आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
त्या दिवशी कलकत्त्याच्या इडन गार्डन स्टेडीयमवर भारताची लढत होती ऑस्ट्रेलियाशी. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि भारतासमोर ४४५ धावांचे भले मोठे लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने १७१ धावांतच आपला खेळ गुंडाळला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला फॉलोऑन खेळण्याची संधी दिली.
फॉलोऑन खेळतानाही भारताची स्थिती अगदीच डळमळीत झाली होती. ५२ धावांतच भारताची पहिली विकेट पडली. स्टेडीयममधील प्रेक्षकांची निराशा वाढतच होती. भारत याही सामन्यात काही विशेष कामगिरी करू शकेल असे दिसत नसल्याने कित्येक प्रेक्षक स्टेडीयममधून निघून गेले. अशात सचिननेही फक्त दहा धावा काढल्या आणि तंबूत परतला. आता तर भारताचा पराभव स्पष्ट दिसत होता.
पुढे येणारे बॅट्समन काही विशेष कामगिरी करतील अशी आशा ठेवण्यात काही अर्थ वाटत नव्हता. तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाच्या हातात गेलेली ही मॅच पुन्हा भारताच्या पारड्यात टाकली.
त्याने सामन्याचा निकालच बदलून टाकला. तेव्हापासूनच व्ही. व्ही. एस. लक्ष्मण ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’ झाला.
ऑस्ट्रेलियाने त्यावेळी सलग १५ कसोटी सामने जिंकले होते. मॅथ्यू हेडन, रिकी पॉंटिंग आणि अॅडम गिलक्रिस्ट यांच्यासारखे फलंदाज असलेला संघ कसा असेल याची कल्पनाच केलेली बरी. याउलट भारतीय संघात अशा मजबूत फलंदाजांची कमतरता होती त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियन संघासमोर फारच कमकुवत समजला जायचा. आंतरराष्ट्रीय पातळीवरील १५ सामने जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचे वलयच इतके प्रभावी होते की भारतीय संघावर त्याचे प्रचंड दडपण आले होते.
या कसोटी मालिकेची सुरूवात मुंबईच्या मैदानातून झाली. कसोटीतील या पहिल्याच सामन्यात भारतीय संघावर जबरदस्त दडपण होते म्हणूनच त्यांना या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.
दुसरा सामना होता कलकत्त्याच्या इडन गार्डनवर. तिथेही भारतीय संघामध्ये आत्मविश्वासाची कमतरता होतीच. ४४५ धावांचे लक्ष्य पूर्ण करताना भारताने फक्त १७१ धावांतच आपला खेळ गुंडाळला. ऑस्ट्रेलियाने भारताला फॉलोऑन खेळण्याची संधी दिली, पण फॉलोऑन खेळतानाही भारतीय संघ हा सामना जिंकेल असे वाटण्यासारखी कुठलीच लक्षणे आपल्या खेळाडूंमध्ये दिसत नव्हती.
सदगोप्पन रमेश आणि शिव सुंदर यांनी फॉलोऑनची सुरुवात केली. ५२ धावसंख्या झालेली असताना रमेशची विकेट पडली. रमेश नंतर कॅप्टन सौरभ गांगुलीने व्ही. व्ही. एस. लक्ष्मणला मैदानावर पाठवले. दास आणि लक्ष्मण यांनी मिळून चांगली धावसंख्या उभारली. ९७ चा स्कोअर बोर्डवर लागलाच होता इतक्यात मॅग्राथच्या बॉलवर दासची विकेट पडली.
दास गेल्यावर सचिन मैदानात आला पण, दहा धावा करून तोही तंबूत परतला. आता क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा मावळल्या होत्या. काही प्रेक्षकांनी स्टेडियम सोडलेच होते, जे बसून होते ते कदाचित पाहू तरी काय होतंय या आशेवर बसले असतील. ११५ धावसंख्येवर भारतीय तीन फलंदाजांना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी तंबूत पाठवले होते.
आता कॅप्टन गांगुली आणि लक्ष्मण यांची भागीदारी सुरु झाली. दोघांवरही तणाव होता. गांगुलीनेही ४८ धावा केल्या, त्याचे अर्धशतक तरी पूर्ण होईल असे वाटत असतानाच मॅग्राथच्या बॉलने गांगुलीचीही विकेट घेतली.
आता मैदानात उतरला द्रविड. द्रविड आणि लक्ष्मण यांनी चांगला सूर पकडला. लक्ष्मणने आपले शतक पूर्ण केले. यानंतर मॅग्राथ काय किंवा वॉर्न काय, लक्ष्मणने कुणाचीच पर्वा केली नाही.
द्रविड आणि लक्ष्मण दोघांनीही धावांचा डोंगर रचला. दोघांनीही आता आक्रमक पवित्रा घेतला होता. लक्ष्मणच्या बॅटने कांगारूंना चांगलाच घाम फोडला होता. त्याने दुसरे शतक पूर्ण केले आणि अख्ख्या स्टेडियमने त्याला उभे राहून अभिवादन केले. आजचा दिवस लक्ष्मणचा होता. प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव होते व्ही. व्ही. एस. लक्ष्मण.
दोन शतकावरच त्याची बॅटिंग थांबली नाही तर कसोटी सामन्यातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू हा सुनील गावस्करचा रेकॉर्डही त्याने मोडून टाकला. द्रविडनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकले होते. यामुळे सामन्याचे चित्रच पालटले हातातून गेला असा वाटणारा सामाना आश्चर्यकारकरित्या भारताच्या बाजूने फिरला होता. सामन्याचा अंतिम निकालच बदलून जाईल असा खेळ करून लक्ष्मणने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. भारतीय प्रेक्षक आणि भारतीय संघ दोघांचेही मनोबल त्याने उंचावले होते.
सामन्याच्या पाचव्या दिवशी लक्ष्मणची धावसंख्या होती २८१. आज लक्ष्मण तिसरे शतक ठोकणार अशी अनेकांना अपेक्षा होती पण मॅग्राथने पाचव्या दिवशी लक्ष्मणला तंबूत पाठवलेच. द्रविडसोबत मिळून लक्ष्मणने ३७६ इतकी चांगली धावसंख्या उभारली होती.
भारत आता ६ बाद ६०८ धावांवर पोहोचला होता. कॅप्टन गांगुलीने खेळ संपवण्याऐवजी आणखी काही धावा जोडण्याचे शहाणपण दाखवले आणि भारत ६५७ धावांवर पोहोचल्यानंतर त्याने आपला खेळ संपल्याचे घोषित केले. फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली होती. विजय मिळवायाचा तर आता गोलंदाजांनीही तितकीच दमदार कामगिरी करणे अपेक्षित होते.
हरभजन सिंगने सहा विकेट घेऊन फलंदाजांच्या कष्टाचे चीज केले. त्याच्या विकेट्समुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारणे शक्य झाले नाही.
ऑस्ट्रेलिया समोर ३८४ धावांचे लक्ष्य असताना ते फक्त २१२ धावाच काढू शकले. भारताने या सामन्यावर आपला शिक्कामोर्तब केला होता.
लक्ष्मणला या सामन्यासाठी ‘मॅन ऑफ दि मॅच’चा किताब मिळाला. विशेष म्हणजे त्याच्या या खेळाने ग्रेग चॅपेल त्याच्यावर भलतेच खुश झाले. या सामन्यानंतर त्यांनी लक्ष्मणला ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’ अशी बिरुदावली दिली आणि ते याच नावाने त्याला हाक मारत असत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना लक्ष्मणने आपला हा आक्रमकपणा कायम ठेवला. त्यांच्याच मैदानावर झालेल्या सामन्यातही त्याने द्विशतक झळकवले होते. आज लक्ष्मण भारतीय संघाचा खेळाडू नसला तरी समालोचक म्हणूनही त्याने आपले स्पेशल स्थान निर्माण केले आहे.
आजही व्ही. व्ही. एस. लक्ष्मण भारतासाठी ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’च आहे आणि पुढेही राहील!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.