आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आधुनिक भारताचा इतिहास लिहित असताना ज्यांनी ज्यांनी भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले अशा व्यक्तींचा उल्लेख करणे अपरिहार्य आहे. यामध्ये बाबू जगजीवन राम यांच्या राजकारणाची आणि राजकारणात राहून त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेणे अपरिहार्य आहे. स्वातंत्र्य चळवळीत तर जगजीवनराम यांनी पुढाकार घेतलाच पण, स्वातंत्र्यानंतर त्यांनी सत्तेत राहून सामान्य लोकांच्या उन्नतीसाठी सत्तेचा फायदा करून घेतला.
दलित वर्गाचे नेते म्हणून त्यांचा कितीही उदोउदो होत असला तरीही त्यांनी केलेले काम हे सर्वधर्मीय भारतीयांचा विकास साधणारेच होते. संपूर्ण राष्ट्र निर्माणाच्या कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, याकडे दुर्लक्ष करता येत नाही. स्वातंत्र्यानंतर मिळालेल्या सत्तेचा उपयोग त्यांनी समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केला.
जगजीवन राम हे सर्वसामान्यांचे नेते होते. तत्कालीन सरकारमध्ये त्यांनी अनेक उच्च पदे भूषवली पण त्याची कधीही घमेंड बाळगली नाही. सामान्य लोकांचे नेतृत्व करत काही गोष्टी त्यांना शिकवत असतानाच, काही गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यात त्यांना कमीपणा वाटला नाही.
बाबू जगजीवन राम यांचा जन्म बिहारच्या आरा जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील ब्रिटीश आर्मीत होते. १९१४ मध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि परिवारावर अरिष्ट कोसळले. वडिलांच्या माघारी जगजीवनराम यांच्या आईने कसाबसा संसाराचा गाडा पुढे नेला.
जगजीवन राम यांनी आरा टाउन स्कूलमध्ये प्रवेश घेतला. याच शाळेत त्यांना पहिल्यांदा जातिभेदाचे चटके सोसावे लागले. त्यांचा शाळेत हिंदूंसाठी पिण्याच्या पाण्याचा वेगळा माठ होता तर, मुसलमान विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा वेगळा माठ होता. जगजीवनराम यांनी हिंदूंसाठी असलेल्या मठातील पाणी पिले. हिंदू विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात हेडमास्टरांकडे तक्रार केली.
हेडमास्टरांनी त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि शाळेतील दलित विद्यार्थ्यांसाठी आणखी एक वेगळा माठ ठेवण्याची तजवीज केली. पण, जगजीवनराम यांना हा भेदाभेद मुळीच रुचला नाही. त्यांनी दलितांसाठीचा वेगळा माठ फोडून टाकला. शाळेत आलेल्या या आणि अशा अनुभवांतूनच त्यांच्या मनात जातविद्रोहाची भावना मूळ धरू लागली.
१९२५ साली त्यांची भेट पंडित मदन मोहन मालवीय यांच्याशी झाली. जगजीवनराम यांच्या बुद्धीने प्रभावित झालेल्या पंडित मालवीय यांनी जगजीवनराम यांना पुढील शिक्षणासाठी बनारस हिंदू विश्वविद्यालयात येण्याचे निमंत्रण दिले. गावातील प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर जगजीवनराम पुढील शिक्षणासाठी बनारस विद्यापीठात गेले.
परंतु तेथेही त्यांना जातीय भेदभावाच्या भीषण अनुभवांना सामोरे जावेच लागले. तिथल्या वसतीगृहात दलित विद्यार्थ्यांना जेवण वाढले जात नसे. केस कापण्यासाठी त्यांना गाजीपूरहून दलित केशकर्तनकारला बोलावून आणावे लागले.
बनारस विद्यापीठातून बाहेर पडून जगजीवनराम यांनी थेट कलकत्ता गाठले. कलकत्त्याच्या विद्यापीठातून त्यांनी ‘बी.एस्सी.’ची पदवी मिळवली. १९३१ साली गांधीनी अस्पृश्यताविरोधी आंदोलन सुरु केले होते. जगजीवनराम गांधींच्या या अस्पृश्यताविरोधी आंदोलनात सामील झाले. या आंदोलनाच्या माध्यमातून जगजीवनराम लोकांशी संपर्क वाढवू लागले. १९३४ साली बिहारमध्ये भीषण भूकंप झाला होता. यावेळी त्यांनी स्वतःहून मदतकार्यात पुढाकार घेतला.
ब्रिटिशांविरोधात कामगारांना एकत्र करून अनेक आंदोलने केली. १९३५ साली त्यांनी ‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस लीग’ची स्थापना केली. समाजात दलितांना सन्मान मिळवून देणे आणि समानता आणणे हाच या संघटनेचा मूळ उद्देश होता.
याचवेळी भारतात ब्रिटिशांनी एक नवा कायदा आणला. या कायद्यान्वये मतदारसंघात दलितांना विशेष प्रतिनिधित्व मिळणार होते. कॉंग्रेसच्या वतीने बिहार मतदारसंघातून जगजीवनराम यांचे नाव जाहीर केले गेले.
पुढे भारतात “चले जाव” आंदोलनाची तीव्रता वाढू लागली. जगजीवनराम यांनी या आंदोलनातही सक्रीय सहभाग घेतला. या आंदोलनातच त्यांना जेलवारीही करावी लागली.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. त्याच्या पहिल्या मंत्रिमंडळात जगजीवनराम यांना कामगारमंत्री पद देण्यात आले. या काळात जगजीवनराम यांनी कामगारांसाठी अनेक कायदे मंजूर करून घेतले. यामध्ये इंडस्ट्रीयल डीस्प्युट ॲक्ट (१९४७), एम्पलॉयमेंट स्टेट अस्युरन्स ॲक्ट (१९४८) आणि प्रोव्हीडंड फंड ॲक्ट (१९५२) अशा काही महत्त्वपूर्ण कायद्यांचा उल्लेख करता येईल.
१९५२ साली त्यांना दूरसंचार मंत्रीपद देण्यात आले. या काळात त्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात टपालसेवेचा विस्तार केला. १९५६ साली त्यांना रेल्वे आणि दळणवळण मंत्री बनवण्यात आले. तेव्हा त्यांनी खाजगी एअरलाईन्सचे राष्ट्रीयीकरण केले. सागरी व्यापाराला उत्तेजन देण्यासाठी त्यांनी जहाजांची संख्या वाढवण्यावर भर दिला.
रेल्वे मंत्री असताना त्यांनी रेल्वेचे आधुनिकीकरण करण्याला प्राधान्य दिले. त्यांच्या पाच वर्षाच्या रेल्वे मंत्री पदाच्या कार्यकाळात एकदाही रेल्वेची भाडेवाढ झाली नाही. इंदिरा सरकारच्या काळात त्यांना पहिल्यांदा कृषिमंत्री असताना त्यांनी देशात हरितक्रांती यशस्वी करून दाखवली. १९७२ साली झालेल्या भारत-पाक यु*द्धाच्या वेळी ते देशाचे सरंक्षण मंत्री होते. या यु*द्धात भारताचा विजय झाला आणि स्वतंत्र बांग्लादेशची निर्मिती करण्यातही भारत यशस्वी ठरला.
इंदिराजींनी १९७५ साली आणीबाणी घोषित केली. या आणीबाणीच्या काळात संविधानाने सामान्य नागरिकांना जे अधिकार दिले त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इंदिराजींच्या या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. पुढे त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला.
१९७७ सालच्या निवडणुकीत जनता दलाचे सरकार आले तेंव्हा त्यांनी देशाचे उपपंतप्रधान पदही भूषवले. त्यांनी जर मनावर घेतले असते तर, ते देशाचे पहिले दलित पंतप्रधान होऊ शकले असते. पण, त्यांनी जनतेचा कौल शिरसावंद्य मानला.
१९८६ पर्यंत ते संसदेत कार्यरत राहिले. दलित वर्गासाठी तर त्यांनी आवाज उठवलाच पण, राष्ट्रासाठीही त्यांनी केलेले काम अनमोल आहे. शेवटपर्यंत ते सर्वसामान्यांचा नेता बनूनच राहिले. शोषित वंचित घटकांसाठीही त्यांनी बरेच काही केले. लोकांवर निर्णय थोपवून तो यशस्वी करण्यावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता.
१९३६ ते १९८६ म्हणजे जवळपास पन्नास वर्षे ते भारतीय राजकारणात सक्रीय राहिले. त्यांची धोरणे, त्यांचे विचार, याबद्दल भलेही मतभेद असू शकतात. पण, आपल्या एका वेगळ्या राजकीय शैलीतून त्यांनी दिलेले योगदानाकडे अजिबात दुर्लक्ष करता येत नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.