आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गेल्या काही महिन्यांपासून इसरोचे मिशन चंद्रयान-३ प्रचंड चर्चेत आहे. कोणाचा वाढदिवस असो, वा गणेशोत्सव, अगदी अशा प्रसंगी केल्या जाणाऱ्या रोषणाईमध्ये देखील चंद्रयान-३ ची झलक दिसते. चंद्रयान-३ नंतर इसरोने हाती घेतलं होतं आदित्य एल-१ मिशन, ते मिशन देखील यशस्वी होण्यामध्ये जमा आहे. या दरम्यान इसरोने अनेक लहान मोठ्या अवकाश मोहीमा हाती घेऊन त्यांना यशस्वी करून दाखवलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भारत सरकार आणि इसरो आपल्या ‘गगनयान’ या मोहिमेसाठी तयारी करत आहे. याच मोहिमेसाठी इसरोने काही ऍस्ट्रोनॉट्स रशियाला प्रशिक्षणासाठी पाठवले होते. काल दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रशिक्षण घेऊन तयार झालेल्या सर्व ऍस्ट्रोनॉट्सची नावे जाहीर झाली आहेत. नेमके कोण आहेत हे गगनवीर आणि काय आहे ही मोहीम, जाणून घेऊया या लेखातून..
सुरुवात आणि अडथळे
गगनयान मोहिमेची सुरुवात झाली २००६ पासून, तेव्हा याचं नाव होतं ऑर्बिटल वेहिकल मिशन. त्यावेळी या मिशनमध्ये २ अंतराळवीर एका आठवड्यासाठी अंतराळात पाठवण्याची तयारी होती. २००७ साली या मिशनची सुरुवात झाली आणि तेव्हा हा प्रोजेक्ट २०२४ पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज बांधण्यात आला होता.
२००७ साली या मिशनसाठी १० हजार करोड रुपयांची आवश्यकता होती. २००८ साली मिशनची रूपरेषा ठरवण्यात आली आणि सरकारकडून निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरु झाले. २००९ साली निधी मंजूर करण्यात आला. पण सरकारने या मोहिमेला पुरेसा निधी दिला नसल्या कारणाने २०११ ते २०१३ मध्ये मोहीम बारगळली.
२०१४ च्या सुरुवातीस, प्रकल्पाचा पुनर्विचार करण्यात आला आणि फेब्रुवारी २०१४ मध्ये मोहिमेसाठी नवे बजेट देण्यात आले. २०१७ साली या मोहिमेला पुन्हा एकदा बूस्ट मिळाला. दरम्यानच्या काळात, री-एंट्री स्पेस कॅप्सूल, पॅड ॲबॉर्ट टेस्ट, रॉकेट अयशस्वी झाल्यास अंतराळवीरांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी तयार करण्यात आलेली यंत्रणा, डिफेन्स बायोइंजिनियरिंग अँड इलेक्ट्रोमेडिकल लॅबोरेटरीद्वारे (DEBEL) विकसित फ्लाइट सूट तसेच जीएसएलव्ही मार्क ३ लाँच वेहिकल (रॉकेट) ही पूर्वतयारी करण्यात आली.
यानंतर पंतप्रधान मोदींनी २०१८ च्या स्वातंत्र्यदिनी या मोहिमेची, देशाला संबोधताना, औपचारिकरीत्या घोषणा केली. गगनयान मोहिमेत बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या असून यात आता २ नाही तर ३ अंतराळवीरांचा समावेश असेल, ही तीन दिवसीय मोहीम असून, प्रत्यक्ष अंतराळवीरांना पाठवण्याआधी याच वर्षी (२०२४) इसरो रोबोटला अंतराळात पाठवणार आहे.
उद्देश
गगनयान मोहीम फक्त अंतराळात माणूस पाठवण्याइतपतच सीमित नाही तर वेगवेगळे प्रयोग करण्यातही त्यांची मोठी भूमिका असणार आहे. इस्रो गगनयानवर पाच प्रयोग करणार आहे. भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (IIST), धारवाड येथील कृषी विज्ञान विद्यापीठ (UASD), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), आयआयटी पाटणा, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (IICT) आणि जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च (JNCASR) या संस्थांद्वारे प्रयोगांचे पेलोड्स विकसित होणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रयोग व त्यांचा अभ्यास अंतराळात होणार असून भारताच्या अंतराळ संशोधन इतिहासात हा मैलाचा दगड मानला जाईल.
गगनयानवर होणाऱ्या पाच प्रयोगांपैकी दोन जैविक प्रयोग असतील, जे भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (IIST), धारवाड येथील कृषी विज्ञान विद्यापीठ (UASD) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चद्वारे (TIFR) करण्यात येणार आहेत, तर IIT पटना अतिउष्णतेचा प्रवाहावर प्रयोग करणार आहे, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (IICT) क्रिस्टलायझेशनवर संशोधन करणार आहे आणि जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च (JNCASR) फ्लुइड मिक्सिन्गयावर संशोधन करणार आहे.
अंतराळवीर
इसरोने या मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड केली होती. चारही अंतराळवीरांची निवड भारतीय वायुसेनेतून करण्यात आली आहे. त्यांनी फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२१ दरम्यान रशियाच्या युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. जून २०१९ मध्ये इसरोने त्यांच्या प्रशिक्षणासाठी रशियन अंतराळ एजन्सी रॉसकॉसमॉसची (Roscosmos) उपकंपनी असलेल्या ग्लाव्हकॉसमॉससोबत (Glavkosmos) सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. इसरोने अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी बेंगळुरू येथे ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरच्या निर्मितीची घोषणा केली. ३० जानेवारी २०१९ रोजी इसरोच्याच कॅम्पसमध्ये याचे उद्घाटन करण्यात आले.
दिनांक २७ फेब्रुवारी रोजी तिरुवनंतपुरम शहरातील इस्रोच्या केंद्रातील एका कार्यक्रमात, चार अंतराळवीरांचे वर्णन “अंतराळात जाण्याची तयारी करणारे, स्वप्न पाहणारे, साहसी आणि शूर लोक” असे झाले. भारतीय हवाई दलातून निवडलेले हे अधिकारी म्हणजे – ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी त्यांना बॅज देऊ केले तसेच पंतप्रधानांनी त्यांचे वर्णन “भारताचे अभिमान” असे केले.
ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर हे नॅशनल डिफेन्स अकादमीचे माजी विद्यार्थी आणि एअर फोर्स अकादमीमध्ये “स्वॉर्ड ऑफ ऑनर”चे मानकरी आहेत. ते एक फ्लाइंग इन्स्ट्रक्टर असून त्यांना अंदाजे तीन हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. याशिवाय त्यांच्याकडे Su-30 MKI, MiG-21, MiG-29, Hawk, Dornier, An-32, इत्यादींसह अनेक विमाने उडवण्याचा अनुभव आहे. ते युनायटेड स्टेट्स स्टाफ कॉलेज आणि डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलींग्टनचे माजी विद्यार्थी देखील आहेत. विशेष म्हणजे त्यांनी भारतीय वायुसेनेच्या सर्वोत्कृष्ट लढाऊ विमानांपैकी एक, Su-30 MKIच्या स्क्वाड्रनचेही नेतृत्व केले आहे.
ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन हे देखील नॅशनल डिफेन्स अकादमीचे माजी विद्यार्थी असून त्यांना वायुसेना अकादमीमध्ये राष्ट्रपती सुवर्ण पदक आणि स्वॉर्ड ऑफ ऑनरचा सन्मान प्राप्त झाला आहे. ग्रुप कॅप्टन अजित हे देखील फ्लायिंग इन्स्ट्रक्टर आणि टेस्ट पायलट असून त्यांना सुमारे २९०० तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. याशिवाय त्यांच्याकडे Su-30 MKI, MiG-21, MiG-21, Mig-29, Jaguar, Dornier, An-32 इत्यादींसह अनेक विमाने उडवण्याचा अनुभव आहे. ग्रुप कॅप्टन अजित डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलींग्टनचे माजी विद्यार्थी देखील आहेत.
ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप हे देखील नॅशनल डिफेन्स अकादमीचे माजी विद्यार्थी असून फ्लायिंग इन्स्ट्रक्टर आणि टेस्ट पायलट आहेत. त्यांना एकूण २००० तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. याशिवाय त्यांच्याकडे Su-30 MKI, MiG-21, MiG-29, Jaguar, Hawk, Dornier, An-32 अशी विमाने उडवण्याचा अनुभव आहे.
विंग कमांडर शुभांषु शुक्ला हे देखील नॅशनल डिफेन्स अकादमीचे माजी विद्यार्थी असून ते एक फायटर कॉम्बॅट लीडर आणि टेस्ट पायलट असून त्यांना सुमारे २००० तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. याशिवाय त्यांच्याकडे Su-30 MKI, MiG-21, MiG-29, Jaguar, Hawk, Dornier, An-32 अशी विमाने उडवण्याचा अनुभव आहे.
या अंतराळवीरांची वायुसेनेच्या निवडक वैमानिकांच्या गटातून निवड करण्यात आली होती आणि शॉर्टलिस्ट होण्यापूर्वी त्यांच्या मोठ्या प्रमाणात शारीरिक आणि मानसिक चाचण्या घेण्यात आल्या होत्या. या नंतर त्यांनी रशियामध्ये १३ महिने कठोर प्रशिक्षण घेतले. ही मोहीम यशस्वी झाल्यास, सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि चीननंतर अंतराळात मानव पाठवणारा भारत हा चौथा देश ठरेल. सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेचे स्पेस स्टेशन्स १९६१ पासून अंतराळात आहेत. ऑक्टोबर २००३ मध्ये चीन हा अंतराळात पोहोचणारा तिसरा देश ठरला. त्यावेळी चिनी मिशनने अंतराळात २१ तास घालवले होते.
येत्या काही महिन्यांत इसरोची गगनयान मोहीम कशी पुढे जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल..!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.