आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आजच्या २१ व्या शतकात देखील समुद्राच्या लाटांवर स्वार होणारा खलाशी होणे हे फक्त पुरुषांचेच क्षेत्र समजले जाते. मोठमोठे मालवाहतुक करणारे जहाज असो की साधारण प्रवासी बोटी, जहाजावरील कर्मचारी हे पुरुषच असतात आणि जहाजाचा चालक तर हमखास पुरुष असतो. जर चुकून तुम्हाला एखादी स्त्री ह्या क्षेत्रात आढळून आली तर विश्वास ठेवा तिने प्रचंड संघर्ष यासाठी केलेला असणार आहे.
उदाहरण द्यायचं तर कॅप्टन राधिका मेनन यांचे घेऊया, भारतीय नौदलातील पहिल्या महिला कॅप्टन, ज्यांनी अनेक प्रकारच्या वादळांचा सामना केला आणि आपले स्वप्न साकार केले. कॅप्टन मेनन ह्या जगातील पहिल्या महिला होत्या ज्यांनी समुद्रात केलेल्या अद्वितीय कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
त्यांनी घालून दिलेल्या ह्या जिवंत उदाहरणामुळे अनेक स्त्रिया आज समुद्रात उतरण्यासाठी सज्ज झाल्या असून दिवसेंदिवस महिलांचा समुद्राकडे ओढा वाढतच चालला आहे. आज आपण एका अशाच महिलेविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी १९९९ साली पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ह्या क्षेत्रात राजकीय आणि सामाजिक बंधनं झुगारून लावत मरीन इंजिनिअर म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली होती. त्या महिलेचे नाव होते सोनाली बॅनर्जी. ह्या भारतातील पहिल्या महिला मरीन इंजिनिअर होत्या. परंतु अनेक लोक त्यांच्या संघर्षाच्या कथेशी अनभिज्ञ आहेत.
लहानपणापासूनच सोनाली यांना सागरी किनाऱ्यावरील शहरांचे आणि समुद्रातील बेटांचे विशेष आकर्षण होते, त्यांच्या चित्रांमधून त्याची एक छाप पडायची. त्यांचे काका मर्चंट नेव्हीत कामाला होते, त्यांच्या सहवासातून सोनाली यांच्यात स्वतःची एक बोट चालवण्याचा विचार निर्माण झाला होता.
अनेक वर्षांनी, विश्व भ्रमंतीचे स्वप्न घेऊन तरुण वयातील सोनाली यांनी कोणालाही न विचारता चार वर्षांच्या मरीन इंजिनिअरिंगच्या आभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यासाठी त्यांनी कोलकाताच्या मरीन इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटची निवड केली.
पण एक मरीन इंजिनिअर म्हणून एका मुलीच्या प्रवास इतका साधा सरळ नव्हता. त्यांना पदोपदी अपमान आणि स्त्रीत्वाच्या तिरस्काराचा सामना करावा लागत होता. नातेवाईकांच्या नाराजी पासून ते सोबतच्या समवयस्क मुलांच्या शेरेबाजीपर्यंत त्यांना सगळ्याच त्रासाला तोंड द्यावं लागत होतं.
टेलिग्राफला दिलेल्या एका मुलाखतीत सोनली म्हणाल्या होत्या की त्यांच्या वडीलांना देखील त्यांचा निर्णय आवडता नव्हता. त्या जेव्हा घराबाहेर पडत तेव्हा तू पुरुषांच्या विश्वात कशी काम करणार असा सवाल त्यांना विचारला जात असे.
परंतु सोनालींचा संकल्प दृढ होता. त्यांनी आपलं तन मन समर्पित करून आभ्यास करायला सुरुवात केली. काही काळातच तिने तिच्या इतर समवयस्क साथीदरांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कॉलेजात शिक्षण घेताना त्यांना विशेष अडचण आली नाही.
महत्वाचं म्हणजे सोनालीमुळे कॉलेजसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. अभ्यासात अत्यंत कुशाग्र आणि बुद्धिमान असलेल्या कॉलेजच्या एकमेव महिला विद्यार्थी सोनाली यांची नेमणूक तरी कुठे करायची? मोठ्या वाद आणि विवादानंतर त्यांना ऑफिसर्स क्वार्टर्समध्ये नोकरी करण्याची संधी प्रदान करण्यात आली.
१९९९ साली सोनाली महाविद्यालयातून भारतातल्या पहिल्या मरीन इंजिनिअर म्हणून उत्तीर्ण झाल्या. १५०० पुरुषांच्या सोबतीला असलेली एकमेव महिला असा त्यांचा उल्लेख केला जात होता. नेमणूक झाल्यानंतर लगेचच त्यांची मोबील शिपिंग कंपनीच्या सहा महिन्यांच्या समुद्र प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. ह्या प्रशिक्षणा दरम्यान त्यांनी सिंगापूर, श्रीलंका, थायलंड, हाँग काँग, फिजी आणि ऑस्ट्रेलिया ह्या बंदरांना भेट दिली.
अनेक महिने समुद्रात घालवत, घरापासून शेकडो मैल अंतरावर, अनेक आठवडे कुठलाही संपर्क न करता जहाज घेऊन जाणे आणि जो काही संपर्क साधता येईल तो सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून संपर्क साधने, हे अनेक खलाशाना अवघड होतं, पण सोनाली यांनी ते सहज शक्य करून दाखवलं होतं.
सोनाली यांना माहिती होतं की त्या ज्या क्षेत्रात आहेत तिथे त्यांना पदोपदी सिद्ध करत रहावं लागणार आहे. स्त्री असल्यामुळे त्यांच्या वाटेला हा संघर्ष अपरिहार्य होऊन बसल्यामुळे बऱ्याचदा त्या वैतागून जात असत. पण त्यांनी जिद्द सोडली नाही.
पुरुषाने एखादी लहान चूक जरी केली तरी त्या चुकीकडे दुर्लक्ष करण्यात येत होते पण सोनाली यांच्याकडून होणाऱ्या अगदी लहानसहान चुकांवर त्यांना पुरुषी मानसिकतेचे टोमणे ऐकावे लागत पण त्यामुळे डगमगून गेल्या नाहीत. त्यांनी जिद्दीने संघर्ष चालू ठेवला.
अखेरीस ऑगस्ट २६, २००१ ह्या दिवशी त्यांनी तो अडचणींचा ‘सागर’ पार करत आपला कोर्स पूर्ण केला आणि इतिहास घडवला. ज्यावेळी सोनाली बॅनर्जी मोबील शिपिंग कंपनीच्या जहाजावरील मशीन विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारत होत्या त्यावेळी समस्त स्त्री जातीचा पुनश्च एक मोठा गौरव सोहळा पार पडला होता.
त्यांनी एक नवीन इतिहास घडवला होता आणि स्त्री जातीसाठी एका नव्या क्षेत्राचे आभाळ मोकळे करून दिले होते. आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेक स्त्रिया आपल्या पारंपरिक पिंजऱ्यातून बाहेर येत ह्या नव्या आभाळात मुक्त विहार करत आहेत. हेच सोनाली यांच्या संघर्षाचे फलित म्हणावे लागेल.
आज सैन्य दलात वेगवेगळ्या पदांवर स्त्रियांची होणारी नेमणूक ही कौतुकास्पद आहे. नौदलात दिवसेंदिवस स्त्रियांचा वाढता प्रभाव हा फारच उत्साहवर्धक असून भारतीय द्वीपकल्पात महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय लिहला जात आहे. महिलांच्या या संघर्षाला साथ देणे हे पुरुषाचे कर्तव्य आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.