडीतून नक्कीच कोणी तरी योग्य तो अर्थ काढेल”
आणि पुढे त्याने सही केली – एव्हरिस्ट गॅलोई!
आपल्या अतिशय महत्त्वाच्या संशोधनाचे संक्षिप्त सार असे घाईघाईने उतरवून काढायची अशी काय गरज पडली या एव्हरिस्ट गॅलोईला? का त्याने अनेक ठिकाणी “माझ्याकडे पुरेसा वेळ नाही” असे लिहिले? चला तर, जाणून घेऊया गणित शास्त्राच्या विकासामध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या विख्यात गणितज्ञ – एव्हरिस्ट गॅलोईबद्दल.
एकोणविसाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये सगळीकडे अंदाधुंदीचे साम्राज्य होते. कोणत्याही बाबतीत थोडेसेही मतभेद झाले की, लोक अक्षरश: हाणामारीवर उतरत असत. एक-दुसऱ्याचा खू*न करायलाही कोणी मागे पुढे पाहत नसे. अशा वातावरणामध्ये एव्हरिस्ट गॅलोईचा जन्म झाला.
तत्कालीन परिस्थितीनुसार सुरुवातीचे शिक्षण एव्हरिस्टला त्याच्या आई-वडिलांनी घरीच दिले. तो बारा वर्षांचा झाल्यावर त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यात आहे. ही शाळा अतिशय प्रसिद्ध होती. या काळातले अनेक प्रख्यात लोक त्या शाळेत शिकले होते. असे असले तरी ही शाळा म्हणजे जणू काही एक कोंडवाडाच. पहाटे लवकर सारी कामे आटोपून शाळा सुरु होते असे ती थेट सूर्यास्तापर्यंत चालत असे. या शाळेच्या पारंपरिक शिक्षण पद्धतीनुसार प्राचीन साहित्य आणि लॅटीन भाषा घोकून एव्हरिस्ट वैतागला होता. त्यातून विरंगुळा मिळावा म्हणून एव्हरिस्ट वाचनालयामध्ये जाऊन बीजगणित आणि भूमितीवरची पुस्तके वाचू लागला आणि यातूनच त्याला भूमितीची गोडी लागली. तत्कालीन भूमितीचा अभ्यास त्याने अक्षरशः दोन- चार दिवसांतच पूर्ण केला.
त्यानंतर त्याने बीजगणिताचा अभ्यास सुरु केला. या काळामध्ये दोन आणि तीन घातांकांपर्यंतचीच (exponents) समीकरणे सोडवण्याची पद्धत शोधण्यात आली होती. पण बीजगणिताची ही पुस्तके वाचताना एव्हरिस्टच्या लक्षात आले की, बीजगणित हा विषय भूमितीप्रमाणे विकसित विषय नाही. पुढे त्याने चार घातांकाच्या समीकरणाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याला खात्री होती की चारच काय पण पाच घातांकाच्या समीकरणाचे उत्तर शोधणे शक्य आहे.
लवकरच एव्हरिस्ट गॅलोईने बीजगणिताची समीकरणे कशी सोडवावी या विषयावर एक प्रबंध लिहिला आणि तो फ्रेंच ॲकॅडमीला पाठवला. अनेक महिने वाट बघूनही फ्रेंच ॲकॅडमीकडून काही उत्तर आले नाही.
एव्हरिस्टने या गोष्टीचा पाठपुरवठा केला. फ्रेंच ॲकॅडमीला त्याने अनेक पत्रे पाठवली. शेवटी “तुमचा प्रबंध तपासण्यासाठी अमुक एका प्राध्यापकांकडे पाठवण्यात आला आहे” असे उत्तर मिळाले. एव्हरिस्टने त्या प्राध्यापकांकडे पत्र व्यवहार केला तर “असा कोणताही प्रबंध मला मिळालाच नाही” असे उत्तर मिळाले. ‘या प्राध्यापकानेच माझ्या प्रबंधाला केराची टोपली दाखवली असणार’, असा संशय एव्हरिस्टला आला. संशय येणे अगदी साहजिकच होते, कारण एव्हरिस्टप्रमाणेच अनेक तरुणांना या प्राध्यापक महोदयांचा असाच अनुभव आलेला होता.
त्याच दरम्यान एव्हरिस्टच्या आयुष्यात अतिशय दुख:द घटना घडली. त्याचे वडील राजकारणातील सक्रीय सहभागामुळे संकटात सापडले आणि त्यांना आत्मह*त्या करावी लागली. त्यांच्या पार्थिव देहाला स्मशानभूमीमध्ये नेण्यात आले. धार्मिक क्रिया करणाऱ्या धर्मगुरूचे विचार त्याच्या वडिलांच्या राजकीय विचारांपेक्षा अतिशय भिन्न होते. त्यामुळे तो धर्मगुरू वडिलांविषयी भलतंसलतं बोलला. एव्हरिस्टला प्रचंड राग आला आणि त्याने त्या धर्मगुरूला चांगलेच चोपून काढले. या प्रसंगामुळे धर्मगुरुबद्दल त्याच्या मनात तिरस्कार निर्माण झाला.
वडिलांच्या मृत्यूमुळे एव्हरिस्टचे मन अतिशय कटू बनले. फ्रेंच ॲकॅडमी, धर्मकारण, राजकारण या सर्वांविषयी त्याच्या मनात तिरस्कार निर्माण झाला. पुढे त्याने बीजगणिताचे अध्ययन सुरूच ठेवले होते. या काळात त्याची विद्वत्ता ओळखणाऱ्या त्याच्या मित्राने त्याला नवा प्रबंध लिहिण्याचा आग्रह केला.
एव्हरिस्टने गणित शास्त्रातले अनेक नवे सिद्धांत शोधले होते. त्यावर अनेक लेख लिहिले परंतु त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. याच नवीन सिद्धांतांवर आधारित प्रबंध त्याने पुन्हा फ्रेंच ॲकॅडमीला पाठवला. त्याच्या दुर्दैवाने याही वेळी त्याला पूर्वीसारखाच अनुभव आला.
त्याच दरम्यान राजेशाहीविरुद्ध बंड पुकारणाऱ्या एका पक्षाचा तो सभासद झाला. त्या काळी फ्रान्समध्ये राजेशाहीची हुकुमत होती. एव्हरिस्टला राजेशाही अजिबात आवडत नव्हती. राजेशाहीविरुद्ध होणाऱ्या बंडामध्ये तो सहभाग घेऊ लागला. तसेच स्वतःबरोबर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या बंडामध्ये सहभागी करून घेऊ लागला.
एकदा त्यांच्या पक्षाच्या सभेत भाषण करताना एव्हरिस्टने राजाविषयी अपशब्द उच्चारले. दुर्दैवाने राजाचे गुप्तहेर त्या सभेमध्ये होते. दुसऱ्याच दिवशी एव्हरिस्टला अटक करण्यात आली. त्याच्यावर अनेक आरोप ठेवून त्याला तुरुंगात धाडण्यात आले.
त्याच दरम्यान फ्रान्समध्ये कॉलराची साथ पसरली होती. एव्हरिस्टसारखा बंडखोर नेता जर तुरुंगातच मरण पावला तर सामान्य जनतेमध्ये गदारोळ माजेल. म्हणून त्याला एका आरोग्यधामामध्ये पाठवण्यात आले. तेथील डॉक्टरच्या मुलीचा आणि एव्हरिस्टचा परिचय झाला. खरी घटना कोणालाच माहीत नाही किंवा कुठे नमूदही करण्यात आली नाही, पण असे म्हणतात की एव्हरिस्ट त्या मुलीवर प्रेम करू लागला होता.
त्या काळी दोन युवकांनी एकाच युवतीशी लग्न करायचे ठरवले तर त्यांना द्वंदयु*द्ध करावे लागत असे आणि जो जिंकेल तोच त्या युवतीशी लग्न करू शकत असे. खरे म्हणजे असे द्वंदयु*द्ध करणे बेकायदेशीर होते, तरीही अशी द्वंदयु*द्धे सर्रास करण्यात येत असत आणि कोणी असे आवाहन दिले तर ते स्वीकारावेच लागत असे. तुरुंगातून बाहेर आल्यावर एव्हरिस्टला अशा द्वंदयु*द्धाचे आवाहन देण्यात आले. राजेशाहीविरुद्ध केलेल्या बंडाच्या वेळी ज्या अधिकाऱ्याने एव्हरिस्टला अटक केली होती, त्यानेच हे आवाहन दिले होते आणि २५ पावलांच्या अंतरावर उभे राहून एकमेकांवर बंदुकीने निशाना साधायचा, असे साधारण या द्वंदयु*द्धाचे स्वरूप होते.
एव्हरिस्ट काही कुशल नेमबाज नव्हता. त्यामुळे द्वंदयु*द्धाच्या आदल्या रात्री एव्हरिस्टला वाटले की उद्या माझा मृत्यु अटळ आहे. माझ्यासोबतच मी केलेले गणिताचे संशोधनदेखील नष्टच होऊन जाईल. त्यामुळे जे काही शक्य आहे तेवढे तरी लिहून ठेवावे, असा विचार करून तो लिहायला बसला. जमेल तसे भराभर तो वहीमध्ये उतरवून काढत होता.
पण एका रात्रीतून २० वर्षांचा तरुण मुलगा लिहून लिहून किती लिहिणार. दुर्दैवाने एव्हरिस्ट केवळ साठ पानेच लिहू शकला. त्याने शोधलेले सिद्धांत आणि सगळे संशोधन जर सविस्तरपणे लिहून काढायचे ठरवले असते तर हजारो पानेही कमी पडले असते. उण्यापुऱ्या २० वर्षांच्या आयुष्यात केलेल्या संशोधनाचा जमेल तेवढा भाग त्याने त्या ६० पानांवर लिहून काढला.
दुसऱ्या दिवशी सकाळी रस्त्याच्या एका बाजूला एका शेतकऱ्याला जखमेने विव्हळत पडलेला एव्हरिस्ट दिसला. त्याच्या पोटात गोळी झाडण्यात आली होती. त्या शेतकऱ्याने एव्हरिस्टला रुग्णालयात नेले. परंतु एव्हरिस्ट अखेरच्या घटका मोजत होता. तोपर्यंत एव्हरिस्टचा भाऊ – आल्फ्रेड यालाही ही बातमी कळली होती आणि तोदेखील आपल्या भावाला भेटण्यासाठी रुग्णालयात आला. भावाचे डोळे अश्रूंनी डबडबलेले पाहून एव्हरिस्ट त्याही स्थितीत त्याला म्हणाला, “रडू नकोस आल्फ्रेड. विसाव्या वर्षी मृत्यूला सामोरे जाण्यासाठी तू मला धैर्य दिले पाहिजे” आणि त्यानंतर थोड्याच वेळात त्याने डोळे मिटले ते कायमचेच.
मृत्युपूर्वी लिहिलेले सर्व लिखाण प्रसिद्ध करण्याची जबाबदारी त्याने आपला भाऊ आल्फ्रेड आणि मित्र ऑगस्ट केवालिएर यांच्याकडे सोपवली. तसेच मित्र ऑगस्ट याला लिहिलेल्या पत्रामध्ये त्याने आपण लिहिलेल्या सिद्धांतांवर त्या काळातील विख्यात गणितज्ञ जॅकोबी किंवा गॉस यांनी त्यांचे मत सार्वजनिकरित्या सांगावे अशीही इच्छा प्रकट केली होती. परंतु त्या काळी गॉस इतरांच्या संशोधनाकडे तिरस्कार आणि द्वेषानेच बघत असे.
एव्हरिस्ट गॅलोईच्या मृत्युनंतर तब्बल १६ वर्षांनी जोसेफ लिउविले या फ्रेंच गणितज्ञाने एव्हरिस्टने अखेरच्या क्षणी लिहिलेल्या ६० पानांचा अभ्यास करून त्याचे महत्व ओळखले. त्याने ते सर्व साहित्य एका गणिताच्या मासिकामध्ये छापून प्रसिद्ध केले. ते लिखाण प्रसिद्ध होताच एव्हरिस्ट गॅलोईची कीर्ती सर्वत्र पसरली. त्याने लिहिलेला प्रबंध आज “Galois Theory” म्हणून प्रसिद्ध आहे आणि हीच थेअरी आजच्या आधुनिक गणितशास्त्राचा आधारस्तंभ मानली गेली आहे.
एक प्रख्यात गणितज्ञ बनण्याची प्रतिभा असलेला एव्हरिस्ट गॅलोई मानवी षडरिपुंच्यापुढे पराभूत झाला होता. त्याच्या मृत्यनंतर अनेक वर्षांनी का असेना, पण त्याला जगविख्यात गणितज्ञांच्या मांदियाळीत स्थान मिळाले, हीच त्याच्यासाठी खरी श्रद्धांजली होय.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.