आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
हॉकी हा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे पण आपल्या देशात क्रिकेट खूप जास्त प्रमाणात खेळलं जातं. तरुणांना फुटबॉल पाहायला खूप आवडतं या सगळ्या खेळांच्या तुलनेत आपल्या भारतात बास्केटबॉल हा खेळ काही प्रमाणात दुर्लक्षित आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे हा खेळच आपल्या इथल्या कित्येक लोकांना माहिती नाही. मग यातले खेळाडू माहिती असण्याची शक्यता तर त्याहूनही कमी.
आपल्याला क्रिकेट खेळणारा कपिल देव माहिती असतो, हॉकी मधले मेजर ध्यानचंद माहिती असतात, किंवा बॅटमिंटन खेळणारी सानिया नेहवाल सुद्धा माहिती असते.
तुम्हाला बास्केटबॉल मधले खुशीराम माहिती आहेत का ? जर तुमचं उत्तर नाही हे असेल तर आज आम्ही तुम्हाला खुशीराम यांची ओळख करून देणार आहोत.
जर तुम्ही बास्केटबॉल या खेळाचे चाहते असाल तर तुम्हाला मायकल जॉर्डन नक्कीच माहिती असेल. माहिती नसेल तर सांगतो की मायकल जॉर्डन हा खेळाडू आपल्या खेळाने पूर्ण मैदान डोक्यावर घ्यायचा. पण जर तुम्हाला असं सांगितलं की असाच एक जॉर्डन आपल्या भारतात सुद्धा होऊन गेला आहे. तर? तुमचा विश्वास बसेल? नाही ना?
चला तर मग मलेशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वात जास्त गुणक्रमांक करण्याचा किताब मिळवणाऱ्या जगप्रसिद्ध भारतीय बास्केटबॉलपटू खुशीराम यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.
७ ऑगस्ट १९३६ रोजी २००० लोकवस्ती असणाऱ्या हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील झामरी गावात खुशीराम यांचा जन्म झाला. मोठे झाल्यावर खुशीराम हे वयाच्या चौदाव्या वर्षी सैन्यात, दिल्लीत असणाऱ्या राजपुताना रायफल्स या तुकडीत भरती झाले.
६.४ इंच एवढी भारदस्त उंची असणाऱ्या या युवकावर प्रशिक्षकाची नजर पडली व त्यांनी खुशीराम यांना बास्केटबॉल खेळण्याचा सल्ला दिला. सुभेदार मूलचंद हे खुशीराम यांचे पहिले प्रशिक्षक होते, त्यांनीच खुशीराम यांना बास्केटबॉल या खेळातील बारकावे शिकवले.
१९५२ मध्ये खुशीराम यांनी आपली पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळली. प्रत्येक खेळाडू प्रमाणेच खुशीराम यांचंसुद्धा भारतासाठी खेळून देशाचं नाव मोठं करण्याचं स्वप्न होतं. या स्वप्नासाठी ते ११ वर्ष सैन्यदलाकडून खेळत राहिले.
१९६४मध्ये कोलोम्बो इथे आयोजित झालेल्या चौथ्या क्वाड्रेंगुलर स्पर्धेत ते सहभागी झाले. आणि खुशीराम यांना पहिल्यांदा भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
निवडकर्त्यांच्या विश्वासास पात्र ठरत ते या स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक गुणक्रमांक नोंदवणारे खेळाडू ठरले. त्यांची या स्पर्धेतील कामगिरी पाहता १९६५दरम्यान मलेशिया येथे होणाऱ्या एशियन बास्केटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने त्यांना संघाची जबाबदारी सोपवली. याबरोबरच कर्णधारपदाची धुरा देखील त्यांच्याच खांद्यावर दिली. इथेसुद्धा खुशीराम आपली जादू कायम ठेवत या स्पर्धेत ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गुणक्रमांक कमावणारे खेळाडू ठरले.
या वेळी भारताने जागतिक क्रमवारीत आपले सातवे स्थान पटकावले होते. १९६७च्या दरम्यान साऊथ कोरिया इथे झालेल्या स्पर्धेत अजून चांगली कामगिरी करत भारतीय संघ सहाव्या क्रमांकावर आला होता. या स्पर्धेनंतर फिलिपीन्स येथे झालेल्या एका स्पर्धेत भारतीय संघाला खूप मोठ्या गुणांनी पराभवाला सामोरं जाव लागलं होतं. या सामन्यात भारताचे ६३ गुण होते व त्यातले ४० गुण हे एकट्या खुशीराम यांनी केले होते.
त्यांच्या या कामगिरीची दखल घेत खुशीराम यांना सरकारने अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं होतं.
१९७० साली फिलिपीन्सची राजधानी मनाली इथे आमंत्रित स्पर्धा खेळण्यात आली होती. या स्पर्धेत ७ सामन्यात खुशीराम यांनी एकट्याने १९६ एवढे गुण मिळवले होते. एशियन बास्केटबॉलचे पॉवरहाऊस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिलिपीन्सच्या विरुद्ध त्यांनी एका सामन्यात ४३ गुण पटकावले.
असं म्हटलं जातं की, एकाच सामन्यात एवढे गुण मिळवणारे खुशीराम हे एकमेव खेळाडू होते. त्यांच्या या विक्रमाला आजवर सुद्धा कोणी तोडू शकलं नाहीये.
या स्पर्धेत खुशीराम यांना ३ पुरस्कार मिळाले. पहिला सर्वात्कृष्ठ खेळाडूचा पुरस्कार, दुसरा सर्वश्रेष्ठ शूटरचा पुरस्कार, व तिसरा स्पर्धेतील सर्वात उत्कृष्टरीत्या सेंटर पोजीशनच्या खेळाडूचा पुरस्कार.
या स्पर्धेनंतर खुशीराम यांना बऱ्याच संधी मिळाल्या. त्यात काही विदेशातील संघांकडून खेळण्याच्या सुद्धा होत्या. पण खुशीराम यांनी विदेशी संघांकडून खेळण्यास कायम नकारच दिला. ते स्वतःच्या भारतीय संघासाठी खेळत राहिले. १९७० च्या आशियाई स्पर्धात खुशीराम यांना संघात घेण्यात आले होते. पण ट्रेनिंग कॅम्प दरम्यान त्यांच्या डोळ्याला जखम झाली आणि ते या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत.
याच वर्षी बास्केटबॉलची पंढरी समजल्या जाणाऱ्या अमेरिकेसोबत स्प्रिंगफिल्ड कॉलेजचा संघ भारतात औपचारिक सामना खेळला होता. या सामन्यात अमेरिकेचा संघ खूप सहज जिंकला असता. पण संघात खुशीराम असल्याने त्यांना या सामन्यात हार पत्करावी लागली. या सामन्यात खुशीराम यांनी केवळ ४० मिनिटांच्या खेळात अमेरिकेला हरवलं होतं.
१९५२ ते १९७२ पर्यंत भारतीय संघांकडून, राजस्थान संघांकडून व फौजेच्या संघांकडून खेळल्यानंतर खुशीराम व्यावसायिक बास्केटबॉलच्या खेळातून निवृत्त झाले. यानंतर त्यांनी बास्केटबॉलचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. बरीच वर्ष ते श्री रामरायन्स व राजस्थानच्या संघासाठी मार्गदर्शन करत होते. त्यांनी या काळात सदर संघांना खेळातील बारकावे शिकवले ज्यांच्या जोरावर हे संघ कित्येक स्पर्धा जिंकले सुद्धा.
हनुमान सिंग, अजमेर सिंग यांच्यासारख्या कितीतरी महान खेळाडूंनी खुशीराम यांच्या देखरेखीखाली ऑलम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये आपली दमदार कामगिरी दाखवली. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सुद्धा हा माणूस कोटा या शहरातील मॉडर्न स्कुलच्या मुलांना बास्केटबॉलने जग बदलण्याचे धडे देत होता.
२९ डिसेंम्बर २०१३मध्ये खुशीराम आपल्या गावात एका स्पर्धेचे बक्षीस वितरण करत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं.
खुशीराम हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बास्केटबॉलशी जोडले गेले होते. २०१५ साली भारतीय बास्केटबॉल संघाने खुशीराम यांच्या जन्मगावात त्यांचं स्मारक उभारले. हे स्मारकाच्या रूपानी ते, त्यांचे या खेळातील योगदान कायम सर्वांच्या स्मरणात राहतील हाच याचा उद्देश होता.
आपल्या देशात असे खूप महान खेळाडू आहेत जे इतिहासाच्या पानांच्या आड लपलेत. त्यांचं योगदान आपल्या पर्यंत पोहोचतच नाही. त्यांची माहिती आपल्याला व्हावी म्हणून हा लेख. खुशीरामसारख्या सगळ्या खेळाडूंना आमचा सलाम!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.