आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
क्रिकेट, क्रिकेट हा खेळ ज्याला माहिती नाही असा माणूस महाराष्ट्रातच काय भारतातसुद्धा शोधूनही सापडणार नाही. भलेही जरी भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी असला तरी त्या तुलनेत क्रिकेटची लोकप्रियता जास्त आहे. अगदी आबालवृद्धांपासून सगळ्यांना हा खेळ पाहायला, खेळायला आवडतो.
१८ व्या शतकापासून खेळल्या जात असलेल्या या खेळात अनेक गुणवान हुशार आणि आपल्या कामगिरीच्या जोरावर देशाचं तसेच स्वतःच नाव उंचावणारे खेळाडू होऊन गेले. या खेळाडूंपैकी आपल्याला काही नावे अगदी तोंडपाठ आहेत तर काही काळाच्या ओघात खूपच मागे पडली.
सुनील गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, जहीर खान यांच्यासारखे मंडळी तर आपल्याला माहितीच आहेत पण तुम्ही मनोज प्रभाकर बद्दल माहिती आहे का ?
गझियाबादच्या गल्ली क्रिकेटपासून सुरुवात करत भारताच्या संघात पोहचलेल्या या खेळाडूने अल्पावधीतच आपल्या खेळाने सर्वांना आपली चमक दाखवून दिली होती.
टीम इंडियाला जशी मनोज प्रभाकरची गरज लागली त्याप्रमाणे टीमने त्याचा वापर केला. जेव्हा टीम इंडियाला एकदिवसीय सामन्यात सलामीवीराची गरज भासली तेव्हा मनोज प्रभाकरने संघासाठी सलामी दिली. जेव्हा मधल्या षटकात मध्यमगती गोलंदाजांची गरज संघाला जाणवली तेव्हा मनोज प्रभाकरने गोलंदाजी केली. मनोज संघाला हवं ते तो देत गेला आणि थोड्याच काळात त्याने भारतीय संघात अष्टपैलू म्हणून आपली जागा मिळवली.
१५ एप्रिल १९६३ रोजी उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे जन्मलेल्या मनोज प्रभाकर यानी शालेय जीवनापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मात्र शाळेत असताना तो प्रामुख्याने फलंदाजी करायचा.शाळेतून आल्यानंतर तो घराच्या अंगणात किंवा रस्त्यावर क्रिकेट खेळायचा. काळानुसार त्याचे क्रिकेट वाढू लागले आणि त्याने व्यावसायिक क्रिकेट खेळायला सुरवात केली.
यानंतर त्याने स्टेडियममध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तिथेच पुढे मनोजने स्टेडियमच्या प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून गोलंदाजीस सुरुवात केली. मनोज मध्यम वेगाने गोलंदाजी करायचा, परंतु त्याचे चेंडू अगदी योग्यरीत्या वळायचे ज्यामुळे तो फलंदाजांना क्रीजवर उभे राहणे कठीण करायचा.
शालेय शिक्षण संपल्यावर मनोजने क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. गाझियाबादहून दिल्लीच्या जवळ असण्याचा फायदा मनोजला मिळाला. त्याने उत्तर प्रदेशच्या रणजी संघात न जाता दिल्लीच्या रणजी संघात जाण्याचा निर्णय घेतला. कदाचित हा निर्णय यामुळे घेण्यात आला असावा की दिल्ली गाझियाबादपेक्षा जवळ आहे, तर लखनऊ खूप दूर आहे.
याचवेळी मनोज प्रभाकर दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर दिवसभर प्रशिक्षण घ्यायचा. दिल्लीच्या रणजी संघासाठी जेव्हा चाचण्या सुरू झाल्या तेव्हा मनोज प्रभाकरला त्यात स्थान मिळाले. मनोजच्या प्रशिक्षकांनी दिलेला सल्ला मनोजला इथे कामाला आला. तो केवळ फलंदाजीपुरता मर्यादीत नव्हता तर त्याने गोलंदाजीतही आपले कौशल्य दाखविले.
मनोजच्या प्रशिक्षकांना असा विश्वास होता की ज्या सामन्यात मनोज फलंदाज म्हणून यशस्वी होणार नाही, त्या सामन्यात गोलंदाजीच्या रूपात तो फलंदाजांना त्रास देऊन संघासाठी योगदान देईल.
त्यावेळी स्वत: मनोजलाही वाटले नसेल की तो एक दिवस टीम इंडियासाठी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास येणार आहे.
१९८३ साली भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकला होता. हा असा काळ होता जेव्हा टीम इंडियामधील जुने खेळाडू निवृत्त झाल्याने नाराज होते, आणि तिथे नवीन खेळाडूंचा प्रवेश होत होता.
८ एप्रिल १९८४ रोजी युएईच्या शारजाह मैदानावर या मुलाला भारतीय संघाकडून आपल्या कारकीर्दीचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मिळाला.
शारजाह चषक सामन्यात श्रीलंका संघाविरूद्ध भारतीय संघाच्या वतीने मनोज प्रभाकरने आपले पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात मनोजने स्वतःच्या आश्चर्यकारक कामगिरीने सर्वांनाच चकित केले.
सुनील गावस्करांच्या नेतृत्वाखाली खेळताना मनोजवर बराच मानसिक दबाव होता. या सामन्यात आपण चांगली कामगिरी नाही दाखवली तर आपल्याला पुन्हा संघात संधी मिळेल की नाही ही गोष्ट त्याच्या डोक्यात होती
या सामन्यात प्रदर्शन करताना श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला. श्रीलंकेची फलंदाजी भारतीय गोलंदाजांसमोर पूर्णपणे उध्वस्त झाली. श्रीलंकेचा संपूर्ण संघ ४१ षटकांत केवळ ९६ धावांवर बाद झाला.
आपला पहिला सामना खेळत असलेल्या मनोज प्रभाकरने १० षटकांत केवळ १६ धावा देत ३ मेडन शटके टाकली होती आणि २ बळी घेतले होते. मनोजच्या या कामगिरीच्या मदतीने भारतीय संघाने हा सामना १० गडी राखून जिंकला होता.
भारतीय संघात मनोज प्रभाकरची सुरुवात ही गोलंदाज म्हणून झाली, पण त्याची फलंदाजीही संघाच्या पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरली.
जेव्हा अंतिम षटकात त्याने अनेक वेळा सामने जिंकुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला तेव्हा त्याला फलंदाजीला वरच्या क्रमात पाठविण्यात आले. या दरम्यान त्याने अनेक सामन्यांमध्ये सलामीलादेखील फलंदाजी केली.
पदार्पण सामन्यामुळे मनोज प्रभाकर भलेही चर्चेत आला असेल, पण त्याचे एक रेकॉर्ड आजही लोक विसरणार नाही असं आहे.
मनोजने टीम इंडियाकडून १३० सामने खेळले. ज्यामध्ये त्याने १८५८ धावा केल्या. मनोजने त्याच्या वनडे कारकिर्दीत २ शतके आणि ११ अर्धशतके झळकावली आहेत. एकदिवसीय कारकीर्दीतील त्याची सर्वोत्तम धावसंख्या १०६ धावा एवढी होती.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने १३० एकदिवसीय सामन्यात एकही षटकार ठोकला नाहीये. भारतीय संघातील तो असा एकमेव फलंदाज आहे ज्याने एकदिवसीय सामन्यात कधीही फलंदाज म्हणून षटकार मारलेला नाही. मनोजने कसोटी सामन्यात मात्र ३९ सामने खेळताना ४ षटकार मारले आहेत.
मनोज प्रभाकर या खेळाडूची कारकीर्द भलेही तशी चमकदारपणे सुरू झाली होती. पण त्या कारकीर्दीचा शेवट खूप वाईट झाला.
असं म्हटलं जातं की स्वत: मनोज प्रभाकर स्वत: चं करिअर बरबाद करण्यासाठी जबाबदार होता. मनोज प्रभाकरने असं काहीतरी केलं की ज्याने सगळी खळबळ माजली. त्याने अनेक भारतीय क्रिकेटपटूंवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले, आणि केवळ आरोपच केले नाहीत तर तहलका नियतकालिकासोबत काम करत सहकारी खेळाडूंचे स्टिंग ऑपरेशन सुद्धा केले.
जेव्हा हे स्टिंग ऑपरेशन माध्यमांत आलं तेव्हा एकच खळबळ उडाली.
मनोज प्रभाकर यांच्या म्हणण्यानुसार भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सामने फिक्स केले जायचे ज्याला मनोजने जगासमोर आणण्याचं मनावर घेतलं होतं. यात त्याने कपिल देव यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोपही केला. तो इथेच थांबला नाही तर रवी शास्त्री, सुनील गावस्कर, किरण मोरे, सिद्धू यांसारख्या खेळाडूंविरूद्ध सुद्धा त्याने स्टिंग केलं आणि त्यांना कॅमेर्यावर दाखवून दिलं.
ही सगळी परिस्थिती तेव्हा खराब झाली जेव्हा हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आणि तपास सुरू झाला. मनोजने कोर्टाला अनेक टेप दिल्या पण वेस्ट इंडीज संघाविरुद्ध सामना फिक्सिंगमध्ये जेव्हा तो सुद्धा अडकला तेव्हा हे सगळं प्रकरण त्याच्यावर फिरलं. यानंतर बीसीसीआयने २००० मध्ये त्याच्यावर बंदी घातली. नंतर २००६ मध्ये ही बंदी हटविण्यात आली पण ते पुन्हा संघात दिसले नाही.
व्यावसायिक क्रिकेटमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी दिल्ली रणजी संघाच्या प्रशिक्षकाचीही भूमिका निभावली. यानंतर ते अफगाणिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकही होते. त्यांच्या कोचिंग दरम्यान अफगाणिस्तान संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट गोलंदाजी करण्यास सुरवात केली.
मनोज प्रभाकर यांना जर आपण वादाच्या बाजूने पाहिले गेले तर एक खेळाडू म्हणून तो ९० च्या दशकातील टीम इंडियाचे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.