आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ॲग्रीशक्ती हे एक अँड्रॉइड ॲप असून तामिळनाडूतील एका तरुणाने ते विकसित केले आहे. एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये विज्ञानाची प्रगती होत आहे, ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश पृथ्वीच्या कानाकोपऱ्याला व्यापून टाकतो, अगदी त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाने मानवी जीवनातील सर्व आयामांवर परिणाम केला आहे. मग यामध्ये कृषिक्षेत्र कसं मागे राहील? इस्रायल आणि अरबस्तानातील काही देश देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर फक्त शेतीच करत नाहीत तर या वाळवंटात असलेल्या देशांनाही स्वयंपूर्ण बनवण्याचं काम करताहेत. पाश्चिमात्त्य देशांमध्ये तर कृषिक्षेत्रातील आधुनिकतेने कळस गाठला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
भारत हा कृषिप्रधान देश समजला जातो. पण भारतामध्ये कृषी तंत्रज्ञान त्या मानाने बऱ्याच पिछाडीवर आहे. शतकानुशतके जुनी मंडई आणि बाजाराची पद्धत म्हणजे शेतकऱ्यांसाठी शापच. कोणत्याच बाजारसमितीमध्ये कृषिउत्पादनाला योग्य आणि अपेक्षित असा बाजारभाव मिळत नाही. सर्व व्यवसायांची मूलभूत आणि सर्वांत महत्त्वाची गरज असलेला व्यवसाय म्हणजे शेती, ज्यावर अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा असतो, पण हाच व्यवसाय आज तोट्याचा बनलाय. यावर उपाय म्हणून सरकारने २०२० साली तीन महत्त्वाचे कृषी कायदे आणले, परंतु दलाल आणि उद्योगपतींच्या झुंडशाहीमुळे शेतकऱ्याला न्याय मिळवून देणारे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात आले.
एवढ्या अडचणी असूनही भारतातील अनेक नवउद्योजक कृषीक्षेत्रासाठी काही नाविन्यपूर्ण करू इच्छितात. तंत्रज्ञानाचा जास्तीत वापर करून शेतीतून चांगले उत्पन्न मिळवणे हे त्यांचे ध्येय असते. अशा कल्पना आणि युक्त्या घेऊन आजवर अनेक युवा उद्योजकांनी वेगवेगळे स्टार्टअप्स सुरु करायचा प्रयत्न केला, त्यातीलच एक स्टार्टअप म्हणजे ॲग्रीशक्ती.
नावानुसारच हे ॲप कृषी क्षेत्राला नवी ऊर्जा देणारं आहे. काही दिवसांपूर्वी या संकल्पनेची दखल घेत केंद्र सरकारच्या माध्यमातून या स्टार्टअपच्या फाउंडरची आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची भेट झाली. ती भेट नेमकी कशी झाली आणि या ॲपमागचा उद्देश काय जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून.
हे ॲप तयार केले आहे तामिळनाडू जिल्ह्यातील सेल्वा मुरली नावाच्या युवकाने. सेल्वाच्या कुटुंबाचा देखील शेती हा मुख्य व्यवसाय होता. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल, हवामान, इत्यादींबद्दल आवश्यक ती सर्व माहिती दिली जाते. तामिळनाडू राज्यातील कृष्णगिरी जिल्ह्यात सेल्वाची व्हिज्युअल मीडिया टेक्नॉलॉजी नावाची सॉफ्टवेअर कंपनी देखील आहे. ही कंपनी त्याने २००७-०८ साली स्थापन केली होती. याशिवाय २०१० साली त्याने क्लाउड्सइंडिया नावाची क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित कंपनी सुरु केली होती.
२०१० साली क्लाउड तंत्रज्ञानाशी संबंधित कंपनी सुरु करणे म्हणजे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्या काळाच्या मानाने मोठी भरारी होती. आपल्या याच अफाट ज्ञानाचा वापर त्याने ॲग्रीशक्ती ॲपच्या माध्यमातून लोककल्याणासाठीही केला. स्थानिक शेतकऱ्यांना कळण्यास सोपे जावे म्हणून हे ॲप पूर्णतः स्थानिक तामिळ भाषेमध्ये बनवण्यात आले आहे, हे याचे प्रमुख वैशिष्ट्य. या ॲपमध्ये शेतकऱ्यांना उत्पादने, पीक विमा, पिकांसाठी लागणारे न्यूट्रिशन्स, खते, आणि बाजारभाव इत्यादींची माहिती तामिळ भाषेतही दिली जाते.
सेल्वाने आपल्या ॲपसाठी गुगलच्या अनेक फीचर्सचा वापर केला असून, त्यापैकी एक म्हणजे गुगलचे व्हॉइस-टू-टेक्स्ट फिचर. जर तुम्ही तामिळ भाषेत एखादा प्रश्न विचारला तर हे ॲप तामिळ भाषेतच तुम्हाला उत्तर देते, हे याचे वैशिष्ट्य. या ॲपमधून दिसणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून कंपनीला पैसे मिळतात. याशिवाय सेल्वाच्या इतर सॉफ्टवेअर कंपनीतून मिळणाऱ्या इंकमवर देखील या ॲपचा सर्व मेंटेनन्स शक्य होतो.
सेल्वा आणि सुंदर पिचाई यांची भेट केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयोजित केलेल्या एका उपक्रमाच्या माध्यमातून झाली. गुगलच्याच ॲपस्केल ॲकॅडमीतर्फे गुगलनेच देशभरातून सर्वोत्तम १०० ॲप डेव्हलपर्स निवडले होते. या ॲप डेव्हलपर्सना सहा महिन्यांचे उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आले, जेणेकरून त्यांची पुढील वाटचाल अधिक सोयीस्कर आणि उत्पादनक्षम (प्रोडक्टीव्ह) होईल.
ॲग्रीशक्ती ॲप बनवणारा सेल्वा मुरली हा त्याच १०० ॲप डेव्हलपर्सपैकी एक. दिल्लीमध्ये प्रशिक्षणादरम्यान त्याला सुंदर पिचाईबरोबर बोलण्याची संधी देण्यात आली. सेल्वासाठी हा सुखद धक्का होता, त्याला शेवटपर्यंत आपण सुंदर पिचाई यांना भेटणार आहोत हे माहीतही नव्हते. दोघांमध्ये १५ मिनिटांहून अधिक वेळ चर्चा झाली. सेल्वाने आपल्या ॲपबद्दल सांगितले, आणि हा ॲप देशभरात कशाप्रकारे वापरता येईल याबद्दल पिचाई यांनी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे सुंदर पिचाई आणि सेल्वा दोघेही तामिळनाडूचे आहेत आणि दोघांनी तामिळ भाषेतच संवाद साधला.
सुंदर पिचाई यांनी ॲग्रीशक्तीसाठी अनेक प्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. गुगल त्यांना डेटा सायन्सबद्दल तज्ज्ञांची मदत देणार आहे. डेटा सायन्सचा वापर करून महत्त्वपूर्ण माहितीचे सेट्स (डेटा सेट्स) तयार करून शेतकऱ्यांना अचूक माहिती देण्यात गुगल मदत करणार आहे.
कृषिक्षेत्रासाठी काम करणाऱ्या अनेक नवउद्योजकांसाठी सेल्वा मुरली आणि त्याने तयार केलेले ॲग्रीशक्ती हे ॲप एक प्रेरणास्रोत आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.