आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आज देशभरातील नागरिक मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करत असतील. सर्वत्र तिळगुळ, लोहडीचा प्रसाद, पोंगल आणि बिहूचा नुकताच शेतातून आणलेला तांदूळ या गोष्टींची रेलचेल असते. याच्याच जोडीला उत्तर भारतातील निम्न शहरी भागात पतंगोत्सवाचे देखील आयोजन करण्यात येते.
अनेक शहरांचे आकाश पतंगांनी व्यापून टाकले होते. गुलाबी शहर जयपूर यात मागे कसं राहणार?!
पण उत्साह आणि चैतन्याच्या खेळकर वातावरणात एक युवक आणि त्याचे काही साथी मिळून पतंगोत्सवा दरम्यान जखमी झालेल्या पक्षांवर उपचार करत असतात.
“होप अँड बियॉंड” या एका अशासकीय सामाजिक संस्थेचे सदस्य जयपूरचा प्रसिद्ध पतंगोत्सव सुरू असताना जखमी पक्षांवर उपचार कऱण्यात मग्न असतात.
त्यांनी अनेक पक्षांना जीवनदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे पक्ष्यांचे प्राण वाचवणे सहज शक्य बनले. पतंगाच्या दोरात आणि मांज्यात पंख अडकून अथवा मान अडकून अनेक पक्षी जखमी होतात किंवा मरण पावतात. ते जमिनीवर येऊन पडतात.
त्यांना मदतीची गरज असते आणि बऱ्याचवेळी ती मिळत नाही म्हणून ते पक्षी तडफडून मरतात. अनेक पक्षी कायमचे जायबंदी होतात. शिवाय त्यांना जमिनीवरच्या मांसाहारी प्राण्यांचा देखील मोठ्या प्रमाणात धोका असतो.
या अशावेळी माणसांनी त्यांची मदत करणे हे कर्तव्य आहे. ह्या कर्तव्य पूर्ततेसाठी डॉ. जॉय गॉर्डनर यांनी होप अँड बियॉंड ह्या संस्थेची स्थापना केली.
२०१५ साली ३६ वर्षीय गॉर्डनर यांनी होप अँड बियॉंडची स्थापना केली. गॉर्डनर हे गेल्या दोन दशकांपासून वन्यप्राणी संवर्धन कार्यक्रमात कार्यरत आहे.
यंदाच्या पतंगोत्सवाला त्यांनी पक्षांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी १७ पशुवैद्यांची एक संपूर्ण टीमच उभी केली होती.
जयपूरचा पतंगोत्सव हा तीन ते चार दिवसांच्या कालावधीसाठी असतो, या कालावधीत त्यांनी ३५० पक्षांचे प्राण वाचवले असून ह्यात अनेक दुर्मिळ प्रजातीच्या पक्षांचा देखील समावेश आहे.
ही संस्था मानव आणि वन्यजीवांमध्ये वारंवार होणाऱ्या संघर्षाला थांबवण्याचा प्रयत्न देखील करते. या भागाच्या जवळपासचा भाग हा वनस्पती आणि जंगलांनी व्यापलेला आहे, त्यामुळे अनेक वन्य श्वापदं जंगलातून शहरात येत असतात. यात बिबट्यांचा देखील समावेश आहे.
या बरोबरच ही संस्था गेल्यावर्षी झालेल्या सांभर तळ्याच्या दुर्घटनेत देखील मदतीला हजर होती ज्यात तब्बल २५ हजार पक्षांचे प्राण गेले होते.
राज्य सरकार आणि काही संस्थांच्या मदतीने त्यांनी १२०० पक्षांचे जीव वाचवण्यात यश प्राप्त केले होते. यात ५५० परदेशी पक्षांचा समावेश होता.
पतंगबाजी ही असंख्य पक्षांच्या आयुष्याला हानिकारक असून, ग्लासकोटेड मांजाच्या वापरामुळे अनेक पक्षी त्या मांज्यात अडकतात, जखमी होतात.
त्यांचे पंख तुटतात, त्यांचे हाड मोडते बऱ्याचदा त्यांचा मज्जातंतूला धोका निर्माण होतो ज्यामुळे त्यांचा जीव जातो. अनेकवेळा त्यांच्या शरीरात काच घुसून त्यांचा मृत्यू होता. घारींचे ह्यात जखमी होण्याचे प्रमाण जरा जास्त आहे.
दरवर्षी जखमी होणाऱ्या पक्षांच्या संख्येत वाढ होत असून ह्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्षांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. एवढं असून देखील मांजा वापरणाऱ्या लोंकाच्या संख्येत अजिबात घट होत नसून ती देखील वाढत जात आहे.
जर पक्षांना होणाऱ्या इजा जर थांबवायच्या असतील तर सर्वात आधी मांजाचा वापर शक्यतो टाळला पाहिजे.
लोकांनी शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी पतंग उडवणे बंद केले पाहिजे कारण ह्याच काळात पक्षी आपल्या घरट्याकडून रानात आणि रानातून घरट्यात जात असतात. ह्यामुळे त्यांच्या जखमी होण्याचे चान्सेस जरा जास्त असतात.
लोक साधा नायलॉन अथवा कापसाचा दोरा वापरून देखील पतंग उडवू शकतात पण लोक मांजाचा वापर करतात कारण त्यांना लोकांसोबत असलेली पतंगबाजीची स्पर्धा जिंकायची असते.
संक्रांति हा एक आनंदाचा सण असून तो सण इतरांच्या आयुष्यात आनंद आणून साजरा करायला हवा, जर पतंगबाजीचा त्याग करून लोक गरिबांना अन्नदान करतील तर ते जास्त उपयोगाचं राहील.
सणाच्या आनंदीपर्वात जर आपल्यामुळे कुठलीच चूक नसणाऱ्या पक्षांचे नुकसान होत असेल तर आपण त्याला का म्हणून प्रोत्साहन द्यायचं? असा प्रश्न देखील ह्या संस्थेच्या प्रामुख्याने उपस्थित केला आहे.
संपूर्ण जयपूर शहरात ‘होप अँड बियॉंड’ने जखमी पक्षांचं रक्षण करण्यासाठी आपले रेस्क्यू कॅम्प उभारले होते.
प्रत्येक कॅम्प हा आधुनिक उपचार सामुग्रीने परिपूर्ण होता. जर कुठला पक्षी आढळून आल्यास ह्या संस्थेचे स्वयंसेवक कुठेच वेळ न घालवता त्या जागेवर पोहचायचे.
सोबत तज्ञ पशुवैद्यांची टीम देखील असायची जी जागच्या जागी पक्षाची तपासणी करायची जर पक्षी गंभीर जखमी असेल तर त्याच्या वर शस्त्रक्रिया केली जायची, त्यासाठी त्यांना रेस्क्यू सेंटरला आणलं जायचं. आधी पक्षाच्या शरीरातून होणार रक्तस्त्राव थांबावणे या लोकांपुढील एक आव्हान असायचे.
जर पक्षी जास्त गंभीर असेल तर त्याला बेस कॅम्प वर आणलं जातं. जिथे त्याला बेशुद्ध करण्यापासून पुढचे उपचार प्रदान केले जातात. पक्षांच्या पालनाची जबाबदारी अंगावर घेत ही संस्था त्यांची अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने काळजी घेत असते.
पक्षांना इतर लोकांची ओळख होऊ नये आणि ते घाबरू नये म्हणून त्यांच्या डोळ्यावर आधी पट्ट्या बांधल्या जातात.
त्यांना ज्या पिंजऱ्यात ठेवले जाते तेथे देखील एकाच व्यक्तीला त्यांना अन्न द्यायला जाण्याची परवानगी असते. ते पक्षी तंदरुस्त होईपर्यंत त्यांची काळजी घेतात.
पक्षांच्या जखमांचे रोज निरीक्षण केले जाते, जेव्हा ते बरे झाल्याची खात्री पटते तेव्हा त्यांना मुक्त करण्यात येतं. आधी ते ८ फुटापर्यंत उडू शकत आहेत की नाही हे तपासले जाते. जे पक्षी उडू शकत नाही त्यांना जयपूरच्या प्राणिसंग्रहालयात ठेवलं जातं.
दरवर्षी जवळ जवळ शंभर स्वयंसेवकांची एक टीम या पक्षांना वाचवण्यासाठी झटत असते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.