आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
इस्राईलमधील हैफा शहर आणि भारताचे एक अतूट नाते आहे. आजही या शहरात भारतीय सैनिकांना मानवंदना दिली जाते. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात भारतीय बिजनेस टायकून गौतम अदानीने तेथील बंदर विकत घेतले आहे. तिथल्या पुस्तकातून, शालेय अभ्यासक्रमातून, साहित्यातून आजही भारतीयांच्या शौर्याचे पोवाडे गायले जातात. भारतीयांचा आणि या शहराचा हा संबंध गेली कित्येक पिढ्या जोपासला गेला आहे.
भारतीयांनी आपल्या पराक्रमाने हे हैफा शहर तुर्कांच्या ताब्यातून हिसकावून घेतले. इतिहासात हे यु*द्ध ‘बॅटल ऑफ हायफा’ या नावाने प्रसिद्ध आहे.
इस्राईल आजही भारतीय सैनिकांच्या या ऋणांचे स्मरण करतो. त्यांच्या पाठ्यपुस्तकातून राजस्थानी योद्धयांच्या पराक्रमाचे धडे शिकवले जातात.
शिवचरित्रात अनेकदा एक श्लोक येतो,
यस्याश्वा तस्य राज्यं यस्याश्वा तस्य मेदिनी । यस्वाश्वा तस्य सौख्यं यस्याश्वा तस्य साम्राज्यम् ।।
यु*द्धशास्त्रात घोडदळाचे महत्त्व काय हे आपल्याला यातून दिसून येते.
पहिले महायु*द्ध शिगेला पोहोचले होते. तेव्हा अजून इस्राईल या स्वतंत्र ज्यू धर्मीय देशाची स्थापना झाली नव्हती. पण, त्याकाळी या भूभागावर जर्मन आणि तुर्की लोकांचे वर्चस्व होते.
हैफा शहराला तुर्कांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटीश सैन्याच्या वतीने हैदराबाद, मैसूर आणि राजस्थान संस्थानाची घोडदळे सामील झाली होती.
बलाढ्य आणि आधुनिक शस्त्रास्त्राने सज्ज असलेल्या तुर्की आणि जर्मन सैन्यासमोर भारतीय सैन्याच्या या तीन घोडदळांनी पराक्रमाची अशी शर्थ केली की, या सुसज्ज सैन्यालाही माघार घ्यावी लागली. शेवटी हैफा शहर स्वतंत्र झाले.
आज हैफा हे इस्राईलमधील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. युनेस्कोनेही या शहराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.
त्याकाळी रेल्वेचे मोठे जाळे आणि व्यापारी बंदर यामुळे हैफा शहराला व्यापाराच्या दृष्टीने अपरिमित महत्त्व होते.
हैफाचे हे यु*द्ध १९१८ साली लढले गेले. जर्मन आणि तुर्की सैन्याने बहाई समुदायाचे अध्यात्मिक गुरु अब्दुल बहा यांना बंदी बनवले होते. त्यांची सुटका करण्यासाठी ब्रिटीश सैनिक नियोजन करत होते. या सैन्याच्या खांद्यावर जरी ब्रिटीशांचा झेंडा असला तरी, त्यातील सैनिक मात्र भारतीय होते.
एकाच दिवसात या भारतीय सैनिकांनी तुर्की सैन्याला धूळ चारली होती. जवळपास १३५० जर्मन-तुर्की सैनिकांना भारतीय सैन्याने बं*दी बनवले होते. एवढेच नाही तर त्यांच्या तोफा-मशीनग*न्स देखील जप्त केल्या होत्या.
२३ सप्टेंबर १९१८ रोजी प्रत्यक्ष युद्धाचा दिवस उजाडला. हैफामध्ये मशीनग*न आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज जर्मन आणि तुर्की सैन्य उभे होते. त्यांच्यासमोर जोधपुर आणि मैसूरचे सैन्य उभे होते.
१५०० तुर्की सैन्याविरुद्ध ४०० पारंपारिक भारतीय सैन्य.
ज्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे अजिबात नव्हती. तसे पाहता दोन्ही सैन्यांतील शस्त्रास्त्र बलाची तुलना करता या यु*द्धाला काहीच अर्थ नव्हता. घोडे किती जरी वेगात पळत असले तरी, त्यांना बंदुकीच्या गोळ्यांचा वेग थोडीच गाठता येणार होता. पण, त्यादिवशी एक नवा इतिहास रचला जाणार होता.
जर्मन आणि तुर्की सैन्याला ह*ल्ल्याची जराही खबर लागू न देता अत्यंत बेसावध क्षणी भारतीय सैनिकांनी हैफावर हल्ला चढवला. जोधपूरचे सैनिक ढाली घेऊन लढत होते. मैसूरच्या सैनिकांनी उत्तरेकडून हल्ला चढवला. यात कमांडर दलपत सिंह सुरुवातीलाच धारातीर्थी पडले.
त्याच्यानंतर अमन सिंह यांनी युद्धाचे नेतृत्व आपल्या ताब्यात घेतले. मैसूर रेजिमेंटने दोन मशीनग*न्स ताब्यात घेतल्या आणि हैफामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग सुकर केला.
एकीकडे घोडे आणि दुसरीकडे बंदुकीच्या गोळ्या. गोळ्यांच्या माऱ्यांनी घोडे जखमी होत होते. ब्रिटीश जनरल एडमंडने भारतीय सैनिकांना माघार घेण्याची सुचना केली. पण, एकदा मैदानात घुसल्यावर माघार घेतील ते भारतीय सैनिक कसले?
दिवसभराच्या यु*द्धानंतर भारतीय सैनिकांनी ४०० वर्षं जुन्या ऑटोमन साम्राज्यापासून हैफा शहर मुक्त केले. पहिल्या महायु*द्धात घोडदळाने केलेला हा पहिला आणि शेवटचा अभूतपूर्व पराक्रम होता.
आज या यु*द्धाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. पण आजही इस्राईली नागरिक हैफाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या भारतीय सैनिकांची आठवण काढून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.
हैफा शहराचे महापौर योना याहाव, म्हणाले होते की, भारतीय सैनिकांशी इस्राईलचे एक अतूट नाते जोडले गेले आहे.
दलपत सिंह आणि त्यांच्या सैन्याने फक्त या शहराचाच नाही तर संपूर्ण मध्य आशियाचा इतिहासच बदलून टाकला. आमच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेले भारतीय सैनिक आम्हाला प्राणप्रिय आहेत.”
या शहीद सैनिकांची आठवण म्हणून हैफा शहरात तीन मूर्तींचे स्मारक तयार करण्यात आले आहे. या स्मारकाच्या ठिकाणी दरवर्षी या भारतीय योद्ध्यांना मानवंदना दिली जाते.
येणाऱ्या पिढ्यांनाही भारतीय सैनिकांचा हा पराक्रम माहिती व्हावा म्हणून इस्राइल सरकारने या लढ्यावर आधारित धडे ३ री ते ५वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकामध्ये सामाविष्ट केले आहेत.
भारताने देखील आपल्या या पराक्रमी सैन्याची आठवण चिरकाल जपून ठेवली आहे. जोधपुर आणि मैसूरचे घोडदळ सध्या भारताच्या 61st कॅव्हेलरीचा भाग आहेत. सध्या 61st कॅव्हेलरी रेजिमेंट ही जगातील सर्वांत जुन्या आणि आजही अस्तित्वात असलेल्या घोडदळांपैकी एक आहे.
१९२२ साली भारतानेदेखील दिल्लीमध्ये तीन मूर्तींचे स्मारक उभे केले आहे. यामध्ये तीन पुतळे बनवण्यात आले आहेत. हैद्राबाद, जोधपुर आणि मैसूरच्या घोडदळांचे प्रतिक म्हणून यांच्याकडे पहिले जाते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.