आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
इंदिरा गांधींच्या आणीबाणीनंतर देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या. निवडणुकीत जनता पक्षाला अभूतपूर्व यश प्राप्त झालं. २३ मार्च १९७७ रोजी मोरारजी देसाई यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेऊन काही दिवस उलटले नव्हते तोपर्यंत मोरारजी देसाईंनी ३० एप्रिल १९७७ रोजी आठ राज्यांमधील राज्य सरकारांना बरखास्त केलं. त्यांनी असं का केलं याचा इतिहास रंजक आहे.
देशात वेळोवेळी वेगवेगळ्या केंद्र शासनांनी कलम ३५६चा वापर अथवा गैरवापर करून देशातील वेगवेगळ्या राज्यांत राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. काँग्रेस पक्षाने तर १००पेक्षा जास्त वेळा हे कलम वापरून काँग्रेस नसलेली सरकारे नष्ट केली आहेत. भाजपा आणि इतर पक्षांनी देखील संविधानातील या कलमांचा गैरफायदा घेतला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या ६ वर्षांच्या शासन काळात चारवेळा राष्ट्रपती राजवट लागू केली होती.
ज्यावेळी देशातील आणीबाणी संपुष्टात आली आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले, त्यांनी देखील या कलमाचा वापर करत ३० एप्रिल १९७७ रोजी एकाच वेळी ८ राज्यांतील काँग्रेस सरकार बरखास्त केले होते. जनता पक्ष जितका काळ सत्तेत होता, त्या कालावधीत तब्बल १६ वेळा कलम ३५६चा वापर करण्यात आला होता.
मोरारजी देसाईंनी ३० एप्रिल १९७७ रोजी उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब आणि राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडून राष्ट्रपती राजवट लागू केली होती. हे घडल्यानंतर इंदिरा गांधींनी याच कलमाचा वापर करत त्या राज्यांमध्ये आपले सरकार पुन्हा स्थापन केले होते. जनता पक्षाने तीन वर्षांत १६ वेळा कलम ३५६ वापरले होते.
मोरारजीच नाहीतर काँग्रेसच्या पाठबळावर सहा महिने सत्तेत आलेल्या चौधरी चरण सिंह यांनी देखील चार वेळा हे कलम वापरले होते, अर्थात जनता पक्षाच्या कार्यकाळात १२ वेळा मोरारजी देसाई आणि ४ वेळा चौधरी चरणसिंह, असा १६ वेळा कलम ३५६चा वापर करण्यात आला होता.
स्वतंत्र भारतात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट देशाचे पहिलेच पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लावली होती. त्यांनी काँग्रेसमध्ये दुही माजल्यावर २० जून १९५१ ते १७ एप्रिल १९५२ या कालावधीत पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली होती. पंडित नेहरूंच्या १६ वर्षांच्या एकूण कारकिर्दीत ७ वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. इंदिरा गांधींच्या कार्यकाळात ही संख्या सर्वाधिक ४९ इतकी होती. इतक्या वेळा कलम ३५६चा (गैर)वापर करण्यात आला होता.
इंदिरा गांधी आणीबाणी आधी १५ वर्षं आणि आणीबाणीनंतर १५ वर्षं सत्तेत होत्या. १९६६ ते १९७७ या कालावधीत इंदिरा गांधींनी ३३ वेळा कलम ३५६ वापरले आणि १९८० ते ८४ या दरम्यान १६ वेळा वेगवेगळ्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी हे कलम वापरले. असा एकूण ४९ वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. जनता पक्षाचे सरकार कोसळल्यानंतर १९८०मध्ये जेव्हा इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनल्या तेव्हा त्यांनी १७ फेब्रुवारीला ९ राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली होती.
पुढे १९८९ ते १९९९ या छोट्या कालावधीत भारताला ७ पंतप्रधान बघावे लागले. अटल बिहारी वाजपेयी तीन वेळा पंतप्रधान होते. त्यांनी आपल्या ६ वर्षांचा कारकिर्दीत ४ वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली होती.
माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या २५ जुलै १९७७ ते २५ जुलै १९८२ या कार्यकाळात २० वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यांच्यानंतर व्ही. व्ही. गिरी यांच्या कार्यकाळात १९ वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. गिरी २४ ऑगस्ट १९६९ ते २४ ऑगस्ट १९७४ पर्यंत देशाचे राष्ट्रपती होते.
देशाच्या २७ राज्यांना कमीत कमी एक वेळा राष्ट्रपती राजवटीचा सामना करावा लागला आहे. यापैकी १३ राज्य असे आहेत ज्यात ४ वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक १० वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सर्वाधिक काळासाठी राष्ट्रपती राजवट ही पंजाबमध्ये लागू करण्यात आली असून, ३५१० दिवस इतका कालावधी आहे. जम्मू काश्मीरमध्ये तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ही राजवट २३७५ दिवस इतक्या कालावधीपर्यंत होती.
जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्या आधी राज्यपाल राजवट लागू केली जात होती. कलम ३७०चा हा भाग होता. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यापूर्वी ८ वेळा राज्यपाल आणि ३ वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. आता कलम ३७० हटवल्यामुळे राज्यपाल राजवट नाही तर सरळ राष्ट्रपती राजवट लागू करणे शक्य झाले आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी कलम ३५६चा सर्वाधिक दुरुपयोग केला होता. त्यांनी जेव्हा केरळमधील कम्युनिस्ट सरकार बरखास्त केले त्यावेळी, इंदिरा गांधींना त्यांचे पती फिरोज गांधी यांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. फिरोज गांधी यांनी पंतप्रधान कार्यालयात न जाण्याची शपथ घेतली होती. जेव्हा त्यांचे निधन झाले त्यावेळी त्यांचे शव तीन मूर्ती भवन येथे आणण्यात आले होते.
भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात त्यांनी दोन वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली. राजीव गांधींनी त्यांच्या पाच वर्षांच्या कालावधीत ६ वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली होती. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात ११ वेळा, मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात १० वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे चंद्रशेखर यांनी ४ वेळा हे कलम वापरले. एच. डी. देवेगौडा यांनी २ वेळा हे कलम वापरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बऱ्याच वेळा या कलमाचा वापर केला आहे.
एकंदरीत कलम ३५६ चा सर्व राजकीय पक्षांनी सदुपयोग तसेच दुरुपयोग देखील केलेला आहे, पण लोकशाहीच्या रक्षणासाठी हे कलम महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.