आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ख्रिसमसची रात्र म्हणजे, रोषणाईची, आनंदाची रात्र! पण, एका अपशकुनी गावात मात्र पन्नास वर्षापूर्वी उगवलेली ही ख्रिसमसची रात्र त्या गावातील तब्बल ४४ लोकांसाठी एक भीषण काळरात्र ठरली. तामिळनाडूतील किझ्वेन्मानी या गावातील काही भूमिहीन शेतमजुरांनी आपली मजुरी वाढवून मिळावी अशी मागणी केली.
पण, सरंजामदारीच्या अहंकाराने आणि जात वर्चस्वावादी मानसिकतेने ग्रासलेल्या या गावातील शेतमालकांनी अशी मागणी करण्यासाठी आलेल्या ४४ दलित मजुरांना एकाच वेळी जाळून ठार मारले. तामिळनाडूतील किझ्वेन्मानी हे गाव तंजावर जिल्ह्याचा भाग आहे.
भूमिहीन शेतमजूर आणि जमीनदार या दोन गटांत झालेले हे ह*त्याकांड मजुरी वाढवण्याच्या वादातून झाले होते असेच आजही सांगितले जाते. किझ्वेन्मानीच्या या घटनेत किती क्रू*रपणे मानवी अधिकारांचे हनन करण्यात आले, हे पाहून खेद होतो. परंतु, हा फक्त वेतनवाढीचा प्रश्न नाही तर, जात, वास्तव आणि जमीनदार पद्धती यातील तीव्र संघर्ष किल्वेन्मानी यांनी आपल्या “द जेंटलमन किलर्स” या पुस्तकातून चित्रित केला आहे.
जमिनीची असमान वाटणी, कमी वेतनामुळे भूमिहीन मजूर तर जातीय शोषण होत असल्यामुळे तेथील दलित, यांच्यात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला होता. परिणामी त्यांनी वेतनवाढीची मागणी केली.
या भागात कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी परिसरातील कामगारांना एकत्र केले आणि त्यांनी वेतनवाढीसाठी आंदोलन सुरु केले. दलित भूमिहीन मजुरांचे हे आंदोलन दडपण्यासाठी स्वतःचेही संघटन केले. शेतात काम करण्यासाठी ते बाहेरून मजूर घेऊ लागले. पण, गावाच्या दलित शेतमजुरांनी मात्र वेतनवाढ मिळेपर्यंत शेतात काम करण्यास नकार दिला. भूमिहीन गरीब दलित शेतमजूर जमीनदारांची आज्ञा पाळत नाही, हे पाहून या जमीनदारांचा अहंकार दुखावला गेला.
काहीही करून हे आंदोलन चिरडून टाकण्यानेच त्यांचे वर्चस्व कायम टिकून राहणार होते. म्हणून त्यांनी एक क्रू*र योजना आखली.
२५ डिसेंबरच्या त्या संध्याकाळी पोलीस व्हॅनमधून या जमीनमालकांनी आणलेले काही गुंड गावात शिरले. त्यांनी गावातील दलित वस्तीला चारही बाजूनी घेरलं. त्यांच्याकडे शिकारीच्या बंदुका देखील होत्या. संपूर्ण वस्तीला घेरल्यानंतर त्यांनी बंदुकीतून गोळीबार सुरु केला.
चारही बाजुंनी रस्ते बंद आहेत आणि आपल्यावर ह*ल्ला झालाय हे लक्षात येताच काही स्त्रिया लहान मुलं आणि वृद्धांना सोबत घेऊन एका झोपडीत दडून बसल्या. इतर लोकांजवळ बंदुकीच्या गोळ्यांना उत्तर म्हणून दगडफेक करण्याशिवाय पर्याय नव्हता.
पण, त्यांचा प्रतिकार फार काळ टिकाव धरू शकला. ते गुंड त्या झोपडीजवळ आले ज्यात २० स्त्रिया, १६ मुले आणि ५ वृद्ध लोक होते. त्यांनी त्या झोपडीलाच आग लावली. झोपडीतून कुणीही बाहेर पडणार नाही आणि वाचणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली. त्यात वाळका पालापाचोळा आणि लाकडे टाकून आग अजून भडकेल याचीही तजवीज करण्यात आली. आतील सर्व लोक जाळून खाक झाल्यानंतरच त्यांच्यातील राग शांत झाली.
हे ह*त्याकांड घडवून आणल्यानंतर हेच जमीनदार पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि या ह*त्याकांडाचा सूड उगवण्यासाठी आम्हाला लक्ष्य केले जाऊ शकते. आम्हाला पोलिसांकडून सरंक्षण हवे असल्याची मागणी केली.
पोलिसांनी देखील त्यांच्या मागणीला तत्काळ होकार दिला. दोन वर्षांनी या ह*त्याकांडाचा न्यायालयात निकाल लागला आणि यातील सहभागी आरोपींना फक्त दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.
त्यानंतर १९७५ साली मद्रास उच्च न्यायालयाने निम्न न्यायालयाचा निकाल रद्द करून सर्वच्या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. यातील मुख्य आरोपीवर सूड उगवण्यात आला आणि १९८० त्याची हत्या करण्यात आली. या हत्येच्या आरोपाखाली दलित समाजातील शेतमजुरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मद्रास उच्च न्यायालयाने १९९४ साली या खटल्याचा निकाल देताना, सर्व शेतमजुरांना निर्दोष मुक्त केले.
“हा खटला दाखल करण्यात आला तेव्हा मी फक्त पाच वर्षांचा होतो. जमिदारांना निर्दोष सोडण्यात आले मात्र, आम्हाला सतत न्यायालयात हजेरी लावावी लागे. आम्हाला तर न्याय मिळालाच नाही. माझ्या वडिलांच्या शरीरात ४० गोळ्या घुसल्या होत्या, त्यातील सहा तर डॉक्टरांना काढताही आल्या नाहीत. त्यानंतर माझ्या वडलांना कधीच नीट चालता आले नाहीत.” कुमारन सांगत होते.
हे ह*त्याकांड घडले तेव्हा कुमारन यांचे वय फक्त ५ वर्षे होते. या ह*त्याकांडातून जे दलित वाचले त्यांना गाव आणि घर सोडून जाण्यास भाग पाडले गेले. त्यांची घरे जप्त करण्यात आली. या भयानक ह*त्याकांडाची झळ बसलेल्या गावकऱ्यांनी स्वतःहूनच हे अनुभव सांगितले.
“आम्हाला गाव सोडून जाण्यास भाग पाडले आणि आमची घरे देखील काढून घेतली. जमिदारांना तर सात वर्षात निर्दोष मुक्त करण्यात आले पण, आमच्यावरील खटल्याचा निकाल लावण्यास मात्र १५ वर्षांचा अवधी लागला.” ज्या गावकऱ्यांना गाव सोडून जाणे भाग पाडले होते, त्यांनी ही माहिती दिली.
या ह*त्याकांडानंतर दहा वर्षांनी आलेल्या एआयएडीएमके सरकारने या गावकऱ्यांना शेतजमीन दिली. मात्र, या जमिनीसाठी दर एकरासाठी सरकारने ७,२०० रुपयांची रक्कम देखील घेतली. यामुळे अनेक कुटुंबांना या जमिनी विकत घेता आल्या नाहीत.
या परिसरात कृष्णाम्मल जगन्नाथन यांच्या लँड फॉर टीलर्स या संघटनेच्या अथक प्रयत्नामुळे काही शेतकऱ्यांना त्यांची हक्काची जमीन मिळाली आहे. भूमिहीन आणि अन्यायग्रस्त शेतमजुरांना हक्काची जमीन मिळावी म्हणून कृष्णम्मल १९६८ पासून लढत आहेत.
आज कृष्णम्मल ९२ वर्षांच्या आहेत. गावातील काही शेतमजुरांना हक्काच्या जमिनी मिळाल्या असल्या तरी, अजून हा लढा पूर्णतः यशस्वी झाला नसल्याचे कृष्णम्मल म्हणतात.
ज्या दिवशी हे ह*त्याकांड घडले त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या इथे आल्या. इथली परिस्थिती पाहून त्यांना गाव न सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या कायमच्या इथेच राहिल्या. त्यांच्या संघटनेने शेतमजुरांच्या हक्कासाठी गेली पन्नास वर्षे लढा दिला आहे. ज्यात त्यांना आज थोडेफार यश मिळाले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.