आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
एका बोगद्यात अडकलेल्या एका ब्रिटिश सेनेच्या तुकडीचा कर्नल. काळ्या जादूचा वापर करून त्याची सेना अर्धमेले झॉंबी बनते आणि १५० वर्षानंतर बोगदा उघडतो. तिथून पुढे CIPD च्या सैनिकांत आणि त्यांच्यात चकमकी सुरू होतात. बोटावर मोजता येतील एवढेच सैनिक या असामान्य परिस्थितीत एका इमारतीत अडकतात आणि नेमकं चाललंय तरी काय हे शोधायचा प्रयत्न करत असतात. मेलेला माणुस ही झॉंबी बनतो आणि त्या ब्रिटिश सैन्यात सामील होतो, असं चित्र असताना गोष्टी अजूनच अवघड होत जातात. अशी साधारणतः या चार एपिसोडच्या सिरीजची रूपरेषा आहे.
आता बघुयात यात काय जमलंय आणि काय बिघडलंय.
पेट्रिक ग्रहाम हा ब्रिटिश लेखक या सिरिजचा क्रिएटर आहे. सोबतच त्याने दिग्दर्शनात आणि लिखाणातही काम केलंय. याआधी तो राधिका आपटे आणि मानव कौल यांची मुख्य भूमिका असलेल्या “घुल” या सिरीजचाही क्रिएटर होता. ती सिरीजही हॉरर-थ्रिलर प्रकारातच मोडते.
पण घुलचा बराचसा राजकीय परिस्थितीला रुपकातून मांडून भूताटकीच्या रूपानं परिणाम सांगणारा वेगळ्या प्रकारचा यशस्वी प्रयोग होता. पेट्रिकच्या मते हॉरर सिनेमात अशी काहीतरी मजबूत कहाणीसुद्धा पाहिजे म्हणजे निव्वळ भूत भूत न करता प्रेक्षकांना त्यातून एक गोष्ट सांगता येईल.
“बेताल” मध्ये ती गोष्ट इंग्रज अधिकारी, आदिवासींच्या अंधश्रद्धा आणि सैनिकांमधला ड्रामा अशी होती. मात्र यावेळेस या गोष्टीची चौकट आणि पात्र चांगले असले तरी बारकाव्यातून निर्माण होणारी उत्कंठा किंवा फक्त विस्तारित स्वरूपातून एक सिन बघून “व्वा” म्हणावसं वाटेल असे संवाद, असं फारसं आपल्या वाट्याला येत नाही. त्यामुळं मागच्या चांगल्या कामांमुळे खूप अपेक्षा ठेऊन बघत असू तर आपली निराशा होते.
हॉरर प्रकारचा सिनेमा महत्वाचा असतो कारण त्यात मानवी भावनांचं टोक दाखवता येतं. त्यासाठी माणसाच्या शरीराला दुसऱ्या माणसाच्या आत्म्याने झपाटलंय आणि ते सोडविण्यासाठी बाकीचे प्रयत्न करतायत अशी चौकट असते. इथं ही चौकट न पाळता मध्येच देशभक्ती, मध्येच लहान मुलीला वाचविण्यासाठीची धडपड, मध्येच भ्रष्ट अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश आणि शेवटपर्यंत काय चाललंय हे नीट कळत नसलेला नायक.
यामुळं मूळ उद्देश बाजूला राहतो, आपल्याला शेवटी काय मिळवायचं आहे हे कधीच स्पष्ट होत नाही. ज्यामुळं नेमकं कशासाठी यात अडकून रहावं हे कळत नाही. अशावेळी आपण पात्रांमध्ये इंटरेस्ट घेतो, पण यातली पात्रंही तितकीशी सेट होत नाही. त्यांचा भूतकाळही स्पष्ट नसतो आणि वर्तमानात त्यांच्या भूमिका ही आपण त्यांच्यासोबत टिकून राहाव्यात अशा नसतात.
याउलट फार कमी सीन्स मिळालेल्या आदिवासींच्या आयुष्यात आपला इंटरेस्ट वाढतो पण निर्माते शेवटपर्यंत त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. जितेंद्र जोशीचं पात्रं यात भुतांपेक्षाही जास्त वाईट दाखवलं आहे. एका ठेकेदाराची अमानुषता, पैशाचा लोभ जितेंद्रने उत्तम साकारला आहे.
फार न बोलता, छोट्या हरकतींमधूनच त्याने त्या पात्राचा राग येईल असं त्याला घडवलं आहे. शेवटपर्यंत हा मराठी नट यात एवढं छान काम करताना बघून भारी वाटतं, आजवर जणू मराठी निर्मात्यांना जितू ओळखताच आला नाही असं वाटलं.
मुख्य भूमिकेत विनीत कुमार सिंग, अहाना कुमरा आणि सुचित्रा पिल्लई आहेत. विनीतला आपण या आधी अनुराग कश्यपच्या मुक्काबाझमध्ये बघितलं होतं. त्यावर्षीचा तो भारतीय सिनेमातला सर्वोत्तम अभिनय मानला जातो. म्हणून एवढा चांगला अभिनेता असताना ती भूमिका छान होणं सहाजिक होतं, विनीतने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं.
अहाना आणि सुचित्रा CIPD च्या मोठ्या हुद्द्यावर शोभून दिसतात, तिथे त्यांचं काम छान झालंय. पण बेतालच्या प्रभावात आल्यावर त्यांचा अभिनय टिपिकल होतो, जो त्यांना साजेसा दिसत नाही, आणि अशा सिरीजमध्ये खोटा वाटतो. कदाचित पारंपरिक बॉलिवूडमधला तो प्रभाव असावा.
अभिनयापेक्षा दिग्दर्शन जास्त निराश करतं. नेटफ्लिक्सच्या प्रेक्षकांना एव्हाना स्पेशल फोर्समधल्या लोकांच्या चालीरीती पाठ झाल्यात. इथे मात्र त्यांची कार्यपद्धती खोटी वाटत राहते. कॅमेरे, चालण्याची पद्धत, आदेश देतानाचे सिन, सगळं खोटं वाटतं. जितेंद्र जोशी सोबत तेवढंच अनपेक्षित छान काम झालंय ते आदिवासी महिलेची भूमिका करणाऱ्या मंजिरी पुपाला हिचं. आदिवासी लोकांच्या वागण्यात शहरी औपचारिकता नसतील, बोलण्यात तारतम्य नसेल याची जाणीव ठेऊन तिने खूप सहज हे पात्र अंगीकारलय.
भारतात या प्रकारचा “गो गोआ गॉन” नंतरचा हा पहिलाच झोंबी, हॉरर, थ्रिलर प्रकारचा प्रोजेक्ट होता. अशा प्रकारात तंत्रज्ञान हे कथा आणि कलाकारांपेक्षाही महत्वाचं असतं. जर तेवढ बजेट नसेल तर भूत न दाखवताच ते येईल याची भीती, आतुरता आणि परिणाम यावर जास्त लक्ष दिलं जातं. उदा. रागिणी एम एम एस.
इथं मात्र पहिल्या एपिसोड पासून भूत दाखवलेत. तुंबाड हा भारताचा एकमेव ओरिजिनल चांगला हॉररपट. या सिनेमाने तंत्रज्ञानाचा वापर करून एक आदर्श समोर ठेवला असताना, “बेताल” ला त्याचा विसर पडला की काय असं वाटतं. कारण यात हलकं प्रॉसथेटिक आणि डोळे चमकवायला लाल लेजर लाईट वापरल्याचा फील येतो, यातून भीती वाटण्यापेक्षा फायटिंग कधी होईल याची उथळ आतुरता निर्माण होते.
गोष्टी अजूनच सामान्य करायला प्रभावहीन म्युजिकही आहेच. सिंगल कॅमेरा शूट करायचा निर्णय चांगला होता, त्यातून जास्त वैयक्तिक वाटेल अशी दृष्टी मिळते. पण त्या प्रयोगाला बाकी विभागाची साथ मिळत नाही.
प्रोड्युसर शाहरुख खान असल्याने काही गोष्टींचा संबंध त्याच्या दृष्टीकोनाशीही लावता येतो. प्रेक्षकांच्या बदलत्या अपेक्षांचं ओझं स्वतःलाच रिपीट करण्याच्या हिरोगीरीच्या सवयीवर पडल्यामुळे त्याला सध्या सूर गवसत नाहीए.
ही सिरीज सुद्धा तशीच प्रेक्षकांना गृहीत धरून बनवल्यासारखी झाली आहे. पण जसं आता शाहरुखला रिप्लेस करायला बरेच नवे चेहरे आहेत, तसेच अधिक चांगले पर्याय नेटफ्लिक्सवरही आहेतच. म्हणून ही सिरीज नेहमीच पर्याय म्हणून असेल. आवर्जून बघाच असं संगण्याइतपत भारी काहीच यात नाहीए. पण भारताततल्या कथा या जॉनरमध्ये फारश्या आतापर्यंत आल्या नव्हत्या. त्यामुळं जर तुम्ही हॉरर फॅन असाल तर ही सिरीज तुम्ही चुकवू नये, फॅन नसाल तर फार अपेक्षा ठेऊन बघू नका.
नक्की बघावेत असे भारतीय हॉरर सिनेमे : तुंबाड, परी, भूत, घुल.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.