आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जेव्हा केव्हा सरकारच्या विरोधात मोठा जन आक्रोश तयार होत असतो, त्यावेळी प्रसिद्ध व्यक्तींना आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न सरकार करत असते, कारण फॅन्स आणि सरकार दोन्ही त्या प्रसिद्ध व्यक्तींच्या समर्थनाची अपेक्षा बाळगून असतात. त्यामुळे कोणाची निवड करायची हा मोठा प्रश्न त्या प्रसिद्ध व्यक्तींसमोर उभा राहत असतो.
बॉलिवूडच्या कलाकरांना तर आपल्या भूमिका घेताना मोठ्या प्रमाणावर विचार करावा लागतो.
जून १९७५ साली जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली, तेव्हा सरकारने निर्णयाला समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. ह्यात त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटीजला समर्थनाची मागणी केली होती.
अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी कुठल्याही प्रकारचे दुसरे मत व्यक्त न करता, सरकारच्या निर्णयाला आपला पाठिंबा जाहीर केला आणि सरकारचे मांडलिक होऊन बसले होते. परंतु असे काही सेलिब्रिटी होते ज्यांनी सरकारचे मांडलिकत्व स्वीकारले नाही आणि आपला वेगळा विचार जपला परिणामतः त्यांना त्यांचे नागरी स्वातंत्र्य धोक्यात टाकावे लागले होते.
काहींना तर या कराऱ्या बाण्याची मोठी किंमत चुकवावी लागली होती. यात अग्रणी होते प्रसिद्ध पार्श्व गायक किशोर कुमार.
मुंबईत होणाऱ्या युथ काँग्रेसच्या रॅलीचे निमंत्रण अस्वीकार करण्यापासून ते माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या व्ही सी शुक्लांची संजय गांधी यांच्या आर्थिक धोरणाचे प्रदर्शन असणाऱ्या जहिरातीला संगीत देण्याची मागणी फाट्यावर मारण्यापर्यंत त्यांनी सरकारविरोधात बंडाचे निशाणा उभारले होते.
परिणामतः चिडलेल्या व्ही सी शुक्लांनी सरळ दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या किशोरदांच्या गाण्यावरच बंदी घातली.
किशोर कुमारच नाहीतर सर्व बॉलिवूडला भयग्रस्त करून टाकण्याची ती एक खेळी होती. रंजन दास गुप्ता नावाच्या पत्रकारानुसार मोहम्मद रफी यांनी तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नातू शोभत नाही अशा शब्दात संजय गांधींची कानउघाडणी केली होती. पण त्यांच्यावर याचा काहीच परिणाम झाला नव्हता.
जनतेपर्यंत पोहचण्याचे अत्यंत कमी पर्याय उपलब्ध असताना किशोरदांच्या गाण्यावर आलेली बंदी ही त्यांच्यासाठी फार मोठा झटका होती.
पुढे तब्बल दीड वर्षांनी ही बंदी उठवण्यात आली, जेव्हा आणीबाणी रद्द झाली आणि काँग्रेसला सत्तेच्या बाहेर फेकण्यात आलं होतं.
किशोरदांप्रमाणे देवानंद आणि शत्रुघ्न सिन्हा देखील आणीबाणीच्या राजकारणाचे बळी ठरले होते. बिहारमध्ये काँग्रेसचा प्रचार करा नाहीतर बरोडा डायनामाईट केस पुन्हा उघडली जाईल, अशी धमकी त्यांना देण्यात आली होती. देवानंद यांनी केवळ सरकारचे मांडलिकत्व नाकरलेच नाही, तर आपल्या दोन्ही भावांच्या सोबत आणीबाणीच्या विरोधात बोलले देखील होते.
ते म्हणाले होते की आणीबाणीने देशातील सरकारी अधिकाऱ्याना वठणीवर आणलेलं असलं तरी आणि ती देशाचं भलं करत असली तरी देशाला असं जेरीस आणून त्यांना काय मिळणार आहे?
जनतेच्या मनातील असंतोष हा सुप्त ज्वालाग्राही पदार्थासारखा असतो, त्याला पेट घेण्यासाठी फक्त एका ठिणगीची गरज असते. त्या ठिणगीमुळे ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो, दुर्दैवाने आज इंदिरा गांधींच्या रूपात ती ठिणगी पडली आहे आणि ज्वालामुखीचा उद्रेक होणार आहे.
देवानंद यांच्या टीकेनंतर सरकार संतप्त झाले, त्यांनी देवानंद यांचा अत्यंत कडक पद्धतीने सूड उगवला होता.
त्यांच्या देस परदेस ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान अनंत अडचणी निर्माण करण्यात आल्या होत्या. पण ते मुळीच डगमगले नाहीत, ते जाहीर मंचावर आणीबाणीचा निषेध करत राहिले. त्यांना प्राण, हृषीकेश मुखर्जी, डॅनी डेंगझोपा आणि साधना ह्या तत्कालीन बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांनी समर्थन दिलं होतं.
जुहू बीचवर दिलेल्या एका जाहीर भाषणात देवानंद यांनी इंदिरा गांधी आणि त्यांचे सुपुत्र संजय गांधी यांच्यावर शाब्दिक हल्ले चढवून त्यांच्या दडपशाहीचा निषेध केला होता. त्यांनी नॅशनल पार्टी नावाच्या एका पक्षाची स्थापना देखील केली होती.
सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांनी देखील सुरुवातीच्या काळात इंदिरा सरकारची भलामण करत असल्याचं दाखवून शोले रिलीज करायची परवानगी व्ही सी शुक्लांकडून मिळवून घेतली होती. पण मनोज कुमार हे आधीपासूनच आणीबाणीच्या विरोधात होते.
माहिती व प्रसारण मंत्रालयाचे लोक एकदा त्यांच्याकडे गेले आणि आणीबाणीचे समर्थन करणारा माहितीपट बनवण्याची मागणी त्यांच्या जवळ केली. त्यासाठी अमृता प्रीतम यांनी स्क्रिप्ट लिहून दिल्याचे देखील त्यांना सांगितले.
हे ऐकताच त्यांनी माहितीपट बनवायला नकार तर दिलाच पण अमृता प्रीतम यांना फोनकरून म्हणाले की तू सरकारला विकली गेली आहेस का ?
त्यांचे खडेबोल ऐकून अमृता प्रीतम यांना आपली चूक उमगली आणि त्यांनी मनोज कुमारांना ती संपूर्ण पटकथा जाळून टाकायला सांगितली.
या संपूर्ण घटनेचा परिणाम फार वाईट झाला. मनोज कुमारांचा शोर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याच्या दोन आठवडे आधीच दूरदर्शनवर प्रदर्शित करण्यात आला होता. यामुळे जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा तो आपटला आणि मनोज कुमारांचे मोठे नुकसान झाले.
देवानंद आणि मनोज कुमार यांच्यापेक्षा वाईट अवस्था राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री स्नेहलता रेड्डी यांची झाली होती. स्नेहलता रेड्डी यांनी आणीबाणी विरोधात नुसती भूमिकाच घेतली नाहीतर त्या प्रत्यक्ष भूमिगत लढ्यात सहभागी देखील झाल्या होत्या, यामुळे त्यांना शासनाने मिसा कायद्याअंतर्गत तुरुंगात टाकलं होतं.
तिथे त्यांच्या मोठ्या प्रमाणावर मानसिक छळ करण्यात आला. त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले, आणीबाणी संपल्यावर त्यांची मुक्तता करण्यात आली होती, पण पुढच्या पाचच दिवसात त्यांना मृत्यूने गाठलं होतं.
व्ही. शांताराम, उत्तम कुमार, सत्यजित रे, राज कुमार आणि गुलजार या लोकांनी देखील आणीबाणीच्या विरोधात भूमिका घेतली होती.
सत्यजित रे यांनी इंदिरा गांधींनी आपले वडील जवाहरलाल नेहरू यांच्या आयुष्यावर माहितीपट निर्माण करण्याची विनंती सत्यजित रे यांना केली होती. त्यांनी ती स्पष्ट शब्दात धुडकावून लावली होती. पण सत्यजित रे यांचे भारतासह जगभरात चाहते असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार धजवले नाही.
पण इतर अभिनेते आणि अभिनेत्री यांनी इंदिरा गांधींच्या निरंकुश सत्तेशी दिलेला लढा निश्चितच वखाण्याजोगा होता. आज त्यांच्या छोट्या प्रतिकारामुळे भारतात लोकशाही सुरक्षित आहे. हे मात्र निश्चित !
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.