आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
पहिल्या दबंगमधे एक भ्रष्ट, उद्धट पण मनाने चांगला असणारा पोलीस आईच्या हत्येचा बदला घेताना तुटलेल्या परिवाराशी पुन्हा जोडला जातो. हे एक अलिप्त पात्र म्हणून बघितलं तर असं पात्र आजवर भारतीय सिनेमात नव्हतं. स्टाईल, विनोद सगळं अगदी फ्रेश. वॉन्टेंडमधे एक पोलीस ओळख बदलून गुंडात वावरतो, आणि गुंडगिरी संपवतो. यात त्याच्या वडिलांचं आणि भावाचं त्याला बलिदान द्यावं लागतं. हिरोईनच्या घरचा मालक आणि तिला त्रास देणारा भ्रष्ट पोलीस यांतून सतत एक विनोदी वातावरण तयार होतं.
रेडीमधे तर अगदी दर ५ मिनिटाला पंचलाईन्स आणि पुन्हा पुन्हा बघितल्यावर समजतील असे विनोद, एक भरभक्कम स्टोरी असं बरंच असतं. बजरंगी भाईजान तर आहेच एक छान फॅमिली सिनेमा. आणि अजूनही सलमानचे काही सिनेमे टीव्हीवर लागले तर चांगला फॅमिली सिनेमा, छान कथा म्हणून बघणारे सामान्य प्रेक्षक खूप आहेत. यातले गाणे आले की स्कीप करणं, फायटिंग आली की इग्नोर करणं असं ठिके पण ओव्हरॉल हे सिनेमे चांगला टाईमपास करतात.
पण रेस 3, टायगर झिंदा है आणि आता राधे या सगळ्यात यातले गाणे, फायटिंग हे सगळं एवढं जास्त कोंबल गेलंय की जी हलकी फुलकी कथा लोक एन्जॉय करायचे ती राहिलीच नाही.
सलमानच्या अभिनयातल्या मर्यादा या सिनेमांतल्या चाणाक्ष दिग्दर्शनाने झाकून गेल्या होत्या त्या आता बाहेर पडताय. सलमान भाईंचा मूळ प्रेक्षकवर्ग यातून दुरावला, आणि यातले मिम्स त्यांना जास्त विनोदी वाटू लागले. कथा, पटकथा यातल्या कामाचा दर्जा एवढा खालावला की दबंग ३ ची कथा म्हणे सलमानने स्वतःच लिहिली.
“राधे”च्या निमित्ताने जी अजून एक निराशा आपल्या वाट्याला आली आहे, त्याची कारणे बघुयात.
‘राधे’मधे मुंबईत ड्रग्जच्या वाढलेल्या व्यापारामुळे अल्पवयीन मुलं आत्महत्या करतायत आणि म्हणून स्पेशल पोलीस अधिकारी- राधे शहरात येतो. मग काय गुंडांना मारलं की दी एन्ड. कथेची रूपरेषा इतकी एकांगी आणि अजिबात क्रिएअटीव्ह नाहीये. गली बॉय सिनेमाचे डायलॉग लिहिलेल्या विजय मौर्याने या सिनेमाचे डायलॉग लिहिले आहेत यावर विश्वास बसत नाही, इतकं हे सुमार काम आहे.
सामान्यपणे सिनेमाच्या कथेत काही ठराविक चढउतार असतात. साहजिकच इंटर्व्हलला आपला हिरो हरतो, आणि आता पुढे काय होईल या चिंतेत आपण पॉपकॉर्न आणायला जात असतो, पण इथे तो लो पॉइंटसुद्धा नीट येत नाही, त्यासाठी कथेत लागणारा जीवच या चित्रपटात नाहीये. हाय पॉईंट नेमका हाच असेल असं वाटतं पण तो सिन संपतो, मग दुसरी फायटिंग, मग तिसरी, असं आपण वाट बघत बसतो. यातून क्लायमॅक्ससाठी उत्कंठा वाढावी अशी सामान्य अपेक्षा निर्मात्यांना असेल असं वाटतं पण तसं न होता हे सिन कंटाळा वाढवतात.
बाघी 3 मधे एकानंतर एक फाईट सिनने क्लायमॅक्सपर्यंत आपल्या अपेक्षा वाढतात, मग हेलिकॉप्टर येतं, तेव्हा ते अवास्तव आणि विनोदी ही वाटतं. इथे मात्र त्या विभागात ही काही काम केलेलं नाही, रटाळ वाटतील असे तेच तेच सिन बाकी सिनेमातून चोरून वापरलेत असं वाटतं.
प्रभू देवा ऍक्शन सिनेमांमधे लोकप्रियतेचे उच्चांक गाठत होता पण कदाचित आता त्याची कल्पकता संपत आली आहे.
सलमान खानचा ब्रँड, त्यामुळे वाढणारी प्रोडक्शन कॉस्ट आणि त्यामुळे चांगली कथा मोठ्या कॅनव्हासवर दाखवायची संधी या सगळ्यांचा फायदा करून घेणं या आधी प्रभू देवाला जमलं होतं. पण राधेमधे आधीच्याच सिनेमातील सूत्रं पुन्हा वापरण्याचं आळशी काम प्रभू देवाने केलंय.
पण आता काळ बदलला आहे. वॉन्टेंड आला तेव्हा ते सगळं नवीन होतं, आता मात्र ती सूत्र जुनी झालीत. तरीही डोक्याला रुमाल, उगाच ओरडणारे गुंड, भ्रष्ट पोलीस, एका बुक्कीत गार पडणारे गुंड, हवेत उडून मारणारा हिरो असं सगळं राधेच्या निमित्ताने आपण बघतो.
या सिनेमात आपल्याला सगळं मिळतं. म्हणजे ईदच्या शुभेच्छा, ‘स्वच्छ भारत मिशन’ची जाहिरात, रिअलमी मोबाईलमधले सेल्फी, आयटम सॉंग्स, सगळं. पण काच फोडत राहणं हा सलमान भाईंना लागलेला नवीन छंद आहे वाटतं. राधेमधे भाई बिल्डिंगच्या काचांपासून तर हेलिकॉप्टरच्या काचांपर्यंत सगळं काही आपल्या चेहऱ्याने फोडून आत घुसतात.
एक तर हे हेलीकॉप्टर सध्या प्रत्येक ऍक्शन सिनेमात आणून विज्ञानाला धाब्यावर बसवणं ट्रेंडमध्ये आलंय. असाच दुसरा डोकेखाऊ आणि गंभीर ट्रेंड म्हणजे स्त्री सबलीकरण!
स्त्रियांना कथेत काही बदल आणतील असे मुख्य पात्र दिल्या जात नाही, पण आयटम सॉंग्समधून त्यांचं अंगप्रदर्शन नक्की केलं जातं. पण आता आता आपला नायक स्त्रीशक्तीचे धडे द्यायला लागलाय. सिनेमाच्या कथेशी काहीही संबंध नसताना रँडम स्त्री पात्र येऊन हिरोला सभ्य करून जाते. जणू त्या एका सिनमधून बाकी अपवादात्मक सिन झाकले जातील, प्रसंगी यातून विषयांतर होतं.
सलमान भाईंच्या खांद्यांवर ओझं कमी करायला नेहमी त्यांच्या सिनेमात साहाय्यक पात्र खूप चांगली असतात. विनोद सलमान सोबत होत असला तरी त्याच्याकडून नसतो होत, तो या बाकी पात्रांच्या मदतीने केला जातो. उदाहरणार्थ दबंगमधे बाकी हवालदार, वॉन्टेंडमधला घरमालक, रेडीमधे परेश रावलचं पात्र. या छोट्या छोट्या पात्रांतून कथा अधिक रंजक होते पण राधेमधे ती सोय ही नाहीये. दिशा पाटणी आणि जॅकी श्रॉफची पात्रं नीट लिहिलीच गेली नव्हती त्यामुळे त्यांच्या सुमार अभिनयावरही आरोप करता येत नाही.
एकंदर राधे – युअर मोस्ट “अनवॉन्टेंड” भाई असं नाव या सिनेमाला जास्त शोभलं असतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.