आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक मान्यवरांना पद्म पुरस्कार घोषित होत असतात. पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून दिले जाणारे नागरी सन्मान आहेत. १९५४ सालापासून भारतात पद्म पुरस्कारांचे वितरण केले जाते.
पण हे पद्म पुरस्कार कोणाला द्यायचे आणि कोणाला नाही, याची निवड सरकार कशाप्रकारे करते, जाणून घेऊया या विशेष लेखातून…
१९५४ साली पद्म पुरस्कारांचा वितरणाला सुरुवात झाली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी या पुरस्कार विजेत्यांच्या नावांची यादी जाहीर होते.
हा पुरस्कार तीन पातळीवर दिला जातो. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. एखाद्या विषयात अथवा क्षेत्रात जी व्यक्ती आपलं अमुल्य योगदान देते, त्या व्यक्तीला पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं.
पद्मविभूषण हा सर्वोच्च पद्म सन्मान असून एखाद्या क्षेत्रात दिलेल्या असामान्य आणि अतुलनीय योगदानाबद्दल प्रदान केला जातो.
पद्मभूषण हा एखाद्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्यासाठी प्रदान केला जातो, तर पद्मश्री हा एखाद्या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानासाठी प्रदान केला जातो.
एखादा पद्मश्री पुरस्कार विजेता अधिक वरच्या पद्म सन्मानाला प्राप्त करू शकतो पण एकदा पुरस्कार प्रदान केल्यानंतर त्या व्यक्तीला पाच वर्षे पुन्हा पद्म पुरस्कार घोषित न करण्याचा नियम आहे.
पद्मश्री मिळून पाच वर्ष झाल्यावरच एखाद्या व्यक्तीला पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. हेच पद्मभूषण-प्राप्त व्यक्तीला देखील लागू होते, पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पाच वर्षांनीच ती व्यक्ती पुन्हा पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करू शकते.
पद्म पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते होते. यात एक सन्मानचिन्ह आणि मानपत्र प्रदान केले जाते. पुरस्कार विजेत्याला सन्मानचिन्हाची प्रत सरकारी कार्यक्रमांच्या वेळी सोबत बाळगण्याची मुभा देण्यात आली आहे. पुरस्कार विजेत्यांची संख्या ही १२० पेक्षा जास्त नसायला हवी. पद्म पुरस्कार हे अत्यंत महत्वपूर्ण लोकांना मरणोत्तर देखील प्रदान केले जातात.
सोबतच अनिवासी भारतीय, परदेशी नागरिक आणि इतर देशातील नागरिकांना देखील पद्म पुरस्कार प्रदान केले जातात.
पद्म पुरस्काराच्या नियमानुसार पद्म पुरस्कार विजेत्याने या पुरस्काराचा सन्मान म्हणून त्या पुरस्काराचा उल्लेख नावाआधी आणि नावानंतर करणे अनिवार्य आहे.
कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मिळतात पद्म पुरस्कार ?
१) कला :- कला क्षेत्रात चित्रकला, गायन, मातीकाम, मूर्तिकला, छायाचित्रण, चित्रपट, संगीत, नाटक इत्यादी क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्ती
२) सामजिक कार्य : – समाजसेवा, सेवाभावी संस्था, समाजिक प्रकल्प, इत्यादीत योगदान देणाऱ्या व्यक्ती
३) राजकीय क्षेत्र – कायदा, राजकारण, इत्यादी क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्ती
४) विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्ती
५) व्यापार आणि उद्योग विकासात योगदान देणाऱ्या व्यक्ती
६) आरोग्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्ती
७) साहित्य क्षेत्रात योगदान देणारे कवी, लेखक, चरित्रकार, कादंबरीकार इत्यादी क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्ती
८) सरकारी सेवेत असतांना केलेल्या भरीव कार्य करणाऱ्या व्यक्ती
९) क्रीडा क्षेत्रात क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्ती
१०) मानव अधिकार आणि इतर क्षेत्रात भरीव योगदान देणारे व्यक्ती
पद्म पुरस्कार कोणाला द्यायचे हे कोण ठरवतं ?
पंतप्रधान दरवर्षी एका पद्म पुरस्कार समितीचे गठन करतात. या समितीसमोर त्या सर्वांची यादी असते, ज्यांनी एखाद्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे आणि त्यातून ही समिती चयन करत असते. या समितीचे अध्यक्षपद कॅबिनेट सचिवाकडे असते, यांच्यासोबत गृह सचिव, राष्ट्रपती सचिव आणि ५ ते ६ तज्ज्ञ लोक असतात. यातून निवडण्यात आलेल्या नावांची यादी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना दाखवण्यात येते.
पद्म पुरस्कारासाठीची पात्रता काय ?
१ मे ते १५ सप्टेंबर या कलावधीट विविध नावांची यादी राज्य सरकार, केंद्र शासित राज्य, परराष्ट्र मंत्रालय, विविध देशातील दुतावास, केंद्र आणि राज्यातील मंत्री, आधीचे भारतरत्न आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, प्रथितयश व्यक्ती आणि सामजिक संघटना यांच्याकडून मागवली जाते.
पद्म पुरस्कार समिती त्या नावांवर विचार करते, त्या लोकांच्या एकूण कार्यात ‘समाज कल्याणाचे’ आणि ‘राष्ट्र कल्याणाचे’ अंग आहे की नाही हे सर्वात आधी तपासले जाते. सोबतच क्षेत्रात किती वर्ष योगदान दिले आहे, हे देखील तपासले जाते.
निवड करण्यात आलेल्या लोकांचे चारित्र्य कसे आहे याचा तपास देखील समितीकडून विविध पद्धतीने केला जातो मगच नावावर शिक्कामोर्तब केला जातो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.