आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
चोवीस तास अपडेट न्यूज देणारे न्यूज चॅनेल्स, नवनवीन घडामोडींचे विश्लेषण करणारी पारंपारिक वर्तमानपत्रे, कोणत्याही गोष्टींचा आगापिछा न धुंडाळता हाती येईल ती माहिती वाऱ्यासारखी पसरवणारी समाजमाध्यमे, त्या माहितीच्या आधारे प्रतिक्रिया देणारे टेक्नोसॅव्ही पिढी अशा माहिती आणि बातमीतील फरकही न समजू शकणाऱ्या जंजाळात प्रत्यक्ष जमिनीस्तरावरून माहिती घेऊन त्याचे अचूक निष्पक्षपाती विश्लेषण करणारे लल्लनटॉप या वेबसाईटने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
तेथील बातम्या आणि माहितीबद्दल वाचकांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे. माहितीच्या या जंजाळात लल्लनटॉपने ही उंची कशी गाठली? त्यांच्या या यशा मागचे खरे गमक काय? आभासी जगतात सातत्याने खऱ्या खोट्या गोष्टींची बेमालूम सरमिसळ होत असतानाही त्यांनी स्वतःचा सच्चेपणा कसा जपला? जाणून घेऊया हा प्रवास.
पत्रकारितेचे पारंपारिक चित्र आता बदलले आहे. आजूबाजूला इतक्या घडामोडी घडत असतात आणि त्या सर्वत्र पोचवण्याची सर्वांना इतकी घाई असते की प्रत्येकजण इथे पत्रकार बनला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. समाज माध्यमांनी बातम्या आणि त्यांच्या परिणामाची व्याप्ती खूपच व्यापक केली आहे. अशा परिस्थितीत पत्रकारितेसमोर बातम्यांची सत्यता आणि सार्थकता टिकवून ठेवणे हे एक आव्हान बनले आहे.
इंटरनेट युगात ही पत्रकारितेने काही नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. यातही हिंदी मध्ये वेगळ्या धाटणीची पत्रकारिता आणणे हीच लल्लनटॉपची खासियत आहे. उत्तरप्रदेशच्या कानपुर भागातून येणाऱ्या तरुण पत्रकाराने लल्लनटॉप सारखी वेबसाईट चालवण्याची गोष्ट खूपच प्रेरणादायी तितकीच संघर्षमय देखील आहे.
उत्तरप्रदेशमधील कानपुर जवळील उरई सारख्या गावात जन्मलेल्या सौरभ द्विवेदी यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी कानपुर गाठले. कानपुर मधून त्यांनी गणितातील पदवी संपादन केली. पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी जेएनयुची पायरी चढली. जेएनयुमधून त्यांनी हिंदी साहित्यातून मास्टर्सची पदवी पूर्ण केली. हिंदी साहित्याची पदवी घेतलेले सौरभ पत्रकारीतेकडे कसे वळले हे पाहणे रोचक ठरेल.
सुरुवाती पासूनच सौरभ यांना पत्रकारितेच्या क्षेत्राबद्दल विशेष आकर्षण होते. राजकारण आणि नोकरशाही या दोघांवरही कोरडे ओढण्याची धमक पत्रकारितेतच असते, याचे त्यांना विशेष अप्रूप होते. सोबत सरकारच्या कामाचे मूल्यमापन करणे हेही एक जोखमीचे काम पत्रकारिता करत असते. म्हणून त्यांनी आयआयएमसी मधून पत्रकारीतेसाठी प्रवेश घेतला.
साहित्याचे विद्यार्थी असल्याने त्यांचे भाषेवर चांगलेच प्रभुत्व होते. पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर खरी कसोटी होती, प्रत्यक्षात पत्रकारिता अंमलात आणण्याची. त्यासाठी व्यासपीठाची गरज होतीच. पदवी पूर्ण होताच त्यांनी सुरुवातीला स्टार न्यूज मध्ये इंटर्नशिप केली. सुरुवतीला ते स्टार न्यूजमध्ये एखाद-दुसरी बातमी करत होते. नंतर त्यांनी एक विशेष शो सुरु करण्यात हातभार लावला.
इथल्या अनुभवानंतर ते टाईम्स ग्रुप मध्ये रुजू झाले. को-ऑपरेट न्यूज जगताशी त्यांची इथेच पहिली ओळख झाली. इथल्या अनुभवाने त्यांची पत्रकारिता समृद्ध झाली. नवभारत टाईम्समध्ये काम करत असताना पत्रकारितेतील विविध बाजू त्यांना पाहायला मिळाल्या.
तीन वर्षे नवभारत टाईम्समध्ये काम केल्यानंतर ते भास्कर ग्रुपमध्ये रुजू झाले. इथे त्यांना प्रगतीच्या भरपूर संधी मिळाल्या आणि सौरभ यांनी त्या संधींचे सोने केले. भास्कर ग्रुप म्हणजे आज भारतीय पत्रकारीतेतील एक मोठे नाव.
वयाच्या २६-२७ व्या वर्षीच त्यांच्या लेखणीत एक वेगळीच चमक आली होती. बातमी कशी बनवायची, त्याचा आकार किती असावा, त्यामध्ये नेमकी माहिती काय आणि कशी मांडायची, यातील अनुभवांनी पुढे त्यांना चांगली मदत झाली.
नवभारत नंतर त्यांनी इंडिया टुडे मध्ये प्रवेश केला. इतक्यात इंटरनेटने स्वतःचा बराच पसारा वाढवला होता आणि इंटरनेटवर हिंदी बातम्यांना चांगले दिवस आले होते. हिंदीच्या या वाढत्या प्रसाराने सौरभ प्रभावित झाले. पत्रकारितेतील अनुभवासोबतच चांगली माहिती देण्याच्या जिज्ञासेतून त्यांनी स्वतःची वेबसाईट सुरु करण्याचे ठरवले. याच जिज्ञासेतून लल्लनटॉपचा जन्म झाला. लल्लनटॉप आज भारतातील सर्वात जास्त वाचली जाणारी वेबसाईट बनली आहे. यामागे सौरभ यांची अनोखी पत्रकरिता तर आहेच. पण, लोकांपर्यंत विश्वासार्ह माहिती पोचवण्याची तळमळ, बातमीचे खरे चेहरे जगासमोर आणण्याची धडपड यांचाही तितकाच वाटा आहे.
लल्लनटॉपने आज जे यश संपादन केले आहे, त्यामागे बराच मोठा संघर्षही आहेच. लल्लनटॉप म्हणजे डिजिटल पत्रकारितेतील एक रोल मॉडेल बनले आहे. याच्या यशामागचे खरे गमक हे आहे की, लल्लनटॉपमध्ये काम करणारे कुणीही पत्रकारितेतील पदवी घेतलेली नाहीये. त्यांना पत्रकारितेची पार्श्वभूमीही नाही. पण, ते स्मार्ट आहेत आणि त्यांच्या जवळ चांगला कंटेंट निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांचे काम चांगले होते.
सौरभ द्विवेदी एका मुलाखतीत लल्लनटॉपबद्दल बोलताना सांगतात की,
“सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्ही तरुण वाचकांना आकर्षित करण्याचे ध्येय ठेवले होते. हिंदीतून चांगली माहिती ज्यांना हवी आहे, असा वाचक वर्ग डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करतो. विशेष म्हणजे इथे काम करणाऱ्या सर्वांचा लल्लनटॉपच्या या कल्पनेवर विश्वास आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण, त्यांनीच यावर विश्वास नाही ठेवला तर दुसरे कोणी का विश्वास ठेवेल?
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे, आम्ही जी माहिती देतो ती कॉपी पेस्ट अजिबात नसते. लल्लनटॉपच्या माहितीत तथ्य असते. दुसऱ्या कोणत्या तरी वेबसाईटवरील कंटेंटची उचलबांगडी करून जास्त काळ काम करता येत नाही. असे काम वाचकांना रुचतही नाही. यातून तुमची वैशिष्ट्यपूर्ण इमेजही तयार होत नाही. म्हणून सगळ्यात जास्त गरज असते ती कंटेंटवर काम करण्याची.”
वेबसाईट पत्रकारिता हे या जमान्यातील एक मजबूत व्यासपीठ आहे. या माध्यमातून आणखीन तरुण पत्रकारांना प्रेरणा मिळेल व ते आपले काम प्रामाणिकपणे, बातमीची सत्यता लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रेरणेतून करत राहतील अशी अपेक्षा करूया.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.