आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
१५ जूनला लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या तुंबळ लढाईत भारताच्या २० जवानांना वीरगती प्राप्त झाली. हे सर्व समोर आल्यानंतर देशभरात चीनच्या विरोधात संतापाची लाट उसळली आणि चीनच्या कृत्याच्या निषेधार्थ चिनी मालाचा बहिष्कार करण्याच्या मोहीमेने जोर धरला आहे. चिनी उत्पादनांवर भारतात बंदी घाला अथवा त्यांचा बहिष्कार करा असा आवाज देशभरात घुमतो आहे.
पण चीनच्या मालावर बंदी घालणे अथवा त्याचा संपूर्ण बहिष्कार करणे कितपत शक्य आहे?
एका वृत्त वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, ७०% भारतीय चीनी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी जास्त खर्च झाला तरी तो करायला तयार आहेत. ९१% टक्के लोकांनी चिनी ऍप्सचा वापर करणे बंद केले आहे. ९२% भारतीय लोकांना चीनवर विश्वास नाही. तर ५२% लोकांच्या मते भारताने आत्मनिर्भर बनले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.
जनतेचा मनातील चीनबद्दलचा आणि त्यातून लोकांच्या ह्या प्रतिक्रियांचा उगम झाला असला तरी व्यवहारीकदृष्ट्या चिनीमालावर बंदी घालणे अथवा त्याचा बहिष्कार करणे हे हस्यास्पद तर आहेच पण याचा भारताला काही फायदा देखील होणार नाही आहे. याची काही विशेष कारणं आहेत ती आपण समजून घेऊया.
१) भारत चीनवर निर्भर आहे, चीन भारतावर नाही!
यावर्षी भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश म्हणून अमेरिकेने चीनला मागे टाकले आहे. भारताच्या एकूण व्यापाराचा ११.३% भाग हा अमेरिकेचा असला तरी हाँगकाँगची व्यापारी भागीदारी चीनसोबत एकत्र केली तर चीनची भारतासोबतची व्यापारी भागीदारी १४ टक्क्यांपर्यंत आहे.
भारत मात्र चीनचा तितका मोठा व्यापारी भागीदार नाही. अगदी पहिल्या पाचमध्ये देखील नाही. चीनचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार अमेरिका असून त्यांच्यानंतर जपान, दक्षिण कोरियाचा क्रमांक लागतो. भारत चीनचा फक्त २.१% व्यापारी भागीदार आहे, जे प्रमाण खूप कमी आहे.
२) या गोष्टींसाठी भारत चीनवर अवलंबून आहे
भारत चीनमधून मोठ्या प्रमाणात वस्तूंची आयात करतो. भारताच्या एकूण आयातीत त्याचा वाटा तब्बल २३% इतका आहे. चीनमध्ये जेव्हा कोरोनाने थैमान घातले होते तेव्हा भारताच्या इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाईल, फर्निचर, ह्या घरगुती वस्तूंच्या व्यापारात मंदी आली होती कारण चीनमधून होणारी निर्यात कमी झाली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण चीनच्या आयातीवर निर्भर आहोत.
३) भारत औषधांसाठी चीनवर अवलंबून आहे
भारत हा जगातील औषधांच्या निर्मितीत तिसऱ्या क्रमांकाचा देश असला तरी त्याच्या किंमतीनुसार आपला क्रमांक १४ वा आहे. भारत आपल्या देशातील औषधांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी चीनवर अवलंबून आहे. औषध निर्मितीच्या काही महत्वपूर्ण घटकांची आयात चीनमधून केली जाते.
२०१९ मध्ये तब्बल ७०% आयात चीनमधून करण्यात आली होती. सध्या सीमेवरील तणाव लक्षात घेता भारताने चीनवरील ही निर्भरता कमी करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.
४) चीन भारतावर किती निर्भर आहे?
चीन हा भारतावर अवलंबून नाही. १९९० साली चिनी माणूस आणि भारतीय माणूस यांचे उत्पन्न समान होते. पुढे चीनने मोठ्या प्रमाणात प्रगती केली. १९९६ मध्ये चीन १ ट्रीलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनला. त्यावेळी भारतीय माणूस आणि चिनी माणूस यांच्या कमाईत २००० रूपयांची तफावत निर्माण झाली. पुढील दोन दशके चीनने आर्थिक प्रगती करून १३ ट्रीलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेची निर्मिती केली. त्यांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था फक्त २.५ ट्रीलीयन डॉलर्सची आहे आणि भारतासमोर ५ ट्रीलीयन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या निर्मितीचे लक्ष्य आहे. चीनसाठी भारत हा खूप छोटा व्यापारी भागीदार आहे.
५) चिनी वस्तूंवर बंदी आणणे व्यवहार्य नाही
चीनविषयक असलेला राग थोडा बाजूला ठेवला तर कायदेशीरदृष्ट्या चिनी मालावर बंदी आणणे अशक्य आहे. भारत जागतिक व्यापारी संघटनेचा सदस्य असून त्यांच्या नियमानुसार कुठल्याही देशाला एखाद्या देशासोबत व्यापारी संबंध संपुष्टात आणणे अथवा त्याच्या मालावर बंदी घालण्याचा हक्क नाही. ह्या संघटनेच्या सदस्यांना मुक्त व्यापाराची अट घालण्यात आली आहे. अशावेळी परराष्ट्र नीती अथवा व्यापारी नीतीत बदल करून चीनी मालावर बंदी आणणे हे धोक्याचे आणि नवीन संघर्षाला तोंड फोडण्याचे कारण ठरू शकते.
चीनी मालाचा बहिष्कार करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर संघटना स्वदेशी आणि गैरचिनी मालाचा प्रचार करत असले आणि लोकांना चीनी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी आग्रह करत असले तरी भारतीय ग्राहकांच्या सवयीचे निरीक्षण केल्यास सध्या तरी हे अवघड आहे.
कोरियन कंपनी सॅमसंग, तैवानी एचटीसी आणि जपानी सोनी कंपनी जरी कमी किंमतीत चीनी मोबाईल कंपन्यांना पर्याय उपलब्ध करून देत असल्या तरी ह्याचा विशेष परिणाम होत नाही आहे, असे दिसून आलं आहे. भारतात एवढे चीनविरोधी वातावरण असून देखील वन प्लस ह्या चिनी कंपनीचा फोन फक्त काही मिनिटात संपूर्णपणे विकल्या गेला आहे.
६) चिनी मालावर बहिष्कार टाकून काही फायदा होणार नाही
चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय हा समजूतदारपणाचा नसून आततायी असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे. सध्याच्या स्थितीनुसार आणि आकडेवारीला बघितल्यास चीन आपल्यावर अवलंबून नाही, हे स्पष्टपणे दिसून येते. यासाठीच चीनी मालावर बहिष्कार घातला तरी त्याने चीनवर काही परिणाम होणार नाही आहे. एका रिपोर्टनुसार अनेक चीनी कंपन्या भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणुक करत असून, जर आपण बहिष्काराचे अस्त्र उगारले तर ते आपल्यालाच धोकादायक ठरणार आहे.
अजून एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे दरवर्षी ८ लाख चिनी नागरिक भारताला भेट देत असतात, बहिष्कार केला तर त्याचा वाईट परिणाम भारतीय पर्यटन व्यवसायावर होऊ शकतो.
७) बहिष्कार टाकल्याने होतील वाईट परिणाम
जर चीनी उत्पादनावर आणि व्यापारावर बंदीचे हत्यार जरी उपसण्यात आले, तरी यामुळे तुलनेने गरीब आणि कमी कमाई असणाऱ्या घटकांचे मोठे नुकसान होणार आहे. चीनला पर्याय म्हणून असलेले जपानी आणि कोरियन उत्पादनं हे तुलनेने जास्त महागडे ठरणार असून याचा सरळ परिणाम भारतीय ग्राहकांवर होणार आहे. बहिष्कारामुळे भारताच्या विदेश नीतीच्या विश्वासहार्यतेवर परिणाम होणार असून यामुळे जगभर नाचक्की होण्याचा धोका देखील असणार आहे. तिसरी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर भारताच्या क्रियेला प्रतिक्रिया म्हणून चीनने बहिष्काराचे अस्त्र उपसले तर याची झळ भारतीय उद्योजकांनाच बसणार आहे.
वरील सर्व मुद्दे लक्षात घेतले तर सध्याच्या सीमाप्रश्नामुळे भारतीय लोकांचा चीनवर असलेला राग कितीही स्वाभाविक असला तरी चिनी मालावर बंदी अथवा बहिष्कार हा कधीच चीनच्या प्रतिकाराचा व्यवहारिक पर्याय ठरणार नाही. तरी आपण आपल्या स्थानिक उत्पादनांचा प्रचार करण्यात काही चुकीचे नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.