आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
उन्हाळ्याच्या दिवसांत थोडा थंडावा आणि जिभेची चव दोन्हींची पूर्तता व्हावी म्हणून अधिकाधिक लोक शीतपेयांची निवड करतात. आजकाल तर दैनंदिन आहारातही शीतपेयांचा समावेश झालेला आहे. कोणत्याही ऋतूत शीतपेये पिणारा एक मोठा वर्ग आज पहायला मिळतो.
सरबत, ताक, पन्हे, हे भारतीय शीतपेयांचे काही पारंपारिक प्रकार आहेत, पण आज यापेक्षा कार्बोनेटेड पेये पिण्याकडे जास्त कल आहे. सोडा असो किंवा थम्सअप, पेप्सी, कोकसारखी उत्पादने असोत भारतीय बाजारपेठेत यांचे आगमन कधी झाले आणि भारतीयांना अशा पेयांची चव कुणामुळे ओळखीची झाली?, कार्बोनेटेड पेयांची सुरुवात कधी आणि कशी झाली?, भारतीयांच्या जिभेवर ही चव कशी रुळत गेली? हा सगळा प्रवास जाणून घेणे फारच मनोरंजक आणि माहितीत अधिक भर घालणारा ठरेल.
आज या शितपेयांनी भारतातील तब्बल ८ बिलियन डॉलरची बाजारपेठ काबीज केली आहे. पण, याचा पाया घातला तो भारतात अल्पसंख्य होत चाललेल्या पारसी समाजाने. गेल्या दोन शतकात या समाजाने भारतीयांना या कार्बोनेटेड शीतपेयांची ओळख करून देण्यात आणि त्यांची चव अंगवळणी पाडण्यात बरेच योगदान दिले आहे.
१८व्या शतकापर्यंत सोडा हे ब्रिटीशांचे एक आवडते पेय होते. काही कंपन्या याच सोड्याला लेमन, ऑरेंज आणि रास्पबेरीचे फ्लेवर देऊन त्याची विक्री करत. अर्थातच ब्रिटीशांच्या मागून हा सोडा देखील भारतात पोहोचला. १८३७ च्या दरम्यान हेन्री रॉगर्स यांनी मुंबईत पहिली सोड्याची फॅक्टरी सुरु केली. त्याकाळी मुंबईत पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मुबलक मिळत नव्हते. त्यामुळे काविळीसारख्या जीवघेण्या आजाराच्या साथी थैमान घालत असत.
पण कार्बोनिक ऍसिड आणि सोड्यामुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. म्हणून लोकांनी ही शीतपेये अगदी सहज स्वीकारली. त्यानंतर कार्बोनेटेड टॉनिक वॉटर आले. ज्यामध्ये मलेरियाचे जंतू नाहीशी करण्याची क्षमता होती.
पारसी लोकांनी या व्यवसायाला सुरुवात केल्यामुळे भारतातील ब्रिटीश सैनिकांना त्यांची तहान शमवण्याची चांगली सोय होऊ लागली. या शीतपेयांच्या व्यवसायात पैसा गुंतवल्यास भरपूर परतावा मिळू शकतो, हे त्याकाळी पारसी बांधवांनी पुरते ओळखलेले होते. अनेकजण याआधीच या व्यवसायात उतरलेले होते आणि त्यांची उत्पादने ब्रिटनला निर्यात केली जात.
पारसी बांधवांनी मुंबईत अनेक ठिकाणी छोटेछोटे इराणी स्टॉल सुरु केले. या व्यवसायावरून पारसी लोकांमध्ये तर सोडाबॉटलवाला, सोडावॉटरबॉटलवाला अशी आडनावे देखील रुळू लागली होती. हळूहळू भारतातील इतर जात बांधव देखील या व्यवसायात उतरू लागले. १९१३ पर्यंत मुंबईत जवळपास दीडशे सोडा फॅक्टरीज उभ्या राहिल्या होत्या. या व्यवसायात त्याकाळी पारसी लोकांचाच वरचष्मा होता. हळूहळू सोडा हा मुंबईच्या सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातही अनन्य साधारण स्थान निर्माण झाले.
टिळकांवर राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाली तेंव्हा सरकार विरोधात निदर्शने करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांनी रस्त्यावर सोडा वॉटरच्या बाटल्या फोडल्या होत्या.
त्यावेळी इराणी लोकांच्या दुकानात अगदी ओसंडून गर्दी वाहत असल्याचे निरीक्षण सिटी पोलीस कमिशनरने नोंदवले होते. सोड्याच्या बाटल्या या दंगली आणि आंदोलनात ऐच्छिक हत्यार म्हणून वापरल्या जाऊ लागल्या.
कार्बोरेटेड पेये अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागली तसतशी पारसी बांधवांचा सोडा व्यवसाय अधिकाधिक बहरू लागला. दिनशा पंडोले या पारसी इसमाने ड्युक रास्पबेरी सोडा नावाने सोडा वॉटर कंपनी सुरु केली. ड्युक हे क्रिकेट बॉलच्या एका ब्रँँडचे नाव होते. ते स्वतः क्रिकेट शौकीन असल्याने त्यांनी आपल्या कंपनीसाठी हेच नाव निवडले. एक आण्याला एक बॉटल सोडा वॉटर विकणारी ड्युक कंपनी १९०७ च्या काळात फारच फाॅर्मात होती.
हळूहळू पारसींचा सोडा वॉटरचा हा उद्योग मुंबई पुरताच मर्यादित न राहता भारताच्या इतर भागातही पसरू लागला होता. अगदी कोलकत्तापासून ते कालिकतपर्यंत या व्यवसायाचा विस्तार झाला होता. यातल्या अनेक कंपन्या छोट्या होत्या. त्यांना मिळणारा फायदा देखील तुटपुंजा होता, पण सोड्याची चव आणि त्याचा दर्जा याबाबत कुठेही तडजोड केली जात नव्हती. अगदी १९७० च्या दशकातही अहाबादमधील पी. धुंजीभाय अँड सन्स ही कंपनी सोड्याच्या बाटल्या वितरीत करण्यासाठी बैलगाडीचा वापर करत असे.
हैद्राबादजवळील निझामाबाद या शहरातील मरोलिया कुटुंबाकडे सोड्याच्या बाटल्या पोचवण्यासाठी चार कामगार होते. जे सकाळी लवकर सायकलवर सोड्याच्या बाटल्यांच्या चार कॅरेट लावत असत आणि त्या वितरीत करत असत. सोडा तयार करण्यासाठी जितका खर्च येत नसे त्यापेक्षा जास्त खर्च काचेच्या बाटलीसाठी येत असे. म्हणून काही कंपन्या सोड्याच्या बाटल्या ग्राहकांकडून त्वरित परत घेत आणि त्याचाच पुनर्वापर करत असत.
१९८० पासून हळूहळू या क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होत गेली तसे पारसी बांधवांची मक्तेदारी मोडीत निघू लागली. अशातही ड्युक आणि रॉगर्सच्या रास्पबेरीने बाजारात चांगला जम बसवला होता. अशातच १९९२ पासून जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. पेप्सी आणि कोकाकोला सारख्या कंपन्या देशी कंपन्यांना जास्तच फाईट देऊ लागल्या. १९९४ साली ड्युक कंपनी पेप्सीमध्ये विलीन करण्यात आली.
अर्थात रास्पबेरी सोडा अगदीच कालच्या पडद्याआड गेला अशी स्थिती आहे का? तर अजिबात नाही. आजही भारतातील अनेक इराणी कॅफे-रेस्टॉरंटमधून रेट्रो ड्रिंकच्या नावाने हे पेय दिले जाते. रास्पबेरीचे नाव बदलले असले तरी, चव मात्र आजही तीच आहे.
पारसी बांधवांनी दीडशे दोनशे वर्षापूर्वी ज्या पेयांची भारतीयांना ओळख करून दिली, त्याची चव आजही भारतीयांच्या जिभेवर रेंगाळत आहे. आजही अनेक ग्राहक रास्पबेरी कुठे मिळेल याची चौकशी कोल्ड्रिंक हाउस मध्ये करत असतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.