आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
पश्चिम बंगालच्या जादवपूरमध्ये राहणारे शिक्षणतज्ञ काझी मासूम अख्तर हे एक बंगालमधील प्रसिद्ध शिक्षणतज्ञ असून त्यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्रीची घोषणा करण्यात आली आहे. पद्मश्री पुरस्काराचा मानकरी ठरलेले अख्तर मात्र आज पश्चिम बंगालमधील कट्टरतावादी मुस्लीमांपासून स्वतच्या जीव वाचवत आहेत.
देशभक्ती आणि महिलांचे हक्क यांच्या साठी प्रयत्न करणारे शिक्षणतज्ञ प्रभावी मुख्याध्यापक अशी ओळख ज्यांची पद्मश्री पुरस्कारावर देताना सांगण्यात आली आहे.
त्याला आज आपला जीव मुठीत धरून जगावं लागत आहे, हे मात्र फार दुर्दैवी आहे.
अख्तर यांच्या प्रयत्नांना आज जरी भारत सरकारकडून उचित सन्मान मिळाला असला तरी आजही अख्तर हे आपला जीव संभाळून जगत आहेत.
आपल्याच देशात त्यांना अशा भयग्रस्त वातावरणात का राहावं लागत आहे याचं मूळ पाच वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेत असून ज्यामुळे त्यांच्या जीवाला एक मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक इस्लामी आणि कट्टरपंथी मुस्लिम संघटनांच्या रडारवर अख्तर असून त्यांच्या मनात अख्तर यांच्याविषयी प्रचंड द्वेष भरलेला आहे, गेल्या पाच वर्षात अख्तर यांना मोठ्या छळाचा सामना करावा लागला आहे.
अख्तर यांच्या वाट्याला जन्माने मुस्लिम असूनही मुस्लिम कट्टरपंथी संघटनांचा द्वेष येण्यामागे कारण एकच आहे की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत म्हणायला सांगितलं होतं.
फक्त ह्या एवढ्या एका कारणामुळे आज त्यांना स्वतःच्या जीवाला जपावं लागत आहे.
मार्च २०१५ मध्ये अख्तर दक्षिण कोलकाताच्या एका मदरसाचे मुख्याध्यापक असतांना त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत म्हणायला सांगितले आणि अचानकच एका मोठा जमाव त्या दिवशी त्यांच्यावर चालून आला ज्यात अनेक मौलानांचा देखील समावेश होता. अख्तर यांच्यावर हल्ला करण्यात आला, त्यात अख्तर गंभीर जखमी झाले.
हा हल्ला करण्याचे कारण एकच होते की त्यांनी मुलांना राष्ट्रगीत म्हणायला सांगितले.
मुस्लिम कट्टरतावादी लोकांच्या मते राष्ट्रगीत हे एक सांप्रदायिक गीत असून ते हिंदुत्वाचं गाणं आहे, अख्तर हे एक काफिर असून मुलांच्या बुद्धीला भ्रष्ट करत आहेत म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. हे सर्व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच घडलं होतं. त्या घटनेनंतर आजपर्यंत अख्तर हे स्वत:चा जीव वाचवत फिरत आहेत. त्यांच्या विरोधात असंख्य फतवे ह्या मुस्लीम कट्टरतावादी लोकांनी काढले असून त्यांचा जीवाला अजूनही धोका असल्याचं ते सांगतात.
तत्कालीन बातमी पत्रात छापून आलेल्या वृत्तानुसार काही मौलाना आणि धार्मिक गुरुंनी ताल्पुकुर आरा हाय मदरसाच्या मुख्याध्यापक असलेल्या अख्तर यांना मुलांना राष्ट्रगीत म्हणायला सांगितले म्हणून मारहाण केली आहे.
त्यांच्या भावना दुखावल्याचं स्पष्टीकरण मुस्लिमांनी दिलं आहे.
पण अख्तर यांच्या मते फक्त राष्ट्रगीत हा मुद्दा कधीच नव्हता, अख्तर यांना अशा हल्ल्यांना कायम सामोरं जावं लागत होतं. अख्तर अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये होते.
त्यांच्यावर उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुस्लिमांनी पुन्हा मदरशाच्या आवारात भटकण्यास देखील मज्जाव केला होता.
जेव्हा त्यांनी पुन्हा नोकरीवर रुजू होण्याची मागणी केली तेव्हा त्यांच्यासमोर काही विचित्र अटी ठेवण्यात आल्या. त्यांना शर्ट घालणं सोडून कुर्ता पायजमा घालावा लागेल, जो पारंपारिक मुस्लीम पोशाख आहे.
इतकंच नाही तर त्यांना आपली क्लीनशेव ठेवता येणार नाही आणि त्यांना दाढी वाढवावी लागेल, अशी देखील अट ठेवण्यात आली होती. राष्ट्रगीताचा मुद्दा फक्त कारण होता, पण मुस्लीम कट्टरतावादी अख्तर यांच्या विरोधात तेव्हापासून होते ज्यावेळीपासून त्यांनी मुस्लिम मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले होते. अख्तर यांनी त्या मुलींच्या बालविवाहाला देखील कडाडून विरोध केला होता.
ते मुलींच्या पालकांना भेटून बालविवाह कसा कायदेशीर अपराध असून त्याचा कसा परिणाम मुलीच्या मनावर होतो हे समजावून सांगत होते.
अख्तर यांनी ट्रिपल तलाकच्या कायद्याविरोधात देखील भूमिका घेतली होती आणि त्यांनी स्पष्ट शब्दात त्याचा धिक्कार करत १ लाख सह्यांची मोहिम देखील त्याविरोधात हाती घेतली आहे. मुस्लिम समाजात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना ह्या त्रासाला सामोरं जावं लागलं आहे.
त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांची जयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी देखील त्यांना विरोधाचा सामना करावा लागला होता.
अख्तर आजदेखील त्यांचा जीवाला जप्त आहेत, त्यांनी पोलिसांकडे अनेक तक्रारी देखील ह्या संदर्भात केल्या आहेत. त्यांना सदैव धमक्यांचा अंधकारात रहावे लागत असल्यामुळे त्यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती.
पण ममता सरकार हे मुस्लिम कट्टरतेला प्रोत्साहन देत आहे त्यामुळे पोलीस देखील कारवाईला कचरत असल्याचा आरोप अख्तर यांनी केला आहे. कोर्टात त्यांनी दाद मागून पाहिली, कोर्टाने पोलिसांना निर्देश दिले, पोलिसांनी त्या गुन्हेगार कट्टरतावादी लोकांना अटक देखील केली पण पुढे कुठलीही कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात आलं.
अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मदरसेच्या हेडमास्तर पदावरून अख्तर यांची गच्छंती करण्यात आली. आता ते जादवपूर भागातील एका शाळेत मुख्यध्यापक आहेत.
अख्तर यांनी नुकतच केंद्र सरकारच्या सीएए कायद्याला समर्थन दिलं असून भारतीय मुस्लिमांना भयाचे कारण नसल्याचे म्हटले आहे. पण यावर देखील मोठा वाद निर्माण झाला असून त्यांना पुन्हा धमक्या येण्यास सुरुवात झाली आहे.
ते म्हणतात की सीएए आंदोलनाचा मुद्दाच फार वेडगळ असून जे लोक आंदोलन करत आहेत, ते आज राष्ट्रगीत म्हणत आहे, हेच राष्ट्रगीत मी तेव्हा म्हणत होतो तर मला विरोधाचा सामना करावा लागला होता.
आज पद्मश्री मिळाल्यामुळे मी आनंदी आहे पण माझ्या जीवाचा धोका अजूनही कमी झालेला नाही, पण मला त्याची पर्वा नसून मुस्लिम समाजात सुधारणेचे कार्य मी चालू ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.