आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
१८ मे १९७४ रोजी पोखरण येथील अणू चाचणी यशस्वी झाली आणि भारत अ*ण्वस्त्रधारी देशांच्या यादीत जाऊन बसला. खरे तर भारताचा अ*ण्वस्त्रसज्ज होण्याचा प्रवास १९४८ पासूनच सुरू झाला होता. भारतीय अणू ऊर्जेचे जनक होमी भाभा यांनी तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्याशी चर्चा करून भारताने अणू ऊर्जा क्षेत्रात प्रगती करणे किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. त्यांच्याच सल्ल्यावरून भारतात १९४८ साली अणू ऊर्जा आयोगाची स्थापना झाली. नंतर इंदिरा गांधींनी याचे नाव बदलून भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) असे केले.
अर्थात अणू ऊर्जेचा विघातक वापर करण्यास होमी भाभा यांचा विरोधच होता, पण अणू उर्जेचा विधायक वापर लवकरच भारताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवेल असा त्यांचा कयास होता.
होमी जहांगीर भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी भारतातील एका पारसी कुटुंबात झाला. त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले होते. १९४५ साली भारतात ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ची स्थापना झाली आणि होमी भाभा याचे पहिले संचालक होते. भारताला अ*ण्वस्त्रसज्ज करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाभांचा मृत्यू एका विमान अपघातात झाला.
२४ जानेवारी १९६६ रोजी एअर इंडियाच्या १०१ नंबरचे हे विमान फ्रांसच्या माउंट ब्लॅक पर्वत रांगेत दुर्घटनाग्रस्त झाले. दुर्दैव म्हणजे या विमानात एकूण एकशे सतरा प्रवासी होते, त्यातील कुणीच वाचू शकले नाही, यातीलच एक प्रवासी होते होमी भाभा.
हा एक अपघात नसून होमी भाभांना मारण्यासाठी रचण्यात आलेला कट होता अशी चर्चा नंतर बराच काळ चालली. पण, पुरेशा पुराव्या अभावी हे सिद्ध करता आले नाही. काळाच्या ओघात ही चर्चा हवेतच विरून गेली. कोणी म्हणे या विमानात बॉ*म्ब ठेवण्यात आला होता, कोणी म्हणे दुसऱ्या विमानाच्या मदतीने हे विमान मुद्दाम पाडण्यात आले, तर कोणी म्हणे विमानाच्या इंजिनने अचानक पेट घेतला. नंतर या अपघाताच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने याचे खापर विमानाच्या पायलटच्या डोक्यावर फोडले. पायलटच्या चुकीने हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले असा खुलासा करण्यात आला.
होमी भाभांच्या मृत्यू आधीच एक-दीड आठवडा म्हणजे ११ जानेवारी १९६६ रोजी ताश्कंत येथे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचाही असाच संशयास्पद मृत्यू झाला होता. पाकिस्तानसोबत शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री ताश्कंतला गेले होते. तिथे अचानकच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
पण, सोव्हिएत रशियन सरकारने त्यांचे शवविच्छेदन न करताच ते थेट भारतात पाठवून दिले. भारतातही शव विच्छेदन होऊ न देताच हे प्रकरण परस्पर दाबण्यात आले.
खरे तर शास्त्रीजींच्या कुटुंबियांचा दावा होता की जेव्हा शास्त्रीजींचे शव दिल्ली विमानतळावर त्यांच्याकडे सोपवण्यात आले तेव्हा ते काळे-निळे पडले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणीही केली होती. भारत सरकारने याची चौकशी केली मात्र याबाबतचे सत्य कधीच उघड केले नाही.
अवघ्या दहा-बारा दिवसांच्या अंतराने भारताचे पंतप्रधान आणि भारतीय अणू उर्जा आयोगाचे अध्यक्ष होमी भाभा यांचा देखील संशयास्पद मृत्यू होणे ही बाब कशाची द्योतक आहे? यामागे खरंच काही तरी आंतरराष्ट्रीय कट असेल का? अशी शंका घेण्यास वाव आहे, कारण अजूनही याबाबत भारत सरकारने पुरेशी माहिती उघड केली नाही.
२००८ साली पत्रकार आणि लेखक ग्रेगरी डग्लस आणि सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेतील एक माजी अधिकारी रॉबर्ट क्राउली यांची एकमेकांशी झालेली चर्चा प्रसिद्ध झाली होती. ज्यामध्ये १९६० च्या दशकातील भारतातील अणू कार्यक्रमावरही चर्चा झाली. यामध्ये रॉबर्टने खूप मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा जाणून घेण्यापूर्वी त्याची थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊ.
होमी भाभा यांनी १९६५ साली भारताला लवकरात लवकर अ*ण्वस्त्रसज्ज बनवण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांनी भारताच्या पंतप्रधानांकडे फक्त अठरा महिन्याचा अवधी मागितला होता. फक्त अठरा महिन्यात भारताला अ*ण्वस्त्रसज्ज बनवण्याचे स्वप्न त्यांनी ऑल इंडिया रेडीओवरून जाहीर केले होते. कृषी, उर्जा आणि वैद्यकीय क्षेत्रात यामुळे भारताला फायदा होईल आणि भारत एक शक्तिशाली देश म्हणून ओळखला जाईल असा त्यांचा कयास होता.
अमेरिकेला मात्र भारताचे हे अ*ण्वस्त्रसज्ज होणे तितकेसे पचनी पडले नव्हते. त्यांना वाटले की भारत जर अ*ण्वस्त्रसज्ज झाला तर त्याची ताकद वाढेल. त्यातही भारत आणि तत्कालीन सोव्हिएत रशियाचे संबंधही दृढ होते. रशियाच्या मदतीने भारत एक ताकदवान देश बनू शकेल आणि कदाचित आपल्याला जगात आणखी एक स्पर्धक वाढेल असा त्यांचा विचार असावा
भारताच्या या ताकदीमुळे आशियात अस्थिरता निर्माण होईल असा त्यांचा अंदाज होता. थोडक्यात १९७०च्या काळात भारत म्हणजे दुसरा कोरिया ठरेल अशी अमेरिकेला भीती होती.
भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री आणि पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष अय्युब खान यांच्यातही शांतता कराराची बैठक होणार होती. या करारानुसार पाकच्या ताब्यातील ७१० चौ. किमी प्रदेश भारताला आणि भारताचा २१० चौ. किमी भूभाग हा पाकिस्तानला देण्याचे ठरले. या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि त्याच रात्री शास्त्रीजींचा मृत्यू झाला.
रॉबर्ट यांच्या मते भारत जर अ*ण्वस्त्र सज्ज झाला असता तर अमेरिकेची डोकेदुखी वाढेल असा अमेरिकेचा कयास होता. म्हणूनच सीआयएच्या सदस्यांनी या दोघांना संपवण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे भारताचे अ*ण्वस्त्रसज्ज होण्याचे स्वप्न सुमारे दहा वर्षे पुढे ढकलले गेले.
लालबहाद्दूर शास्त्री आणि होमी भाभा यांच्या मृत्यूचा भलेही परस्पर संबंध जोडता येणे कठीण आहे पण सीआयएच्या रॉबर्ट क्राउली याने लिहिलेला पुस्तकात याबद्दल बरेच काही खुलासे करण्यात आले आहेत. क्राउलीच्या मते शास्त्री आणि होमी भाभा यांच्या मृत्यूस अमेरिकाच जबाबदार होती.
या दोन्ही मृत्यूंमुळे भारताचा अ*ण्वस्त्र कार्यक्रम ठप्प झाला होता. जिथे होमी भाभा फक्त अठरा महिन्यात भारताला अ*ण्वस्त्रसज्ज बनवणार होते. पण अमेरिकेने शास्त्री आणि होमी भाभा दोघांचाही काटा काढून भारताच्या या योजनेला खो दिला.
भारत सरकारच्या मते यामागचे रहस्य उघड केल्यास भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधात बाधा निर्माण होईल. दोन्ही मृत्यूंच्या भोवतीचे संशयाचे सावट आजही हटलेले नाही. यामागील सत्य कधी बाहेर येईल की ते असेच दडपून ठेवले जाईल हेही सांगता येणार नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.