आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं ही गोष्ट तर आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. एकेकाळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, इंग्रज मराठ्यांना दडपण्याच्या प्रयत्नात होते तर म्हैसूरच्या सुलतानालासुद्धा मराठी साम्राज्य ताब्यात घ्यायचे होते आणि या वेळी मराठ्यांची खिंड एक असा सैनिक लढवत होता, ज्याने फक्त इंग्रजांनाच धडा शिकवला नाही तर त्याने म्हैसूरच्या सुलतानालासुद्धा त्याची लायकी दाखवून दिली होती.
या सैनिकाने इंग्रजांच्या विरोधात लढाई लढली. यानंतर म्हैसूरच्या टिपू सुलतानासोबत युद्ध केलं आणि या युद्धात मुत्सद्दीपणाचा वापर करून टिपूचा मराठा साम्राज्य बळकावण्याचा विचार धुळीला मिळवला होता.
तर ही गोष्ट आहे पुण्यात पेशवाई असताना मराठा साम्राज्याचे एक धुरंदर सेनापती असलेल्या नाना फडणीस यांची. नाना फडणीस मूळचे बालाजी जनार्दन भानू म्हणून परिचित होते. त्यांची चतुराई, ताकद, आणि कारभारातील शिस्त यांच्यामुळे त्यांच्याविषयी शत्रूच्या मनात प्रचंड धास्ती निर्माण व्हायची.
नाना फडणीस यांच्या दूरदृष्टी आणि मुत्सद्दीपणामुळे पानिपतच्या युद्धात हरल्यानंतर मराठा साम्राज्याला ताकद मिळाली. असे हे नाना फडणवीस म्हणजे नेमकं काय रसायन होते ते तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून उमजत जाईल.
१२ फेब्रुवारी, १७४२ रोजी साताऱ्याच्या एका ब्राम्हण घराण्यात जन्मलेल्या नाना फडणीसांचे नाव बालाजी जनार्दन भानु असं होतं, पण लोक त्यांना प्रेमाने नाना असं म्हणायचे. नाना फडणीसांचे पूर्वज मराठा साम्राज्याचे पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांच्यासोबत श्रीवर्धन जवळच वेळास हे गाव सोडून साताऱ्यात राहत होते. नंतर त्यांना पेशवा कार्यकाळात वित्तमंत्री केलं गेलं.
मुघलांनी पेशव्यांना मारण्याचा एक कट आखला होता. तेव्हा या नानांचे आजोबा बालाजी महादजीने पेशव्यांना वाचवताना आपले प्राण दिले होते आणि त्यांच्या आजोबांच्या याच कार्याला स्मरून त्यांना पेशव्यांच्या शिफारशीवरून शाहू महाराजांनी अष्ट प्रधानांपैकी एक अशा “फडणीस” या पदवीने सन्मानित केलं होतं. तोच वारसा नानाजींकडे येत ते सुद्धा फडणीस झाले होते.
१७६१ मध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाई नंतर नाना फडणवीसांनी आपलं मंत्रीपदाच कर्तव्य दाखवत पेशवाईची मोडकळीस आलेली प्रतिष्ठा आणि शक्ती पुन्हा मिळवण्यास मदत केली होती. या वेळी मराठा साम्राज्य डबघाईला आलं होतं. राज्याची आर्थिक व्यवस्था कोलमडली होती. पैशाच्या व्यवहारावर सरकारी व्यवस्थापकांचे काहीच नियंत्रण नव्हते.
या परिस्थितीत राज्याची जबाबदारी नाना फडणीसांच्या हाती आली. पेशवाईची ही परिस्थिती सुधारण्यासाठी आणि नवीन पेशव्यांना धीर देण्यासाठी नाना फडणीस आले. त्यांनी शासनाच्या नियमांना पुन्हा दुरुस्त करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
नानांनी राज्याचे विश्वासपात्र मंत्री असणारे गोपाळराव पटवर्धन, त्र्यंबकराय पेठे आणि रामशास्त्री फडणीस यांना सोबत घेऊन परिस्थिती सुधारण्यास कष्ट घेतले आणि त्यांना यश आले. त्यांनी पेशवाईची घोडदौड पुन्हा योग्य मार्गावर आणली.
हळूहळू नाना फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पेशवाईने राज्याची तिजोरी पुन्हा मिळवली. यामुळे काही काळानंतर मराठा साम्राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली. एवढेच नव्हे तर नाना फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सैन्याने हैदराबादच्या निझामावर विजय मिळविला, ज्याने पानिपतच्या युद्धानंतर हरवलेला मराठा साम्राज्याचा मान आणि प्रतिष्ठा परत मिळाली.
मराठ्यांचे चौथे पेशवा माधवराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकटे भाऊ नारायणराव यांनी पेशव्याची गादी सांभाळण्यास सुरुवात केली. पण नारायणराव आपल्या भावाप्रमाणे समजूतदार आणि धाडसी नव्हते. अशा परिस्थितीत बालाजी बाजीरावांचा भाऊ आणि नारायणराव यांचे काका रघुनाथराव यांना राज्य ताब्यात घेण्याची संधी मिळाली. शेवटी रघुनाथरावांना सुद्धा पेशवा व्हायचं होतंच.
या काळात त्यांनी नारायणरावांच्या विरोधात षडयंत्र रचण्यास सुरुवात केली पण रघुनाथराव आणि नारायणरावांच्या मध्ये नाना फडणीस नावाची कणखर भिंत उभी होती. त्यांनी एक एक करून रघुनाथरावांचे सगळे षडयंत्र परतावून लावले.
शेवटी १७७३ मध्ये एक कट रचला गेला आणि त्यात शेवटी नारायणरावांची रघुनाथरावांनी कपटीपणाने हत्या घडवून आणली. आणि रघुनाथराव पेशवे झाले.
जेव्हा रघुनाथराव पेशवेपदावर विराजमान झाले तेव्हा नारायणरावांच्या पत्नी गंगाबाई या गरोदर होत्या आणि नाना फडणवीसांची इच्छा होती की नारायणरावांचा वारसच पेशवा व्हावा. त्यासाठी नाना फडणीसांनी एक बारभाई षडयंत्र रचले. या षडयंत्रात त्यांच्यासोबत अजून ११ मराठी सरदार होते जे रघुनाथरावांच्या विरोधात होते.
अशा प्रकारे नाना फडणीसांनी बारभाई कमिटीची स्थापना केली आणि रघुनाथरावांना पेशवेपदावरून काढून ४० दिवसांत दुसऱ्या माधवरावांना नवीन पेशवा म्हणून नियुक्त केलं. त्यावेळी माधवराव केवळ नावाला पेशवे होते, पण सगळी सत्ता नाना फडणीसांच्याच हातात होती.
नाना फडणीस दूरदृष्टी असणारे सेनानी होते. त्यांना या गोष्टींची चांगली कल्पना होती की मराठा साम्राज्याचे सर्वात मोठे शत्रू हे इंग्रज आणि फ्रांसचे व्यापारी आहेत आणि यामुळे नाना फडणीसांनी एक गुप्तहेरांचा विभाग तयार केला होता. हे गुप्तहेर या व्यापाऱ्यांच्या बारीक हालचालींवर सगळं लक्ष ठेऊन होते.
इंग्रजांना सुद्धा या गोष्टीची माहिती होती की नाना फडणवीस त्यांच्यासाठी सर्वात मोठे शत्रू आहेत. त्यांच्या उपस्थितीत इंग्रज मराठा साम्राज्याला तोडू शकत नाहीत ही गोष्ट सुद्धा त्यांना माहिती होती. इंग्रजांनी कित्येक वेळेस फडणीसांना बदलण्याची विनंती पेशव्यांना केली पण ती कधीच मान्य झाली नाही.
दरम्यान, मराठा साम्राज्याचा गद्दार राज्यकर्ता रघुनाथ राव यांनी पुन्हा एकदा पेशवे होण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी इंग्रजांची मदत घेतली आणि पेशव्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण चतुर असलेल्या नानांनी समजदारपणा दाखवत निजाम आणि भोसले यांना समज दिली आणि यामुळे तह करून युद्धाचा अंत झाला.
१७७५ साली मराठ्यांच्यात आणि इंग्रजांमध्ये सुरतचा तह झाला. या तहाच्या नंतर इंग्रजांनी कित्येक वेळा मराठ्यांना हरवण्याचा प्रयत्न केला, पण नाना फडणीसांच्या मुत्सद्दीपणापुढे त्यांचं काहीच एक चाललं नाही. आणि त्यांना प्रत्येकवेळी अपयश आलं.
नाना फडणीस यांनी कधीही पद किंवा कुठल्या इनामाची अपेक्षा केली नाही. त्यांची आवड केवळ मराठा साम्राज्याच्या प्रगतीत होती. जेव्हा जेव्हा राज्यात अस्थिरता होती तेव्हा नाना फडणीस यांनी परिस्थितीवर मात केली आणि पुन्हा ते स्थिर केले आणि याच दरम्यान १३ मार्च, १८०० रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि मराठा साम्राज्याला पुन्हा उतरती कळा लागली. याच घटनेनंतर इंग्रजांनी मराठ्यांवर आक्रमण केलं आणि हळूहळू पेशवाई उधळून लावली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.