आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
पृथ्वीवर ऊर्जेचे दोनच स्त्रोत असतात, पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत. काही काळाने संपुष्टात येणाऱ्या उर्जा स्त्रोतांना पारंपरिक ऊर्जा स्त्रोत म्हणतात. उदाहरणार्थ: तेल, कोळसा, पेट्रोल, डिझेल, खनिज. ज्या विजेशिवाय माणसाचे पानही हलत नाही, त्या विजेचे ७५% उत्पादन हे खनिजा पासून होते. जगभरात, इंधन संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत.
तंत्रज्ञानाच्या प्रगती बरोबरच इंधनाचा, विजेचा वापर सुद्धा कैक पटीने वाढला आहे. या समस्येवर उपाय म्हणून पर्यायी ऊर्जेच्या स्त्रोतांचा शोध लावण्यात आला. सूर्या पासून, हवे पासून, ऊर्जा निर्मिती होऊ लागली. पण एक मत असे ही पडले की ऊर्जास्त्रोताचा शोध लावण्या ऐवजी, यंत्रांची कार्यक्षमता वाढवण्यात जास्त फायदा आहे.
एकट्या भारतासारख्या प्रगतीशील देशात दरवर्षी सरासरी २.७४ दशलक्ष कार विकल्या जातात, इतर वाहने वेगळी. संपूर्ण जगभरातील ह्या खपाची आकडेवारी तर किती मोठी असेल. दरवर्षी वाढत जाणारी ही आकडेवारी आणि त्याला लागणारे इंधन व कार्यक्षमतेच्या वाढीसाठी पर्यायी उपाय शोधण्याकरिता दरवर्षी ‘शेल इको मॅरेथॉन’ ही प्रतियोगिता आयोजित करण्यात येते व जग भरातील विज्ञान शाखेचे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतात.
२०१९ साली मलेशियात आयोजित केलेल्या शेल इको मॅरेथॉनचे द्वितीय पारितोषिक हे भारतीय संघाला मिळाले. आय. आय. टी. वाराणसी (बनारस हिंदु यूनिवर्सिटी) येथील ६ विद्यार्थ्यांच्या ‘अवरेरा’ समूहाने, २०१८ साली ‘अल्टर्नो’ नावाच्या एका तीन चाकी वाहनाची निर्मिती केली. ज्याचे वजन ४० किलो पेक्षा जास्त नसून, ताशी ३४९.६ किमी किलोवॅट एवढी कार्यक्षमता होती.
चेन्नई येथे, शेल इको मॅरेथॉन मध्ये आशियातील तिसरे तर भारतातील पहिले सर्वात उत्कृष्ट कार्यक्षमता असलेल्या वाहनाचा मान पटकावला. त्यानंतर लगेच मागील वर्षी मलेशियातील शेल इको मॅरेथॉन मध्ये याच वाहनासाठी ‘बॅट्री इलेक्ट्रिक प्रोटोटाईप’ या विभागात त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला.
पण इथवर पोहोचण्यासाठी अवरेराला अथक परिश्रम घ्यावे लागले. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’ हा मूलमंत्र अवरेराच्या प्रत्येक सदस्याने गाठी बांधला होता. अवरेराचा शेल इको मॅरेथॉन मधला प्रवास हा २०१३ साली सुरू झाला. दोन वर्षे आपल्या आविष्कारावर काम करून, २०१५ पासून शेल इको मॅरेथॉन मध्ये भाग घेणे सुरू केले. पण तांत्रिक पडताळणीच्या फेरीत अनुभवाच्या अभावापायी हवे तसे प्रदर्शन न देऊ शकल्यामुळे त्यावर्षी अंतिम फेरीत जाण्यास ते मुकले.
२०१६ साली फिलिपिन्स येथे आयोजित स्पर्धेत या फेरीत ते यशस्वी झाले. पण फिलिपिन्सच्या हवेतील आर्द्रता वाहनाच्या मोटर कंट्रोलर करता प्रतिकूल ठरली व प्रत्यक्ष चाचणी आधीच त्यात स्फोट झाला. या अनुभवातून शिकत, अवरेराने त्यांच्या यंत्रात बरेच बदल केले. जसे, कार्बन फायबर मोनोकॉक चेसिस बसवले, यंत्राचे वजन ४० किलो पर्यंतच सिमीत ठेवले, व कार्यक्षमता वाढावी म्हणून कारचे मुख्य न्युरल नेटवर्क्स असलेल्या भागाला एरोडायनॅमिक आकार दिला. याचबरोबर या कारचा ड्रॅग कोईफीशियण्ट हा वापरात असलेल्या इतर कारच्या तुलनेत ०.०९७ इतकाच होता.
या कारमध्ये एक विशिष्ट, ब्रशलेस डी. सि. (BLDC) बसवण्यात आले होते. हे कंट्रोलर, ट्रॅकनुसार काम करणारे कंट्रोलर असते. हे बदल केल्यानंतर त्यांनी कारचे अल्टर्नो हे नाव बदलून ‘अल्टर्नो ४.१’ केले. अल्टर्नो ४.१ ची कार्यक्षमता वाढून ताशी ४६२.५ किमी किलोवॅट इतकी झाली. ही कार पर्यावरणपूरक असून, ऑटोमोबाईल क्षेत्रातील पहिली ‘इलेक्ट्रिएफीशियेंट’ कार म्हणून ओळखली जाते. वीजउत्पादनाच्या ७५% भाग हा एलेक्ट्रिक वाहनांत खर्च होतो, ज्यामुळे प्रदूषण कमी न होता, नॉर्मल कारच्या आय.सी. इंजिन इतकेच प्रदूषण होते.
२०१९ साली अवरेराने आपल्या आल्टर्नो ४.१ ला सोबत घेऊन पुन्हा एकदा शेल इको मॅरेथॉन मध्ये भाग घेतला. या स्पर्धेचे हे दहावे वर्ष होते. ही स्पर्धा मलेशियात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आशिया व मिडल ईस्ट देशांतील एकूण १०० संघांनी सहभाग घेतला होता. ‘कोणती कार कमीत कमी इंधन वापरून, सगळ्यात जास्त अंतर गाठू शकते’ अशा पैजेची ही पहिलीच वेळ होती. या स्पर्धेला तीन विभागांत विभाजित करण्यात आले होते.
एक- इंटर्नल कम्बशन इंजिन:गॅसोलिन, इथेनॉल, डिझेल; दुसरा विभाग- हायड्रोजन फ्यूल सेल आणि तिसरा विभाग- बॅटरी इलेक्ट्रिक पावर. याचबरोबर आता कारच्या कार्यक्षमते बरोबरच, कारचालकाची सुद्धा परीक्षा होणार होती.
इंधन बचती बरोबरच आता कारच्या वेगाकडे देखील लक्ष द्यावे लागणार होते. अवरेराने हे आव्हान स्वीकारून, तिसऱ्या विभागातून स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला. त्यात ते यशस्वी देखील झाले!
अवरेराच्या प्रत्येक सदस्याने आपल्या मुलाखती दरम्यान, संघाच्या एकीबद्दल आणि कामाबद्दल बोलताना सांगितले की आमच्या टीम मधील प्रत्येक सदस्य हा टीम लीडरच आहे, कोणीच लहान-मोठे, कमी-जास्त नाही.
आमचे यश हे प्रत्येकाची मते, नवीन संकल्पना व दूरदृष्टी यांचे फळ आहे असेच आम्ही मानतो. आमच्या यशाचे श्रेय आम्हाला नितांत प्रोत्साहन देणाऱ्या गुरूंना व आईवडिलांना देतो.
योग्य मार्गदर्शन लाभून त्या दिशेने कष्ट घेतले, हार न मानता मेहनत घेतली तर काहीही अशक्य नसते, हे या विद्यार्थ्यांनी खरे करून, भारतच्या शीरपेचात मानाचा तूरा खोवला!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.