आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात खाजगी विमान सेवा सुरु होऊन कित्येक दशके उलटली आहेत. आज विमानप्रवास ही एक सामान्य बाब झाली आहे. पण, भारतात खाजगी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय जेव्हा या उद्योगपतीने घेतला तेव्हा त्यांचा प्रवास सुखकर होणार नाही हे निश्चितच होते.
१९३२ साली जेआरडी टाटांनी भारतात पहिली खाजगी विमानसेवा सुरु केली. विशेषत: प्रवासी आणि तार यांची वाहतूक करणे इतकाच मर्यादित उद्देश या पहिल्या सेवे मागे होता. पहिल्यांदा विमानसेवा सुरु करताना भारतात पुरेश्या सुविधांचा अभाव होता. या कंपनीचे पहिले ऑफिस, मुंबईच्या जुहू परिसरात पत्र्याचे छत असलेल्या एका झोपडी सदृश्य ठिकाणी सुरु करण्यात आले. जेआरडींचा जन्म २९ जुलै १९०४ रोजी, पॅरीसमध्ये झाला. जेआरडी हे रतन टाटा आणि त्यांची फ्रेंच पत्नी सुनी यांचे सुपुत्र होते.
लहानपणापासूनच जेआरडींना विमानाच्या उड्डाणाबद्दल भरपूर उत्सुकता होती. त्यांनी आकाशात उडण्याची स्वप्ने याच वयापासून पाहण्यास सुरुवात केली.
लहानपणापसूनच ते फ्रेंच पायलट लुईस ब्लेरीयट (इंग्लिश खाडी हवाईमार्गाने पार करणारा पहिला व्यक्ती) आणि ॲडोल्फ पीगॉड (लढवू विमाने चालवण्यात तरबेज असणारा पहिला पायलट) या दोघांच्याही अक्षरश: प्रेमात होते. आपल्या अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी याची नोंद केलेली आहे की, लुईस ब्लेरीयट आणि ॲडोल्फ पीगॉड हे दोघेही त्यांच्यासाठी प्रेरणास्थानी होते.
“हर्डेलॉट किनाऱ्यावर जेव्हा मी पहिल्यांदा ॲडोल्फ पीगॉडचं विमान उड्डाण पाहिलं तेव्हा पासूनच मी त्यांचा चाहता झालो. ॲडोल्फ प्रमाणे लीलया हवाई कसरती करण्याची स्वप्ने मी देखील तेव्हापासूनच पाहण्यास सुरुवात केली,”
जेआरडींचे बालपण फ्रांसमधेच गेले पण, १९२९ मध्ये आपले फ्रेंच नागरिकत्व रद्द करून ते भारतात आले. मुंबईत पहिल्यांदा एरो क्लब ऑफ इंडिया या फ्लाइंग क्लबची स्थापना झाल्यानंतर पायलट बनण्याचे जेआरडी यांचे स्वप्न पूर्ण झाले. १० फेब्रुवारी १९२९ रोजी साडेतीन तास हवेत घालवल्यावर त्यांना भारताच्यवतीने पहिल्यांदा विमान चालवण्याचा अधिकृत परवाना मिळाला.
तार आणि प्रवासी वाहतूक करण्याच्या उद्देशाने जेआरडींनी १९३२ मध्ये टाटा एअर सर्व्हिस सुरु करण्याचा निर्णय घेतला. यासाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा देखील त्यावेळी त्यांना उपलब्ध झाल्या नाहीत.
१५ ओक्टोंबर १९३२ हा दिवस टाटा एअर सर्विस आणि भारताच्या हवाई वाहतुकीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे.
याच दिवशी जेआरडी यांनी, कराचीच्या ड्रीघ रोड एअरोड्रोम पासून मुंबईच्या जुहू एअरस्ट्रीप पर्यंत अहमाबादमार्गे ऐतिहासिक विमान उड्डाण केले. यासाठी वापरण्यात आलेले विमान हे सिंगल इंजिनचे होते, ज्यातून ४ आणे किमतीची २५ किलो पोस्टकार्ड्सची वाहतूक केली होती.
हे पहिले विमान उड्डाण आमच्यासाठी फारच उत्सुकता निर्माण करणारे होते. हे उड्डाण यशस्वी व्हावे यासाठी मी प्रार्थना केली आणि जे जे कोणी या प्रवासात सहभागी होणार होते त्यांच्या सुरक्षेसाठी देखील. त्याकाळात या प्रोजेक्टवर काम करणारी आमची टीम फारच लहान होती. आम्ही सर्वांनी मिळून अनेक यश आणि अपयश पचवले, आनंद आणि होणारा मनस्तापदेखील वाटून घेतला.
आम्ही सर्वांनी मिळून या व्यवसायाचा पाया घातला, जी पुढे जाऊन एअर इंडिया आणि एअर इंडिया इंटरनॅशनल या नावाने उदयास आली.
आपल्या आठवणींना उजाळा देताना अनेकदा जेआरडी याबाबत उत्साहाने सांगत असत.
पहिल्या वर्षी टाटा एअर सर्विसने २,५७,४९५ किमीचे अंतर पूर्ण केले, यात १५५ प्रवासी आणि १० टन तारांची वाहतूक केली. याच वर्षी त्यांनी सर्वाधिक अंतराचा टप्पा देखील पूर्ण केला. सुरुवातीची ही विमाने अगदी लहान असत त्यामुळे कधी कधी प्रवाश्यांना तारेचा गठ्ठा असलेल्या बॅग्जवर बसून प्रवास करावा लागे.
१९३८ मध्ये कंपनीचे रुपांतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत करण्यात आले. कंपनीचे एअर इंडिया असे नामकरण केल्यानंतर मुंबईतील टाटा हेड ऑफिस येथे कंपनीचे हेडक्वार्टर सुरु करण्यात आले. यानंतर दोनच वर्षात एअर इंडियाने युरोपमध्ये आपली पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरु केली. ८ जून १९४८ रोजी मलाबार प्रिन्सेस या विमानाने ८,०४७ किमीवरून मुंबई ते लंडन असे उड्डाण कैरो आणि जिनिव्हा मार्गे केले. यात इतर ३५ प्रवासी आणि सोबत खुद्द जेआरडी देखील होते.
एअर इंडियाच्या या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचे कॅप्टन होते के. आर. गुझदार आणि डी. के. जातर.
१९५३ साली एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतर जेआरडींना कंपनीचे चेअरमन पद देण्यात आले. १९७८ पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. ऑक्टोबर १९६२ मध्ये, कंपनीच्या तिसाव्या वर्धापनदिन, जेआरडी यांनी स्वतः कराची ते मुंबई पर्यंत लिओपार्ड मॉथ प्लेनने हा दिवस साजरा केला. १९८२ मधे ५० व्या वर्धापनदिनी देखील जेआरडी यांनी हा सोहळा साजरा करण्यासाठी पुन्हा मेलबॅगसहित पाकिस्तानचे राष्ट्रपतींनी भारताच्या राष्ट्रपतींना दिलेला संदेश आणि कराचीच्या महापौरांनी मुंबई महापौरांना दिलेला संदेश देखील या मेलबॅगमध्ये होता.
एअर इंडियाने, इंडियन एअरलाइन्स आणि इंडियन एअर फोर्सच्या मदतीने, मध्य पूर्वेतील आखाती युद्धांची सुरुवात होण्यापूर्वी, १,११,००० लोकांची सुटका करवून त्यांना अमन (जॉर्डन) ते मुंबई पर्यंत सुखरूप आणले.
एका नागरी एअर लाईनने इतक्या मोठ्या प्रमाणात सुटका करून स्थलांतर करवण्यात सहभाग घेतल्याचे हे पहिलेच उदाहरण होते. भारतीय नागरी हवाई वाहतुकीच्या दृष्टीने जेआरडीचे हे योगदान अभूतपूर्व आहे. “आपली सेवा जर आपले देश आणि देशांचे नागरिक यांच्या गरजांना लक्षात घेत नसेल, तर मिळवलेल्या कोणत्याही भौतिक यशाचे कसलेच मोल नाही,” असे ते नेहमी म्हणत.
भारतीय हवाई वाहतुकीच्या स्थापनेसह, जेआरडींनी या क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाची दाखल घेत, भारत सरकारने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर एका वर्षाने २३ नोव्हेंबर १९९३ रोजी वयाच्या ८९ वर्षी जिनिव्हा येथे त्यांचे निधन झाले.
जेआरडींना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. हा सन्मान संसद सदस्यांव्यतिरिक्त कुणालाही देण्यात येत नाही. पण, फक्त जेआरडी हेच एक दुर्मिळ उदाहरण होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.