आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या मुंबईत अडकलेल्या हजारो मजुरांना त्यांच्या मूळगावी पोहचवण्याचे काम करतो आहे. कोरोनाच्या भीतीमुळे हा मजूर वर्ग आपआपल्या गावी जाण्यासाठी मिळेल त्या मार्गाचा वापर करत होता. कित्येक मजूर तर पायीच आपआपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत.
मजुरांचे होणारे हाल लक्षात घेऊन सोनू सूद यांनी शेकडो बसेसची व्यवस्था या मजुरांना त्यांच्या मूळगावी पोहचवण्यासाठी केली असून, रस्त्यात त्यांच्या खाण्यापिण्याचीसुद्धा व्यवस्था केली आहे, यामुळे सर्वत्र अभिनेता सोनू सुदचे कौतुक होत आहे.
अशी मिळाली मजुरांना मदत करण्याची प्रेरणा
सोनू सूद म्हणतात की, सुरुवातीला त्यांना देखील आपल्याला मजुरांना त्यांच्या मूळगावी पोहचवण्याची व्यवस्था करावी लागेल याची कल्पना नव्हती. पण मजुरांना पायी त्यांच्या गावी जाताना बघून वाईट वाटलं. हे तेच लोक होते ज्यांनी ही शहरं उभी केली होती. या लोकांच्या प्रयत्नामुळे आज एवढे चांगले रस्ते, आपण राहतोय त्या इमारती आहेत.
त्यांना असं असहाय्य होऊन घराकडे जाताना बघून सोनू सूद यांनी स्वतः पुढाकार घेऊन ह्या लोकांच्या मदतीसाठी कार्य करण्यास सुरुवात केली.
त्यांनी आधी काही मजुरांशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडे फक्त दोन दिवसांचा वेळ मागितला जेणेकरुन ते त्यांची घरी जाण्याची व्यवस्था करण्यासाठी सर्व सरकारी परवानग्या प्राप्त करू शकतील. त्यांनी त्या मजुरांना शांततेत त्यांच्या घरापर्यंत सोडण्यासाठी आश्वस्त केले.
अशाप्रकारे उभी केली व्यवस्था
सोनू सूद यांनी सर्वप्रथम सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि परवानगी मिळवत ३५० मजुरांना कर्नाटकातील त्यांच्या गावी रवाना केले. जेव्हा त्यांना सोनू सूद रवाना करत होते तेव्हा त्यांचा चेहऱ्यावरील हस्याने सोनू सूद यांचे मन भारावून गेले. त्यांच्या मनात एक विचार आला की हे ३५० मजूर तर त्यांच्या घरी पोहचतील पण बाकीच्या अडकलेल्या मजुरांचे काय?
मग त्यांनी त्या मजुरांची देखील मदत करण्याचा निर्धार केला. त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या मजुरांशी संपर्क प्रस्थापित केला मग तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी मजुरांच्या नावांची यादी तयार करून त्यांच्या तुकड्या केल्या आणि त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवले.
त्यांनी आतापर्यंत १२ हजारांच्या आसपास मजुरांना घरी पोहचवले असून आता अजून ४५ हजार मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत!
ते म्हणतात की, जर ईश्वराची कृपा अशीच असेल तर आम्ही शक्य तितक्या लोकांना मदत करण्यास पूर्णपणे समर्थ आहोत.
राज्यांच्या सीमा ओलांडणे तसे अवघड होते, यात अनेक तांत्रिक समस्या होत्या, ज्या प्रशासनाशी संपर्क करून सोडवायच्या होत्या, सोनू सूद यांनी मजुरांना आश्वस्त केले की ते त्याची पूर्ण काळजी घेतील, फक्त विश्वास ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या रणरणत्या उन्हात सर्व सरकारी परवानग्या मिळवत सुखरूप घरी पोहचवण्यामागे त्या मजुरांंनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास कमी आला असं ते नमूद करतात.
सोनू सूद याला अशी मिळाली मदत
सोनू सुदने जरी एकट्याने या कामाची सुरुवात केली असली तरी नंतर अनेक लोकांनी त्याचे कार्य बघून त्याला सहकार्य करायला सुरुवात केली. त्यांची मैत्रीण नीती गोयल यांनी त्यांना खूप मदत केली. त्यांनी यानाला घर भेजो अभियान असे नाव दिले.
अनेक सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून मजुरांसाठी बसेस, जेवण आणि राहण्याच्या व्यवस्थे संदर्भात चर्चा केली. सोनू सूद यांनी मजुरांना घरापर्यंत सोडण्याचे आश्वासन अधिकारी वर्गाला दिले.
अशा प्रकारे केली जेवणाची व्यवस्था
मजुरांचा प्रवास सुखद व्हावा, यासाठी सोनू सूद यांनी अन्न व पाण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी फळांचे काही बॉक्स आणि सुके अन्नपदार्थ यासोबतच पाण्याच्या बाटल्या मजुरांना दिल्या होत्या जेणेकरून ते प्रवासात उपाशी राहू नये.
इतकंच नाही जे मजूर मुंबईत होते अशा तब्बल ४५ हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था पण करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक लोकांना सोनू सूद यांनी मदत केली आहे.
प्रशासकीय अडचणींचा करावा लागला सामना
मजूरांना त्यांच्या गावी वेगवेगळ्या गाड्यांमधून रवाना केले जात होते. यासाठी रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक राज्याच्या प्रशासनाची परवानगी घेण्यासाठी सोनू सूद यांना प्रचंड अडचणी आल्या तर मजुरांना घरी पोहचवण्याबाबत ते कटिबद्ध होते. अखेरीस त्यांना मजुरांना यशस्वीरित्या घरापर्यंत सोडण्यात यश आले.
त्यांनी सर्व प्रशासकीय परवानग्या मिळवत, मजुरांची उत्तम व्यवस्था तर केलीच त्यांची वेळोवेळी चौकशी सुद्धा केली. त्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नामुळेच आज बहुतांश मजूर घरी पोहचले आहेत.
सोनू सूदला येतायत मजुरांच्या प्रतिक्रिया
अभिनेते सोनू सूद यांच्या प्रयत्नामुळे घरी पोहचलेले मजूर त्यांना प्रतिक्रिया देत असून, सोनू सूद यांचे ट्विटर, फेसबुक, इमेल आणि मेसेजेसच्या माध्यमातून आभार व्यक्त करत आहेत. एका गावात तर परतलेल्या मजुरांनी सोनू सुदचा पुतळा उभारण्याचे काम मनावर घेतले होते. जेव्हा सोनू सुदला याची माहिती मिळाली त्यांनी हा खर्च टाळून गरिबांना मदतीचे आवाहन केले आहे.
चित्रपटात नेहमी खलनायकी पात्र साकारणारा हा अभिनेता खऱ्या आयुष्यात एक महानायक बनला आहे. सोनू सुदच्या ह्या दिल जित लेनेवाल्या कार्याला आमचा सलाम!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.