आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
हिमालय पर्वत म्हणजे भारताला लाभलेले एक अद्भुत आणि अमूल्य वरदान आहे. दरवर्षी हा हिमालय जगभरातील हजारो पर्यटकांना आकर्षित करत असतो. गिर्यारोहकांना तर हिमालयाचे प्रचंड आकर्षण आहे. हिमालयाच्या पर्वत रांगेत त्रिशूळाप्रमाणे तीन पर्वतांची टोके एकत्र दिसतात. ज्याला त्रिशूल पर्वतरांग संबोधले जाते. उत्तरांचलमधील चामोली जिल्ह्यातील या ५००० फुट उंच असलेल्या या पर्वत रांगावर नंदा देवी मातेचे मंदिर आहे.
या मंदिराकडे जायच्या वाटेवरच रूपकुंड तलाव आहे. हा तलाव हिवाळ्यात तर बर्फाने अच्छादलेला असतो पण, उन्हाळ्यात यातील बर्फ जेव्हा वितळतो तेव्हा याच्या तळात फसलेले मानवी हाडांचे सांगाडे वर तरंगू लागतात.
या १९४२ साली एच. के. माधवाल या गिर्यारोहकाने पहिल्यांदा या तलावावर तरंगणाऱ्या या सांगाड्यांचा अभ्यास केला. तेंव्हापासून आजतागायत ही सांगाडे कुणाची आहेत? ती इथे कशी आली? याबाबत विविध संशोधकांनी आपल्याआपल्या परीने काही तर्क मांडण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक लोकांमध्ये या हाडांच्या सांगाड्यावरून काही दंतकथाही प्रचलित आहेत.
या तलावात जवळपास ३०० मानवी हाडांचे सांगाडे आहेत. इथल्या स्थानिक लोकांमध्ये प्रचलित असणाऱ्या दंतकथेनुसार नंदादेवी माता तिच्या परिसरातील जनतेचे रक्षण करते. कनौजच्या राजांनी आपल्या प्रजेचे अतोनात हाल केल्याने त्यांच्यावर माता नंदा देवीचा कोप झाला.
सुमारे १२०० वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, एकदा कनौजचा राजा जसधवल आपली राणी बालंपा आणि काही दरबाऱ्यांसोबत नंदादेवीच्या दर्शनासाठी निघाला होता. देवीच्या दर्शनाला जातानाही त्यांच्याकडे भक्तीभाव नव्हता, उलट हे सगळे लोक मौजमजा करण्यातच गढून गेले होते. आधीच प्रजेवर होणाऱ्या अत्याचार चिडलेल्या नंदादेवीचा ही अशी मौजमजा बघून अधिकच प्रकोप झाला.
तिच्या प्रकोपाने हे लोक प्रवासात असतानाच एक मोठे वादळ उठले आणि हा सगळा लवाजमा या तलावात बुडून गेला. तेव्हापासून त्या सर्वांचे सांगाडे या तलावात पडून आहेत, असे म्हटले जाते.
या सगळ्या मृतात्म्यांमुळे या परिसरात काही विचित्र घटना घडत राहतात, ज्याला घाबरून कोणीही स्थानिक रहिवासी या परिसरात फिरकत नाहीत. म्हणूनच हा परिसर एकदम निर्जन असतो.
काही लोकांच्या मते, इथे खूप खूप वर्षांपूर्वी मानवीवस्ती होती. तिथे अचानक साथीचा रोग पसरला आणि इथले सगळे लोक या साथीत मारले गले. काही लोकांच्या मते हे सैन्याचे जवान आहेत जे बर्फाच्या वादळामध्ये गाडले गेले. इंडिया टुडेने काही वर्षापूर्वी यावर एक बातमी छापली होती. त्यांच्यामते १८४१ मधील तिबेट युद्धावरून परत आलेल्या सैनिकांचे हे सांगाडे आहेत. अशा अनेक कथा या सांगाड्यांभोवती गुंफण्यात आल्या आहेत.
ज्या गिर्यारोहकांना चढाई सोबतच अशा रहस्यमय वातावरणात राहण्याचा अनुभव घ्यायचा असतो ते मात्र आवर्जून या तलावाला भेट देतात. फक्त गिर्यारोहकच नाही तर, पत्रकार आणि संशोधकांना देखील या तलावाचे विशेष आकर्षण आहे.
१९४२ साली या ठिकाणी गेलेल्या एच. के. माधवाल यांनी पहिल्यांदा या सांगाड्यातील काही हाडांचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी सांगितले की, ही हाडे सुमारे ९०० वर्षे जुनी आहेत. तेव्हापासून तर अनेक संशोधकांनी अभ्यासासाठी इथली हाडे नेली आहेत. काही अतिहौशी पर्यटकांनीही यातील हाडे स्वतःसोबत नेली आहेत. शिवाय, काळी जादू करणारे मांत्रिकांनीही याठिकाणची काही हाडे लंपास केली आहेत.
विविध अभ्यासकांनी या हाडांचा अभ्यास करून काही निष्कर्ष मांडले आहेत. या सांगाड्यांतील ७१ सांगाड्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. या सांगाड्यांची कार्बन डेटिंग चाचणीही करण्यात आली आहे. हे सगळे सांगडे वेगवेगळ्या कालखंडातील आणि वेगवेगळ्या वांशिक समूहाचे असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे राजा-राणी आणि देवीचा प्रकोप होण्याची कथा निव्वळ पुराणकथा असल्याचे सिद्ध होते.
या संगड्यात महिला आणि पुरुषांचेही सांगाडे आहेत. कदाचित हे सगळे सांगाडे एकाच कुटुंबातील व्यक्तींचे असावेत या अंदाजाने यांच्या डीएनएचाही अभ्यास करण्यात आला, पण या सांगाड्यांच्या डीएनएमध्ये खूपच फरक आढळतो त्यामुळे हे एकाच कुटुंबातले किंवा एकाच वंशातील लोकांचे सांगाडे नाहीत हेही सिद्ध होते. शिवाय, हे सांगाड्यांमध्ये कुठल्याही साथीचे रोग पसरवणाऱ्या जीवाणूंचे अवशेष मिळालेले नाहीत. त्यामुळे हे सगळे लोक साथीच्या आजारात मारले गेल्याचा दावाही खोटाच म्हणावा लागेल.
यातील काही सांगाडे हे भारत आणि आसपासच्या देशातील आहेत. काही सांगाडे हे ग्रीसच्या परिसरातील तर काही पूर्वेकडील देशातील आहेत.
भारत आणि आसपासच्या प्रदेशातील सांगाडे हे सातव्या ते दहाव्या शतका दरम्यानचे आहेत. ग्रीस आणि त्या परिसरातील सांगाडे हे सतराव्या ते बाविसाव्या शतकाच्या काळातील आहेत. तर पूर्वेकडील सांगाडे हे त्यानंतरच्या काळातील असल्याचे सिद्ध झाले आहे.
म्हणजेच इथे जमा झालेले हे सांगाडे कुठल्या एकाच काळातील नाहीत आणि ते एकाच नैसर्गिक प्रकोपाचे शिकार झालेले नाहीत. वेगवेगळ्या कालखंडात या ठिकाणी आलेल्या लोकांना इथल्या प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
रूपकुंड तलावाच्या या परिसरात अनेकदा हिमस्खलनासारख्या घटना घडत राहतात. यापूर्वीही कदाचित अशाच नैसर्गिक आपत्तीच्या काळात हे लोक त्यात फसले असतील आणि त्यांना जीव गमवावा लागला असेल असाही एक अंदाज आहे. कारण यातील अनेक सांगाड्यामध्ये फॅक्चर आढळून आलेले आहे. अभ्यासकांनाही कोणताच एक ठोस निष्कर्ष मांडणे शक्य झालेले नाही.
इथल्या स्थानिक लोकांमध्ये मात्र या तलावावरून अनेक दंतकथा, लोककथा प्रचलित आहेत. येणाऱ्या काळातही हा तलाव सांगाड्यांचा तलाव म्हणूनच ओळखला जाईल. या तलावाचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे, तरीही सांगाड्यामुळे या तलावाला मिळालेली ही ओळख लवकर पुसली जाण्याची शक्यता फार कमी आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.