आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात क्रिकेटचा इतिहास फार जुना आहे. १९३२ साली भारतात क्रिकेटचा एक अधिकृत संघ निर्माण करण्यात आला. त्यानंतर भारताच्या संघाने इंग्लंडसोबत ४ कसोटी सामने खेळले. यात भारतीय संघाने तीन वेळा इंग्लंडचा आणि इंग्लंडच्या संघाने एकवेळा भारताचा दौरा केला. भारताने ऑस्ट्रेलियासोबत देखील सामने खेळले. परंतु भारताला सलग १९ वर्ष एकही विजय संपादन करता आला नाही.
भारताचा हा दुष्काळ स्वातंत्र्यानंतर संपुष्टात आला, भारताने अद्वितीय कामगिरी करून सर्वात प्रथम १९५१-५२ साली इंग्लंडला मालिकेत पराभूत केले. हा भारताच्या बाजूने पहिला विजय होता. हा विजय भारताने कसा मिळवला, हे जाणून घेणे फार रंजक आहे.
इंग्लंडचा संघ ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात आला. निगेल डेव्हिड हार्वर्ड हा इंग्लंडचा कर्णधार होता. भारतीय संघाचे कर्णधारपद विजय हजारेंना बहाल करण्यात आले, यासाठी विजय मर्चंट आणि लाला अमरनाथ या दिग्गजांना डावलण्यात आले.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. यामुळे भारतीयांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मालिकेचा पहिला सामना २ नोव्हेंबर १९५१ रोजी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर खेळला जाणार होता.
इंग्लंडने टॉस जिंकला आणि पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. भारतीय लेग स्पिनर शिंदे यांनी इंग्लंडच्या फलंदाजांची गाळण उडवली. इंग्लंडचा संपुर्ण संघ २०३ धावांवर गारद झाला. शिंदे यांनी ९१ धावांचा मोबदल्यात ६ विकेट्स घेतल्या. ही शिंदे यांच्या एकूण कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती.
आता भारतीय फलंदाजांची वेळ होती. विजय मर्चंट आणि विजय हजारे दोघांनी शतक पूर्ण केले, यामुळे भारतीय संघ ६ विकेटच्या मोबदल्यात ४१८ धावा करण्यात यशस्वी झाला. आता सामना संपूर्णपणे भारताच्या पारड्यात होता. भारतीय संघाने मोठी बढत मिळवली होती.
परंतु जेव्हा इंग्लंडचा संघ पुन्हा फलंदाजीला आला त्यावेळी त्या संघासमोर भारतीय गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. इंग्लंडने ६ विकेटच्या मोबदल्यात ३६८ धावा केल्या. मालिकेतील पहिला सामना भारत जिंकणार अशी आशा असणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर इंग्लंडची खेळी बघून उदासी पसरली. जे घडायला नको तेच घडलं आणि भारत मालिकेतील पहिला सामना हरला.
पुढचा सामना मुंबईत होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ९ विकेट्सच्या मोबदल्यात ४८५ धावांची खेळी केली. याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडच्या संघाने ४५६ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज अपयशी ठरले. फक्त ४४ धावा झाल्या होत्या आणि ७ खेळाडू तंबूत परतले होते. परंतु मंकड आणि गोपीनाथ यांनी चांगली खेळी करून २०८ धावा उभ्या करून, भारताची अब्रू वाचवली. हा सामना अनिर्णित राहिला.
पराभव झाला तरी भारतीय संघाच्या आत्मविश्वासावर त्याचा इतका परिणाम झाला नाही. तिसरा कसोटी सामना कोलकाताच्या प्रसिद्ध ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवण्यात आला.
इंग्लंडने पहिल्या फेरीत ३४२ धावा केल्या. त्याचा प्रतिकार करत भारताने ३४४ धावांची खेळी केली. दुसऱ्या फेरीत इंग्लंडने ५ बाद २५१ धावांची खेळी केली. कलकत्त्याच्या खराब धावपट्टीमुळे हा सामना देखील अनिर्णित राहिला.
आतापर्यंत भारताची इंग्लंडविरोधातील कामगिरी चांगली होती, मालिकेचा चौथा सामना केवळ तीन दिवस चालला कारण बिहारमधील ज्या मैदानात तो खेळला गेला त्याच्या धावपट्टीचा फायदा उचलून गोलंदाजांनी मोठी कामगिरी बजावली होती. दुर्दैवाने भारताचा या सामन्यात पराभव झाला आणि भारताने मालिका गमावली.
आतापर्यंत इंग्लंडच्या संघाला भारतीय संघाच्या विरोधात २-० ने आघाडी मिळाली होती. मालिकेत पूर्ण विजयासाठी इंग्लंडचा संघ आतुर होता. मालिकेचा पाचवा सामना चेन्नईत खेळण्यात आला. सामन्याच्या वेळी इंग्लंडचा कप्तान हॉवर्डचे आजारी पडणे आणि डोनाल्ड कारला कर्णधारपद मिळणे भारताच्या पथ्यावर पडले.
डोनाल्ड कारने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडुन मंकड यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. त्यांनी इंग्लंडच्या फलंदाजांच्या एका फळीला गारद केले. २६६ धावांवर इंग्लंडचा डाव आटोपला.
मंकड यांनी जबरदस्त कामगिरी करत ५५ धावांचा मोबदल्यात ८ बळी घेतले होते. आता भारतीय फलंदाजांची वेळ होती. भारतीय फलंदाजानी अप्रतिम कामगिरी करत ९ विकेट्सच्या मोबदल्यात ४५७ धावा केल्या. पंकज राय आणि पॉली उमरीगर यांनी अत्यंत शानदार प्रदर्शन करत शतक केले होते.
खरंतर मागील सामन्यात केलेल्या सुमार कामगिरीमुळे उमरीगर यांना तंबूत बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण ऐनवेळी हेमू अधिकारी हे जखमी झाले, त्यामुळे त्यांच्या जागी बदली खेळाडू उमरीगर आले होते. त्यांनी अप्रतिम कामगिरी करून आपली निवड सार्थकी लावली.
दुसऱ्या डावात मंकड यांनी पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी करत विरोधी फलंदाजांची भंबेरी उडवली. गुलाम अहमद यांनी देखील त्यांना मोलाची साथ दिली. दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी ४-४ विकेट घेतल्या. इंग्लंडचा संघ १८३ धावांवर गारद झाला.
पूर्ण स्टेडियममध्ये भारताचा जय जयकार सुरू झाला होता. भारतीय संघाने १९ वर्षात पहिला विजय मिळवला होता. ८ धावांनी इंग्लंडचा पराभव झाला. भारताने ऐतिहासिक विजय मिळवला.
हा विजय भारताच्या दृष्टीने महत्वाचा होता कारण इंग्लंडचे भारतावर दीर्घ काळ अधिपत्य होते, यामुळे हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न बनला होता. या विजयाने भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला होता. यानंतर भारताने कधीच मागे वळून बघितले नाही.
१० फेब्रुवारी १९५२ रोजी भारतीय क्रिकेट संघाने आपला पहिला विजय मिळवून इतिहास घडवला. आज भारतीय संघ जगात क्रिकेटमध्ये जे यश संपादन करतोय त्याची सुरुवात त्या विजयापासून झाली त्याची ही कथा प्रेरणादायी आहे
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.