आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात EVM मशीन ही निवडणूक प्रक्रियेचा एक महत्वपूर्ण भाग आहे. भारतात EVM मशीनवर होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर भारतातील विरोधी पक्ष आक्षेप घेऊन भाजपा सत्तेसाठी त्या EVM चा वापर करत असल्याचा आरोप निवडणूक निकाल लागल्यावर करत असतात. पण विरोधी पक्षांच्या आरोपांचे खंडन निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी करण्यात आले आहे. परंतु विरोधक मात्र आरोप करत असतात.
अनेक विरोधक अशी मागणी करत असतात की भारतात निवडणूक ही बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेतली जावी. EVM भारतीय निवडणूक संस्थेचा भाग होण्यापूर्वी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेतल्या जात होत्या. पण या पद्धतीत देखील अनेक घोळ होते, जे कालांतराने लक्षात आल्याने ही पद्धती कालबाह्य ठरवून नवीन तंत्रज्ञानावर आधारित पद्धत देशभरात लागू करण्यात आली.
भारताच्या निवडणुकीत EVM चा वापर सुरु होण्यापूर्वी फार मोठ्या प्रमाणात घोटाळे होत होते. ह्या घोटाळ्यांना आवर घालण्यात निवडणूक आयोगाची पंचायत व्हायची. असाच एक प्रकारचा घोटाळा भारताच्या पहिल्या निवडणुकीत झाला होता. भारताच्या सौराष्ट्र राज्यात जो युनायटेड स्टेट्स ऑफ काठियावाड म्हणून ओळखला जात होता.
सौराष्ट्र हे भारताचे एक राज्य होते, जे पुढे गुजरात राज्याचा भाग म्हणून नावारूपास आले. या भागात एक अट्टल गुन्हेगार, घरफोड्या आणि अनेकांच्या मनातील नायक अशी प्रतिमा असलेला भुपत सिंह नावाचा व्यक्ती होता. त्याच्या गुन्ह्यांची चर्चा लांबपर्यंत पोहचली होती.
या भुपत सिंहाने भारताच्या इतिहासाच्या अत्यंत महत्वपूर्ण कालखंडात गोंधळ माजवला होता. एकीकडे देश स्वातंत्र्य होत होता आणि देशाची फाळणी होत होती. त्यावेळी ह्या भुपत सिंहाने सौराष्ट्रावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. देशाची फाळणी, प्रांत रचना आणि इतर प्रशासकीय गोंधळामुळे भुपतचा सौराष्ट्राच्या भूमीवर उदय होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली होती.
भुपत आधी बडोद्याच्या महाराजांच्या सेवेत कार्यरत होता. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात एक कारचालक म्हणून झाली होती. पण जसं बडोद्याचं संस्थान खालसा करण्यात आलं आणि राजावर बहिष्कार घालण्यात आला. त्यावेळी भुपतने परिसरात माजलेल्या अनागोंदीचा फायदा उचलून त्या भागात वर्चस्व प्रस्थापित केलं. याला अर्थातच राजाचा पाठींबा लाभला होता.
भारत स्वातंत्र्य झाल्यावर आपल्या हातची सत्ता गमवावी लागणार ह्या एका भीतीने देशभरातल्या संस्थानिक घराण्यातून पहिल्या निवडणुकीच्या अपयशासाठी असंख्य डावपेच खेळले गेले होते.
संस्थानिकांना आपलं राज्य टिकवण्यासाठी निवडणुकीत विजय मिळवणे अत्यावश्यक झाले होते. यासाठीच त्यांना भुपत सारख्या दरोडेखोर आणि दहशतवादी गुंडांची गरज निर्माण झाली होती. आपल्या परिसरात अराजक निर्माण करायचं आणि आपल्याला वगळता इतर कोणाला सत्तेत राहण्याचा अधिकार नसावा या एकाच भावनेतून एका मोठ्या गुंडाला प्रोत्साहन देण्याचं काम या सौराष्ट्रातल्या संस्थानिकांनी केलं होतं.
डोक्यावरच्या राजाश्रयामुळे या भुपतने असंख्य चोऱ्या केल्या, दरोडे घातले, खून केले, यामुळे त्याची दहशत त्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. या गुंडाच्या दहशतीच्या चर्चा पार अमेरिकेपर्यंत जाऊन पोहचल्या. न्युयॉर्क टाईम्स आणि इतर काही दैनिकांनी भारतात सुरु असलेल्या या दहशतवादावर बोलायला आणि लिहायला सुरुवात केली होती. भुपत सिंहाच्या मोठे होण्याला बडोद्याची राजकन्या मोठ्या प्रमाणावर जबाबदार होती. तिनेच भुपत सिंहाला प्रदेशात आराजकता पसरवण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. यात त्याने कुठलीच कसर सोडली नाही.
त्याने त्या भागातील गरीब शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास दिला. यामुळे त्या भागात त्याची प्रचंड दहशत निर्माण झाली. त्याने पसरवलेल्या या दहशतीच्या बळावर राजकुमारीने देशाच्या पहिल्या निवडणुकीत आपला प्रचार करताना ब्रिटीश सरकार गेल्यामुळे आता देशात अराजक असून अशा अराजकाच्या परिस्थितीत जर तुम्हाला ह्या वाढत्या गुंडांच्या जाचा पासून मुक्ती हवी असेल तर तुम्हाला मला आणि कॉंग्रेस पक्षालाच मतदान करावं लागेल. कॉंग्रेसशिवाय तुमच्या हाती दुसरा कुठलाच पर्याय नाही. एकप्रकारच्या भीतीच्या राजकारणावर या लोकांच्या पोळ्या भाजणे सुरु होते.
या सौराष्ट्राच्या राजकुमारीने लुटमारीने लोकात भीती पसरत नाही, हे बघून भुपतला अजून धनराशी देऊ केली आणि आता रक्तपात करायला सुरुवात कर म्हणून सांगितले. त्याने आदेशाचे पालन करत लोकांच्या मनात भय निर्माण करायला हत्याकांड सुरु केले. कॉंग्रेस पक्षाचे असंख्य विरोधक आणि अनेक गावातील प्रतिष्ठीत व्यक्ति यांच्या रक्ताचा घोट त्याने घेतला.
त्याने सामान्य जनतेचा राक्षसी पद्धतीने छळ चालवला होता. याचा फायदा सरळ सरळ फायदा राजकुमारीला होत होता. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अनेकांनी अगदी डोळे बंद करून आपले समर्थन देऊ केले.
भयाच्या पोटी विरोध करायला अथवा विरोधात उभं रहायला कोणी मिळालं नाही, याचा फायदा राजकुमारीला झाला. पण राजकुमारीच्या क्षणिक सत्ता सुखासाठी अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले होते.
वि. ग. कानिटकर नावाच्या मराठी पोलीस अधिकाऱ्याची या भागात नियुक्ती करण्यात आली होती. त्याने अत्यंत मेहनतीने भूपतीच्या दहशतीच्या साम्राज्याला सुरुंग लावला. त्याने शिताफीने त्याचे सर्व अड्डे उध्वस्त केले आणि त्याचा साथीदरांना पकडून त्यांची रवानगी कारागृहात केली. कानिटकरांच्या ह्या आक्रमणाने भुपतसिंह पुरता भांबावून गेला. सरतेशेवटी भुपतसिंह स्वत:चा जीव वाचवत पळत सुटला आणि कायमचा अदृश्य झाला. अनेकांच्या मते त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तो पाकिस्तानात वास्तव्याला गेला. परंतु पुढे त्याचा काही पुरावा हाती लागू शकला नाही. कानिटकरांच्या धडाकेबाज कारवाईमुळे हा भाग भयमुक्त होऊ शकला.
आज हे प्रकरण बऱ्यापैकी इतिहासाच्या पानात गडप झालं आहे. कानिटकरांनी एका मराठी पुस्तकात यात लिहून ठेवलं आहे असं म्हणतात. पण निवडणूक व सत्ता लालसेसाठी खेळण्यात आलेला हा सर्वात रक्तरंजित डाव होता. भारताच्या पहिल्या निवडणुकीला व लोकशाहीला यामुळे गालबोट लागले होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.