आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताच्या कुठल्याही भागात रोजच्या आहाराचा एक अत्यंत महत्वपूर्ण पदार्थ म्हणजे चपाती. पण एकेकाळी भारतात हीच चपाती एका मोठ्या आंदोलनाचा भाग बनली होती.
हे सर्व त्याच काळात घडलं होतं ज्यावेळी भारतात १८५७ चे बंड पुकारले गेले होते, परंतु इतिहासात चपाती आंदोलन म्हणून ओळखला गेलेला हा अजरामर लढा मात्र दुर्लक्षित राहिला होता.
चपाती आंदोलन नेमकं काय होतं, ते सैनिकांना चपात्या पुरवण्या संबंधित होतं का की काही वेगळा प्रकार होता, या बाबत इतिहासकारांमध्ये मोठे संभ्रम आहेत.
मार्च १८५७मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्य तुकडीचे सर्जन डॉ. गिल्बर्ट हैडो यांनी सर्वप्रथम ह्या आंदोलनाचा उल्लेख केलेला आढळून येतो. हा चपाती आंदोलनासंबंधित उपलब्ध एकमात्र पुरावा आहे. ह्या पुराव्यातून चपाती आंदोलनाविषयी अत्यंत रंजक माहिती समोर आली होती.
हैडो यांनी आपल्या एका पत्रात लिहले होते की,
”वर्तमान परिस्थितीत भारतात एक अत्यंत रहस्यमय आंदोलन सुरू आहे. ते आंदोलन नेमकं काय आहे हे आमच्यापैकी कोणालाच माहिती नाही? कोणत्या कारणांसाठी हे आंदोलन केले जात आहे, याबाबत पण आम्ही पूर्णपणे अनभिज्ञ आहोत. हे कुठलं धार्मिक आंदोलन आहे की गुप्त चळवळीतून निर्माण झालेलं आंदोलन आहे, हे आम्हाला कळत नाही आहे फक्त इतकं माहिती आहे की याला चपाती आंदोलन म्हटले जाते.”
हैडोने दिलेला हा संदर्भ एका अशा आंदोलनाकडे इशारा करत होता, ज्याने ब्रिटिशांची झोप उडवली होती. आपल्या दूरस्थ बहिणीला लिहिलेल्या पत्रात हैडो ह्या आंदोलनाचा उल्लेख करतो यावरून आंदोलनाचे महत्व स्पष्ट होते.
ह्या आंदोलनावर पहिली नजर मार्क थॉर्नहील नावाच्या ब्रिटिश शासनाच्या मॅजिस्ट्रेटची गेली. तो मथुरेत नोकरीला होता. मूळचा ब्रिटिश असल्याने तो चपाती ह्या भारतीय खाद्य पदार्थाशी पूर्णपणे अनभिज्ञ होता. एकदा त्याला त्याच्या टेबलवर एक चपाती दिसली, ती चपाती बघून तो विस्मयचकित झाला.
हा कुठला केक तर नाही याची त्याने खात्री केली, पण पांढरा रंग आणि त्यावर असलेले काळे ठिपके बघून त्याने हे एखादं मोठं बिस्कीट असावं असा अनुमान लावला.
त्याने मग त्याच्या सैनिकाला बोलावले आणि त्याला विचारपूस केली, त्यावर तो भारतीय वंशाचा सैनिक म्हणाला की, त्याला त्याच्या गावाकडून एक पिशवी आली आहे ज्यात मोठ्या प्रमाणावर चपात्या पाठवण्यात आल्या आहेत. चपातीबद्दल पूर्ण माहिती घेऊन मार्कने शिपायाला विचारले की त्याला ही पिशवी कोणी दिली?
त्यावर तो म्हणाला की, एका गावाकडच्या रखवालदाराने हा चपाती भरलेला थैला त्याच्याकडे सोपवला असून रात्री जंगलाच्या वाटेने आणण्यात आला आहे. सोबत त्याला अशी सूचना करण्यात आली आहे की अशाचप्रकारे अजून चपात्या बनवून दुसऱ्या गावी रवाना करण्यात याव्या.
मार्क जरा अचंबित झाला, त्याला प्रश्न पडला की हा नेमका काय प्रकार आहे? एका गावाहून ढीगभर चपात्या दुसऱ्या गावात येतात आणि त्या गावाहून अजून ढीगभर चपात्या दुसऱ्या गावाला जातात. आधी मार्कने हे इतकं मनावर घेतलं नाही. पण ज्यावेळी लोकांच्या चौकीचौकीवर हे चपात्यांंचा ढीग दिसू लागल्यावर मात्र ईस्ट इंडिया कंपनीला संशय आला.
मार्कने ह्या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू केला. आधी त्याच्या मनात भारतीय सैनिकांची चौकशी करण्याचा विचार आला पण त्याला लक्षात आलं की ते स्वतः ह्या चपात्या इकडून तिकडे पोहचवत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून खरी माहिती मिळणे दुरापास्त होते.
एक खाण्याचा पदार्थ असलेली चपाती गावोगाव का वाटली जात असेल, याचं कोडं मार्कला उलगडत नव्हतं. चपातीवर ना कुठला संदेश लिहिणे शक्य होते, ना काही प्रचार करण्यास तिचा उपयोग होत.
या चपात्या एका गावाहून दुसऱ्या गावी पाठवण्यामागे नेमका उद्देश काय या प्रश्नाने मार्कला हैराण करून सोडलं होता.
काही दिवसांनी हे चपात्या प्रसाराचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढले. बघताबघता भारताच्या एका टोकापासून पार नेपाळपर्यंत चपात्यांंचा प्रसार होऊ लागला. चपातीला इकडून तिकडे पाठवण्याची ही व्यवस्था ब्रिटिशांच्या पोस्टल व्यवस्थेपेक्षा जास्त जलद गतीने काम करत होती. या सगळ्या प्रकारानी ब्रिटिश अधिकारी चक्रावले होते.
जेव्हा त्यांनी चपाती वाटप करणाऱ्या लोकांना अटक केली तेव्हा त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. चपाती वाहक ते असं का करत आहेत याबाबत अनभिज्ञ असल्याची पुष्टी करत फक्त एका ठिकाणाहून दुसरीकडे चपात्या पोहचवणे हेच काम होते.
ब्रिटिशांंनी याचा छडा लावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते. फक्त अफवेने प्रेरित होऊन लोक असं करत असल्याचे त्यांना वाटले. पण कुठलीच पुष्टी मिळाली नाही, यामुळे त्यांनी शोध लावणे थांबवले. तेव्हापासून हे चपाती आंदोलन एक गूढ बनून आहे. भारतीय इतिहासकारांनी देखील ह्या विषयावर अधिक संशोधन केलेलं नाही.
अनेकांच्या मते तात्या टोपे यांचा ह्या चपाती आंदोलनात मोठा वाटा राहिला आहे. तात्या टोपे यांनीच ह्या आंदोलनाला सुरूवात केली असे म्हटले जाते.
ह्या माध्यमातून प्रांतोप्रांती संदेशवहन करून क्रांती घडवून आणण्यासाठी स्थानिक लोकांना आणि संस्थानिक शासकांंना प्रेरित करण्याचे काम केले गेले.
त्याकाळी भारतीय राज्यकर्त्यांना एकत्र आणून ब्रिटिश विरोधी मोहीम उघडण्यास चपाती आंदोलनाने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
चपाती आंदोलनाच्या काही दिवसांनी ४ मे १८५७ रोजी क्रांतीचा वणवा देशभरात भडकला होता.
सरदार कुंवरसिंह जे ह्या क्रांतीत सहभागी होते, त्यांच्या सैनिकांना देखील अशाप्रकारे चपाती घेऊन जातानाच्या नोंदी आहेत. परंतु असं असलं तरी हे चपाती आंदोलन नेमकं काय होतं हे खात्रीशीरपणे सिद्ध होऊ शकलेलं नाही.
चपाती आंदोलनासंदर्भात एक अजून दावा केला जातो. १८५७ च्या काळात देशभरात कॉलराची साथ आली होती. पीडित रुग्णांना मदत पोहचवण्यासाठी हे आंदोलन होते असे नमूद केले आहे. पण कुठलाही सबळ आधार ह्या दाव्याला अजून प्राप्त झालेला नाही.
एक गोष्ट मात्र निश्चित आहे की हे चपाती आंदोलनाने देशभरातील लोक जोडले गेले होते. अशा ह्या आपल्या देशाच्या इतिहासासंदर्भातील एक महत्वपूर्ण पानावर अधिक संशोधन झालं पाहिजे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.