आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ हे शब्द आता अगदी नियमितपणे वापरले जातात. स्वावलंबी भारताची संकल्पना आता चांगलाच जोर धरते आहे. या स्वप्नाची खरी सुरुवात झाली ती स्वदेशी चळवळीने. इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतात विदेशी मालावर बहिष्कार टाकुन भारतीय उत्पादने वापरण्याची गरज त्यावेळी पहिल्यांदा निर्माण झाली. यावेळी अनेक छोटे मोठे उद्योगधंदे आणि उत्पादनांचा उदय भारतात झाला. अशाच एका उत्पादनाचा आज आपण इतिहास जाणुन घेणार आहोत.
रत्नम पेन नावाच्या एका फाऊंटन पेनचा इतिहास आज आपण जाणुन घेणार आहोत. पुर्ण भारतीय बनावटीच्या या पेनची किंमत लाखांच्या घरात आहे हे ऐकुन तुम्हाला धक्का नाही बसला तर नवलच. पण हे अगदी खरं आहे.
सोन्याचे टोक असलेल्या निबच्या रत्नम पेनची किंमत चक्क २ लाख रुपये आहे.
या किमतीच्या मागे जेवढा हात सोन्याचा आहे त्यापेक्षाही जास्त हात आहे तो या पेनच्या मागे असलेल्या इतिहासाचा आणि त्याबरोबर असलेल्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा.
या पेनला स्वदेशी पेन असेही म्हटले जाते. यामागे या पेनचा महात्मा गांधी यांच्याशी असलेला संबंध कारणीभूत आहे असे म्हटले जाते. १९२१ च्या काळात जेव्हा रत्नम पेनचे सर्वेसर्वा के. व्ही. रत्नम गांधीजींना भेटले तेव्हा त्यांनी गांधीजींना विचारले की, “स्वदेशी उत्पादनांमध्ये नेमके काय बनवता येईल..?” तेव्हा गांधीजींनी त्यांना तुम्ही एका पिनपासून तर पेनापर्यंत काहीही बनवू शकता असे उत्तर दिले. इथुनच रत्नम पेनच्या कल्पनेची सुरुवात झाली.
१९३३ मध्ये रत्नम यांनी विदेशी फाऊंटन पेनचा अतिशय बारीक रितीने अभ्यास केला. त्यातील वेगवेगळ्या आंतरिक बाबींचा अभ्यास करुन त्यांनी त्यावेळी एक पेन बनवला. गांधीजींनी तो पेन नाकारला कारण त्याचे वेगवेगळे हिस्से परदेशातुन निर्यात केले गेले होते.
एका वर्षानंतर ‘ऑल इंडिया विलेज इंडस्ट्रीज असोसिएशन’चे सचिव जे.सी. कुमारप्पा यांनी रत्नम यांची मदत करण्याचे ठरवले. रत्नम यांची भेट घेऊन त्यांनी पेनसाठी लागणारा सगळा कच्चा माल भारतात उपलब्ध होइल याचे नियोजन केले. अशा प्रकारे पहिला स्वदेशी पेन तयार झाला.
जेव्हा हा इबोनाईटपासून बनवलेला नविन पेन गांधीजीना भेट देण्यात आला तेव्हा त्यांनी रत्नम यांच्या नावे १६ जुलै, १९३५ रोजी एक पत्र लिहिले,
“प्रिय रत्नम, मी हा फाऊंटन पेन वापरला असुन विदेशी पेनच्या ऐवजी हा अगदी योग्य असा पेन आहे. मला या पेनची आवश्यकता होती, वेळेवर हा पेन मला दिल्याबद्दल मी तुझे आभार मानायला हवेत” आजही हे पत्र रत्नम पेनच्या कार्यालयात अगदी अभिमानाने लावलेले बघायला मिळते.
नंतर हा पेन अनेक मोठ्या राष्ट्रीय नेत्यांनी वापरला. जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, इंदिरा गांधी, व्ही.व्ही. गिरी, इंडियन एक्सप्रेसचे संस्थापक रामनाथ गोयंका अशा मोठमोठ्या लोकांच्या हाती हा पेन दिसत होता. आजही प्रत्येक ५ वर्षाला पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचे कोरलेले नाव असलेला हा पेन कार्यालायात पाठवला जातो.
एवढेच काय तर जर्मन पंतप्रधान (Chancellor) अँजेला मर्कल जेव्हा भारत भेटीला आल्या होत्या तेव्हा त्यांनासुध्दा हा पेन भेट म्हणून देण्यात आला होता.
आजही आंध्रप्रदेशमधील राजाहमुंद्री गावात एका छोट्याश्या घरात रत्नम पेनचा कारखाना आहे. “भारतातील पेन उद्योगाच्या क्रांतीचे जनक” असे नाव असलला फलक आजही त्यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारात दिसतो.
१९५८ मध्ये के.व्ही.रत्नम आणि त्यांचा भाऊ कसुरी सत्यनारायण वेगळे झाले तेव्हा पेन उद्योगसुद्धा विभागला गेला. रत्नम सन्स आणि रत्नम पेन वर्क्स असे दोन भाग पडले. यातील रत्नम पेन वर्क्स या ठिकाणीच गांधीजींनी लिहिलेले पत्र आढळते, दुसऱ्या ठिकाणी नाही. रत्नम पेनला जाहिरातीची गरज पडत नाही. कामाची गुणवत्ता, आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीच त्यांच्या विक्रीसाठी पुरेशी आहे असे ते म्हणतात.
कामातील सूक्ष्मपणा एवढा प्रचंड आहे की प्रत्येक व्यवसायासाठी वापरला जाऊ शकेल असा पेन बनवताना वेगवेगळ्या निब वापरल्या जातात. वापराची पध्दत, वापराचा वेळ या घटकांचा अभ्यास करुन या वेगवगळ्या निब बनवल्या जातात. कोणत्याही कोनात लिहू शकेल असा पेन वृत्तकारासाठी. जाड निब असलेला पेन डॉक्टरसाठी.
प्रत्येक रत्नम पेन आजही हातानेच बनवला जातो. एका पेनसाठी दोन ते तीन दिवस लागतात. २२ कैरट सोन्याची निब असलेला पेन बनवण्यासाठी आजही ३ दिवसाचा कालावधी लागतो. मुख्यत: पेन बनवण्यासाठी इबोनाईट, चांदी आणि सोने यांचा वापर केला जातो.
स्टीलची निब असलेला रत्नम पेन १५०-१५०० रुपये या दरात भेटतो. १४ कैरटची निब असलेला पेन २५००-१५००० पर्यंत भेटतो. १४ कैरट चांदीची निब असलेला एक पेन २५०००-३५००० रुपयांत भेटतो. सोन्याचा पेन घ्यायचा म्हटलं तर चक्क २ लाख रुपये मोजावे लागतात.
२०१२ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये के. व्ही. रामणा मूर्ती यांच्या नावे सगळ्यात छोटा पेन बनवण्याचा विक्रम नोंद केला गेला आहे. हा पेन ३.५ सेमी लांब, १.७ ग्राम एवढ्या वजनाचा आहे. या पेनला १४ कैरट सोन्याची निब सुद्धा आहे.
एका उंचीवर पोहचेपर्यंतच कष्ट करावे लागतात, नंतर ती उंचीच सगळं काम करते असं व. पु. काळे म्हणतात ते अगदी योग्य आहे. फाऊंटन पेनच्या क्षेत्रात ती उंची रत्नम पेनने नक्कीच मिळवली आहे. तरीही आपल्या कष्टात आणि गुणवत्तेत कसलीही कसर न पडू देण्याची ही रत्नम पेन निर्मात्यांची वृत्ती अगदी वाखाणण्याजोगी आहे एवढं नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.