आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
अठराव्या शतकापासून व्यापाराच्या निमित्ताने अनेक देशांतील व्यापारी भारताकडे आकृष्ट होऊ लागले होते. खरे तर त्याआधीपासून भारताचा परकीय देशांशी व्यापार होत होता पण, साम्राज्य विस्ताराची महत्त्वाकांक्षा यानंतरच्या काळात वाढत गेल्याने व्यापारासाठी आलेल्या परदेशी व्यापाऱ्यांनी इथेच स्थायिक होऊन आपला फायदा करून घेण्याचा निर्णय घेतला.
अठराव्या शतकापर्यंत तर इस्ट इंडिया कंपनीने इथे चांगलेच बस्तान बसवले होते. त्याचवेळी मध्य आशियातील वेगवेगळ्या इस्लामिक सत्ता आपसांत संघर्ष करत होत्या. यात तुर्क राजवटीला स्वतःचा पराभव समोर दिसू लागला. त्यामुळे या प्रदेशात एकूणच अशांतता आणि अस्थिरतेचे वातावरण होते. जिथे व्यापाऱ्यांना चांगले दिवस येण्याची शक्यता अगदीच धूसर होती.
बगदादमधे असाच एक ज्यू व्यापारी होता डेव्हिड ससून. बगदाद हे एकेकाळचे मध्यआशियातील सांस्कृतिक बेट समजले जायचे. याच बगदादमधील ससून हे एक अत्यंत श्रीमंत व्यापारी कुटुंब. ससून कुटुंबाला बगदादमध्ये खूप प्रतिष्ठा आणि नावलौकिक होता. डेव्हिड ससून हा या कुटुंबाचा प्रमुख होता. ऑटोमन तुर्कांशी त्याचे चांगले संबंध होते. त्यामुळे या कुटुंबाचा अगदी शाही इतमिमाम होता.
पण, तुर्क आणि इतर मुस्लीम सत्तांच्या संघर्षात तुर्कांची बरीच पीछेहाट झाली होती. अशातच एके दिवशी ससून व्यापाराच्या निमित्ताने सीनेगॉगहून परत येत होता. वाटेत त्याला एक ज्योतिषी भेटला.
या ज्योतिषाने डेव्हिडला सांगितले की त्याने जर भारतात जाऊन आपला व्यापार वाढवला तर त्याची भरभराट होईल. ज्योतिषाच्या या भाकितावर विश्वास ठेवून १८३२ साली डेव्हिड आणि त्याच्या कुटुंबाने आपले नशीब आजमावण्यासाठी बगदादहून भारताकडे प्रस्थान केले.
मुंबईच्या दक्षिण कुलाबा बंदरात बांधलेली ससून गोदी तुम्ही पहिली असेल. २०१७ मध्ये या गोदीचे नुतनीकरण करण्यात आले. ‘स्टार्ट अर्बन फेस्टिव्हल’ अंतर्गत या गोदीचे आधुनिकीकरण करण्यात आले असून, ही गोदी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली आहे. अर्बन फेस्टिव्हलचा हा कार्यक्रम मुंबईतील मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुरु करण्यात आला असला तरी, या कार्यक्रमाने ज्या कुटुंबाच्या नावाने ही गोदी उभारण्यात आली आहे, त्या कुटुंबाकडेही लक्ष वेधले आहे.
वॉल्टन्स, कोच, आणि रोथ्शील्ड कुटुंबांप्रमाणे ससून कुटुंबाकडे कधी कुणाचे फारसे लक्ष जात नाही. कारण या कुटुंबाने नेहमीच स्वतःची प्रसिद्धी करणे टाळले. जगातील अतिश्रीमंत कुळातील एक कुटुंब असूनही त्यांनी स्वतःवरील प्रकाशझोत कटाक्षाने टाळला. असे असले तरी मुंबईच्या अनेक जुन्या वास्तूंवर तुम्हाला ससून हे नाव कोरलेले प्रकर्षाने जाणवेल. ग्रंथालय, कार्यालयांचे कॉम्प्लेक्स, शाळा, क्लॉक टॉवर, अशा अनेक ठिकाणांशी हे नाव जोडले गेले आहे, हे तुमच्या लक्षात येईल.
मुंबईत आल्यानंतर या कुटुंबाने सातत्याने मुंबईच्या भरभराटीत आपले योगदान दिले आहे. या कुटुंबाने मुंबईत येऊन अनेक उद्योगधंद्यांत पाय रोवले. त्यांच्या या प्रकल्पाद्वारे सुमारे २० ते २५ हजार लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला होता. ससून कुटुंबाने तत्कालीन मुंबईतील निम्म्यापेक्षा जास्त कुटुंबाना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार पुरवला होता. १८६०च्या काळात ते मुंबईतील एका अतिश्रीमंत कुटुंबापैकी एक होते.
त्याकाळात मुंबईत बगदादहून आलेली श्रीमंत कुटुंबाची संख्या बऱ्यापैकी होती. मध्य आशियातून भारतात कोणी जरी स्थलांतरीत झाले असले तरी, त्यांना बगदादी असेच म्हटले जायचे. (जसे आता उत्तर भारतातून कोणत्याही राज्यातून आलेल्या परप्रांतीयाला भैय्या म्हटले जाते.) मध्य आशियातून मुंबईत स्थलांतरित झालेली ही कुटुंबे बहुतांशी व्यापारी होती. पर्शियन आखातीच्या बंदरातून होणाऱ्या व्यापारावर त्याकाळी यांचीच मक्तेदारी होती. मुंबईत ज्यू लोकांची संख्या बऱ्यापैकी असली तरी हा समुदाय पुरेसा संघटीत नव्हता. परंतु डेव्हिडच्या आगमनानंतर मात्र ही परिस्थिती बदलली.
१८३० पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील व्यापाराची सूत्रे स्वतःच्या हातात एकवटली होती. मात्र त्यानंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली. डेव्हिड ससून यांनी भारतात येताच लवकरात एक आंतरराष्ट्रीय व्यापारपेठ उभारली. त्याकाळी कापूस आणि अफू यांचा व्यापार जोरात होत असे. त्यांनी याच दोन वस्तूंच्या व्यापारात गुंतवणूक केली.
भारतातून हा माल ते चीनला पाठवू लागले. परंतु, फक्त या एका व्यापारानेच डेव्हिड श्रीमंत झाले असे नाही. डेव्हिड यांच्या हे चटकन लक्षात आले की, भारतात कापूस मोठ्या प्रमाणावर पिकवला जात असला तरी मुंबईत एकही कापड गिरणी नाही.
मुंबईत पहिली कापड गिरणी उभारण्याचे श्रेय डेव्हिड ससून यांनाच जाते. ही एक छोटी सुरुवात होती. पण, याच सुरुवातीमुळे विसाव्या शतकात मुंबई शहर वस्त्रोद्योगाची राजधानी म्हणून ख्यातनाम झाले.
मुंबईच्या समृद्धीत भर घालणाऱ्या आणि मुंबईला एक प्रसिद्ध व्यापारी बंदर म्हणून नावारूपास आणणाऱ्या डेव्हिड ससून यांचा १८६४ साली मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युनंतर, त्याचा मुलगा अल्बर्ट अब्दुल्लाह डेव्हिड ससून याने मुंबईतील व्यापाराची सूत्रे आपल्या हातात घेतली. ससून कुटुंबाचा कापूस आणि अफूचा व्यापार तर होताच. कालांतराने या व्यापाराला अधिकच भरभराटी येत गेली. त्याकाळी मालाचा चढ-उतार करण्यासाठी इंग्रजाकडून गोदी भाड्याने घ्यावी लागे. यावर उपाय म्हणून अब्दुल्लाहने स्वतःचीच गोदी (ज्याला धक्का देखील म्हटले जाते.) उभारण्याचा निर्णय घेतला त्याने या गोदीचा आराखडा तयार केला आणि त्याला ससून डॉक हे नाव दिले.
पश्चिम भारतातील हे पहिले वेट डॉक आहे, जिथे जहाज पाण्यावर तरंगावे म्हणून खालच्या बाजूला पुरेसे पाणी साठवलेले असते.
या डॉकमुळे इंग्लंडहून पूर्व देशात केला जाणारा सगळा व्यापार आपसूकच ससून कुटुंबियांच्या हातात आला. ससून कुटुंबाच्या संपत्तीत भर पडत गेली तसे ससून कुटुंबातील एकेक सदस्य भारतातून इतरत्र स्थलांतरित होऊ लागले. खुद्द अब्दुल्लाह याने रॉथ्शचाइल्ड कुटुंबातील मुलीशी विवाह केल्यानंतर तो युरोपात निघून गेला. ससून कुटुंबातील शेवटच्या व्यक्तीने १९५० मधून भारत सोडून इस्राइलमध्ये स्थलांतर केले.
मुंबईतील डेव्हिड ससून ग्रंथालय, मागन डेव्हिड सिनेगॉंग, ससून हायस्कूल, नेसेट इलीयाहू सिनेगॉंग अशा विविध ऐतिहासिक इमारती ही या कुटुंबाचीच देण आहे. मध्य आशियातून व्यापाराच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या ससून कुटुंबाने स्वतःसोबतच मुंबईच्या समृद्धीतही अमाप भर घातली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.