आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
महापुरुष दोन प्रकारचे असतात, एक ज्यांना जिवंतपणी भरपूर अनुयायी मिळतात पण, मृत्युनंतर मात्र ते हळूहळू विस्मृतीत जातात. दुसरे असे असतात ज्यांची मृत्युनंतर अधिक प्रशंसा केली जाते आणि त्यांच्या स्मृती जपण्यासाठी धडपड केली जाते. सरदार पटेल यांच्या आठवणीचे किस्से लिहिताना देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी हे विधान केले आहे.
मोरारजी देसाई हे कधीही कुणाची विनाकारण स्तुती करत नसत. सरदार पटेल यांना जाऊन सात दशकांहून अधिक काळ लोटला आहे. पण, त्यांच्या कामाचे महत्त्व काय होते याची प्रचिती आजही येते.
पंतप्रधान मोदी तर नेहमीच त्यांच्या कार्याचे स्मरण करत असतात, त्यांच्या विचारांची आठवण करून देत असतात. त्यांच्या स्मृती जगवण्यासाठी आणि त्या चिरकाल टिकाव्या म्हणूनच पंतप्रधान मोदीनी त्यांचा पुतळा उभारला आहे, ज्याला स्टॅच्यू ऑफ यूनिटी म्हटले जाते. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.
जी गोष्ट हजारो वर्षांपूर्वी चाणक्याने केली तीच गोष्ट याकाळात सरदार वल्लभभाई पटेल यांनी करून दाखवली. चाणक्य यांनीही अखंड भारत एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न केला, तेच कार्य आधुनिक कालखंडात सरदार पटेल यांनी केले. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले.
१५ डिसेंबर १९५० रोजी मुंबईतील बिर्ला हाउसमध्ये सरदार पटेलांनी अखेरचा श्वास घेतला. तसेही गांधीजींच्या मृत्यूनंतर सरदार पटेलांची तब्येतही ढासळत चालली होती. त्यांना दोनदा हृदयाचा झटका येऊन गेला होता. तशा अवस्थेतही पटेल एकसंध देशाची उभारणी करण्याचे काम करतच होते. यामुळे तर त्यांची तब्येत आणखीन खालावली.
मुंबईचे हवामान त्यांच्या शरीराला मानवते म्हणून १२ डिसेंबर रोजी ते दिल्लीहून मुंबईला आले. त्याचवेळी दिल्लीतील त्यांच्या सहकाऱ्यांना कळून चुकले होते की, कदाचित आपण सरदार पटेलांना पुन्हा भेटू शकणार नाही. त्यांना व्हीलचेअरवरून विमानात चढवण्यात आले. विमानात चढताना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडे पाहून फक्त एक मंद स्मित केले. जणू त्यांनाही याची जाणीव झाली होती की, हे आपले स्मित अखेरचे असणार आहे..
मुंबईत आल्यावरही त्यांच्या तब्येतीत फारसा फरक पडला नाही. पंधरा डिसेंबरच्या पहाटे तीन वाजता त्यांची शुद्ध हरपली तेंव्हा त्यांच्या जवळ त्यांचा मुलगा दाह्याभाई, सून भानुमती, नातू बिपीन, त्यांची मुलगी मणीबेन, त्यांचे खाजगी सचिव व्ही. शंकर असे सगळेच जवळचे नातेवाईक हजर होते.
शेवटी सकाळी नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे स्वीय सहाय्यक व्ही. शंकर यांनी ताबडतोब सगळ्यांना फोन वरून ही बातमी देण्यास सुरुवात केली. त्यांनी दिल्लीत जेंव्हा फोनवरून ही बातमी सांगितली तेंव्हा दिल्लीत स्मशानशांतता पसरली. सरकारमध्ये आणि पक्षातही सरदार पटेलांचे खूप चाहते होते. त्या सगळ्यांनाच पटेलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची तीव्र इच्छा होती.
मुंबई (बॉंबे) प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि त्यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री असलेले मोरारजी देसाई ही बातमी काळातच तातडीने तिथे पोहोचले.
दिल्लीतील त्यांचे सहकारी मुंबईसाठी रवाना होण्याची तयारी करत असतानाच पंतप्रधान नेहरूंनी सगळ्यांनाच असा काही आदेश दिला, की सगळेच अवाक झाले. याबाबत तत्कालीन केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेले माणिकलाल मुन्शी यांनी आपल्या पिलग्रीमेज टू फ्रीडम, वॉल्युम सेकंडमध्ये याचा उल्लेख केला आहे.
“जेंव्हा सरदार यांचे मुंबईत देहावसान झाले, तेंव्हा जवाहरलाल यांनी आपल्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना असे निर्देश दिले की त्यांनी अंत्यसंस्कार विधीत सामील होऊ नये. सगळ्या मंत्र्यांपैकी मी ही एक होतो. तेंव्हा मी मुंबईच्या जवळच माथेरानमध्ये होतो. श्री. एन. व्ही. गाडगीळ, श्री. सत्यनारायण सिन्हा आणि श्री व्ही. पी. मेनन हे निर्देश न मानता अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले.
जवाहरलाल यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना देखील त्यांनी मुंबईला जाऊ नये असा विचित्र आग्रह केला होता. राजेंद्र प्रसाद यांनीही हा आग्रह मानला नाही. अंत्यसंस्काराच्या विधीसाठी आलेल्या व्यक्तींमध्ये डॉ.राजेंद्र प्रसाद, राजाजी आणि पंतसुद्धा होते. मी देखील होतोच.”
देशाचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान, इतकेच नाही तर आधुनिक भारताचे शिल्पकार सरदार पटेल यांच्या अंत्यसंस्काराच्या विधीसाठी देशाच्या पहिल्या राष्ट्रपतींना डॉ राजेंद्र प्रसाद यांना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मनाई केली होती, याचे संदर्भ अनेक पुस्तकातून आढळतात.
त्या काळाच्या प्रसिद्ध पत्रकार दुर्गा दास, ज्या नेहरू, पटेल आणि आझाद या सगळ्यांच्याच निकटवर्ती होत्या त्यांनी आपल्या ‘इंडिया-फ्रॉम कर्जन टू नेहरू अँड आफ्टर’ या पुस्तकात लिहिले आहे –
“पटेल यांच्या मृत्यूने संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. डॉ. राजेंद्र प्रसाद नेहरूंच्या आदेशांकडे दुर्लक्ष करत विमानाने मुंबईला रवाना झाले. अशा प्रसंगी पंतप्रधानांचा सल्ला राष्ट्रपतींनी मानला नाही. नेहरूंचे मत असे होते की एका राष्ट्राच्या प्रमुखाने एका मंत्र्याच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्याची गरज नाही. हा एक चुकीचा पायंडा ठरेल. नेहरू पटेलांचा मोठेपणा नाकारत आहेत, असे प्रसाद यांना वाटले.”
खुद्द राजेंद्र प्रसाद यांचा मुलगा मृत्युंजय प्रसाद यांनीही आपल्या वडिलांच्या आठवणींत त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारे एक पुस्तक लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलेय –
१५ डिसेंबर १९५० रोजी सरदार पटेल यांचे मुंबईत जिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते, देहावसान झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणे हे राष्ट्रपतींनी आपले कर्तव्य समजले आणि ते तातडीने मुंबईला निघण्यास तयार झाले. परंतु पंतप्रधानांना मात्र ही गोष्ट खटकली.
ते राष्ट्रपतींना म्हणाले की, ‘केवळ एका मंत्र्याचा मृत्यू झाला म्हणून राष्ट्रपतींनी दौऱ्यावर जाणे उचित दिसत नाही. हे त्यांच्या पदाला शोभणारे नाही. सरदार यांच्या अंत्यविधीसाठी राष्ट्रपतींनी दिल्लीहून मुंबईला जाण्याने एक चुकीची परंपरा निर्माण होईल. म्हणून तुम्ही जाऊ नये अशी माझी इच्छा आहे.
परंतु राष्ट्रपतींनी ही विनंती मान्य करण्याऐवजी प्राचीन परंपरेचे पालन करणे उचित समजले. पंतप्रधानांनी मनाई करूनही ते मुंबईला गेले आणि अंत्यसंस्कार विधीसाठी उपस्थित राहिले. त्यांनी शोकमग्न पटेल कुटुंबियांचे सांत्वन केले. आपल्या परंपरेचेही पालन केले आणि तीस वर्षे जुन्या संबंधांचे स्मरण करत श्रद्धांजली अर्पण केली.’
महात्मा गांधींचे नातू आणि प्रसिद्ध इतिहासकार राजमोहन गांधी यांनी देखील ‘पटेल अ लाइफ’ या पुस्तकात या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. सरदार पटेल यांच्या अंत्यविधीसाठी भारताचे पहिले गव्हर्नर जर्नल चक्रवर्तीसुद्धा सामील झाले. खुद्द जवाहरलाल नेहरूसुद्धा या अंत्यविधीसाठी उपस्थित राहिले आणि त्यांनी मनाई केलेली असतानाही त्यांचे अनेक मंत्री, अधिकारी आणि तिन्ही सेना दलांचे प्रमुखसुद्धा उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत पटेल यांचे पुत्र दाह्याभाई यांनी सोनापूर येथील स्मशानभूमीत पटेलांच्या पार्थिव देहाला चिताग्नी दिला.’
स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी ज्यांनी पटेलांसोबत काम केले. त्या सर्वांनी साश्रूपूर्ण डोळ्यांनी पटेलांना अखेरचा निरोप दिला. यावेळी श्रद्धांजली वाहताना डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले, पटेलांच्या पार्थिव देहाला जरी अग्नीने लपेटले असले तरी, जगात अशी कुठलीच आग नाही ज्यामुळे त्यांचे कार्य आणि लोकप्रियता नष्ट होईल.
डॉ राजेंद्र प्रसाद यांनी म्हटल्याप्रमाणे पटेलांच्या कीर्तीची पताका आजही गगनाला स्पर्श करीत आहे. त्यांचे कार्य आजही आपल्या सर्वांना एकजुटीने राहण्याची प्रेरणा देत आहे. भारताच्या इतिहासात त्यांचे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.