आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आज आपण एका अशा गुलामाबद्दल जाणून घेणार आहोत जो आपल्या राजकीय मुत्सद्दीगिरीच्या बळावर एका बादशहाचा वजीर झाला. त्याने राजपूत आणि मुघलांशी कडवे द्वंद्व केले. आपल्या कुटनीतीच्या बळावर त्याने आपले मालक असलेल्या मुघलांना धूळ चारून स्वतःचे राज्य प्रस्थापित केले.
त्याचे नाव होते मलिक अंबर, ज्याला दख्खनेतील निजामशाहीचा संस्थापक मानले जाते. त्याने मोठ्या शिताफीने अकबर आणि जहांगीरच्या सैन्याला धूळ चारली होती.
अंबरने आपल्या कुशल नीतीने असंख्य गुलाम आणि राजपुतांचे एक मोठे सैन्य दल उभारले. इतकंच नाही तर डच, फ्रेंच, पोर्तुगीज व ब्रिटिश या परकीयांच्या मदतीने तोफखाना व नौदल उभारले होते.
मलिक अंबरचा जन्म १५४९ साली दक्षिण इथियोपियात झाला. तो एका गरीब कुटुंबाचा सदस्य होता. लहानपणी त्याचे नाव चापु असे होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याचा आईवडीलांनी गुलाम म्हणून त्याची विक्री केली. अनेकांच्या मते याचे अरबी व्यापाऱ्यांकडून अपहरण करण्यात आले होते. परंतु कुठल्याही मार्गाने असेना पण मलिक अंबरच्या बालपणावर गुलामगिरीची मोहर लागली.
तो येमेनला आला मग त्याची काजी हुसैन नावाच्या व्यक्तीला विक्री करण्यात आली. काजी हुसैन त्याच्या प्रतिभेने प्रभावित झाला.
अंबरला काजी हुसेनने आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय कामकाज शिकवले. त्याला अंबर या नावाने सर्व हाक मारायला लागले. त्याने बुद्धिमत्तेच्या बळावर आपली योग्यता सिद्ध केली होती. पुढे जेव्हा हुसेन गेला त्यावेळी त्याला एका व्यापाऱ्याला विकण्यात आले. त्या व्यापाऱ्याने अहमदनगरचा राजा चंगेज खानकडे याला सोपवले.
१६व्या शतकात दख्खन क्षेत्र सांस्कृतिक विविधतेने नटलेलं होतं. त्याकाळी गुलामांना सैन्याचा दास म्हणून चाकरी करण्याची संधी मिळत असे. चंगेज खानने अनेक गुलामांची खरेदी केली होती, पण त्याला अंबरच्या विद्वत्तेची भुरळ पडली.
त्याने अंबरला शासन, सैन्य आणि प्रशासन इत्यादी विषयात आपलं कसब दाखवण्याची संधी प्रदान केली. त्याच्या आधीच्या शिक्षणाचा याठिकाणी त्याला मोठा फायदा झाला. खानने अंबरवर खुश होऊन त्याला गुलामांचा नायक बनवले. मलिक अंबर या नावाने तो ओळखला जाऊ लागला. पुढे जेव्हा चंगेज खानचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या विधवेने सर्व गुलामांना मुक्त केले आणि त्यांना वंश वाढवण्याचा सल्ला दिला. मुक्त झाल्यावर अंबरने लग्न केले.
मलिक अंबर राजकीय मुत्सद्देगिरीचा सम्राट होता. तो अहमदनगर रियासतीचा वजीर बनला. पदाचा कार्यभार सांभाळत असताना त्याने अनेक चांगले काम केले. त्याने शेतकऱ्यांची जमीन जप्त करण्याची व्यवस्था नष्ट केली.
मुघलांनी जेव्हा अहमदनगरवर हल्ला केला तेव्हा मलिक अंबर आपलं नशिब आजमावण्यासाठी विजापूरला गेला. तिथून तो पुन्हा नगरला परतला. त्याने हबशी लोकांचा एका दलात सहभाग घेतला.
अहमदनगरचे राज्य नष्ट होणार हे जवळ जवळ नक्की झाले होते. पण याच काळात मलिक अंबरने एक मुत्सद्दी म्हणून भूमिका बजावत निजामशाहीच्या दुसऱ्या राजपुत्राला गादीवर बसवले. त्याला निजाम दुसरा असे म्हणून घोषित केले व तो स्वतः निजामाचा पंतप्रधान बनला.
आपला कार्यभार सांभाळत अंबरने आपली सैन्य व्यवस्था मजबूत केली. त्याने आसपासच्या मराठा सरदारांना एकत्र करून एक मोठं सैन्यदल उभारलं. त्याने मराठा सैनिकांना गनिमी कावा शिकवला. ज्याचाच वापर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. त्याच्या सैन्यात ४० हजार मराठा आणि १० हजार गुलाम हशबी सैनिक होते.
इतकंच नाही तर त्याने पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिशांची देखील मदत घेतली. पश्चिम तटावरच्या जंजिरा किल्ल्यावर त्याने नाविकांचा तह घडवला. युरोपिय लोकांनी त्याला असंख्य हत्यारं दिले. आपल्या मजबूत सैन्य सामर्थ्याच्या बळावर त्याने दख्खनेत अत्यंत यशस्वीपणे मुघलांना रोखले.
हा तोच काळ होता जेव्हा बादशहा अकबराने दख्खन क्षेत्राची जबाबदारी आपल्या सर्वात कर्तबगार सेनापती अब्दुल रहीम खान कडे सोपवली होती. पण मलिक अंबरने त्याला तह करण्यास भाग पाडले. अब्दुल रहीम खानने मैत्री करून दगा देण्याचा प्रयत्न केला तेव्हा मलिक अंबरने आदिलशाहीचा एक किल्ला जिंकून दहा हजाराचे सैन्यदल उभे केले. मराठे आणि आदिलशाही यांच्या समर्थनाने निजामशाही बळकट झाली. अखेरीस अब्दुल रहीम खानला मागे हटावे लागले.
पुढे जहांगीरने मोठ्या सैन्यदला सोबत आसफ खानाच्या नेतृत्वात एक सेना दख्खनच्या दिशेने रवाना केली. पण त्यांचे देखील मलिक अंबर समोर काही चालले नाही, त्यांना देखील पराभवाचे तोंड बघावे लागले. मग जहांगीर स्वतः यायला निघाला पण त्याच्या दरबारी लोकांनी त्याला अडवले.
जहांगीरने पुढे आपला मुलगा शहाजहाला बंदोबस्त करण्यासाठी पाठवले. मुत्सद्दीचा वापर करत जहांगीरने विजापुरच्या आदिलशहाला आपला मानसपुत्र घोषित केले. यामुळे एकाएकी विजापूरचे समर्थन राहिले नाही. परिणामी मलिक अंबर एकटा पडला. अब्दुल रहीम खानाने देखील मलिक अंबरच्या अनेक माणसांना वतनाचे अमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले.
बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने मलिक अंबरला शरणागती शेवटी पत्करावी लागली. परंतु काही दिवसांतच शहाजहाने आपल्या बापाविरोधात बंड पुकारल्याने मुघल दरबारात अस्थिरता निर्माण झाली, परिस्थितीचा फायदा घेऊन मलिक अंबरने सैन्याची जुळवाजुळव करून आपला भाग पुन्हा ताब्यात घेत पुन्हा निजामशाहीची विस्कटलेली घडी ठिकाणावर आणली. वयाच्या ८० व्या वर्षी तो मृत्युमुखी पडला.
पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाहीचा अस्त केला आणि मराठ्यांचे स्वराज्य आणले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.