आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताच्या प्राचीन इतिहासाचा एक महत्वपूर्ण भाग आहे कुशाण राजवंश. अत्यंत पराक्रमी, बलवान, सामर्थ्यवान, धर्मपालक अशा राजांची एक मोठी श्रेणी या राजवंशात होती. कनिष्क ह्या राजवंशाचा सर्वात प्रसिद्ध शासक होता. कनिष्कच्या काळात कुशाण साम्राज्याचा सीमा पश्चिमी चीनपर्यंत जाऊन टेकल्या होत्या.
कुजूल कडफिससने कुशाण राजवंशाची स्थापना केली. इसवी सन १५ ते ६५ पर्यंत तो राज्य करत होता. कुशाण ही मध्य आशियातील ‘युची’ नावाच्या जमातीची एक शाखा होती.
मौर्य काळानंतर भारतात आलेल्या यवन, शक आणि पहलव यांच्याप्रमाणे कुशाण एक परदेशी जात होती. हा वंश पुढे कडफिससच्या काळात राजवंश बनला आणि त्यात कनिष्क कुशाणचा जन्म झाला.
कनिष्क हा भारतातील सर्वात शक्तिशाली शासक म्हणून नावारूपाला आला. कनिष्कच्या काळात कुशाण साम्राज्याच्या सीमा विस्तारत गेल्या. इसवी सन ७८ मध्ये कनिष्क सत्तेत आला असे मानले जाते. कनिष्कच्या कालगणनेसाठी शक संवतची सुरुवात करण्यात आली. परंतु इतिहासकारांमध्ये यावर विवाद आहेत.
शक आणि पाहलाव लोकांचा पराभव करून कुशाण लोकांनी हिंदुस्थानात भले मोठे साम्राज्य निर्माण केले. मध्य आशियापासून उत्तर प्रदेशाच्या वाराणसी, कौशमबी आणि श्रावस्ती पर्यंत अशा मोठ्या उत्तर भारतीय प्रदेशात कुशाण साम्राज्य पसरले होते.
कनिष्कच्या शासन काळात कुशाण साम्राज्याचा व्यापार आणि आर्थिक व्यवहार एका वेगळ्या उंचीवर होता. पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा रेशीम मार्ग देखील कुशाण साम्राज्यातून जात होता.
भारताच्या उत्तरेला, हिंदुकुश पर्वताच्याही उत्तरेला सध्याच्या ताजिकिस्तानापर्यंत कुशाण साम्राज्य पसरले होते. कुशाण सेनेने पूर्वेकडे देखील सुदूर पामिरच्या भागात आपलं साम्राज्य पोहचवलं, याच भागातून रेशीम मार्ग जायचा, जो पूर्णतः कुशाण साम्राज्याचा भाग होता.
कनिष्कच्या काळात चीन व इतर देशांशी असलेल्या व्यापारात मोठी वृद्धी झाली. मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक देवाणघेवाण झाली. बौद्ध धर्माचा आशिया खंडात प्रसार देखील कनिष्काच्या काळात झाला. त्याने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला. त्याच्या दरबारात राजकवि आणि विधिज्ञ हे बौद्ध धर्मीय होते.
तत्कालीन काश्मिरात तो बौद्धांसाठी निरनिराळ्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करत होता. त्रिपिटक या प्राचीन बौद्ध धर्म ग्रंथावर टीकात्मक लेखन करण्याचे कार्य देखील कनिष्कने केले, त्याला ‘महाविभाषा’ या पुस्तक रुपात देखील त्याने प्रकाशित केले. हे पुस्तक बौध्द धर्माचा विश्वकोश म्हणून गणले जाते.
पाकिस्तानच्या पेशावरला आधी पुरुषपूर म्हणून ओळखले जात होते. कनिष्कने त्या ठिकाणच्या बौद्ध अवशेषांचे संरक्षण करून त्याठिकाणी स्तूप रचना केली. हे बौद्ध स्तूप कालांतराने नष्ट झाले. पण चिनी यात्रेकरू फाहियानने आपल्या ग्रंथात याचा उल्लेख केला आहे.
कनिष्कने आपल्या नाण्यावर असंख्य युनानी, इराणी आणि हिंदू देवी देवतांचे चित्र कोरले होते. यात हर्क्युलसपासून सूर्य, शिव, अग्नी यांची चित्रे आहेत. कनिष्कच्या काळात मुलतानमध्ये सूर्य मंदिर निर्माण करण्यात आले, त्याकाळी मुलतानचे नाव काशतपूर होते. कनिष्कने भारतात शिवपुत्र कार्तिकेय यांच्या पूजनाला देखील पहिल्यांदा सुरूवात केली होती. त्याच्या नाण्यांवर कार्तिकेयाच्या नावांचा उल्लेख केलेला आहे.
कनिष्कच्या ताब्यात अर्ध्याहून अधिक आशिया खंड होता. मध्य पूर्व आशियापासून ते दक्षिणेत कोकणापर्यंत त्याच्या राज्याच्या सीमा पसरल्या होत्या. कनिष्क असा पहिला शासक होता ज्याने पश्चिम चीनमध्ये आपले साम्राज्य स्थापन केले होते.
अनेकांच्या मते चीनच्या राजकुमारिवर कनिष्कचे प्रेम होते पण तिथल्या राजाने विवाहाला नकार दिल्याने त्याने चीनच्या साम्राज्यावर आक्र*मण केले, परंतु यात कनिष्क पराभूत झाला. त्या राजकुमारीच्या प्रेमात कनिष्क आकंठ बुडालेला होता, त्यामुळे त्याने पुन्हा एकदा आक्रमण केले आणि चीनच्या बलाढ्य सैन्याला पराभूत करून त्या प्रदेशात आपले मोठे वर्चस्व प्रस्थापित केले.
कनिष्क हा भारताच्या इतिहासातील पहिला राजा होता, ज्याचे साम्राज्य आशियाच्या आर्ध्या भागावर पसरले होते. ज्याने कुशाण कुळाला एक वेगळा गौरव तर मिळवून दिला होताच पण भारतीय सभ्यता धर्म, परंपरा, साहित्य, कला यांना राजकीय संरक्षण प्रदान करून, कुशल शासकाचा एक वास्तूपाठ घालून दिला होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.