आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
चाकाचा शोध ते रस्त्यावर धुरळा उडवीत जाणाऱ्या मोटारींचा शोध, असा दळणवळण क्षेत्रातील एक टप्पा आपण अगदी वेगाने पार केला. भारतात हिंदुस्तान मोटर्सने पहिल्यांदा भारतीय बनावटीच्या गाड्या बाजारात आणल्या. मॉर्रीस ऑक्सफर्ड या कंपनीकडून हिंदुस्तान मोटर्सने गाडी बनवण्याचे तंत्रज्ञान आयात केले.
१९५८ साली हिंदुस्तान मोटर्सने अँबेसेडर कार पहिल्यांदा भारतीय बाजारपेठेत आणली. त्याकाळी अगदी राजकीय नेत्यांपासून ते सामान्य नागरिकांमध्ये देखील या गाडीबद्दल विशेष आकर्षण होते. अगदी रुबाबदार, ऐट मिरवणारी आणि प्रतिष्ठा असणारी कार म्हणजे अँबेसेडर! अशीच या कारची ओळख होती.
अगदी देशाचे पंतप्रधान देखील त्याकाळी हीच कार वापरत असत. बहुतेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या ताफ्यातही हीच कार असे. त्यामुळे या गाडीला प्रशासकीय गाडी म्हणूनही ओळख मिळाली. विशेष म्हणजे प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या पांढऱ्या अँबेसेडरवर जेंव्हा लालबत्तीचा दिवा विराजमान झाला तेंव्हा तर या गाडीची शान आणखीनच वाढली. शिवाय, सरकारी आणि शासकीय विभगाचे तर या गाडीशी असलेले नाते अधिकच गहन होते.
पंतप्रधान असोत की राजकारणी, अगदी सनदी अधिकारी या प्रत्येकाकडे अँबेसेडरशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळे अँबेसेडर ही कित्येक दशके भारताची शासकीय कार राहिली आहे. हाच धागा पकडून याच्या जाहिरातीत ‘खऱ्या नेतृत्वाला गती देणारे प्रेरणास्थान म्हणजे अँबेसेडर कार’ असा उल्लेख केला जात असे.
तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांकडेही हीच कार असते. मात्र प्रत्येक सैन्य प्रमुखाची कार ओळखता यावी यासाठी त्यांचे वेगवेगळे रंग निवडण्यात आले आहेत. भूदल प्रमुखांच्या गाडीचा रंग काळा असतो, हवाई दलाच्या प्रमुखांच्या गाडीचा रंग निळा तर नौदल प्रमुखांच्या गाडीचा रंग पांढरा असतो.
मेक इन इंडिया या घोषणेचा जन्मही झाला नव्हता, तेव्हा खऱ्या अर्थाने या कारने मेक इन इंडिया ही बिरुदावली सार्थ करून दाखवली. अँबेसेडर कार म्हणजे भारताची खरीखुरी दूतच होती. ज्यामुळे या गाडीला जनमानसातही एक वेगळी ओळख मिळाली.
वाहनप्रेमींचे पहिले प्रेम म्हणजे अँबेसेडर कार असे म्हटल्यास अतिशयोक्ती अजिबात ठरणार नाही. कारण, या गाडीची रचना अत्यंत साधी असे.
भारतातील ओबडधोबड रस्त्यावरून धावण्यास तिची बनावट अगदी मजबूत होती. त्याकाळी या गाडीवरून अगदी लहान मुलंही ही गाडी दुरुस्त करू शकतील, असे हलकेफुलके विनोदही केले जात. अर्थात, गाडीच्या साध्या रचनेमुळे खेड्यापाड्यातील टपरीवजा मोटार रिपेअरिंग दुकानातही या गाडीची दुरुस्ती करता येत असे. त्यामुळे अगदी खेड्यापाड्यातील कच्च्या रस्त्यावरही एकेकाळी या गाडीने राज्य केले आहे. म्हणूनच या गाडीला ‘किंग ऑफ इंडियन रोड्स’ असेही म्हटले जात असे.
शिवाय मागच्या सीट जास्त रुंद असल्याने सहकुटुंब प्रवास करण्यास ही कार अगदी योग्य होती. अँबेसेडर मागून कित्येक आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण कार नंतर बाजारात आल्याही पण, अँबेसेडरच्या पहिल्या प्रेमाची जागा मात्र कुणीही घेऊ शकले नाही. त्याकाळी ही कार म्हणजे भारतीयांसाठी एक स्टेटस सिम्बॉल होती.
मॉरीस ऑक्सफर्ड सिरीज ३ पासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेली ही कार भारतातील पहिली डीझेल इंजिन कार होती. ब्रिटन कंपनीपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली असली तरी ही गाडी म्हणजे मॉरीसची थेट कॉपी असा प्रकार अजिबात नव्हता. त्या गाडीला भारतीय लुक देण्यात आला होता.
एकेकाळी वर्षातून ५० हजार अँबेसेडर कारची विक्री व्हायची. कधी कधी तर लोक वेटिंग लिस्ट लावून थांबत असत. वेटिंग लिस्टमध्ये नाव यायला तब्बल दोन-दोन वर्षेही लागत असत. इतकी लोकप्रियता त्यानंतर आलेल्या कुठल्याही एकाच कारच्या ब्रँडला मिळाली नसेल.
भारतीय रस्त्यांची राणी असली तरी काळाच्या ओघात गाडीच्या तंत्रज्ञानात बदल होत गेले. अँबेसेडरच्या बाह्य रुपात मात्र काहीच बदल होत नसे, त्यामुळे ग्राहकांना त्याच्यातील बदल चटकन जाणवत नसत. १९८० च्या दशकात मारुती सुझुकी सारख्या कंपन्यांनी भारतात प्रवेश केला. या गाड्यांनी अँबेसेडरला चांगलीच टक्कर निर्माण केली. नव्या आकाराच्या, अधिक वेगवान, गाड्यांची चलती सुरु झाली तशी अँबेसेडर मागे पडत गेली.
कालांतराने ही टॅक्सीवाल्यांची गाडी बनली. शासकीय दरबारी असणाऱ्या गाड्या आणि टॅक्सीवाल्यांकडे असणाऱ्या गाड्या सोडल्यास रोडवरील या गाडीचा वावर हळूहळू कमी झाला. आपल्याकडे उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा तर जुनीच आहे. तसेच काहीसे अँबेसेडरच्या बाबतीतही घडले.
या गाडीने बदलत्या काळासोबत स्वतःमध्ये फारसे बदल केले नाहीत. त्यामुळे गाडीची मागणी कमी झाली. शिवाय, स्पर्धक वाढल्याने शेवटी या गाडीची निर्मिती करणेही तोट्यात येऊ लागले. त्यामुळे २०१४ पासून या गाडीचे उत्पादन बंद करण्यात आले. प्युजो या फ्रेंच कंपनीकडे या ब्रँडचे हस्तांतारण करण्यात आले आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात भारताची खरी दूत असणारी ही गाडी जेंव्हा परकीय कंपनीला हस्तांतरित करण्यात आली तेंव्हा अनेकांना वाईट तर वाटलेच. कारण, हीच गाडी मिळवण्याचे स्वप्न घेऊन भारतातील कित्येक पिढ्यांनी आटापिटा केला होता आणि शेवटी आपले स्वप्न साकार केले होते. भारतीय जनमानसांच्या आठवणीत या गाडीला अनन्य साधारण स्थान असेल.
या गाडीसोबत जोडलेल्या आठवणी न विसरता येण्यासारख्या आहेत. प्युजो कंपनी लवकरच या ब्रँडचे आधुनिक रूप लॉंच करेल. पुन्हा एकदा नव्या रुपात अँबेसेडर आपल्या समोर येईलही. पण, लोकांच्या मनात अँबेसेडरचे स्थान कायम राहील. कित्येक नव्या गाड्या आल्या गेल्या तरी, ‘किंग ऑफ इंडियन रोड्स’ ही तिची बिरुदावली मात्र इतर कोणतीही गाडी पटकावू शकत नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.