आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
क्रिकेटमध्ये आज भारतीय संघाची एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. आज भारतीय संघ एक मजबूत संघ म्हणून ओळखला जातोय. याची सुरुवात नेटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यापासून झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतीय संघाने तसा अनेक ठिकाणी विजयाचा इतिहास रचला आहे, पण लॉर्डसच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध जिंकलेल्या त्या सामन्याने मात्र एक नवा इतिहास रचला. याच सामन्याने भारतीय संघाला एक नवी ओळख दिली.
हातातून गेलेला सामना खिशात टाकण्याची ही किमया भारतीय संघाने कशी साधली? गांगुलीच्या नेतृत्वाने भारतीय संघाला अशी कोणती संजीवनी मिळाली ज्यामुळे भारतीय संघाचा असा कायापालट झाला जाणून घेऊया या लेखातून.
२००० सालापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर हा त्रिकोणी एकदिवसीय सामना भरवला जाऊ लागला. या सामन्यात इंग्लंड विरुद्ध इतर दोन देशांचे संघ अशी लढत असल्याने याला त्रिकोणी सामना म्हटले जाते. नॅशनल वेस्टमिन्स्टर बँकेकडून पुरस्कृत गेले जाणारे हे सामने नेटवेस्ट या नावाने ओळखले जाऊ लागले.
१३ जुलै २००२ रोजी लॉर्डसच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड मधील हा सामना आजवर एक अविस्मरणीय सामना ठरला , याला अनेक कारणे आहेत.
समोर इंग्लंड सारखा मजबूत संघ असतानाही भारतीय कर्णधार सौरभ गांगुलीने सामन्याचे नियोजन खेळाडूंना समजावून सांगितले. इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. सौरभच्या सगळ्या योजनांची अक्षरश: वाट लागली. एकही गोलंदाजाला इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजीला रोखण्यात यश आले नाही. एकट्या जाहीर खानने या सामन्यात तीन विकेट घेतले होते. बाकी कुंबळे आणि नेहरा यांनी एकेक विकेटवरच समाधान मानले.
अशा कमकुवत गोलंदाजीचा फायदा घेत इंग्लंडच्या नसीर हुसेनने ११५ तर मार्कस ट्रेस्कोथिकने १०९ धावा काढल्या.
इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतासमोर ३२५ धावांचा डोंगर उभा केला. आता एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग भारतीय संघ कसा करणार आणि या सामन्याचा निकाल काय असणार याबद्दल सर्वांनाच चिंता आणि उत्सुकता वाटत होती.
भारताचे फलंदाज मैदनावर उतरले तेव्हा चांगली सुरुवात झाली होती. सेहवाग आणि गांगुली हे दोघे सलामीवीर होते. दोघांनीही चांगली सुरुवात केली होती. गांगुलीच्या ६० धावा आणि सेहवागच्या ४५ धावांनी मजबूत पाया रचला होता. असाच खेळ सुरू राहिला तर सामना जिंकण्यात काहीच अवघड नाही, असे वाटत असतानाच एकामागून एक गांगुली आणि सेहवाग दोघेही तंबूत परतले.
तरीही अजून सचिन, द्रविड आणि दिनेश मोंगियासारखे फलंदाज संघात होते. त्यामुळे अजूनही तसे तणावाचे वातावरण निर्माण झाले नव्हते. दिनेश मोंगियाचा खेळ तर तेव्हा खूपच फार्मात होता त्यामुळे त्याच्याकडून सगळ्यांनाच खूप अपेक्षा होत्या. पण झाले उलटेच. फक्त ९ धावा करून मोंगिया आउट झाला. स्ट्यूअर्टने त्याचा झेल घेतल्याने त्याला तंबूत परतावे लागले. त्यानंतर सचिननेदेखील आपला खेळ लवकरच गुंडाळला. १४ धावा करून सचिनही आउट झाला.
एकेक मोठे फलंदाज इतक्या कमी धाव संख्येवर आउट झाल्याने भारतासाठी हा सामना हरल्यात जमा होता. सचिन आउट झाल्यावर तर काही लोकांनी टीव्ही बंद केले. का? तर सामना हरणारच अशी त्यांना खात्रीच पटली होती.
पण, गांगुलीचा आत्मविश्वास कायम होता. तो पॅव्हेलियनमधून सामना पाहत होता तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर थोडाही तणाव दिसत नव्हता आणि त्याने आपल्या सहकारी खेळाडूंवरही तणाव येऊ दिला नाही. पहिले पाच खेळाडू तंबूत परतले होते आणि धावसंख्या अगदी मुंगीच्या चालीने वाढत होती तरीही दादाला विश्वास होता की भारत हा सामना जिंकणारच.
भारतीय फलंदाजी ढिली पडली होती. भारतीय संघ जिंकणे निव्वळ अशक्य असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
इतक्यात युवराज आणि मोहम्मद कैफ मैदानावर उतरले पण त्यांच्या क्षमतेवर कुणाला फारसा विश्वास नव्हता.
या नवख्या खेळाडूंना आपले स्थान मजबूत करण्याची ही एक नामी संधी होती. त्यांनी घाबरून न जाता शांतपणे आपली बॅटींग सुरु केली. दोघांनी चांगली भागीदारी केली होती. भारतीय संघाला त्यांनी चांगली धावसंख्या मिळवून दिली. दोघांचा खेळ पाहून सर्वांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या. २६७ धावसंख्या झालेली असताना युवराज ६९ धावांवर आउट झाला. त्याच्या जाण्याने कैफने आपल्या खेळावर काहीही परिणाम होऊ दिला नाही. त्याने ७५ चेंडूत ८७ धावा केल्या. यात ६ चौकार आणि २ षटकार होते. या कामगिरीसह ‘मॅन ऑफ दि मॅच’चा किताब त्याने आपल्या नावे केला.
शेवटची धाव पूर्ण होताच सर्वत्र जल्लोष सुरू झाला. गांगुलीने तर आपल्या अंगातील शर्ट काढून तो लॉर्डसच्या मैदानावर भरल्या स्टेडियममधे गरागरा फिरवला होता.
या सामन्याच्या काही महिने आधीच इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा इंग्लंड संघाच्या अँड्र्यू फ्लिंटॉफने आपल्या संघाच्या विजयावर असाच जल्लोष व्यक्त केला होता. म्हणून सौरवनेही त्याच्याच स्टाईलमधे त्यांच्याच मैदानात तसाच जल्लोष व्यक्त केला. त्याने अँड्र्यूला त्याच्याच भाषेत उत्तर दिले.
या विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास आणखी दुणावला. २००३च्या वर्ल्डकपमधेही भारतीय संघाने फायनल पर्यंत मजल मारली होती. अर्थात तो सामना त्यांना जिंकता आला नाही ही वेगळी गोष्ट. पण आता भारतीय संघाचा चेहरामोहरा बदलला होता. हरभजन, युवराज, सेहवाग, जाहीर खान आणि कैफ सारख्या खेळाडूंमुळे भारतीय संघात एक जोश भरला होता.
या खेळाडूंच्या दमदार खेळामुळेच भारतीय संघाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. नेटवेस्ट ट्रॉफीने भारतीय संघाला एक वेगळी कलाटणी दिली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.