आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारतात प्रत्येक गावात किमान एक तरी शंकराचं मंदिर असतंच. शिवभक्तांची संख्या भारतात खूप मोठी आहे. या मंदिरांमध्ये शिवलिंगाच्या रूपातील शंकराची पूजा करण्यात येते. मग ते १२ ज्योतिर्लिंग असो किंवा एखाद्या गावातलं छोटसं शिवमंदिर असो, प्रत्येक शिवालयाची एक गोष्ट असते, आख्यायिका असते.
आज आम्ही अशाच एका शिवालायाची आख्यायिका सांगणार आहोत. या शिवालयातील शिवलिंगावर दर १२ वर्षातून या वीज कोसळते. म्हणूनच याला “बिजली महादेव” म्हणून ओळखलं जातं.
पार्वती आणि व्यास नदीच्या संगमाजवळ, कुल्लूच्या माथन पर्वतावर हे मंदिर स्थित आहे. या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावातील (बिजली महादेव गाव) लोकच या मंदिराची ठेवरेव करतात. बिजली महादेवाचं हे मंदिर संपूर्ण लाकडी आहे. पहाडी भागातील मंदिरांचा एक नमुना म्हणजे हे बिजली महादेवाचं मंदिर!
मंदिराच्या प्रवेशद्वारावर नंदी तर आहेच पण शंकराच्या अनेक गोष्टी चित्ररूपात कोरलेल्या आहेत. आजूबाजूचा परिसरही अतिशय नयनरम्य आहे.
आधीच सांगितल्याप्रमाणे या मंदिरावर दर १२ वर्षांनी वीज कोसळते आणि आतील शिवलिंग भंगतं पण मंदिराला मात्र काहीही नुकसान पोहोचत नाही. ही काही आजची गोष्ट नाही, तर गेल्या कित्येक वर्षांपासून हे घडत आलंय असे तिथले स्थानिक लोक सांगतात.
शिवलिंग भग्न झाल्यावर तिथले पुजारी त्याला लोण्याचा लेप लावतात, म्हणजे लोणी अक्षरशः चोपाडतात आणि आश्चर्य असं की काही दिवसांत हे शिवलिंग पुन्हा मूळ स्वरूपात येतं.
आता यामागे काय वैज्ञानिक कारण आहे हे तर कोणालाच नाही माहिती, पण यामागची एक आख्यायिका तिथल्या गावांत सांगितली जाते, ती अशी-
असं म्हणतात की या भागात कुलांत नावाचा एक दैत्य राहत असे (त्याच्याच नावावरून या पर्वतांना कुल्लू हे नाव पडलं असावं). एक दिवस त्यानं अजस्त्र अजगराचं रूप धारण केलं. कुल्लूच्या परिसरातून फिरत फिरत तो मंथन गावात येऊन पोहोचला. इथे येऊन तो व्यास नदीच्या मधोमध जाऊन बसला. त्याला नदीचा प्रवाह थांबवून त्या भागाला जलमग्न करून टाकायचं होतं, शेवटी राक्षसच ना तो!
झालं! ही बातमी येऊन पोहोचली भगवान शंकरांपर्यंत आणि ते निघाले कुलांतला संपवायला. पण कुलांतसारख्या अजगररुपी राक्षसाला मारणं ही काही सोपी गोष्टं नव्हती. मग भगवान महादेवांनी काय केलं? त्याला विश्वासात घेतलं, हळूच त्याच्या कानात सांगितलं की कोणीतरी तुझ्या शेपटीला आग लावली आहे आणि जसा तो ती आग बघायला पलटला त्यांनी त्याच्या डोक्यावर त्रिशुळाने वार करून त्याला संपवून टाकलं.
जसा तो मृत्युमुखी पडला त्याचं ते अक्राळविक्राळ शरीर या पर्वतात बदलून गेलं. असं म्हणतात कुल्लूच्या सगळ्या पर्वतरांगा या कुलांतच्या शरीरापासूनच बनल्या आहेत.
आता कुलांत तर मेला, पण त्याची भीती काही तिथल्या लोकांच्या मनातून जाईना. कारण जरी तो मेला असला तरी अजूनही तो पर्वतांच्या रुपात कुल्लूच्या खोऱ्यात होताच! शेवटी लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी भगवान शंकर या कुलांतच्या डोक्यावर, म्हणजे पर्वतावर, वास करू लागले.
एवढंच नाही तर त्यांनी इंद्रदेवाला आदेश दिला की दर बारा वर्षांनी या पर्वतावर वज्रपात करायचा. तेव्हापासून आजपर्यंत दर बारा वर्षांनी इथे वीज कोसळते. असं म्हणतात की तिथल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी म्हणून हा वज्रपात भगवान आपल्यावर घेतात म्हणूनच ही वीज फक्त तिथल्या शिवलिंगावर कोसळते.
हे मंदिर म्हणजे तिथल्या लोकांच्या सुरक्षिततेचं प्रतिक आहे.
यावर्षीही काही दिवसांपूर्वी या बिजली महादेवाच्या मंदिरात अशीच वीज कोसळल्याची आढळून आली.
अशा कितीतरी आख्यायिका भारतातील प्रत्येक गावात आढळतात. या मानल्या तर खऱ्या नाही तर नाही. पण या आख्यायिकांमागे तिथल्या स्थानिक लोकांची मोठी श्रद्धा दिसून येते हे मात्र नक्की!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.