आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
प्राचीन भारतीय इतिहासात केवळ शौर्यकथाच नाहीत तर, अनेक रहस्यमय आणि चमत्कारीक गोष्टीही दडलेल्या आहेत. असंच एक रहस्य आहे “अननोन मेन”. सम्राट अशोक याच्या कालखंडातील हे रहस्य आजही केवळ तर्क आणि अंदाजात गुंतलेलं आहे. या रहस्याला नाकारता येणारे पुरावे नाहीत की ठोसपणे स्विकारता येणारेही पुरावे नाहीत. काय आहे हे रहस्य?
महान शासक चंद्रगुप्त याचा नातू आणि बिंबिसाराचा मुलगा मौर्य सम्राट अशोक हा एक महान पराक्रमी राजा म्हणून इतिहासात नोंदविला गेला आहे. आपल्या कार्यकालात त्यानं त्याच्या राज्याच्या सीमा विस्तारल्या. असं म्हणतात की आजच्या इराणपासून ब्रह्मदेशापर्यंत त्यानं त्याचं राज्य विस्तारलं होतं.
आपल्या कारकीर्दीत प्रचंड नरसंहार ते शांततामय अहिंसक पंथाची स्थापना अशा अनेक चमत्कारिक गोष्टी करणार्या सम्राट अशोकानं आणखीन एक रहस्यमय गोष्ट केली जिच्या अस्तित्वाबद्दल आजही केवळ चर्चा होतात. ही गोष्ट नाकारता येणारे पुरावे नाहीत तसंच अस्तित्वाबद्दल ठोसपणे सांगणारेही पुरावे नाहीत. ही रहस्यमय गोष्ट आहे एका गुप्त समुदायाच्या अस्तित्वाची.
नऊ गुप्त सदस्यांची ही जगातली पहिली संघटना समजली जाते. अशोकानं एक अशी गुप्त टीम बनवली जी जगापासून कायम रहस्यमय अंधारात राहिली.
त्यांना एकत्र आणलं त्यावेळीच हे स्पष्ट करण्यात आलं होतं की या नऊ जणांनी समाजासमोर कधीच यायचं नाही. त्यांची ओळख, चेहरे आम जनतेला कधीच समजू द्यायचे नाहीत.
आपल्या सम्राटाला दिलेल्या या वचनाला जागत या नऊ जणांनी आपली ओळख कधीच जगासमोर आणली नाही. म्हणूनच यांच्या अस्तित्वाबद्दल कायमच एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं आहे.
मुळात अशा प्रकारच्या गुप्त टीमची स्थापना सम्राट अशोकाला का कराविशी वाटली? या नऊ जणांकडे अशी कोणती जबाबदारी सम्राट अशोकानं सोपविली होती की ते अंडरकव्हरच रहावे असं त्याला वाटत होतं?
सम्राट अशोक हा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि क्रूर राज्यकर्ता समजला जात असे. त्यानं कलिंगावार केलेलं आक्रमण हे प्राचीन भारतीय इतिहासातलं एक मोठं क्रूर आक्रमण आणि लढाई समजली जाते. लाखोंचा जीव घेऊन आणि तितक्याच लोकांना बंदी बनवून हे युध्द संपलं. हा नरसंहार सम्राट अशोकानं आपल्या डोळ्यांनी पाहिला. इतक्या मोठ्या प्रमाणात क्रूरपणे घडलेला नरसंहार बघून तो विचारात पडला. आपण या सगळ्यातून नेमकं काय साध्य करत आहोत हा लाखमोलाचा प्रश्न त्याला या युध्दानं पाडला. या युध्दानं त्याला पूर्णपणे विचलीत आणि अशांत केलं. या युध्दानंच त्याच्यात महापरिवर्तन घडलं.
या युध्दानंतरच त्यानं शांततामय अशा बौध्द धर्माकडे पाऊलं वळवली. इथूनच एक पूर्णपणे वेगळं असं वेगळ्या शांततापूर्ण आणि अध्यात्मिक धर्माचं राज्य चालू झालं. एकेकाळी केवळ सीमा वाढविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणार्या आणि त्यापायी नरसंहार करणार्या या सम्राटानं पुढील सर्व आयुष्य मानव कल्याणासाठी वेचलं. हे इतिहासातलं एक मोठं आश्चर्य समजलं जातं.
बौध्द धर्म स्विकारल्यानंतर त्यानं आपल्या आयुष्यात ही हे तत्वज्ञान उतरविण्याचा त्यानं पूर्ण प्रयत्न केला. शिकार आणि पशू हत्या पूर्णपणे वर्जित करुन त्यानं दान धर्माचा मार्ग अवलंबला. ज्ञानप्रसार करणार्या ब्राह्मण समाजाला त्यानं भरभरून दान द्यायला सुरवात केली.
एका पिढीतून दुसर्या पिढीत ज्ञान घेऊन जाणार्या या समाजाचं महत्त्व ओळखत त्यांच्या ज्ञान प्रसाराला त्यानं चालना दिली. याचबरोबर त्यानं आता अनेक जनहिताच्या कार्यांना चालना द्यायला सुरवात केली. चिकित्सालयांची उभारणी, ज्ञानसाधना केंद्रं यांची मोठ्या प्रमाणावर उभारणी चालू केली.
दळणवळण सुलभ व्हावं यासाठी पक्क्या सडकांची बांधणी चालू केली. बौध्द धर्माच्या प्रसारासाठी त्यानं आपले अनुयायी सर्वदूर पाठविण्यास सुरवात केली.
बौध्द धर्माचं अध्ययन आणि प्रसार करत असतानाच त्याला साक्षात्कार झाला की आपल्या समाजात असे काही विषय आहेत की त्यातलं ज्ञान जतन होणं आणि ते सुरक्षित रहाणं महत्त्वाचं आहे. हे ज्ञान चुकीच्या हातात पडलं तर विनाश ओढवेल हे लक्षात आल्यावर त्यानं यावर विचारमंथन चालू केलं. असं काय करता येईल की हे ज्ञानभंडार जतनही होईल आणि विनाशकारक प्रवृत्तींपासून ते गुप्तही ठेवलं जाईल. ए
काचवेळेस राज्यही सांभाळायचं होतं आणि ही जी नव्यानं झालेली ज्ञानप्राप्ती आहे तीदेखील जतन करायची अशी दुहेरी जबाबदारी आता त्याच्यावर पडली होती. या विचारमंथनातूनच त्याला अनोखी कल्पना सुचली. आपले निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू असे नऊ लोक त्यानं अगदी कसून चाचणी घेत निवडले. या नऊ जणांवर त्यानं हे ज्ञान सांभाळून ठेवण्याची जबाबदारी त्यानं सोपविली.
नऊ विषयातली ग्रंथ निर्मिती करून त्यानं हे ज्ञान ग्रंथ स्वरूपात या नऊजणांकडे सोपवलं. ही जबाबदारी सोपवताना त्यानं मुख्य अट हीच ठेवली होती की हे सगळेजण आपलं कार्य अत्यंत गुप्तपणे करतील. समाजाच्या नजरांपासून दूर आपल्या अस्तित्वाची जाणीवही होऊ न देता त्यांनी राहायचं आहे. मानव कल्याणार्थ बनविलेली ही इतिहासातली पहिली सिक्रेट सोसायटी समजली जाते.
द नाईन अननोन मेन
सम्राट अशोकानं नऊ ग्रंथ लिहून ते या नऊ गुप्त सहकार्यांकडे सुपूर्द केले आणि त्यांना सूचना दिल्या की, जे आहे ते जतन तर करायचंच आहे शिवाय सतत अभ्यास, संशोधन करून आपापल्या ग्रंथात भरदेखील घालत जायची आहे. हे काम अर्थात समाजासमोर न येता करायचं आहे.
असं म्हणतात की जगाच्या विविध ठिकाणी या नऊ जणांना पाठवण्यात आलं. आपसात संपर्क साध्यण्यासाठी या नऊ जणांनी एका वेगळ्या सांकेतिक भाषेची निर्मिती केली. ही भाषाही त्यांच्या अस्तित्वाप्रमाणेच गुप्त राखली गेली.
केवळ या नऊ जणांनाच ही भाषा येत होती. आता प्रश्न हा पडतो की आजवर कोणालाही कसलीही कल्पना न येता ही ग्रंथसंपदा कशी काय पिढी दर पिढी पुढे सरकत आली असावी? या ठिकाणी दोन मान्यतांचा विचार केला जातो. त्यापैकी पहिली मान्यता ही आहे की, हे नऊ जण आपली जबाबदारी पुढे नेण्यासाठी एक उत्तराधिकारी कडक चाचण्यांच्या आधारे निवडत असत. सर्व चाचण्या पार केल्यानंतरच ही गुप्त ग्रंथसंपदा या उत्तराधिकार्याकडे सोपविली जात असे.
असे म्हणतात की हजारो वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली असून आजही या सिक्रेट सोसायटीचे उत्तराधिकारी तुमच्या-आमच्यातच आहेत मात्र आपल्यापासून ही माहिती गुप्त राखली जाते.
दुसरी मान्यता ही आहे की, या नऊजणांनी आपल्या संशोधनातून असा काहीतरी पदार्थाचा शोध लावला होता ज्याच्या सेवनामुळे त्यांच वय आहे तिथेच थांबलं असून ते अमर झालेले आहेत.
या दोन्ही मान्यतांपैकी पहिली मान्यता जास्त तर्काला धरुन आहे. मात्र ही नऊ सदस्यांची गुप्त संघटना जगभरात कायम कुतुहलाचा विषय बनून राहिली आहे.
असं काय आहे या ग्रंथांमध्ये?
यात नऊ विषयांना मांडलं आहे. १९२३ साली टॅलबॉट मुन्डी या इंग्लिश लेखकानं, ज्यानं पंचवीस वर्षं भारतीय पोलिसखात्यात काम केलं होतं, आपल्या “द नाईन अननोन मेन” या पुस्तकात या सर्वाचा उहापोह केलेला आहे.
प्रसार (प्रपोगंडा)- लोकांचा ब्रेनवॉश करण्याची मानसशास्त्रीय पध्दत या पहिल्या ग्रंथात आहे.
फ़िजिओलॉजी- यात मानवी शरीराचा सखोल अभ्यास आहे. केवळ स्पर्शानं कोणत्याही शस्त्र, हत्याराशिवाय एखादी नस दाबून हत्या करता येऊ शकण्याचं तंत्र या ग्रंथात आहे.
मायक्रोबॉयोलॉजी- मानवी आणि प्राण्यांच्या शरीरातील पेशींवर महत्वाची माहिती यात आहे. असं म्हणतात की जेंव्हा कॉलरासारख्या रोगानं थैमान घातलं होतं तेंव्हा याच ग्रंथातून यावरचा इलाज शोधला गेला होता. यावरून असं दिसून येतं की जेंव्हा जेंव्हा मानवी समुदाय एखाद्या संकटाला तोंड देत असतो तेंव्हा तेंव्हा हे ग्रंथ मदतीला येतात.
अलकेमी- हा रसायन शास्त्रावर आधारीत असा ग्रंथ असून यात कोणत्याही धातूला सोन्यात कसं रूपांतरीत करायचं यासंबंधीचं विवेचन आहे.
संवाद- या ग्रंथात आपण आपया जगातून अज्ञात जगाशी संवाद साधण्याचं तंत्र सांगितलं आहे. असं मानलं जातं की त्या काळातही या तज्ज्ञांना एलियन्सच्या अस्तित्वाची जाणीव होती आणि ते त्यांच्याशी संवादही साधू शकत होते.
प्रकाश- यात प्रकाश आणि त्यापासून मिळणारी ऊर्जा यावर विचार केलेला आहे. प्रकाशापासून शस्त्र बनवता येण्याच्या तंत्रावर यावर विचार केलेला आहे.
सोशिऑलॉजि- मानवी समाज आणि त्याची जडण घडण यांचा विचार यात केला आहे. याव्यतिरीक्त गुरुत्वाकर्षण, कॉस्मोगोनि या विषयांवरही लिहिलं गेलं आहे.
या पुस्तकात त्यानं असंही नमूद केलं आहे की हे नऊजण अगदी दूर्मिळपणे स्वत:ला जगासमोर आणतात. हे सर्व इतक्या सूक्ष्म पातळीवर घडतं की कोणाच्या लक्षातही येत नाही. एक लोकप्रिय अफ़वा अशीही आहे की, जगदीशचंद्र बोस आणि विक्रम साराभाई जे या गुप्त समाजावर विश्वास ठेवणारे होते ते वास्तवात या गुप्त संघटनेचे सदस्यच होते. जगदीशचंद्र बोस हे स्वत: एखाद्या रहस्याहून कमी नव्हतेच.
असं म्हणतात की त्यांचं अप्रकाशित साहित्य त्यांनी जगापासून लपवून ठेवलं आहे. प्रकाशित साहित्यापेक्षा या अप्रकाशित साहित्यात अनेक गूढ गोष्टींचा विचार मांडला आहे आणि या जर जगासमोर आल्या तर मानवी जीवनात एक वेगळीच क्रांती घडू शकते
मात्र वर उल्लेखल्यानुसार या मान्यतांना प्रमाण देणारे किंवा नाकारणारे पुरावेच नसल्यानं हजारो वर्षांनंतर आजही हे एक कुतुहलमिश्रीत रहस्यच आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.